मंगळवार, २४ जुलै, २०१८

प्रगतीपीठ : शिवाजी विद्यापीठ



 
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर हा सर्व भाग तसा ग्रामीण. विद्यार्थ्यांना सर्व कामासाठी पुण्याला जावे लागे. या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आणि ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी १९६२ मध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. सुरूवातीला कांहीनी या घटनेला "कोल्हापूर येथे आणखी एक खानावळ सुरू झाली", असे हिणवले. तर अनेक नोकरीसंदर्भातील जाहिरातीत 'शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत' अशी टिप असायची. आज हेचं विद्यापीठ अध्यापन, संशोधन आणि समाजप्रबोधन या तीनही प्रांतात स्वत:ची एक नवी ओळख निर्माण करत आहे.  'नवे गाव आंदोलनया मासिकाने जून २०१८चा अंक शिक्षण या विषयावर काढला. त्यातील शिवाजी विद्यापीठासंदर्भातील लेख 'नवे गाव आंदोलन' मासिकाच्या सौजन्याने आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
------------------------------------------------------------------------------------ 

 

 कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर हे सर्व जिल्हे पुर्वी पुणे विद्यापीठाशी सलंग्न होते. हा सर्व भाग तसा ग्रामीण. या भागातील विद्यार्थ्यांना सर्व कामासाठी पुण्याला जावे लागत असे. या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आणि ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाचे स्वप्न राजाराम महाराजानी पाहिले होते. ही इच्छा राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्य केलेले बाळकृष्ण बोलून दाखवत असत. पुढे त्यांचे विद्यार्थी राहिलेले तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई आणि इतर मंडळींच्या प्रयत्नातून कोल्हापूर येथे १९६२ मध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. कोकणातील रत्नागीरीसह पाच जिल्ह्यासाठी विद्यापीठ सुरू झाले. सुरूवातीला कांहीनी या घटनेला कोल्हापूर येथे आणखी एक खानावळ सुरू झाली असे हिणवले. तसेचं अनेक नोकरीसंदर्भातील जाहिरातीत 'शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत' अशी टिप असायची. आज हेचं विद्यापीठ अध्यापन, संशोधन आणि समाजप्रबोधन या तीनही प्रांतात स्वत:ची एक नवी ओळख निर्माण करत आहे. त्यावेळी सागर माळ म्हणून प्रसिद्ध असलेली जागा विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आली. हा भाग तसा गावापासून, मानवी वस्तीपासून दूर होता. हळू हळू या परिसरात विद्यापीठासाठी प्रशासकिय आणि अधिविभागाच्या इमारतींचे बांधकाम सुरू झाले आणि सागर माळाचे विद्यानगरीत रूपांतर होवू लागले. सुरूवातीला विद्यापीठाला पाच जिल्हे जोडले गेले असले तरी नंतर रत्नागीरी जिल्हा हा पुन्हा मुंबई विद्यापीठाला जोडला गेला. पुढे २००४ मध्ये स्वतंत्र सोलापूर जिल्ह्यासाठी विद्यापीठ स्थापन झाले आणि आज कोल्हापूर, सातारा आणि सांगली असे तीन जिल्ह्यांचे मर्यादित कार्यक्षेत्र राहिले आहे.
      दोन जिल्हे कमी झाले तरी विद्यापीठाची विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सातत्याने वाढत आहे. पहिल्या पदवी प्रदान कार्यक्रमात १९६४ मध्ये १०९४ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केवळ दहा वर्षात पदव्यांची संख्या दहा पटीने वाढली. विद्यापीठाने १९७४मधील पदवी प्रदान कार्यक्रमात १००५१ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या.  १९८४ मध्ये ही संख्या १२६२८ इतकी झाली. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या उच्चतम पातळीवर पोहोचत आहे, असे वाटत असतानाचं साक्षरता जागृती आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्रपातळीवर मोठे प्रयत्न सुरू होते. तसेचं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यानी खाजगी महाविद्यालयाना परवानगी देण्यास सुरूवात केली. या नव्या धोरणाचा परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रात खाजगी महाविद्यालयांचे जाळे उभे राहू लागले. यामध्ये व्यावसायीक अभ्ययासक्रमांची संख्या मोठी होती. सहकारक्षेत्रातील मंडळीनी आणि सजग नेतृत्त्व असणाऱ्या अनेक संस्थानी अशी महाविद्यालये सुरू केली आणि त्याचा परिणाम म्हणून अभियांत्रीकी, वाणिज्य, वैद्यक, आयुर्वेद आणि शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढली. अर्थात विद्यापीठाने १९९४ मधे २४९३५ विद्यार्थ्याना पदव्या प्रदान केल्या. वैद्यक, आयर्वेद महाविद्यालयेही शिवाजी विद्यापीठापासून वेगळी झाली. तरीही विद्यापीठाची विद्यार्थीसंख्या कायम राखण्यात विद्यापीठ यशस्वी झाले. याचाचं अर्थ विद्यापीठ शिक्षणाचा पचार आणि प्रसार करण्यामध्ये यशस्वी झाले. ही संख्या २००४ मध्ये ४०००० पेक्षा जास्त झाली. पुढे सोलापूर जिल्हा वगळला जात असताना विद्यार्थी संख्येवर परिणाम अपरिहार्य होता. तो टाळण्यासाठी विद्यापीठाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. यामध्ये सर्वप्रथम विद्यापीठाच्या 'बहिस्थ विभागा'चे 'दूर शिक्षण विभागा'मध्ये रूपांतर करण्यात आले. आकाशवाणी आणि चलचित्र वाहिन्यावर जाहिरात देण्यात आल्या. याचा मोठा फायदा विद्यार्थी संख्या वाढवण्यामध्ये झाला. २०१७ मध्ये विद्यापीठाने ५०४४४ इतक्या विद्यार्थ्याना पदव्या प्रदान केल्या.
