सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

वैज्ञानिक दृष्टीकोन

 

विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी समाजाची निर्मिती या गोष्टी आज वारंवार ऐकावयास मिळतात. प्रत्येक नवजात बालक हे सर्व दृष्टिकोन घेउनच जन्माला आलेले असते. मात्र पुढे त्याला आपण ज्या पद्धतीने वाढवतो, त्यामध्ये बालकाकडील ही वृत्ती कमी होत जाते. मात्र सुदृढ समाजासाठी, निरोगी समाजासाठी हा दष्ट‍िकोन असणे अत्यंत गरजेचे असते. हा दृष्ट‍िकोन बाळगणे म्हणजे काय? विज्ञान आणि शास्त्र यामध्ये नेमका फरक काय आहे? या विषयावर व्यक्त होण्याची संधी ‘कुळवाडी’ या माधव जाधव संपादित पहिल्याच वर्षीच्या दिवाळी अंकात मिळाली. हा लेख कुळवाडी अंकाच्या सौजन्याने खास आपल्यासाठी… 

_____________________________________________________

विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन रूजला पाहिजे’, असा सूर सर्वत्र नेहमी आळवला जातो. तथापि वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवायचा, म्हणजे नेमके काय करायचे? याबद्दल फारसे कोणी बोलत नाही. त्यामुळे  नेमके प्रयत्न होत नाहीत आणि प्रश्न तसाच राहतो. विज्ञान विषय पाचवीपासून अभ्यासाला येतो. शिकवला जातो. पुढे विज्ञान शाखेत पदवी, पदव्युत्तर शिक्षणही घेतले जाते. विद्यार्थी उच्च-पदवीधर होतो आणि त्यानंतरही अशा उच्च विद्याविभुषितांच्या घरचा गणपती दूध पितो. असे झाले की वैज्ञानिक दृष्टिकोन रूजलेला संशोधक शास्त्रीय कारण सांगतो. प्रक्रियेची उकल करतो. ते वादळ शमते. मात्र काही दिवसानंतर दुसरी घटना घडते. समाज उठलेल्या अफवेला सत्य मानत धावतो. म्हणजेच द्यापही जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजलेला नाही, हेयातून स्पष्ट होते. वैज्ञानिक दृष्टीकोन जाणून घेण्यापूर्वी विज्ञान म्हणजे काय? हे समजून घेणे आवश्यक आहे.

विज्ञान म्हणजे परस्परसुसंगत, प्रतिक्षणी वाढणारा ज्ञानाचा संचय. विज्ञान हे सृष्टीतील रहस्यांचा शोध घेणे, विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावणे आहे. सृष्टीतील घटनांचा अर्थ लावताना कालचे सत्य आज खोटे ठरू शकते. विज्ञान ते स्वीकारते. अर्थात कालचे सत्य त्यामुळे खोटे ठरत नाही कारण ते त्या वेळच्या ज्ञानाच्या संकल्पनांवर आधारित असते. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा खेळ मोठा गंमतीशीर असतो. हे गुपित कळल्यानंतर होणारा आनंद अवर्णनीय असतो. घन पदार्थाच्या वस्तुमानाइतके द्रव विस्थापित होते, हे रहस्य आंघोळ करताना आर्किमिडीजला उलगडले. हे रहस्य समजताच तो त्या आनंदाच्या भरात युरेका, युरेकाअसे ओरडत कपडे न परिधान करता रस्त्यावरून पळत सुटला. हा शोधाचा आनंद मिळवण्यासाठी आजही अनेक संशोधक संशोधन करतात. निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेल्या पद्धतशीर, तर्कसुसंगत माहितीचे विश्लेषण करून एखाद्या घटनेमागील कार्यकारणभावाची मांडणी विज्ञानामध्ये करतात.

पारंपरिक समजानुसार विज्ञान म्हटले की डोळ्यांसमोर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय येतात. या सर्व विषयांना इंग्रजीमध्ये सायन्सअसा एकच शब्द वापरला जातो. मराठीमध्ये मात्र विज्ञान आणि शास्त्र असे दोन शब्द आहेत. गंमत म्हणजे हे शब्द समानार्थी नाहीत. या दोन शब्दांमध्ये सूक्ष्म असला तरी, महत्त्वपूर्ण भेद आहे. शास्त्र म्हणजे कोणत्याही नियमांच्या आधारे केलेली एखाद्या विषयाची तर्कशुद्ध मांडणी होय. त्यामुळेच जीव, रसायन आणि भौतिकशास्त्राप्रमाणेच अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भाषाशास्त्र, तर्कशास्त्र अशी अनेक शास्त्रे आपणास पहावयास मिळतात. शास्त्रांमध्ये वापरण्यात येणारे नियम हे स्थल-काल-व्यक्ती-धर्मनिरपेक्ष असतातच असे नाही. ते या घटकांनुसार बदलतात. विज्ञानातील नियम मात्र स्थल-काल-व्यक्ती-धर्मनिरपेक्ष असतात. विज्ञानातील नियमांची पुनर्पडताळणी कोठेही, कोणासही करता येते. शास्त्राचे नियम देशा-देशांत बदलू शकतात. त्यामुळेच विज्ञान शास्त्र असते. मात्र प्रत्येक शास्त्र विज्ञान असतेच, असे नाही. यातही भौतिकशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र म्हणून समोर येते. पदार्थविज्ञानशास्त्रातील नियमांची पडताळणी कोणासही, कोठेही, केव्हाही करता येते. ही पडताळणी प्रत्यक्षात पुनर्पडताळणी असते. निष्कर्ष तेच असतात. इतर विषयांना मात्र शास्त्रच म्हटले जाते. जीव आणि रसायनशास्त्राचे नियम पडताळणी करताना अनेक घटकांचा परिणाम होतो. यातील काही घटना विज्ञानाप्रमाणे निरपेक्षतेचे नियम पाळतात. मात्र जीव आणि रसायनशास्त्रातील अनेक घटनांचे नेमके अनुमान काढणे शक्य नसते. उदाहरणार्थ सागाच्या पानांचा आकार प्रत्येकवेळी सारखाच असत नाही. सागाचे पान साधेच असते, त्याची रचना तीच राहते. मात्र प्रत्येक पानाचा आकार सारखाच असत नाही. तसेच मूळ भारतातील साग कॅरेबियन बेटावर गेल्यावर त्यामध्ये जनुकीय बदल होत गेले. त्यामुळेच इतर सर्व विषयांना शास्त्रच म्हटले जाते.

