त्यांचा स्वभाव आंदोलनकर्त्याचा नव्हता. त्यांचा ‘लोकांना सुज्ञ बनवल्यास समस्येची तीव्रता कमी होईल’, असा ठाम विश्वास होता. याचा अर्थ असा नाही की त्यांनी कधीच आंदोलनात भाग घेतला नाही. सायलेंट व्हॅली, चिपको, कित्तिको-हच्चिको आंदोलनात ते सहभागी झाले, पण एक कार्यकर्ता म्हणून. आंदोलनकर्त्यांची भूमिका योग्य असल्याने आणि ही सर्व आंदोलने गांधीजींच्या विचरांनुसार अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रही स्वरूपाची असल्याने. आपण एखाद्या प्रश्नावर मत मांडायचे झाले तर ते अगोदर त्या समस्येचा पूर्ण अभ्यास करत. कधीही त्यांनी ‘मला असे वाटते,’ किंवा ‘जर-तर’ची भाषा केली नाही. आपले पहिले काम अभ्यास करणे, विषय समजून घेणे आणि नंतरच तो विषय विद्यार्थ्यांपुढे मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि वेगळेपणही.
_________________________________________________________
कोणत्याही सजीवाच्या अन्न, पाणी आणि हवा या तीनच मूलभूत गरजा
असतात. वनस्पतींना फिरता येत नाही. त्या स्थलांतर करू शकत नाहीत, पण
त्यांच्याही याच तीन मूलभूत गरजा आहेत. निसर्ग रचनेमध्ये त्यांना पाणी आणि हवा जागेवरच
मिळाल्यास कोठेही न जाता अन्न तयार करण्याची क्षमता वनस्पतींना मिळाली. अन्य
जीवांना स्थलांतर करता येते. त्यातील अनेक जीव वनस्पती खातात, तेच त्यांचे अन्न असते. त्यांना शाकाहारी
प्राणी म्हणतात. शाकाहारी प्राण्यांची संख्या अमर्याद वाढू नये. जर ते तसे वाढले तर
वनस्पती राहणार नाहीत. म्हणून निसर्ग रचनेमध्ये मांसाहारी प्राणी आले... आणि वनस्पती आणि
इतर जीवांचे संतुलन राखत जीवसृष्टी विकसित झाली. निसर्गाची किमया समजून घेण्यासाठी
ही ढोबळ मानाने गोष्ट. हे ‘सृष्टी निर्माण विश्व’ जितके खोलात जाऊ, तितके मनोरंजक
होत जाते. परिसंस्थेतील बहुतांश घटकांना पुढे काय वाढून ठेवले आहे,
नैसर्गिकरित्या काय घडणार आहे, ते अगोदरच कळते. ठोकताळ्यांने आज त्यातील काही गोष्टींबाबत आपण
चर्चा करतो. उदाहरणार्थ, भूकंप येणार असेल तर कुत्रे विशिष्ट पद्धतीचे आवाज काढतात,
मोठ्या प्रमाणात साप दिसू लागतात… आणि बरेच काही.
निसर्ग रचना समजून घेण्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. तरीही तळ गाठणे अगदी कठीण. कोणीही असे म्हणू शकत नाही की, मला निसर्ग पूर्णत: समजला आहे. मात्र निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे, त्याची निसर्गाने कोणत्या न कोणत्या बहुमोल कार्यासाठी निर्मिती केलेली आहे आणि म्हणून निसर्ग टिकला आहे, म्हणून निसर्गाला मानवी हस्तक्षेपासून मुक्त ठेवले पाहिजे. हे सुद्धा फार कमी लोकांच्या लक्षात येते. हे ज्यांच्या लक्षात येते, ते लगेच स्वत:ला फार मोठे समजू लागतात आणि ते समाजापासून दूर होतात. केवळ आपणासच सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले आहे असा त्यांचा भ्रम असतो. ते लोकांना दुय्यम किंवा कमी लेखू लागतात. या सर्वाला अपवाद असणारे, आपले म्हणणे आग्रहाने पण संयत भाषेत मांडणारे आणि आपण कोणी फार मोठे आहोत, असा अविर्भाव न बाळगता, निसर्गाला जपण्यासाठी सर्वतोपरी कार्यरत राहणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. माधव धनंजयराव गाडगीळ.