      या सर्व वाटचालीमध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग लक्षात घेणे आवश्यक आहे. पहिल्या पदवी प्रदान कार्यक्रमात १९६४ साली पदवी स्वीकारणाऱ्या महिलांची संख्या ही १९९ इतकी होती. ती १९७४ मध्ये १६२३ तर १९८४ मध्ये ३२६८ झाली. वीस वर्षात पहिल्या पदवी प्रदान कार्यक्रमापासून ही संख्या सोळा पटीने वाढली. मुलींची संख्यावाढ ही सातत्यपुर्ण राहीली आणि १९९४ मध्ये एकूण स्नातकामध्ये मुलींची संख्या ही ७८१७ इतकी झाली.  ज्या मुलींचे विवाहानंतर शिक्षण थांबते, त्या मुलीना या सुविधेची माहिती मिळावी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांचे सहाय्य घेण्यात आले. २०१८ च्या पदवी प्रदान कार्यक्रमात पदवी स्वीकारणाऱ्या मुलींची संख्या २६९३८ इतकी होती. सुरूवातीला या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण हे १८ टक्के इतेक होते. आज हे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून ते पन्नास टक्केपेक्षा जास्त करण्यामध्ये विद्यापीठ यशस्वी झाले आहे.
      अध्यापनाच्या क्षेत्रात विद्यापीठाने सुरूवात ही सहा अधिविभागापासून केली होती. आज विद्यापीठात एकोणचाळीस अधिविभाग आहेत. सुरूवातीला पारंपरिक अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर या भागातील शिक्षणाची गरज ओळखून विद्यापीठाने व्यावसायीक अभ्यासक्रमही सुरू केले. शिक्षणशास्त्र, विधी, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या यशस्वी प्रयोगानंतर विद्यापीठाने तंत्रज्ञान अधिविभाग सुरू केला आहे. यामध्येही पारंपरिक सिव्हीलसारखी शाखा सुरू करत असताना विद्यापीठाने अन्न तंत्रज्ञान सारखी नवी शाखा सुरू केली. आज या अभ्यासक्रमाला मोठी मागणी आहे. जुन्या पारंपरिक अभ्याक्रमाला नविनतम अभ्यासक्रमाची जोड देण्याचा विद्यापीठ प्रयत्न करत आहे. विद्यापीठात सध्या तंत्रज्ञान अधिविभाग आणि नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचे अध्यापन होत असतानाचं यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विद्यापीठ ग्रामीण विकासासाठी विद्यार्थी घडवत आहे. सुरूवातीला विद्यापीठात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दोन आकडी होती. ती आता सात हजारपेक्षा जास्त झाली असून ती पुढील दहा वर्षात १०००० इतकी करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
      विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील. अनेकांची परिस्थिती गरीबीची. त्याना कोल्हापूरमध्येही राहणे अवघङ. काम करायची तयारी असली, तरी तशी संधी नव्हती. ती शिवाजी विद्यापीठाने 'अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन'च्या माध्यमातून 'कमवा आणि शिका' योजना सुरू करून उपलब्ध करून दिली. पन्नास मुलाना आणि २५ मुलीना या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो. नाममात्र प्रवेश फी भरल्यानंतर विद्यार्थ्याला शैक्षणिक शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, परीक्षा फी असे कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. तसेचं विद्यार्थ्यांची राहण्याची आणि भोजनाची मोफत सोय केली जाते. यासाठी विद्यार्थ्यास उद्यान, ग्रंथालय, प्रशासकिय विभाग, फोटीकॉपी युनिट इत्यादी ठिकाणी नेमून दिलेल्या विभागात दररोज तीन तास काम करावे लागते.
      संशोधन हे कोणत्याही विद्यापीठात चालणारे एक महत्त्वाचे कार्य आहे. विद्यापीठाने अगदी सुरूवातीपासून विद्यापीठात नामवंत शिक्षकांची नियुक्ती करण्यास सुरूवात केली. परिणामत: विद्यापीठाच्या स्थापनेपासून विद्यापीठात संशोधन कार्य सुरू झाले. अगदी सुरूवातीच्या काळामध्ये पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विज्ञानशाखेतील विषयामध्ये संशोधन कार्यासाठी प्रयोगशाळा सुरू झाल्या. त्या त्या विभागातील शिक्षकानी आपले संशोधन निबंध जागतीक दर्जाच्या संशोधन पत्रीकामधून प्रकाशीत करायला सुरूवात केली आणि आपोआप जागतीक पातळीवर विद्यापीठाचे स्वत:चे असे स्थान निर्माण होवू लागले.  विद्यापीठातील शिक्षकांच्यामध्ये असणारे अनंत नारळीकर हे राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा, नवी दिल्ली येथे शास्त्रज्ञ म्हणून गेले. तथापी त्यानी विद्यापीठात त्या काळामध्ये मटेरिअल सायन्सवर संशोधन करणाऱ्या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची फळी तयार केली. त्याचप्रमाणे वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र विषयातील संशोधनाने एक आपले स्थान निर्माण केले. त्याचाच परिणाम म्हणून आज मटेरिअल सायन्समध्ये चालणारे शिवाजी विद्यापीठातील संशोधन हे देशात अव्वल क्रमांकाचे मानले जाते.
      शिवाजी विद्यापीठाने पश्चिम घाटातील जैववैविधतेवर मोठे संशोधन केले आहे. याचा परिणाम म्हणून विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागास या भागात दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकल्पाच्या निधीतून विद्यापीठामध्ये 'लीड बॉटेनिकल गार्डन'ची निर्मिती करण्यात आली आहे. पुढे काळाची पावले ओळखत सुरू झालेल्या जैवतंत्रज्ञान आणि ॲग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट हे अभ्यासक्रमही आपल्या उत्तम दर्जाच्या संशोधनासाठी ओळखले जातात. यातील जैवतंत्रज्ञान विभागाने संशोधनाच्या प्रांतात भारतात नववे स्थान पटकावले आहे. तसेच या विभागात चालणारा पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान या अभ्यासक्रमास डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीमार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, स्फटीकशास्त्र, सेंद्रिय रसायनशास्त्र, संख्याशास्त्र या विषयासह विज्ञानाच्या विविध विषयात विद्यापीठात संशोधन सुरू आहे. नव्याने सुक्ष्मजीवशास्त्र विभागही आपली संशोधनामध्ये आपली ओळख निर्माण करू लागला आहे. गणितामध्येही अनेक शिक्षकांचे शोधनिबंध उत्तम दर्जाच्या संशोधन पत्रिकामधून प्रसिद्ध होत आहेत. अवकाश शास्त्र अभ्यासक्रम हा भौतिकशास्त्र विभागात सुरू झालेला एक चांगला अभ्यासक्रम आहे. विद्यापीठाने या विषयातील संशोधनासाठी पन्हाळा येथे एक प्रयोगशाळा उभारली असून त्या ठिकाणी विविध रिसीव्हर्स बसवण्यात आले आहेत.  या ठिकाणी मिळणारी माहिती विविध प्रयोगशाळामध्ये पाठवली जाते.