सुरुवातीला विज्ञानाचा प्रारंभ निसर्गविज्ञान म्हणून झाला. पुढे जसजशा ज्ञानाच्या कक्षा रूंदावत गेल्या, तसतसा विज्ञान आणि शास्त्रातील फरक स्पष्ट होत आजचे विज्ञानाचे विश्व उभे राहिले. आज निसर्गात घडणाऱ्या बहुतांश घटनामागचा कार्यकारणभाव मानवाने शोधला आहे. तरीही संशोधकांना नवनवे प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरे मिळवण्यासाठी संशोधक कार्य करत आहेत. हजारो वर्षांपासून संशोधकांनी उलगडलेली रहस्ये समजून घेणे, ऐकीव माहितीला बळी न पडणे, म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे होय. असा दृष्टीकोन बाळगल्यास, आपण सहजपणे आपले आयुष्य सुखकर बनवू शकतो. ज्ञानाची निर्मिती करू शकतो. हा दृष्टीकोन बाळगणाऱ्यांच्या घरचा गणपती दूध पित नाही, तर ती द्रवाच्या पृष्ठीय तन्यतेमुळे घडणारी घटना असते.

हा वैज्ञानिक दृष्टीकोन नवजात बालकांमध्ये उपजत आलेला असतो. सर्वांना आठवेल असे एक उदाहरण. घरात नुकतेच रांगू लागलेले बाळ आहे. संध्याकाळची वेळ आहे. घरात इन्व्हर्टर नाही आणि अचानक विद्युत पुरवठा खंडीत होतो. अशावेळी अशा घरात मेणबत्ती लावण्यात येते. ते नुकतेच रांगणारे बाळ मेणबत्तीच्या ज्योतीकडे भारी वाटते. ते बाळ मेणबत्ती ठेवलेल्या ज्योतीकडे रांगत जाऊ लागते. त्या खोलीतील मोठी माणसे बाळाला सांगतात, ‘ते हा आहे, तिकडे जाऊ नको’. बाळ मोठ्यांचे ऐकते. ते थांबते. मात्र मोठ्यांचे लक्ष नाही हे पाहून ते त्या ज्योतीजवळ जाते. ज्योतीला हातात पकडण्याचा प्रयत्न करते. त्याच्या हाताला जेव्हा त्या पेटलेल्या ज्योतीचा चटका बसतो, तेव्हा त्याच्या मनाचे समाधान होते. त्याचवेळी कोणी जर त्याला पाहिले तर ते लगेच रडायला लागते. त्यावेळी आपण वडिलधाऱ्यांचे न ऐकल्याचा अपराध भाव त्या बालकाच्या मनात असतो. जर त्याला कोणी पाहिले नसे तर ते शांत बसते. वेदना सहन करते. मात्र, जेव्हा विद्युत पुरवठा सुरू होतो आणि कोणी मोठा माणूस ती मेणबत्ती विझवण्यासाठी पुढे येतो, तेव्हा ते छोटेसे बाळ, ‘ते हा आहे’, असे सांगते. ती ज्योत हाताला चटका देते. त्याची वेदना होते, याची अनुभुती त्या बाळाने घेतलेली असते. त्यानुसार ते व्यक्त होत असते. प्रत्यक्षात ‘हा’ म्हणजे काय आहे? हे प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेण्याचे कुतूहल त्या लहान जीवाच्या मनातही असते. हे बालसुलभ वर्तन जवळपास सर्वच लहान मुलांमध्ये अनुभवण्यास मिळते. म्हणजे सत्य जाणून घेण्याची आस सर्वच बालकांमध्ये असते.

पुढे ते बाळ जसे मोठे होते, तसे ते प्रश्न विचारून आपले कुतूहल पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करते. ते वडिलधाऱ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडते. त्याच्या प्रश्नांना मिळणारी उत्तरे खरी मानून माहिती घेण्याचा प्रयत्न करते. लहान मुलांचे प्रश्न अफलातून असतात. अनेकदा त्यांच्या प्रश्नांना वडिलधारी मंडळी, ज्यामध्ये आई, वडील, आजोबा, आजी किंवा घरातील इतर नातेवाईकांचा समावेश होतो. यापैकी जे कोणी त्याच्या प्रश्नांना न हासता, उत्तरे देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात, त्यांच्याशी बाळाची गट्टी जमते. ते आपले प्रश्न तेथे विचारून जिज्ञासा पूर्ण करून घेत राहते. पुढे त्याच्या जीवनात शिक्षक येतात. त्याच्या प्रश्नांची जे शिक्षक उत्तरे देतात, ते शिक्षक मुलांना आवडतात. या वयात जर मुलांना प्रयन विचारण्यापासून कोणी थांबवलेख्‍ प्रतिबंध केला, तर असे शिक्षक मुलांना आवडत नाहीत.

मुलांचे प्रश्न आणि कल्पना दोन्ही कल्पनेपलिकडच्या असतात. एकदा एक पालक बागेतील झाडांना पाणी घालत होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर नुकताच बालवाडीची पायरी चढलेला मुलगा होता. तो मुलांना प्रश्न विचारत होता आणि वडील आपल्या परीने त्याला उत्तरे देत होते. मुलगा विचारतो, ‘तुम्ही काय करताय?’ वडील उत्तर देतात, ‘मी झाडांना पाणी घालतो.’ त्यावर मुलाचा पुढचा प्रश्न, ‘झाडांना पाणी का घालताय?’ वडिलांनी उत्तर दिले, ‘तुला तहान लागल्यावर तू पाणी पितो की नाही, तसेच झाडांना पाणी प्यावं लागतं. नाहीतर ती मरून जातील’. मुलांचा लगेच पुढचा प्रश्न, ‘मला पाणी प्यायचं झाल तर मी पाणी मागतो, झाड कुठे पाणी मागते?’ वडील त्यावर म्हणतात, ‘झाडाला बोलता येत नाही. पण त्याची पाने सुकतात. मग आपल्याला कळत त्याला पाण्याची गरज आहे. खालची जमीन वाळली की आपणच त्याला पाणी द्यायच असतं’. या उत्तरानंतर मुलाचा पुढचा प्रश्न आला, ‘मग झाड पाणी कसं पिते?’ वडील उत्तर देतात, ‘झाडाची मूळं त्याचे तोंड असते. ती जमिनीखाली असतात. झाड मूळांच्या सहाय्याने पाणी पिते.’ मुलाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. तो मुलगा बराच वेळ विचार करत राहिला. थोड्या वेळांने त्याने वडिलाना विचारले, ‘पप्पा, मी पण मातीत तोंड घालू का? मला पण झाडासारखं पाणी प्यायचयं’. तो मुलगा प्रश्न विचारल्यानंतर काही वेळ शांत होता, त्यावेळेत तो मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करत होता. त्याप्रमाणेच म्हणजे झाडांप्रमाणे माणूसही पाणी पिऊ शकतो का? हा त्याच्या मनात पडलेला आणखी प्रश्न होता. एवढंच नाही तर तसं प्रत्यक्ष करून पाहण्याची त्याच्या मनात उर्मी होती. म्हणजे सत्य जाणून घेण्याची आस त्याच्या मनात होती. ही जिज्ञासा हे कुतूहल जपण्याची जबाबदारी पालकांची आणि शिक्षकांची असते.