माधवराव गाडगीळ यांचा जन्म पुण्यामध्ये २४ मे १९४२ रोजी झाला.
नियोजन मंडळाचे अध्यक्ष राहिलेले, निसर्गप्रेमी, अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचे
ते सुपुत्र. धनंजयराव बाँबे नॅचरल हिस्टरी संस्थेचे आजीव सदस्य होते. तसेच पक्षीतज्ज्ञ
सलीम अली यांचे ते मित्रही होते. सलीम अली यांच्यासमवेत ते जंगलांमध्ये फिरायला जात.
अशावेळी वडील माधवरावांना बरोबर घेऊन जात असत. यातूनच त्यांना निसर्गअभ्यासाची आवड
निर्माण झाली. एका जलविद्युत प्रकल्पाला भेट देताना झालेली जंगलतोड पाहून
वडिलांना दु:ख झाले. त्यावेळी वडिलांनी विकास आणि पर्यावरणासंबधी केलेल्या विधानातून माधवरावांना विकास
आणि पर्यावरण अर्थात शाश्वत विकास यासंदर्भात एक दिशा सापडली. त्यावेळी
त्यांचे वय होते अवघे १४ वर्षाचे. तेव्हाच त्यांनी पर्यावरण या क्षेत्रात पुढील
अभ्यास करण्याचे निश्चित केले. त्यांचे शालेय आणि पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. वनस्पतीशास्त्र,
प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह फर्ग्युसन महाविद्यालयातून पुणे विद्यापीठाची पदवी प्राप्त
केली. पदवीनंतर ते मुंबईतील इंस्टिट्युट ऑफ सायन्स या संस्थेत आले आणि मुंबई विद्यापीठाची
पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. या संपूर्ण अभ्यासातून पर्यावरणातील विविध घटकांच्या
परस्परसंबधांची वीण त्यांच्या मनात घट्ट होत गेली. त्यामुळेच पुढे संशोधनासाठी पर्यावरणीय
गणितीतील विषय निवडला. अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठात जीवशास्त्रीय
संशोधनामध्ये गणितीय प्रतिमानांचा समावेश असलेला गाडगीळ यांचा प्रबंध पहिला होता. हॉर्वर्ड
विद्यापीठाची त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. मॅथेमेटिकल इकॉलॉजी हा विषय माधवराव
गाडगीळ यांच्या संशोधनामुळे संशोधनाच्या क्षेत्रात चर्चेत आला. गणिताचा वापर करून पर्यावरणीय
समस्यांचे आकलन करून घेण्याचे त्यांचे कौशल्य पाहून हॉवर्ड विद्यापीठाने त्यांना तेथेच
थांबून अघ्यापन करण्यास सांगितले होते. मात्र स्वदेशात येऊन येथेच कार्य करण्याचे त्यांनी
ठरविले आणि १९७१ मध्ये ते भारतात परतले.
भारतात आल्यानंतर डॉ. सतीश धवन यांच्या सूचनेनुसार ते इन्डियन
इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर या संस्थेत रूजू झाले. त्यांनी येथे काही काळ संशोधक
म्हणून कार्य केले. पुढे त्यांची शिक्षक पदावर नियुक्ती झाली. त्यांनी १९७३ ते २००४
पर्यंत सहाय्यक प्राध्यापक ते प्राध्यापक पदावर शिक्षक म्हणून कार्य केले. ते कृतिशील
शिक्षक होते. पर्यावरणशास्त्र हा य केवळ वर्गात शिकवण्याचा विषय नाही. प्रत्यक्ष जागेवर
जाऊन एखाद्या पर्यावरणीय समस्येचा अभ्यास केला, तर विद्यार्थ्यांना
विषयाचे
नेमके आकलन होते. त्यामुळे अनेकदा ते विविध वनांमध्ये मुलांना नेत आणि तेथे तो
विषय समजावून सांगत. पदव्युत्तर आणि पदवी विद्यार्थ्यांप्रमाणेच, त्यांनी शालेय
विद्यार्थ्यांसोबतही अनेक प्रयोग केले. पर्यावरणीय समस्यांचे शालेय विद्यार्थ्यांना
आकलन झाल्यास किमान अशा समस्यांची तीव्रता तरी वाढणार नाही, असे त्यांचे मत
होते.
विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगत असताना तेही शिकत होते.
त्यांचे गुरू वामनराव वर्तक यांच्यासमवेत त्यांनी अनेक जंगलांना भेटी दिल्या. या
दोघांनी देवरायासंदर्भांत जमा केलेली माहिती महत्त्वाचा दस्ताऐवज मानली जाते. या
भ्रमंतीत त्यांनी अनेक वेळा झाडाखाली मुक्काम केला. लोकांशी चर्चा करत रात्री
जागवल्या. आढळणाऱ्य सर्व वनस्पतींच्या नोंदी केल्या. यातून नव्या देवराया निर्माण
करण्यासाठी मार्गदर्शक माहिती उपलब्ध झाली. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातील जंगलास
त्यांनी भेट दिली. पन्नास हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर ते जंगलात पायी चालले.
या प्रवासात काहीवेळा त्यांच्या जीवावरही बेतले. एकदा तर हत्तीपासून बचाव
करण्यासाठी त्यांना झाडावर रात्र काढावी लागली.
भ्रमंती करत असताना, ते त्या भागातील समस्या समजून घेत असत.
समस्येचे मूळ शोधत आणि त्यावर साक्षेपी उपायही सांगत. त्यांचा स्वभाव आंदोलनकर्त्याचा नव्हता. त्यांचा ‘लोकांना सुज्ञ
बनवल्यास समस्येची तीव्रता कमी होईल’, असा ठाम विश्वास होता. याचा अर्थ असा नाही की
त्यांनी कधीच आंदोलनात भाग घेतला नाही. सायलेंट व्हॅली, चिपको, कित्तिको-हच्चिको
आंदोलनात ते सहभागी झाले, पण एक कार्यकर्ता म्हणून. आंदोलनकर्त्यांची भूमिका योग्य
असल्याने आणि ही सर्व आंदोलने गांधीजींच्या विचरांनुसार अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रही
स्वरूपाची असल्याने. आपण एखाद्या प्रश्नावर मत मांडायचे झाले तर ते अगोदर त्या समस्येचा
पूर्ण अभ्यास करत. कधीही त्यांनी ‘मला असे वाटते,’ किंवा ‘जर-तर’ची भाषा
केली नाही. आपले पहिले काम अभ्यास करणे, विषय समजून घेणे आणि नंतरच तो विषय विद्यार्थ्यांपुढे
मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि वेगळेपणही.
पश्चिम घाटात होणारा विकास ‘कंत्राटदार धार्जिणा’ नको असे
त्यांनी मांडलेले मत, हे पूर्ण अभ्यासांती होते. नाणार आणि बारसू प्रकल्पासंदर्भात
त्यांना पत्रकार आणि शासनाने मत मागितल्यानंतर त्यांनी शासनाकडे या प्रकल्पाचे
आराखडे मागितले. सरकारने ते देण्यास टाळाटाळ केली. मात्र गाडगीळ यांनी ते मिळविले
आणि त्यानंतरच त्यांनी आपले मत सांगितले. शासनाने स्वत:च मागवलेल्या त्यांच्या
अभिप्रायाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. कारण ते त्यांच्या सोईचे नव्हते. आपल्या
अहवालाकडे असे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यातून पर्यावरणाचे आणि तेथील रहिवाशांचे
होऊ घातलेले नुकसान टाळण्यासाठी त्यांनी लोकांपुढे प्रकल्पाबरोबर येणाऱ्या
समस्येची मांडणी करायला सुरुवात केली. आपला अहवालही खुला केला. हे
विज्ञानयात्रेतील वारकऱ्याचे प्रबोधन होते.