      विद्यापीठ स्थापन झाले त्यावेळी विद्यापीठाकडे कोणतीही प्रयोगशाळा नव्हती. त्या काळात पदार्थांची निर्मिती विद्यापीठात केली जायची. त्याचे गुणधर्म तपासण्यासाठी विद्यार्थ्याना आणि मार्गदर्शकाना अन्य संस्था किंवा प्रयोगशाळामध्ये जावे लागत असे. नंतर अगदी मागील शतकाच्या शेवटी क्ष-किरण विकीरण उपकरणासारखी उपकरणे विद्यापीठामध्ये येवू लागली. आज मात्र वैज्ञानिक संशोधनासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. विद्यापीठाने विविध संस्थाशी केलेल्या सामंजस्य करारामुळे विविध मापन सुविधा विद्यापीठात उपलब्ध झाल्या. विज्ञानातील संशोधनाप्रमाणेचं मानव्यशास्त्र आणि कला शाखेमध्येही संशोधन सुरू आहे आणि विद्यापीठातील अनेक शिक्षकानी आपली गुणवत्ता आपल्या संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध केली आहे. विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना विविध संशोधनवृत्ती मिळतात. तरीही विद्यापीठाने ज्याला कोणतीही संशोधनवृत्ती मिळत नाही, अशा प्रत्येक अधिविभागातील एका विद्यार्थ्यास स्वनिधीमधून अध्ययनवृत्ती सुरू केली आहे.
                विद्यापीठातील नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमही आता सुरू झाला आहे. या विद्यार्थ्याना अभ्यासक्रम पुर्ण करत असतानाचं संशोधक वृत्ती निर्माण व्हावी यादृष्टीने त्याना प्रशिक्षण देण्यात येते. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. पोष्ट डॉक्टरल रिसर्चसाठी भरीव विद्यावेतनावर परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारी २०१८च्या 'करंट सायन्स'च्या अंकामध्ये भारतातील संशोधनाची सद्यस्थिती सविस्तरपणे प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये भारतातील संशोधन क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या संस्थांची विविध पैलूना अनुलक्षून माहिती देण्यात आली आहे. या अंकातील 'रिसर्च आउटपूट ऑफ इंडियन इंस्टिट्युशन्स ड्युरिंग २०११-१६:क्वालीटी अँड क्वांटीटी परस्पेक्टीव्ह' लेखात 'साय-व्हॅल' निर्देशांकाच्या आधारे माहिती देण्यात आली आहे.
      सन २०११ ते १६ या पाच वर्षात शिवाजी विद्यापीठाने १९२८ प्रकाशने प्रसिद्ध केली आहेत आणि देशातील अकृषी विद्यापीठातील संशोधनामध्ये ते आठव्या स्थानी आहे. त्याशिवाय या संशोधन संस्थाच्या 'फिल्ड वेट सायटेशन निर्देशांका'वर आधारीत विषयनिहाय क्रमवारीमध्ये मटेरिअल सायन्स, भौतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रीकी या विषयामध्ये देश पातळीवर सर्वसाधारण यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या वर असणाऱ्या संस्था या खुप जुन्या आणि शासनाचे निव्वळ संशोधनासाठी भरीव अनुदान प्राप्त करणाऱ्या आहेत. विद्यापीठातील शिक्षकानी संशोधनामध्ये केलल्या या भरीव आणि महत्त्वपुर्ण कार्यामूळे आज शिवाजी विद्यापीठास 'रूसा' आणि केंद्र शासनाच्या विविध योजनातून भरीव अर्थसहाय्य उपलब्ध होत आहे. निश्चितच नजीकच्या काळात संशोधनात शिवाजी विद्यापीठ आपला क्रमांक आणखी सुधारू शकेल, यात शंका नाही.
      शिवाजी विद्यापीठ स्थापनेपासून समाज प्रबोधनाच्या कार्यात अग्रभागी आहे. विद्यापीठ स्थापनेच्या पहिल्या दशकातचं विद्यापीठाने 'एक महाविद्यालय, एक खेडे' ही अभिनव योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून खेड्यातील लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी बहिश:ल शिक्षण मंडळ कार्यरत राहिले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यामार्फत जनजागृतीसाठी विविध प्रसंगानिमित्त प्रभात फेऱ्या अनेक वर्ष काढण्यात येत. आजही दुर्गसंवर्धन भावना विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावी या हेतून 'रायगड परिक्रमा'सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विद्यापीठाने आपल्या विविध व्याख्यानमाला या ग्रामीण भागातील महाविद्यालयात आयोजीत करण्यास सुरूवात केली. विद्यापीठामध्ये प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाने प्रौढ शिक्षणासाठी भरीव योगदान दिले. आपल्या पदवीधराना स्वत:च्या पायावर उभा राहता यावे, यासाठी विविध अभ्यासक्रमांची निर्मिती केली. ग्रामीण भागातील ग्रंथालय व्यवस्थापन, सूत्रसंचलन, रेडिओ जॉकी, दागीने बनवणे, सुगम संगीत, दूधाचे सुक्ष्मजीवशास्त्र, संगणकसंबधी अभ्यासक्रम, पर्यटक मार्गदर्शक अशा प्रकारचे विविध ८५ पारंपरिक आणि अद्ययावत कौशल्यांचे ज्ञान देणारे अभ्यासक्रम राबवण्यात येवू लागले आणि विद्यापीठ परिसरातील जनसामान्याना रोजगाराची संधी उपलब्ध होवू लागली.