पुढे मुले जशी वरच्या वर्गात जातात, तसा अभ्यासाचा ताण वाढत जातो. पालकांच्या अपेक्षा त्यांच्यावर लादल्या जाऊ लागतात. शाळेचा निकाल चांगला लागला पाहिजे, म्हणून शिक्षकही ‘असे प्रश्न विचारण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष दे. हे काही परिक्षेत विचारणार नाहीत. याची उत्तरे तुला मार्क देणार नाहीत’, अशी वाक्य ऐकवून मुलांना प्रश्न विचारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. मुलांनाही पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षेनुसार वागणे भाग पडते आणि मुले प्रश्न विचारायची सवय सोडतात. एखादाच मुलगा यातूनही प्रश्न विचारत राहतो. काही शिक्षक, पालक मुलांच्या या सवयी जपतात. मुलांना खऱ्या शिक्षणाचा आनंद घेऊ देतात. त्यातून घडणारी मुले आपली सत्य जाणून घेण्याची सवय जपत वाढत राहतात आणि ती विवेकांने आपले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यभर ती सत्य जाणून घेण्यासाठी प्रयोग करतात, वाचन करतात. कोणी सांगितले म्हणून पटकन विश्वास ठेवत नाहीत. मात्र अशा मुलांचे प्रमाण फार कमी असते. जर विवेकवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन असणारा समाज घडवायचा असेल तर, मुलांमध्ये असणारे कुतूहल जागृत ठेवण्याचे कार्य शिक्षक आणि पालकांनी करायला हवे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये यावर भर देण्यात आला आहे. हे प्रत्यक्षात आणायचे असेल तर शिक्षक आणि पालकांचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे.

शिक्षण व्यवस्था समाजाला दिशा देत असते. शिक्षण व्यवस्था सुदृढ झाली तर समाज सुदृढ होईल. विद्यार्थ्यांना वाचनाची आणि चिंतनाची सवय लहानपणापासून लावली पाहिजे. आपण वाचले त्यामध्ये सत्य काय असत्य काय याची पडताळणी करायला मुलांना शिकवायला हवे. मुलांना लहानपणापासून विषयाचे स्वतंत्रपणे आकलन करून घेण्याची सवय लावली पाहिजे. मुले वाचलेल्या, दिसलेल्या गोष्टींवर जेव्हा स्वतंत्रपणे विचार करू लागतील, सत्य असत्याची पारख करू लागतील तेव्हाच सुदृढ समाज, विवेकवादी समाज निर्माण होईल. आज समाज माध्यमांचा, विविध वाहिन्यांचा सुळसुळाट झाला आहे. आपले महत्त्व वाढवण्यासाठी त्यातून खऱ्या-खोट्या माहितीचा महापूर लोटला आहे. अशा माध्यमातून माहितीचा महापूर वाहत असतो. यामध्ये खरी आणि खोटी दोन्ही प्रकारची माहिती असते. ही पडताळून पाहणे नीर-क्षीर विवेकाने पारखून घेणे आवश्यक आहे. मात्र तसे घडताना दिसत नाही. गणपती दुध पितो अशी सुरुवातीची आरोळी ठोकणाऱ्यापेक्षा ती पुढे तशीच पाठवत राहणारा जास्त दोषी असतो. अशा काळात तर वैज्ञानिक दृष्टीकोन अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

विज्ञानातील प्रयोग करणे, सत्याची पडताळणी करणे, जगण्याच्या रहाटगाडग्यात प्रत्येक नागरिकाला शक्य होत नाही. जे प्रयोग करतात, त्यांनी आपले निष्कर्ष प्रसृत करायला हवेत. तसेच या शोधाचा भविष्यात काय परिणाम होईल, हे ही सांगायला हवे. विज्ञानाचा अविष्कार सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत ते मांडायला हवा. एखाद्या शोधांचे दुष्परिणाम लक्षात येताच सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचणे आवश्यक असते. मात्र तसे घडताना दिसून येत नाही. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे आपल्या शोधाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी पत्रक छापून घेत आणि बाजारात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत. भारतात ही संस्कृती अजूनही आलेली नाही. याउलट आम्ही संशोधनाला गोपनियतेचे आवरण घालून ठेवतो. अनेक शोधांचे श्रेय त्यामुळे परदेशी संशोधकांना मिळाले आहे. आपल्याकडे विज्ञान पत्रकारिता हे क्षेत्रही अजून विकसीत झालेले नाही. त्यामुळे विज्ञान संशोधनाची माहिती जनसामान्यांपर्यत पोहोचणे कठीण असते. त्याचबरोबर अशी प्रसृत होणारी माहिती वाचणे आणि समजून घेणे आवश्यक असते. या माहितीचे विश्लेषण करून समजून घेणे गरजेचे आहे. हीच खरी ज्ञाननिर्मितीची आणि वैज्ञानिक द्ष्टीकोन बाळगणाऱ्या समाजाची उभारणी करण्यासाठीची मूलभूत गरज आहे.

 

-०-

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

सर्वांगीण विकासासाठी झटणारी गुरुमाता : वैशाली धायगुडे मॅडम

 शिक्षक दिन विशेष :

विद्यार्थी जीवनामध्ये अनेक शिक्षक भेटतात. त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांचे दान ते विद्यार्थ्यांना देतात. त्यातून विद्यार्थी घडत जातो. विषयाचे अध्ययन सुरू असताना स्वंयअध्ययन करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक असते. हे कौशल्य ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त होते, ते विद्यार्थी घडतात. असे विद्यार्थी घडवणारे शिक्षक मला लाभले, हे माझे भाग्य. माझ्या आयुष्यात भेटलेल्या शिक्षकांपैकी एक महत्त्वाच्या शिक्षिका म्हणजे वैशाली धायगुडे मॅडम. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सेवेत असताना आणि नंतरही कायम कार्यरत मॅडमचे ऋण कधीच फेडता येणार नाहीत. आजच्या शिक्षकदिनी त्यांच्याबद्दलच्या काही साठवणीतील आठवणी….