या अभ्यासात निसर्गाचे मोठेपण त्यांच्या लक्षात येत होते. महाराष्ट्र,
गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या पाच राज्यांमध्ये सोळाशे किलोमीटर दूरवर
पश्चिम घाट वसला आहे. जगभर नामशेष होत चाललेल्या अनेक वनस्पती, कीटक आणि
प्राण्यांच्या प्रजाती या भागात आजही आढळतात. पश्चीम घाटातील विकासाच्या विरोधात
काढलेल्या एका मोर्चातही ते सहभागी झाले होते. विकासाच्या नावाखाली होत
असलेले पर्यावरणाचे नुकसान त्यांच्या लक्षात आले. ‘देशाला विकास करणे आवश्यक आहे, मात्र
तो शाश्वत विकास असायला हवा. रस्त्यांची निर्मिती, उद्योगांची उभारणी या गोष्टी कधीच
टाळता येणार नाहीत. मात्र त्या करताना पर्यावरणाचे नुकसान झालेच नाही पाहिजे आणि झालेच
तर ते कमीत कमी असायला हवे,’ असे त्यांचे मत होते. एखादा उद्योग उभारताना सर्वांगिण
विचार होणे गरजेचे असते. तो न केल्यामुळे पर्यावरणीय समस्या गंभीर होतात, हे त्यांच्या
लक्षात आल्याने, कोणत्याही प्रकल्पाच्या नियोजनात स्थानिकांना सहभागी करायला हवे, असे
ते म्हणत. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोकणामध्ये पर्यावरणाची हानी होऊ न देता, केवळ तीस
टक्के पाणी वापरून २००० मेगावॅट जलविद्युत निर्माण करण्याचा त्यांनी आराखडा शासनास
सादर केला. मात्र त्याकडेही गांभिर्याने पाहिले गेले नाही.
आज कोणताही प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची जणू शर्यत लागली आहे.
विशेषत: जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांच्या निर्मितीसाठी अवजड यंत्रांचा वापर करण्यात
येतो. त्यातून डोंगररांगा पोकळ होतात आणि पावसाचे पाणी त्यात शिरल्यावर जडत्व वाढून दरडी कोसळतात.
त्यामुळे मूळात अशा डोंगररांगातून किमान रस्ते काढायला हवेत आणि तेही अवजड यंत्रांचा
वापर न करता. त्यामुळे लोकांना रोजगार मिळेल, त्यासोबत दरडी कोसळण्याचे प्रमाण घटेल,
असे ते सांगत. मात्र विक्रमी वेळात प्रकल्प पूर्ण करण्याच्या नादात अशा शाश्वत विकासाच्या
मंत्राकडे कोण लक्ष देणार? असे असले तरी त्यांनी अभ्यास करणे आणि आपले स्पष्ट मत देणे
कधीच थांबवले नाही.
जगण्यासाठी नोकरी, कामधंदा करणे गरजेचे असते. आनंदी
जगण्यासाठी कोणतातरी छंद जोपासला जातो. मात्र गाडगीळ सरांनी नेहमी आपल्या कामात
आनंद शोधला. असे कौशल्य प्राप्त होणे फार कमी लोकांना साध्य करता येते. गाडगीळ यांना
असे कौशल्य साध्य करता आले होते. त्यांनी विदर्भातील जंगलातील वनस्पतींच्या नोंदी
केल्या. या कार्यात त्यांनी आदिवासीना सहभागी करून घेतले. त्यामुळे अशिक्षित
आदिवासींची नोंद जागतिक पातळीवर पोहोचली. गाडगीळ यांनी नेहमीच ज्याचे श्रेय त्याला
दिले. यातून त्यांच्या मनाची श्रीमंती लक्षात यावी. आदिवासी, मूलनिवासी यांचे जगणे
त्रासाचे होऊ नये, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत राहिले. मात्र त्यांच्या
कार्याचे महत्त्व या मंडळीच्याही लक्षात येत नव्हते. ही परिस्थिती पाहून कोणीही
नाऊमेद झाले असते. मात्र गाडगीळ यांनी याबाबत कधीही नाराजी दाखवली नाही किंवा
भडकावू आंदालनाची दिशा देण्याचे कार्यही केले नाही. त्यांच्या रक्तात आक्रमकपणा
नव्हता. वृक्षवल्ली, वनचरे, सर्व जीव हे वाचले पाहिजेत. पर्यावरण टिकले पाहिजे, हे
सांगतानाही लोकांना सुज्ञ करणे हा हेतू असे. ते ज्ञान द्यायचे, तेही एखाद्या
संताप्रमाणे. त्यांच्याशी बोलताना त्यांचा अविर्भाव ‘मलाच सर्व काही ज्ञात आहे’, असा कधीच नसे.