      त्याचप्रमाणे विद्यापीठाने लोक विकास केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रामार्फतही अल्प मुदतीचे ३३ विविध अभ्यासक्रम राबवले जातात. उद्यान निर्मिती, प्रयोगशाळा व्यवस्थापन, रोपवाटीका व्यवस्थापन, अशा अभ्यासक्रमामधून लोकाना आपले कौशल्य वर्धन करण्याची आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या अभ्यासक्रमाना सातवी उत्तीर्ण पासून कोणीही त्या त्या अभ्यासक्रमाच्या अर्हतानुसार प्रवेश घेवू शकतो. यासाठी प्रवेश घेणारा हा पदवीधर असण्याची अट नाही. तसेचं तो विद्यर्थी असण्याची आवश्यकता नाही. या अभ्यासक्रमांचा कालावधी हा ही तीन महिने ते वर्ष असा आहे. हे अभ्यासक्रम अर्धवेळ असल्याने आपला उपजिवीकेचा व्यवसाय सांभाळून हे शिक्षण घेता येते.
      विद्यापीठाचे उद्यान आणि वृक्षराजीच्या माध्यमातून विद्यापीठाने कोल्हापूर परिसरात स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठ परिसरात १३००० पेक्षा जास्त वृक्ष आहेत. यावर्षी सामाजिक वनीकरण विभाग आणि विद्यापीठ प्रशासनाद्वारा १३००० पेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याची तयारी करण्यात आली आहे. विद्यापीठ आपल्या परिसरातील बागा आणि वृक्षाना जास्तीत जास्त पुनर्प्रक्रिया केलेले पाणी वापरते. यासाठी परिसरात दोन प्रकल्प उभारले असून आणखी दोन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. विद्यापीठाने मागील काही वर्षात जलयुक्त विद्यापीठ ही संकल्पना राबवण्यास सुरूवात केली आहे. सन २०१७-१८ मध्ये विद्यापीठाने आपल्या वापरासाठी विद्यापीठ परिसरात साठवण्यात आलेले पाणी वापरले आणि एक नवा आदर्श घालून दिला आहे. २०१५ प्रमाणे अवर्षणाची परिस्थिती उद्भवली तरी विद्यापीठ पाण्याबाबत स्वंयपुर्ण राहील यादृष्टीने विद्यापीठाने आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विद्यापीठाने जलसाक्षरता आणि पाण्यासंदर्भात केलेल्या या वस्तुनिष्ठ प्रयत्नांची दखल विविध वृत्तपत्रे आणि मासिकानी घेतली आहे. याचंबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छता, जलसंधारण, आरोग्य, प्रौढ शिक्षण अशा विविध बाबीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करत आहे.
      क्रीडा विश्वातही विद्यापीठाने अनेक उत्तम खेळाडू दिले आहेत. शैलजा साळुंखे (टेबल टेनीस), वंदना शानबाग (ॲथलेटीक्स), राही सरनोबत (नेमबाजी), तेजस्वीनी सावंत (नेमबाजी), राधीका बराले (नेमबाजी), रेश्मा माने (कुस्ती), जयश्री बोरगे (ॲथलेटीक्स),  दीपक कुंभार (ॲथलेटीक्स), अमीत निंबाळकर पॉवर लिफ्टींग), वीरधवल खाडे (जलतरण), संभाजी वरूटे (कुस्ती) इत्यादी खेळाडू घडवण्यात विद्यापीठ यशस्वी झाले. या खेळाडूनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. आज विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटीक ट्रॅक तयार केला आहे. याचा लाभ विद्यार्थी आणि या भागातील खेळाडूना होत आहे.या भागात क्रीडा संस्कृती रूजवण्यात विद्यापीठ यशस्वी झाले आहे.
                विद्यापीठाने २०१२ मध्ये आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. विद्यापीठ स्थापन झाले त्यावेळी सागर माळ म्हणून प्रसिद्ध असलेला भाग आज विद्यानगर बनला आहे. ज्या अपेक्षेने या विद्यापीठाची स्थापना झाली त्या पुर्ण करत आहे. अध्यापन, संशोधन आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून या परिसराच्या प्रगतीसाठी, लोकांचे जीनमान उंचावण्यासाठी आपले योगदान देत आहे आणि  मन आणि बळकअ असणाऱ्या भागात मेंदू बळकट करणारे या भागातील एक केंद्र बनले आहे.

चौकट क्र. १ विद्यापीठाच्या प्रगतीसाठी लाभलेली नेतृत्त्व
अ.क्र.
कुलगुरूंचे नाव
कालावधी
१.
डॉ. अप्पासाहेब पवार
२०-०९-१९६२ ते २०-०१-१९७५
२.
बॅरिष्टर पी. जी. पाटील
२१-०१-१९७५ ते १६-०४-१९७८
प्राचार्य बी. एस. भणगे
१७-०४-१९७८ ते २८-०३-१९८०
प्राचार्य आर. के. कणबरकर
२२-०९-१९८० ते २१-०९-१९८३
प्राचार्य के. भोगीशयना
२२-०९-१९८३ ते २१-०९-१९८६
प्राध्यापक के.बी पोवार
२२-०९-१९८६ ते २१-०९-१९९२
७.
प्राध्यापक ए.टी. वरूटे
२२-०९-१९९२ ते १५-०६-१९९५
प्राध्यापक डी. एन. धनागरे
१-११-१९९५ ते ३१-१०-२०००
प्राध्यापक एम.जी. ताकवले
०१-११-२००० ते ११-०३-२००४
१०
प्राध्यापक एम.एम. साळुंखे
११-०६-२००४ ते ०२-०३-२००९
११
प्राध्यापक एन.जे. पवार
२७-०२-२०१० ते २६-०२-२०१५
१२
प्राध्यापक देवानंद शिंदे
१८-०६-२०१५ पासून आजतागायत

मंगळवार, १० जुलै, २०१८

गोष्ट जलयुक्त विद्यापीठाची!