________________________________________________________

 शिक्षक हा खऱ्या अर्थाने शिल्पकार असतो, विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो आणि कुंभार जसा मातीला आकार देतो, तसा शिक्षक आकार देत असतो, असे म्हणण्याला काही अर्थ नाही. त्याचे कारण म्हणजे कुंभार एकदा तयार केलेल्या चिखलातून हव्या तशा मूर्त्या बनवत असतो. त्याला एकाच आकाराच्या, प्रकारच्या मूर्त्या बनवता येतात, तसे शिक्षकाचे नसते कारण एका वर्गात विशिष्ट अर्हता धारण करून प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हवे ते उद्दिष्ट गाठून देण्याचे कार्य शिक्षकाला साध्य होत नाही. कारण माती कुंभाराच्या इशाऱ्यानुसार वळत असते. ती विरोध करत नाही. तसे विद्यार्थ्यांचे नसते. ते शिक्षकाच्या इशाऱ्याप्रमाणे वागत नाहीत. चांगले गुरू, शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांना चांगले घडविण्याचा प्रयत्न करत असतात. सर्वांना समान संधी देत असतात. मात्र शिक्षकाने दिलेले हे दान घेण्याची ज्यांची पात्रता असते, ते विद्यार्थी घडतात. असे प्रत्येक वर्गात काही विद्यार्थी असतात. त्याची गरज ओळखून त्यांना शिक्षक सहकार्य करतात. शिक्षकांच्या ते लक्षातही येतात. मात्र केवळ त्यांच्यावर लक्ष न देता संपूर्ण वर्गाला ते सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न करत राहतात. असेच आयुष्यभर असिधारा व्रत घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षिका मला माझ्या पदवी अभ्यासाच्या वेळी भेटल्या आणि त्यांनी माझ्याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. या शिक्षिका म्हणजे वैशाली नागेश धायगुडे मॅडम.

बार्शीच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालो, मात्र कसाबसा प्रथम श्रेणी घेऊन. तेवढ्या गुणांवर या महाविद्यालयात बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाला मला प्रवेश देता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स विषयाला कोठे प्रवेश मिळू शकेल, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात १९८४ साली जवळपास एक महिना वास्तव्य केले होते. वस्तीगहात राहताना या महाविद्यालयाचा परिसर मनापासून आवडला होता. या महाविद्यालयाचा परिसर बार्शीच्या कॉलेजपेक्षा खूपच सुंदर होता. मी दयानंद महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो का याची गावातील आबासाहेब शिंदे यांना चौकशी करायला सांगितले. आबासाहेब त्यावेळी रसायनशास्त्र विभागात प्रयोगशाळा सहाय्यक होते. त्यांनी चौकशी करून प्रवेश मिळू शकतो असे सांगितले. वडील प्राथमिक शिक्षक असल्याने कोणतीही आधिकची फी भरावी लागणार नव्हती.

मी जून १९८६ मध्ये सोलापूरला जाऊन दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रवेश घेताना प्रथम वर्षासाठी इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हे विषय निवडले. दयानंद महाविद्यालयात एक वेगळी संस्कृती होती. प्रत्येक विभागाला वेगळी इमारत होती. आंतरविभागीय विषय हवामानशास्त्र, जैवरसायनशास्त्र असे विषय द्वितीय वर्षाला निवडता येत होते. पायाभूत सुविधा जशा प्रशस्त होत्या, तसेच विशाल मनाचे शिक्षक होते. महाविद्यालयाची गुणवत्ता टिकून राहावी यासाठी वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक बारावीच्या वर्गाला शिकवत असत. त्याचप्रमाणे प्रथम वर्षासाठी ज्येष्ठ शिक्षक अध्यापन करत असत. (आता ही अध्यापन संस्कृती राहिली नाही, असे ऐकावयास मिळते.) परिणामी त्या विषयाकडे विद्यार्थी आकर्षित होत असत.

पहिल्या वर्षी भौतिकशास्त्र शिकवण्यासाठी विभागप्रमुख मनगोळी सर, डॉ. नागेश धायगुडे आणि प्रा. वैशाली धायगुडे मॅडम होते. मनगोळी सरांची मातृभाषा मराठी नसावी. मात्र अत्यंत सोप्या इंग्रजीत मध्येच मराठी शब्द वापरत ते खूप सुंदर पद्धतीने जनरल फिजिक्सचा भाग शिकवत असत. दुसरा पेपर होता तो इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिजमचा हा पेपर धायगुडे सर आणि मॅडम शिकवत असत. सरांचे अक्षर आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत इंग्रजीतून शिकवण्याची पद्धत मुलांना भावत असे. मॅडमकडे त्यातील अवघड, विद्यार्थ्याला समजायला कठीण वाटणारा भाग असायचा. त्या आयआयटीमध्ये शिकायला असल्याने त्यांना कठीण भाग देतात, अशी विद्यार्थ्यात कुजबूज असायची. त्याही इंग्रजी माध्यमातून शिकवत. मात्र मुलांना काही समजले नाही तर मराठीतूनही समजावून सांगत. मॅडमची शिकवण्याची पद्धत वेगळी. तीन शिक्षक, तिघांच्या शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या. मात्र विद्यार्थी या तिघांच्याही शिकवण्यामुळे भौतिकशास्त्र विषयाच्या प्रेमात पडत.

दुसऱ्या वर्षी यातील एक विषय सोडावा लागत असे. मी रसायनशास्त्र विषय सोडून इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय निवडले. दुसऱ्या वर्षी जाधव सर, धायगुडे मॅडम आणि धायगुडे सर काही तास घेत असत. दुसरे वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकच विषय निवडावा लागत असे. तोपर्यंत धायगुडे सर आणि मॅडमच्या शिकवण्यामुळे माझ्या मनावर भौतिकशास्त्राने बराच कब्जा करायला सुरुवात केली होती. इलेक्ट्रॉनिक्स तरीही आवडत होते. इलेक्ट्रॉनिक्स की भौतिकशास्त्र यामध्ये शिक्षकाच्या अध्यापनाने इलेक्ट्रॉनिक्स विषय बाजूला पडला आणि मी भौतिकशास्त्र विषय घेऊन पदवी अभ्यासक्रम घ्यावयाचे निश्चित केले.