अगदी या प्रांतात कार्य करणाऱ्या नवख्या अभ्यासकाचे म्हणनेही ते तितक्याच
तन्मयतेने ऐकत असत आणि ते पूर्ण ऐकून घेतल्यानंतर आपले मत किंवा म्हणणे शांतपणे
सांगत.
त्यांना खऱ्या अर्थाने लोक ओळखू लागले ते पश्चिम
घाटासंदर्भात त्यांनी तयार केलेल्या अहवालामुळे. या अहवालामुळेच २०१२ साली पश्चिम
घाटास ‘जागतिक सांस्कृतिक ठेवा’ म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केले. पश्चिम
घाट हा जैवविविधतेने नटलेला. अतिशय संवेदनशील. या भागात विकासाचे कार्य तितक्याच
संवेदनशीलपणे व्हायला हवे, असे ते म्हणत. ‘आपले निष्कर्ष पूर्ण अभ्यासांती असले
पाहिजेत’, हे जीवनभर जपलेले तत्व उतारवयातही त्यांनी पाळले. त्यासाठी त्यांनी
पश्चिम घाट पुन्हा पायी पालथा घातला. आपली निरीक्षणे आणि निष्कर्ष तर्कशुद्ध विश्लेषणासह
मांडले. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानेच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली. माधवराव गाडगीळ आणि
त्यांच्या समितीने अभ्यासपूर्ण असा हा अहवाल २०११ साली शासनास सादर केला. अत्यंत
महत्त्वपूर्ण, वैज्ञानिक अशा या अहवालाकडेही दुर्लक्षच करण्यात आले. जागतिक तापमान
वाढीचे चटके भारतालाही बसू लागले. अतिवृष्टी झाल्यानंतर पश्चिम घाटात केरळपासून
महाराष्ट्रापर्यंत दरडी कोसळून हजारो प्राणांची आहुती गेली. त्यानंतर लोकांना या
अहवालाची आठवण आली. आपण इशारा देऊनही लोकांचे प्राण वाचवता आले नाहीत, हे पाहून
गाडगीळ सरांच्या मनात काय विचार आले असतील, असा प्रश्न नेहमी पडत असे. मात्र यावर
त्यांनी, ‘आपण हे कधीच सांगीतले होते’, अशी शेखी कधी मिरवली नाही. जंगलामध्ये राहणारे आदिवासींचे
हक्क अबाधित राहावेत, त्यांच्याकडूनही जंगलांचे नुकसान होणार नाही आणि त्यांचे
उत्पन्न वाढेल, अशा प्रकारच्या योजना त्यांनी शासनास दिल्या. आदिवासींचा नैसर्गिक संसाधनावरील हक्क प्रथम मान्य केला पाहिजे, असे ते सांगत.
यातूनच ‘जैवशास्त्रीय संरक्षण वन’ ही संकल्पना
आली. त्यांचे सांगणे निस्पृह होते. मात्र निर्णय घेणाऱ्या यंत्रणांना बरे बोलणारे हवे
असतात, खरे बोलणारे नव्हे. तरीही त्यांनी आपणास उमगलेले, गवसलेले जनतेपर्यंत
पोहोचवणे काही सोडले नाही.
त्यांची साहित्याची जाणही उत्तम होती. त्यांची मराठीसह
हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर उत्तम पकड होती. शिक्षण संशोधनाची भाषा ही
इंग्रजी असल्याने त्यांचे संशोधनपर लेखन इंग्रजीतून झाले. २५० पेक्षा जास्त संशोधन
निबंध जगभरातील दर्जेदार संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. सर्वात
महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मराठीतूनही विपुल लेखन केले. विज्ञान, पर्यावरण
मांडताना, वैज्ञानिक तथ्यांना लालित्याची जोड देऊन ते विज्ञान रंजक करत. संस्कृत
साहित्यातील संकल्पना आणि वर्णनाचा उल्लेख ते चपखलपणे करत. आपोआपच त्यांचे लेखन
लोकांना आवडू लागले. वैज्ञानिक लेखन करताना त्यामध्ये ऐकून माहीत असलेले ऐतहासिक
आणि पौराणिक दाखले त्यामध्ये आल्याने वाचक त्यांच्या लेखनाशी जोडला जात असे.