  शिवाजी विद्यापीठ पाण्याबाबत स्वंयपुर्ण व्हावे म्हणून १९९९पासून प्रयत्न करण्यात आले. यावर्षी विद्यापीठाने सर्व पाणी आपले वापरले. महानगरपालीकेचे पाणी घेणे, पूर्ण बंद केले. यामागे असणाऱ्या प्रयत्नांची कथा मांडली आहे... गोष्ट जलयुक्त विद्यापीठाची....या लेखात. २०१६मध्ये शिवाजी विद्यापीठाने आपल्या जलयुक्त विद्यापीठ या मोहिमला सुरूवात केली. 'नवे गाव आंदोलन' या मासिकाने ५ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशीत केलेला अंक पाणी या विषयावर काढला. तो लेख 'नवे गाव आंदोलन मासिकाच्या सौजन्याने आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
------------------------------------------------------------------------------------ 


            शिवाजी विद्यापीठ हे दक्षीण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत, सह्याद्रिच्या पुर्व भागातील निसर्गरम्य परिसरात कोल्हापूर गावी स्थापन झाले. ग्रामीण भागातील शिक्षणाचा स्तर उंचावणे आणि घरोघरी शिक्षण पोहोचवण्याच्या हेतूने या विद्यापीठाची स्थापना झाली. उद्दिष्टांची पुर्तता करताना विद्यापीठाने हळूहळू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दर्जा सिद्ध करायला सुरूवात केली. विशेषत: भौतिकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र इत्यादी विषयातील संशोधनाची चर्चा जागतीक पातळीवर होते.  या क्षेत्रात आपण खुप चांगले संशोधन करत असल्याचे अनेक पाहण्यातून सिद्ध झाले आहे. विद्यापीठाने अत्याधुनिक नॅनोसायन्स, जैवतंत्रज्ञान असे अभ्यास सुरू करताना, यंशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ रूरल टेक्नॉलॉजीची स्थापना केली आणि आपण ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सिद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज अष्टावधानी होते. त्यांचे सर्व बाबीकडे बारीक लक्ष असायचे. त्यांच्या नावाने सुरू असलेले विद्यापीठही सर्वांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करत आहे.
            या विद्यापीठाला सागरमाळ भागातील ८५३ एकराचा परिसर लाभला आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपुर्वी या परिसरात राजाराम तलाव बांधण्यात आला होता. तेथून विद्यापीठ वापरासाठी पाणी घेवू लागले. तसेच एका विहिरीचे पाणी प्रयोगशाळासाठी आणि दुसऱ्या विहिरीचे उद्यानासाठी पाणी वापरले जात असे.  विद्यापीठाच्या इमारती हळूहळू उभारल्या जावू लागल्या. मुलांची - मुलींची वसतीगृहे बांधण्यात आली. अनेक विज्ञानाचे अभ्यासक्रम सुरू झाले आणि पाण्याची गरज वाढू लागली. महानगरपालीकेकडून पाणी घ्यायला सुरूवात झाली.
            आज विद्यापीठात ४० विभागामध्ये ४५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी वसतीगृहात राहतात. परिसरातील निवासस्थानात १०० पेक्षा जास्त कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहतात. विविध विज्ञान प्रयोगशाळामधून मोठया प्रमाणात संशोधन सुरू असते. या सर्वाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. नवे अभ्यासक्रम, संशोधन विषय आणि वाढती विद्यार्थी संख्या यामुळे पाण्याची गरज मोठया प्रमाणात वाढू लागली आणि पाण्यापोटी महानगरपालीकेला द्यावी लागणारी रक्कमही वाढू लागली. पुढे पुढे पाणी मिळणे कठिण होणार, हे ओळखून प्रथम १९९९-२००० मध्ये प्राध्यापक द.ना. धनागरे कुलगुरू असताना भाषा भवनच्या पाठीमागे तलाव बांधण्याचा निर्णय झाला. कामही सुरू झाले आणि सत्तर लाख रूपये खर्चून हा तलाव २००२ मध्ये पुर्ण झाला. मात्र या तलावात पाणी थांबत नव्हते. या प्रश्नावर  २००५ मध्ये खऱ्या अर्थाने विचार झाला. तलावात पाणी येण्यासाठी पाट तयार करावेत आणि या कामात राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य घेण्याबाबत तत्कालीन कुलगुरू माणिकराव साळुंखे यानी प्रेरीत केले.
            तत्कालीन रासेयो समन्वयक श्री भोळे यानी जातीने लक्ष घातले. अभियांत्रिकी  विभागाने पुर्ण सहकार्य केले आणि हा तलाव २००५ मध्ये पाण्याने पुर्ण भरून प्रथम वाहू लागला. या पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यासाठी ग्रंथालयाजवळ जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला. विद्यापीठाने महानगरपालीकेचे पाणी घेणे बंद केले. मात्र हे तलावातील पाणी डिसेंबरमध्ये संपले. पुन्हा काही महिने महानगरपालीकेचे पाणी घ्यावे लागले. त्या वेळेपासून विद्यापीठ साधारण आठ महिने स्वत: साठवलेले पाणी वापरू लागले. मनपाचे पाणी घेणे पुर्ण बंद व्हावे, या हेतूने दुसरा तलाव संगीतशास्त्र विभागाशेजारी बांधण्यात आला. नैसर्गिक परिस्थिती अनुकुल असल्याने केवळ साडेचोविस लाख रूपये खर्चून पाच कोटी लिटर पाणी साठवणक्षमता असणारा, हा तलाव बांधता आला. पुढे राष्ट्रीय योजना समन्वयक डॉ. संजय ठिगळे यानी हे कार्य सुरू ठेवले. त्यानंतर २०१४ मध्ये प्राध्यापक एन्.जे. पवार कुलगुरू असताना या तलावाच्या पश्चिमेस १०० फुट व्यासाची, पस्तीस फुट खोलीची विहीर खोदली.  लिड बॉटॅनिकल गार्डनला पाण्याची सोय व्हावी, या हेतूने वनस्पतीशास्त्र विभागातील प्रकल्पातून भाषा भवन तलावाच्या पश्चिमेस दोन शेत तळी आणि एक विहीर खोदण्यात आली. यातून बॉटनी विभागाच्या पाण्याचा ताण कमी झाला. या सर्व प्रयत्नामुळे विद्यापीठ पाण्याबाबत सुखी होते.