तसा प्रथम वर्षापासून शैक्षणिक उपक्रमाबरोबर वक्तृत्व, निबंध स्पर्धामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. महाविद्यालयातील एखाद्या विद्यार्थ्याने क्रीडा, सांस्कृतीक स्पर्धेत यश मिळवले तर त्याचे नाव लिहिलेला फलक दर्शनी भागात लावलेला असे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसातच या संस्कृतीची ओळख झाली आणि आपलं नावपण असंच बोर्डवर झळकले पाहिजे, असे मनात येऊन गेले. आपला प्रांत सांस्कृतीक होता. माझ्‍या शालेय जीवनामध्ये निबंधाचे चांगलंच कौतुक करण्यात येत असे. निबंध स्पर्धा हा प्रकार आपल्याला पेलवेल असे वाटले. काही दिवसातच जायंटस ग्रुप ऑफ सोलापूर यांच्या निबंध स्पर्धेची जाहिरात आली. चार-पाच विषय होते. त्यातील ‘अंमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर १००० शब्दापर्यंतचा निबंध लिहून पाठवायचा होता. मी त्याबाबत काही संदर्भ शोधून छान निबंध तयार केला आणि मुदतीत टिळक चौकातील दिलेल्या पत्त्यावर नेऊन दिला. निकालाची उत्सुकता होती. अशा स्पर्धेत भाग घ्यायचा पहिलाच प्रसंग होता. त्यावेळी मोबाईलचे युग कल्पनेतही नव्हते. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी छापून आली. त्या काळी संचार, केसरी गर्जने, विश्वसमाचार, तरूण भारत अशी काही मोजकी दैनिके सोलापूरातून प्रकाशित होत असत. तोपर्यंत माझ्या वर्गातील सर्वांशी ओळखीही झाल्या नव्हत्या. आम्ही सकाळी चहा घ्यायला टपरीवर गेलो. तेथे आमचे चहा-नाष्टा घेत पेपर वाचन चालत असे. चहा घेत असताना राजेंद्र शिंदे या वर्गमित्राने येऊन प्रथम माझे अभिनंदन केले. ते पेपरचे पान घेऊन क्षणात बातमी वाचून काढली. पहिल्यांदाच माझे नाव छापून आलेले होते. खूप आनंद झाला होता. तब्बल तीनशे रूपयांचे पहिले बक्षीस (त्यावेळी महिन्याला खानावळीसाठी मला १४० रूपये द्यावे लागत) मिळाले होते. आता ही बातमी शिक्षकांना आपण कशी सांगायची, असे मनात होते.

मात्र प्रॅक्टिकलसाठी भौतिकशास्त्र विभागात गेलो आणि मॅडम आम्हाला प्रॅक्टिकलला नसतानाही, पहिल्या वर्षाच्या प्रयोगशाळेत आल्या. माझे चुलतबंधू सुरेश शिंदे हे धायगुडे सर आणि मॅडमचे फॅमिली फ्रेंड होते. त्यामुळे त्यांचा माझा परिचय होता. त्यांनी बातमी वाचली होती. त्या माझ्याजवळ आल्या आणि विचारले, ‘तुम्ही निबंध स्पर्धेत भाग घेतला होता का?’ मी ‘हो’ म्हटले. त्या लगेच मोठ्याने म्हणाल्या ‘जायंटस क्लबच्या निबंधस्पर्धेत विलास शिंदेना पहिले बक्षीस मिळाले आहे, त्यांचे अभिनंदन.’ एकिकडे आपण स्वत: शिक्षकांना कसे सांगायचे, असा मी विचार करत होतो. हा प्रश्न मॅडमनी चुटकीसरशी सोडवला होता. पुढे त्यांनी मला कोणाचे मार्गदर्शन घेतले, आणखी काय लिहिता, असे बरेच प्रश्न विचारले. या स्पर्धेसाठी मी कोणाचेच मार्गदर्शन घेतले नाही, असे सांगितले. तसेच कविता लिहितो, हे ही सांगितले. ‘तुम्हाला साहित्यात रस असेल, तर तुम्ही वनस्पतीशास्त्र विभागातील शाम कुलकणी सरांना भेटा असे आवर्जून सांगितले.

मी शाम कुलकर्णी सरांना भेटलो आणि ‘अक्षरमंच’ या महाविद्यालयाच्या भित्तीपत्रकाचे काम पाहू लागलो. यातून आमच्या वर्गात शिकणाऱ्या नरेंद्र अंभोरे यांचा परिचय झाला. अंभोरे यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी संपादक म्हणून काम करता आले. दुसऱ्या दिवशी जायंटस क्लबचे पत्र मिळाले माझे नाव बोर्डवर लागले. पुन्हा एकदा अभिनंदन झाले. माझे अल्पकालीन ध्येय साध्य झाले होते. पुढे ज्या-ज्या स्पर्धेची जाहिरात येईल त्या सर्व स्पर्धात भाग घेऊ लागलो. मध्येच एक दिवस कामत सरांनी, ‘निबंध स्पर्धेला पाठवण्यापूर्वी धायगुडे मॅडमना दाखवत जा’, असे सांगितले. त्यानंतर रोटरी क्लबची निबंध स्पर्धा जाहीर झाली. विषय होता, स्त्री-मुक्ती. मी निबंध तयार केला आणि मॅडमना भितभितच विचारले, ‘मॅडम, हा निबंध दाखवायचा होता’. मॅडमनी निबंध लगेच वाचायला घेतला आणि पाच मिनिटात वाचून संपवला. ‘मी असाच निबंध पाठवणार, की पुन्हा लिहिणार’, असे विचारले. मी म्हटलं, ‘काही बदलायचे असेल तर पुन्हा लिहितो.’ मॅडमनी लगेच निबंध पुन्हा वाचायला आणि त्यामध्ये दुरूस्त्या करायला सुरुवात केली. दहा-बारा व्याकरणाच्या दुरुस्त्या केल्या. एक मुद्दा वाढवण्यास सूचवले. जी गोष्ट करायची ती परिपूर्ण असली पाहिजे, असा आग्रह त्या कायम धरत.