त्यांचे लेखन वाचताना त्यांच्या साहित्यविषयक अभ्यासाची खोली लक्षात येते. त्यांनी मराठीतून
अनेक पुस्तके लिहिली. ‘उत्क्रांती एक महानाट्य’ हे पुस्तक त्यांच्या आयुष्यभरच्या संशोधनातून
केलेले चिंतन आहे. ‘निसर्गाने दिलेला आनंदकंद’ वाचताना आपण आपले अनुभव त्यात शोधत राहतो.
‘वारूळ पुराण’ या पुस्तकाची प्रस्तावना त्यांच्या अभ्यासाची खोली दाखवते. त्यांनी अनेक
मराठी आणि इंग्रजी दैनिकातून सदर आणि प्रासंगिक लेखन केले. याखेरीज सहा दर्जेदार इंग्रजी पुस्तकांचेही
लेखन केले आहे. त्यांचे हे लेखन अखेरपर्यंत सुरू होते. शेवटच्या
टप्प्यामध्ये त्यांना लेखन करणे कठीण झाले, तेव्हा ते भ्रमणध्वनीवर बोलून आपले लेख
लिहीत.
त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांने सन्मानित
केले आहे. तरीही त्यांच्या कार्याची
म्हणावी तशी देशपातळीवर दखल घेतली गेली नाही, असे वाटते. त्यांचे कार्य आणि मांडणी
ही लोकानुनय करणारी नव्हती. लोकांना भविष्यातील धोक्याची जाणिव करून देणारी होती.
१९८६ ते १९९० या काळात ते पंतप्रधानांचे विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार समितीचे
सदस्य होते. १९९८ ते २००२ या कालावधीत ते जागतिक पर्यावरणविषयक सल्लागार समितीचे
सदस्य होते. विज्ञान संशोधनासाठी त्यांना भटनागर पुरस्कारांनेही सन्मानित करण्यात
आले होते. याखेरीज कुसुमाग्रज पुरस्कार, कर्नाटक शासनाचा सर्वोच्च राज्योत्सव
पुरस्कार, कॅलिफोर्निया विद्यापीठाचा मात्र पर्यावरण क्षेत्रातील संशोधनासाठीचा
नोबेल मानला जाणारा टायलर पुरस्कार, ईश्वरचंद्र विद्यासागर पुरस्कार, विक्रम
साराभाई पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. २०२४ साली संयुक्त
राष्ट्र संघाने (युनो) पर्यावरणविषयक कार्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च ‘चॅम्पियन्स
ऑफ दि वर्ल्ड’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना अनेक संस्थांनी फेलोशिप आणि
सदस्यत्व दिले होते.
त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधेपणा जपला. खादीची
साधी, स्वच्छ वस्त्रे परिधान केलेले माधवराव गाडगीळ हे पर्यावरण अभ्यासकांचे
प्रेरणास्थान होते. आपले म्हणने शांतपणे मात्र निग्रहाने मांडणे या त्यांच्या
स्वभावामुळे ते नेहमी निसर्गपंढरीचे वारकरी वाटत. असा हा एक सच्चा पर्यावरणवादी,
निसर्गाचा अभ्यासक, मानव हा अन्य जीवांप्रमाणेच एक आहे, त्यांने संपूर्ण जीवसृष्टीचे
आपण मालक आहोत असे मानू नये, असे स्पष्ट सांगणारा, विकास न थांबवता पर्यावरणाची हानी
टाळता येईल असे आराखडे देणारा एक अभ्यासक ८ जानेवारी २०२६ रोजी निसर्गात विलिन झाला.
त्यांच्या
जाण्याने अवघा पश्मि घाट पोरका झाला. सह्यकडाच नव्हे तर भारतातील संपूर्ण
वनसृष्टीला एकटेपण जाणवावे इतके ते भारतातील जंगलांशी जोडले गेले होते. अवघे
आयुष्य लोकांचे भविष्य सुरक्षित रहावे यासाठी कार्य करणाऱ्या या निसर्गाच्या
वारकऱ्याच्या अंत्यविधीला ४०-५० लोकच उपस्थित होते. त्यांचे असे हे
जाणे निश्चितच चटका लावणारे आहे. पण जेव्हा जागतिक तापमान वाढीचे चटके असह्य होतील,
तेव्हा माधव गाडगीळ यांची पुन्हापुन्हा आठवण येईल.... मात्र तेव्हाही उशीरच
झालेला असेल.