             मात्र पुन्हा २०१५ मध्ये पुर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. कोल्हापूरही त्याला अपवाद नव्हते. महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात कपात केली. एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला. विद्यापीठाला विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे कठिण झाले. सत्राचा कालावधी कमी करण्यात आला.  अशा वातावरणात दुष्काळाचा नेहमीचं सामना कराव्या लागणाऱ्या भागातून प्राध्यापक देवानंद शिंदे कुलगुरू म्हणून हजर झाले. त्यापुर्वी कांही दिवस अगोदर कुलसचिव पदाचा कार्यभार माझ्याकडे आला होता. विद्यापीठाला एक महिना परीक्षा अगोदर घ्याव्या लागल्या होत्या. ही बाब आम्हाला खुप खटकली होती. कोल्हापूरसारख्या निसर्ग संपन्न भागातील विद्यापीठावर ही वेळ आल्याची खंत मी कुलगुरू शिंदे सराना बोलून दाखवली. मराठवाड्यातील दुष्काळ अनेक वर्ष त्यानी अनुभवला होता. ते स्वत: जल संधारणाबाबत संवेदनशील होते. 'विद्यापीठाला पाण्याबाबत स्वंयपुर्ण बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करा, पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा. त्यासाठी सर्व प्रयत्न करा', असा मुक्त परवाना दिला. त्यांचे हे विधान तत्कालीन संचालक, मविवि मंडळ प्राचार्य डी. आर. मोरे सर, मी आणि अभियांत्रिकी विभागाचे उपकुलसचिव डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी प्रेरणा मानून आखणी करायला सुरूवात केली.
            तोपर्यंत पाण्याचे आणि जलसंधारणाच्या कामाचे महत्त्व अनेकांच्या लक्षात आले होते. शारीरीक शिक्षण संचालकांची संघटना मदतीसाठी पुढे आली. प्राध्यापक डी.के गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्य घ्यायचे आम्ही निश्चित केले. पहिला टप्पा म्हणून सर्व तळ्याना पाणी आणणाऱ्या चरींचे पुनरूज्जिवन करणे, पसिरातील दोन विहीरींचा गाळ काढणे आणि त्यांचे बांधकाम करणे ही कामे हाती घ्यावयाचे निश्चित केले.   महाविद्यालयीन शारीरीक शिक्षण संचालकांच्या संघटनेने दोन दिवसासाठी जेसीबी मशीन देण्याचे मान्य केले. १४ एप्रिल २०१६ रोजी पहिल्या शेत तळ्याच्या कामाचा शुभारंभ झाला. हे शेत तळे दोन दिवसात पुर्ण झाल्याने पुढील काम मोठ्या उत्साहाने सुरू झाले. पुढे साखळी पद्धतीने आणखी दोन शेत तळी पुर्ण करण्यात आली. या तळ्यांचे वैशिष्ट्य असे की एक भरल्यानंतर त्याचे जास्त झालेले पाणी आपोआप दुसऱ्या आणि ते भरले की तिसऱ्या तळात जाणार होते. या सर्व तळ्यांची उभारणी सुतार विहीरीजवळ करण्यात आली.
            त्याचवेळी सिंथेटीक ट्रॅक परिसरातील विहीरीचा गाळ काढण्याचे काम सुरू केले. विद्यापीठाचा सर्वात उंच भाग. कडक उन्हाळा आणि दुष्काळ असूनही गाळ काढल्यानंतर पस्तीस फुट खाली तळाशी थोडे पाणी येवू लागले. या परिस्थितीत हे निश्चितच आश्वासक आणि उत्साह वाढवणारे होते. या विहीरीचे तातडीने बांधकामही करून घेण्यात आले. ते संपताच सुतार विहीरीजवळील शिंदे विहीरीचे गाळ काढण्याचे काम सुरू केले.  ही  विहिरसुद्धा तीस फुट खोलीची. मात्र गाळाने पंचेविस फुट भरलेली होती. या विहीरीला गाळ निघताचं पाणी येवू लागले. पुर्ण गाळ निघाल्यानंतर तळाशी आठ फुट पाणी साठले. हे चित्र आमच्या प्रयत्नाची दिशा योग्य असल्याचे प्रमाण होते. या विहिरीचेही बांधकाम करण्यात आले.  गाळ काढून दोन्ही विहिरींच्या बांधकामास साडेसहा लाख रूपये खर्च आला.