मी तो निबंध घेतला आणि हॉस्टेलवर संध्याकाळी पुन्हा लिहून काढला. दुसऱ्या दिवशी तो रोटरी क्लबच्या कार्यालयात सादर केला. अर्थातच या स्पर्धेतही पहिले बक्षीस मिळाले. तेथून पुढे कोणत्याही स्पर्धेसाठी निबंध पाठवताना मॅडमना तो दाखवून दुरूस्त करूनच पाठवत असे. अनेक स्पर्धात पहिले किंवा दुसरे बक्षीस हमखास मिळायचे. अशी दरवर्षी पाचसहा बक्षीसे मिळायची. त्यानंतर सोलापूर बाहेरच्या स्पर्धांसाठीही निबंध पाठवले आणि बक्षीसे मिळवली. त्यामध्ये मॅडमचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते. आयआयटीमध्ये इतर विषयही शिकवले जातात. विद्यार्थ्यांना इतर विषयातील अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध असते. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्येही आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे. दयानंद महाविद्यालयात, असे कोणतेही बंधन किंवा नियम नसताना भौतिकशास्त्र शिकणाऱ्या मुलाला ही सुविधा उपलब्ध होती. धायगुडे मॅडम आणि सर विद्यार्थ्याला भौतिकशास्त्राचा कोणताही संबंध नसलेल्या, निबंध लेखनाचे कौशल्य वाढवण्यासाठी कष्ट घेत होते. त्यांनी कधीही याचा आणि तुमच्या विषयाचा काय संबंध, असा प्रश्न विचारला नाही. उलट आपला बहुमूल्य वेळ अशा मार्गदर्शनासाठी दिला. त्यांनी अशा कार्यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये अशा तरतुदी येण्याची वाट पाहिली नाही. ते येण्याच्या कित्येक वर्ष अगोदर हे सारे घडत होते.

विद्यार्थ्यांने केवळ विषयाचे ज्ञान घ्यावे म्हणून त्या कार्यरत नव्हत्या. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्या स्वत: एनसीसी कॅडेट होत्या. त्या खेळाडूही होत्या त्यां राष्ट्रीय पातळीवर खेळल्या होत्या. आता त्या भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत विविध उपकरणाशी लिलया खेळत होत्या. विद्यार्थ्यांना ती कौशल्ये प्राप्त व्हावीत, असे मनोमन प्रयत्न करत होत्या. अंधारखोलीतील (डार्क रूममधील) प्रयोग त्या सहज करून दाखवत. इतर नवीन शिक्षकांना जे प्रयोग करून दाखवायला दोन तास लागत, तेच प्रयोग मॅडम अर्ध्या तासात करून दाखवत असत. दुसऱ्या वर्षाचे प्रयोग आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत असायचो. मॅडमना सर्व उपकरणे शरण आली असावीत. मॅडमच्या उपस्थितीत कोणत्याही उपकरणाने सहकार्य करायचे नाकारले नाही. सगळी उपकरणे निमूट काम करत असत. जेव्हा उपकरणे एवढी सरळ वागायची, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये वाकड्यात जाण्याचे धाडस कसे येणार. विद्यार्थी प्रयोग करताना मॅडम मधून एक फेरी मारून जात. मध्येच विद्यार्थ्यांबरोबर बोलत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष प्रयोगावर केंद्रित झालेले असायचे. 

मी बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्गात शिकत असताना, आमची प्रात्यक्षिके वरच्या मजल्यावरील प्रयोगशाळेत होत असत. त्या प्रयोगशाळेतील डिमरमध्ये स्पार्किंग होत असे. तोपर्यंत उपकरणे हाताळण्याचे कौशल्य प्रयोगशाळा सहाय्यक कारंडे यांच्या लक्षात आले होते. त्यातच मी हिंदुस्तान इन्स्टिट्युट या खाजगी संस्थेतून विद्युत उपकरणे हाताळण्याचा कोर्स केला होता. कारंडे यांनी मला डिमर काढून आतल्या कॉईलवरील आवरण न जाता कार्बन काढणार का असे विचारले. मी ही तेवढाच हात साफ होईल म्हणून लगेच ते साफ करायला घेतले. दोन डिमरचा कार्बन साफ करून झाले. त्यांचे काम सुरळीत सुरू झाले. तिसरा डिमर साफ करत असताना अचानक शिपायाने येऊन फॅनचे बटण दाबण्याऐवजी डिमरची पीन असलेले बटन सुरू केले. जोराचा झटका बसला. त्यांने लगेच बटण बंद केले. मात्र माझ्या अनियंत्रीत हालचाली झाल्या. पाय अचानक पुढे गेला. पुढे लोखंडी पट्टी असलेले स्टूल होते. त्या स्टूलच्या खालच्या पट्टीवर पाय आदळला. पाय आदळताना डाव्या पायाच्या करंगळीशेजारचे बोट आणि करंगळीच्या मधल्या भागात ती पट्टी आली. काही कळण्याच्या आत रक्ताची धार सुरू झाली. मला लगेच महाविद्यालयाच्या दवाखान्यात नेले. तिथल्या डॉक्टरनी पटकन तीन टाके घातले. पायाला माती, चिखल लागू देऊ नका म्हणून सांगितले. जखम खोलवर झाली होती. चालताना नको एवढ्या वेदना होत होत्या. कसेबसे आवरावे लागत होते. जखमेजवळ पाणी पोहोचल्यास जखम चिघळू शकते असे सांगितल्याने आंघोळही नाही. मेसला जेवायलाही जाता येत नव्हते. बाहेरून मेसवर डब्बाही मागवता येत नव्हता आणि होस्टेलची मेसही नव्हती. प्रयोगशाळा सहाय्यक कारंडे याला विभागप्रमुख मनगोळी सर खूप ओरडले होते. त्याला ओरडून माझी जखम भरणार नव्हती. या काळात मॅडमनी इतर मुलांकडे माझी चौकशी केली. संध्याकाळी डब्बा घेऊन मॅडम आणि सर निळया स्कूटरवरून होस्टेलवर आले. त्यापुढे आठ दिवस दररोज माझ्यासाठी डब्बा हॉस्टेलवर पोहोच होत होता. डॉक्टरची औषधे, आणि मातेच्या आपुलकीने घेतली जाणारी ही काळजी यामुळे मी लवकरच बरा होऊन पुन्हा वर्गात येऊ लागलो. मात्र या काळात माझ्या मनात मॅडमबाबत एक बदल झाला. एका चांगल्या शिक्षिकेची मनातील प्रतिमा, मातृप्रतिमेत कधी बदलली ते कळालेच नाही.

माझे उपकरणे हाताळण्याचे आणि प्रयोग करण्याचे कौशल्य इतरही शिक्षकांच्या लक्षात आले होते. तसेच माझे हस्ताक्षर कौशल्यही जर्नलच्या रूपात सर्वांच्या लक्षात आले होते. त्यातही अक्षरमंचचे अंक नियमीत निघत असत. त्यावेळी नुकतेच संगणक शिक्षणसंस्थेत दिसू लागले होते. फ्लेक्सचा जमाना यायचा होता. त्यामुळे विभागातील विविध कार्यक्रमाचे बोर्ड रंगीत खडूनी सजवले जात. हे काम माझ्याकडे आपोआप आले. त्यावेळी फलकावर लिहावयाचा मजकूर प्रथम कागदावर लिहून मॅडमकडून तपासून घ्यायचो. मॅडमचे गोलाकार अक्षर सुंदर आहे. त्यांच्या व्याख्यानाच्या नोटसही तशाच अक्षरात कोणतीही खाडाखोड नसलेल्या असायच्या. ही नोटस काढण्याची सवय माझ्यातही नकळत आली. कोणतीही खाडाखोड न करता लेखन व्हायला हवे हा संस्कार मॅडमचाच. त्या शिकवताना विद्यर्यांनी मुद्दे लिहून घ्यावेत आणि संदर्भ पुस्तके वापरून नोटस काढाव्यात, असे सांगत असत. त्यामुळे बी.एस्सी.ला असतानाच आम्हाला बी.एल. थरेजाचे बेसीक इलेक्ट्रॉनिक्स, थर्मोडायनॅमिक्सला श्रीवास्तव, ॲटोमीक फिजिक्सला राजम या लेखकांची आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची ओळख झाली. संदर्भ पुस्तक वापरणे त्यातून नोटस काढणे, या गोष्टींची सवय झाली. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच विषय शिकायचा कसा, अभ्यासायचा कसा, याची शिकवण मिळाली आणि आम्ही स्वत:च्या नोटस काढू लागलो. मॅडमकडून शिकलेल्या अनेक गोष्टीतील ही सर्वात महत्त्वाची गोष्ट.

पुढे शिक्षकांचा १९८८ च्या अखेरीस शिक्षकांनी संप पुकारला. आंदोलनामध्ये सर्वच शिक्षक सहभागी होते. आम्ही जाताना येताना महाविद्यालयाबाहेर बसलेले शिक्षक पहात होतो. मात्र यामध्ये मॅडम किंवा सरांना क्वचित पाहिले. या संपामुळे वर्गात शिकवणे पूर्ण बंद झाले होते. जवळपास दोन महिने हा संप चालला. शिक्षकांनी संपातील दिवस सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवून भरून काढायचे होते. त्यामुळे दररोज वर्ग सुरू झाले. तो जानेवारीचा शेवटचा आठवडा होता. आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. झुंजूरवाड यांनी मला बोलावल्याचा निरोप विभागात आला. प्राचार्यानी बोलावले म्हणजे अंगावर काटा यायचा. पण मला काहीतरी वेगळी बातमी असावी, असे वाटत होते. मी तरीही भितभितच गेलो. प्राचार्यानी मला एक पत्र दाखवले आणि तुम्ही या शिबिरासाठी जायचे असे सांगितले. अभ्यासाची, शिकवण्याची आणि शिकण्याची घाई सुरू असताना अशा शिबीरासाठी जवळपास तीन आठवडे घालवणे म्हणजे एम.एस्सी. प्रवेशाच्या स्वप्नावर पाणी सोडण्यासारखे होते. त्यामुळे मी प्राचार्याना लगेच नकार सांगितला. प्राचार्यांनी माझे मन वळवण्याची जबाबदारी धायगुडे सरांवर सोपवली. सरांनी मला खूप समजावले. सरांच्या पेपरचा अभ्यास करणे सहज शक्य होते. मात्र मॅडम शिकवत असलेल्या क्वांटम मेकॅनिक्सचे काय करायचे असा प्रश्न होता. मी सरांनाही जवळपास नकारच दिला होता. सरांनीच मॅडमना मला समजावून सांगायला सांगितले असावे. 

मॅडमनी मला सहज बोलावल्यासारखे बोलावून, ‘प्राचार्यांनी का बोलावले होते’ असे विचारले. मी खिशातील पत्र काढून मॅडमना दाखवले. मॅडमनी लगेच ‘अभिनंदन’ केले. ‘खूप छान संधी मिळाली आहे’, असेही म्हणाल्या. मी म्हटलं, ‘मॅडम, हे जवळपास तीन आठवडे जातील. पुन्हा मी युवक महोत्सवासाठी जावे लागेल. जवळपास एक महिना असा गेल्यावर मला एम.एस्सीला प्रवेश कसा मिळेल.’ मॅडम लगेच म्हणाल्या, ‘तुम्ही जावा. अशी संधी पुन्हापुन्हा मिळत नसते. तुम्ही जरूर जावा. अभ्यास होत राहील. आल्यानंतर नोटस मिळतील. होईल तुमचा अभ्यास. तुम्ही गेलंच पाहिजे.’ मी पुन्हा म्हटलं, ‘मॅडम बाकी सारे संमजेल हो, पण क्वांटम मेकॅनिक्स समजायला जड जाईल.’ मॅडमनी पुन्हा सांगितले, ‘मी आहे ना, जे समजणार नाही ते मी शिकवेन. तुम्ही बिनधास्त जावा.’ मॅडमनी दिलेल्या खात्रीमुळे मी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोलापूर सोडले. मार्च १९८९ मध्ये मी परत आलो तेव्हा सर्व अभ्यासक्रम शिकवून झाला होता. सर्व शिक्षकांनी नोटस, पुस्तके उपलब्ध करून दिली. बाकी सर्व विषयांचे बऱ्यापैकी आकलन होत होते. मात्र क्वांटम मेकॅनिक्स डोक्यावरून जात होते. अखेर मॅडमनी तो सेक्शन घरी शिकवला. कोणतेही शुल्क न घेता. हे शिकवणे तसे किती त्यागाचे होते हे मला मी बाप झाल्यावर लक्षात येते. कारण त्यावेळी दिप्ती आणि प्रज्योत हे दोघेही तसे लहान होते. शालेय विद्यार्थी. त्यांचा हक्काचा हा वेळ मॅडम मला देत होत्या. एवढेच नाही, अनेकदा शिकवत असताना उशीर झाला तर, घरीच जेवायला लावत आणि नंतर मी होस्टेलवर येत असे.

मॅडम आणि सरांच्यामुळे मी लेखनाकडे वळलो. दयानंद महाविद्यालयातील शिक्षकांनी केलेले संस्कार आजन्म पुरणारे आहेत. मात्र त्यातील सर आणि मॅडम यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांनी प्रज्योत, दिप्ती यांच्याइतकेच प्रेम माझ्यावर केले. तसे त्या सर्वांशीच आपुलकीने वागत. सर्वांच्या अडचणी सोडवण्यात पुढाकार घेत. मला हे कायम जाणवत असे. त्यातून त्यांच्याप्रती कामयत मनात कृतज्ञता भाव वढत गेला. त्यामुळे आयुष्यातील अनेक निर्णय घेताना मी त्यांचे मत जाणून घेत असे.