            त्याचवेळी रासेयोचे स्वंयसेवक, अभियांत्रीकीचे कर्मचारी आणि उद्यान विभाग सर्वानी एकदिलाने या मोहिमेत सहभाग घेतला. प्रत्येकजण  आपले घरातील कार्य असल्यासारखे काम करत होता. त्यांच्यातर्फे सर्व तळ्याना येणारे पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करणे, अडथळे काढण्याचे काम सुरू होते. पुणे बेंगलोर रस्ता रुंदी करणात शाहू नाक्यापासून पश्चिम बाजूला जाणारे पाण्याचे प्रवाह पुर्णपणे विस्कळीत झाले होते. या रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी पश्चिम भागात जावे म्हणून रस्ता बांधताना जागोजागी फुटपाथ खालील गटाराचे मार्ग सोडले होते. मात्र आमचे त्याकडे दुर्लक्ष होते. आता या कामात सर्वानीचं लक्ष घातले. या नव्या रस्त्याची पायी चालत सर्व बाजूनी पाहणी केली आणि दोन ठिकाणावरून रस्त्याचे पाणी भाषा भवन जवळच्या तळ्यात घेता येते हे लक्षात आले. अभियांत्रीकी विभागाला या कामाची पुर्तता करध्याची सूचना दिल्या. जेसीबी भाड्याने घेवून प्रत्यक्ष देखरेख करत सर्व कामाची अंमलबजावणी सुरू होती. कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे, म.वि.वि.मंडळाचे संचालक प्राचार्य मोरे सर आणि मी मॉर्निंग वॉकच्या वेळीही कामाची प्रगती पाहत होतो. माझी पावले तर कार्यालयीन वेळ सोडून कामाच्या साईटवरून निघत नव्हती. सकाळ, संध्याकाळच नव्हे तर कार्यालयीन वेळेतदेखील शक्य त्या वेळेस काम जेथे सुरू असेल तेथे भेटी सुरू झाल्या. कुलगुरूही आवर्जून सर्व ठिकाणी जात होते. वरिष्ठांचे आपल्या कामाकडे लक्ष आहे ही गोष्ट कर्मचाऱ्याना प्रेरणा देणारी असते. कुलगुरूंच्या भेटीने नेमके हेचं साध्य होत होते. 
            यामध्ये एकूण अडीच किलामिटर अंतराच्या चरींचे काम करण्यात आले. चरींची खोली अर्ध्या फुटापासून आठ फुट होती. यामध्ये रसायनशास्त्र विभागाजवळील रोडवरील पाणी आत घेवून भाषा भवन तलावापर्यंत नेण्यासाठी तयार करण्यात आलेली चर काढताना खुप विचारपुर्वक काम करावे लागले. कांही ठिकाणी आठ फुट खोदावे लागले. माझ्या दृष्टीने या चरीचे महत्त्व फार मोठे होते कारण या चरीला रोडचे पाणी येणार होते. रोडवर थोडा जरी पाउस पडला तरी पाणी चरीत येणार. त्यातून आमच्या या प्रयत्नाची यशस्विता कळणार होती. इतर चरी ५० मिटरपासून साडेपाचशे मिटरपर्यंत होत्या. या चरी खोदणे आणि साफ करण्याच्या कामाला केवळ ५०००० रूपये खर्च आला आणि या सर्व जलसंधारणाच्या कामावर विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत शिबीराचा खर्च वगळता साडेसात लाख रूपयापेक्षा कमी खर्च केला होता. सर्व पाणी वाहून नेणाऱ्या चरींची स्वच्छता ६ जुलै २०१६  रोजी संपली.
            जूनपासून फक्त ढग येत होते. पाउस येत नव्हता. मागील वर्षाची पुनरावृत्ती होते की काय? अशी मनात भिती होती. मात्र आपण मनोभावे काम केले आहे आणि निसर्ग आपणास धोका देणार नाही हा अंतर्मनातला आवाज होता.   ढग येत आणि जात होते, ढगाबरोबर मनात आशनिराशेचा हिंदोळा सुरू होता. आणि आठ जुलै २०१६ला पाउस आला. ९ जुलैला दुसरा शनीवार होता. कार्यालयाला सुट्टी होती. मी माझ्या एका लेखाचे काम करत बसलो होतो. पावसाने जोरदार सुरूवात केली. मी आणि अभियांत्रीकी विभागाच्या कर्मचाऱ्यानी भर पावसात पाहणी केली. पाणी चरीतून व्यवस्थित तळयापर्यंत पोहोचत होते. परत कार्यालयात येवून काम करत बसलो.
             पावसाचा आणखी जोर वाढला. अभियांत्रिकी विभागाचे अभियंता अर्डेकर जेवायला निघाले. जाता जाता ते सहज भेटायला आले. त्याना जाताना शेत तळ्याची परिस्थिती पाहून जायला सांगितले. ते निघाले आणि दहाचं मिनिटात त्यांचा फोन आला 'सर, शेत तळ्याची फुटण्याची शक्यता आहे.' कार्यालय बंद करून लगेच गेलो. पहिले शेत तळे पुर्ण भरले होत मात्र त्याचे अतिरिक्त पाणी बाहेर पडत नव्हते. त्याचा सांडवा खोदणे आवश्यक होते. शेजारच्या शिंदे विहीरीमध्ये पावसाचे पाणी थेट चालले होते. दोन्ही गोष्टी तत्काळ दुरूस्त करणे आवश्यक होते. विद्यापीठ परिसरात असणारा एका कंत्राटदाराचा जेसीबी विनंती करून तत्काळ मागवून कामाला सुरूवात केली.
            परिसरात असणारे अन्य कामावरील कुली, जेसीबी, अर्डेकर आणि मी साडेतीनपासून काम करत होतो. रात्री साडेआठ वाजता सर्व काम संपले. तेवढया वेळात एवढा जोरदार पाउस झाला की दुसरे शेत तळे पुर्ण भरून तिसऱ्या शेत तळयात पाणी जावू लागले. तोपर्यंत विहिरीत जाणारे पाणी थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. सर्व कामे संपल्यानंतर आम्ही निर्धास्त झालो आणि रात्री साडेआठ वाजता पडत्या पावसात घरी गेलो. रात्रभर पाउस पडत राहिला. दुसऱ्या दिवशीही पाउस पडत होता. सकाळी सर्व पाणी साठवण्याच्या ठिकाणी भेटी ‍दिल्या. सर्व पाणवठ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाढले होते. दुसऱ्या दिवशीच्या पावसाने भाषा भवन तलाव मोठ्या प्रमाणात भरले. पुढील काही दिवसात दोन्ही तलाव काठोकाठ भरून अतिरिक्त पाणी सांडव्यातून बाहेर पडले. या कालावधीत कुलगुरू प्राध्यापक देवानंद शिंदे महाराष्ट्र शासनाच्या ग्लोबलायझोशन ऑफ हायर एज्युकेशनसाठीच्या समितीचे सदस्य म्हणून इंग्लंड, फ्रांस आणि आयर्लंड दौऱ्यावर होते. त्याना वाट्सअपद्वारा आम्ही ही सर्व प्रगती कळवत होतो. याप्रसंगी आपण कोल्हापूरात असायला हवे होतो, असे ते सातत्याने बोलत.  ते १६ जुलैला परदेश दौऱ्यावरून परत आले. पाणीसाठे पहाण्यासाठी ते उत्सुक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून सर्व पाणवठ्याना भेटी द्यायला सुरूवात केली. भाषा भवन शेजारील तलाव पुर्ण भरून वाहात होता. तो पाण्याचा साठा पाहत तळ्यातील पाणी त्यानी हातात घेतले. हे करताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच समाधान दिसत होते.
            या सर्व प्रयत्नात विद्यापीठातील भाषा भवन तलावामध्ये २२ कोटी १५ लाख लिटर, संगीतशास्त्र तलावामध्ये ५ कोटी २० लाख लिटर, सुतार विहीर ४ लाख लिटर, क्रिडा विभागाजवळील  विहिर पाच लाख लिटर, रसायनशास्त्र विभागाजवळील विहिर ३ लाख लिटर, सिंथेटीक ट्रॅकजवळील विहिर ५ लाख लिटर, शिंदे विहिर ३ लाख लिटर आणि तीन शेत तळ्यामध्ये ४० लाख लिटर असे एकूण तीस कोटी लिटर पाणी भूपृष्ठावरील साठयामध्ये साठवण्यात आम्ही यशस्वी झालो. याखेरीज जमिनीखालील पाण्यामध्ये मोठी वाढ झाली. सुतार विहिरीजवळील साधारण दिडशे एकर क्षेत्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. आजही या क्षेत्रात कोठेही सात आठ फुटाचा खड्डा घेतला तर पाण्याचे झरे सुरू होतात. हे लक्षात घेवून आम्ही पुढील वर्षाचे नियोजन सुरू केले.
            विद्यापीठात प्राध्यापक डी.टी. शिर्के प्रकुलगुरू म्हणून रूजू झाले. कुलसचिवपदी डॉ. नांदवडेकर रूजू झाले. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा बदलला आणि संचालक मविवि मंडळ हे पद संपुष्टात आले. प्राचार्य मोरे हाती महाविद्यालयात रूजू झाले. मात्र विद्यापीठाने आपले जल संधारणाच्या कार्यात खंड पडू दिला नाही. विद्यापीठ परिसरामध्ये दोन ऐतहासीक विहिरी आहेत. त्यांचे बांधकाम १८८३ साली केल्याचे शीला लेख या दोन्ही विहिरीवर इंग्रजी आणि मराठी भाषेत आहेत. त्यातील रसायनशास्त्र विभागाजवळील विहिरीचे पाणी वापरले जात होते. तंत्रज्ञान विभागाशेजारील विहिर मात्र दुर्लक्षित होती. २०१७ मध्ये या विहिराचा गाळ काढून दुरूस्ती करण्यात आली. तसेचं सुतार विहिर परिसरातील पाणी आणखी वापरात यावे म्हणून ६६ फुट व्यासाची आणखी एक विहिर खोदण्यात आली.
            या नव्या विहिरीची साठवण क्षमता सात लाख लिटर इतकी असून विद्यापीठ परिसरातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या या विहिरीचे बांधकाम करण्यात आले. या विहिरीला 'शिवटाकं' हे नाव कुलगुरू प्रा. शिंदे सरांच्या सुचनेप्रमाणे देण्यात आले. या विहिरीला खोदकाम आणि बांधकामासह चौदा लाख रूपये खर्च झाला. मात्र पाण्याचा हा आणखी एक मोठा साठा आम्हाला उपलब्ध झाला. महानगरपालिकेचे दरमहा येणारे बिल सात लाख रूपये होते. या सर्व प्रयत्नातून विद्यापीठ वर्षाला सर्व खर्च वजा जाता वर्षाला साठ ते सत्तर लाख रूपयांची बचत करत आहे. ते पैसे अन्य विकासात्मक कामासाठी वापरण्यास उपलब्ध होत आहेत. या जल साठयाबरोबर विद्यापीठातील जैव विविधताही चांगली वाढत आहे. परिसरात पक्ष्यांची संख्या वाढली आहे. मोर, साप, मुंगुस, ससा, खवल्या मांजर, विविध पक्ष्याबरोबर यावर्षी पुन्हा कोल्होबाने दर्शन दिले. झाडे आणि वेली परिसरात चांगल्या वाढू लागल्या आहेत.
            सन २०१७ मध्ये पाउस तुलनेने खुपच कमी झाला तरी विद्यापीठाच्या सातत्यपुर्ण प्रयत्नामूळे पाण्याची कोणतीही अडचण आलेली नाही. दरम्यान विद्यापीठाने प्रतिदिन एक लाख लिटर शुदध पाणी देण्याची क्षमता असलेला रिव्हर्स ऑस्मॉसीस तंत्रावरील जल शुद्धीकरण प्रकल्प विद्यापीठात कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी सर्वाना पुरवण्यात येते. तलाव आणि अन्य विहिरींचे पाणी वापरासाठी वापरण्यात येते. सध्या राजाराम तलाव आणि विद्यापीठाने बांधलेल्या दोन तलावासह आठ विहिरीतील पाणी विद्यापीठ वापरते. विद्यापीठातील घाण पाणी बाहेर जावू नये म्हणून विद्यापीठाने स्वत:चे सांडपाणी जल प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. त्यातून मिळणारे पाणी बागासाठी वापरण्यात येते. यावर्षी परत एक प्रकल्प उभारण्यात येत आहे. सांडपाणी जसे बाहेर जावू नये म्हणून  प्रयत्न करते, तसेचं पावसाचा थेंबही भूपृष्ठावरून वाहून जावू नये, यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यावर्षी परत पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि सुरू राहणार आहेत, जोपर्यंत सर्व पाणी अडवले जात नाही तोपर्यंत.

                                                       (छायाचित्र सौजन्य - सुवीज मुव्हीज )