पुढे मी सोलापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर केंद्रात अधिव्याख्याता म्हणून रूजू झालो. माझ्या मनात विचार आला की, राष्ट्रीय विज्ञान दिनी एक ‘विज्ञान पुरवणी’ प्रकाशित व्हावी. मी हा विचार मॅडम आणि सरांच्यापुढे बोलून दाखवला. लगेचच आम्ही तरूण भारतचे संपादक विवेकजी घळसासी यांना भेटलो. यापूर्वी ‘मध्यमा’ पुरवणीचे काम मी अनेक दिवस पाहिले असल्याने पुरवणी काढण्यासाठी काय, काय करावे लागते, हे मला माहीत होते. आम्ही विवेकजीना कल्पना सांगताच त्यांनी लगेच होकार दिला. मात्र विज्ञान लेखकांशी माझा परिचय नव्हता. सर आणि मॅडमनी अगदी जयंत नारळीकर, बाळ फोंडके, विगो कुलकर्णी, निरंजन घाटे हेमचंद्र प्रधान अशा अनेक लेखकांशी संपर्क साधला. या मान्यवरांनीही लेख दिले आणि २८ फेब्रुवारी १९९६ पासून पुढे मी सोलापूरमध्ये असेपर्यंत आम्ही दरवर्षी विज्ञान पुरवणी प्रकाशित करत राहिलो. पुढेही तरूण भारतची विज्ञान पुरवणी मॅडम आणि सर प्रकाशित करत. यातून मी विज्ञान लेखनाकडे जास्त ओढला गेलो. या काळात काही वेळा अगदी उशिरापर्यंत आम्ही काम करत असायचो आणि मॅडमही बरोबर असत.


पुढेही हे घर माझ्यासाठी प्रज्योत, दिप्तीइतक्याच हक्काचे झाले. घराशी कायमचे जोडले जाण्यामध्ये मॅडमचा स्वभाव महत्त्वाचा ठरला. मॅडम सरांपेक्षा थोडा प्रॅक्टिकल विचार करत. मात्र विद्यार्थ्यांसाठी काही करायचे झाले तर सरांच्याही पुढे असत. याचा अनुभव मी अनेकदा घेतला. विद्यार्थ्यांने एखादी अडचण सांगावी आणि मॅडमनी ती आईच्या ममतेने सोडवावी, याचे दर्शन अनेकदा घडले. यातून मी या कुटुंबाशी कायमचा जोडला गेलो. कन्या वैष्णवीसाठी सर ‘गुड मॉर्निंग आजोबा’ आणि मॅडम ‘आज्जी’ बनल्या. तिचेही मॅडमकडून भरपूर लाड झाले. मी प्रशासकीय सेवेत उपकुलसचिव झाल्यानंतर सोलापूरला २००३ पर्यंत होतो. तोपर्यंत दररोज किमान फोनवर बोलायचो. आठवड्यातून एकदा सर्वंजन एकत्र यायचो. सर बाहेरगावी गेले असले तरी यात खंड नसायचा. पुढे माझी बदली कोल्हापूरला झाली.

मॅडम आणि सर दोघेही सेवानिवृत्त झाल्यानंतर सर अनेकदा कार्यालयीन कामासाठी कोल्हापूरला आले. मात्र २००९ च्या फेब्रुवारीमध्ये सर आणि मॅडम प्रथमच दोघेही कोल्हापूरला आले. राहिले. मुलांना खऱ्या अर्थाने आजी-आजोबा अनुभवता आले. स्नेहबंध आणखी दृढ झाला. छोट्याछोट्या प्रसंगात, कमी क्षणातही आनंदाची साठवण कशी करायची, हे त्यांच्याकडूनच शिकता आले. विद्यार्थ्याला केवळ क्रमीक पुस्तकातील, अभ्यासक्रमात नमूद केलं तेवढ्यावर समाधान न मानता त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर या उभयतांनी भर दिला.

त्यानंतर तीनच वर्षांत सरांचे निधन झाले. त्यावेळी ‘एककांचे मानकरी’ या पुस्तकाचे माझे लेखन सुरू होते. सरांच्या जाण्याचा धक्का माझ्यासाठी तीव्र होता. मी पुस्तकाचे काम जवळपास थांबवले होते. मात्र मॅडमच्या सूचनेनुसार पुन्हा ते पुस्तक पूर्ण करायला सुरुवात केली आणि तीन वर्षांनंतर ते प्रसिद्ध झाले. ते पुस्तक सरांना अर्पण केले. त्याचवेळी मी ‘एककांचे इतर मानकरी’ हे पुस्तक लिहायचा विचार करत होतो. आज ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि हे पुस्तक आज प्रकाशनासाठी तयार झाले आहे. एककांचे इतर मानकरी हे मॅडमना अर्पण केले आहे.

पुढे मॅडम पुण्याला राहू लागल्या. मात्र सरांच्या स्मरणार्थ सोलापूरच्या घरांमध्ये शालेय मुलांना प्रयोगाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्यामध्ये विज्ञानाची रूची निर्माण व्हावी, यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या. सरांच्या स्मरणार्थ व्याख्यानमालाही मराठी विज्ञान परिषदेच्या सोलापूर शाखेमार्फत सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्षाच्या निमित्ताने दिप्तीच्या सहाय्याने आवर्त सारणी कशी सहज समजावून सांगता येईल यासाठीचे एक प्रतिमान (मॉडेल) तयार केले. अनेक शाळांतून आवर्त सारणीवर व्याख्याने दिली. त्यांच्या या मॉडेलची चर्चा रशियापर्यंत पोहोचली. त्यांना या मॉडेलसह रशियात आमंत्रित केले. त्यांना त्यावेळी जाणे जमले नाही. मात्र, विज्ञान प्रसाराचे कार्य त्या आजही करत आहेत.

इकडे मीही याच विषयावर ‘आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ हे राज्य शासन पुरस्कार प्राप्त पुस्तक लिहिले. भौतिकशास्त्र तितक्याच समर्थपणे शिकवत असतानाच, या पुस्तकाच्या लेखनाचा विचार आणि त्यासाठी आवश्यक असणारे लेखन कौशल्याचे संस्कार देणाऱ्या या गुरूमातेला त्रिवार वंदन आणि शिक्षक दिनांच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा!





शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

विद्येच्या प्रांगणातील पाच तपे...


प्रा. माणिकराव साळुंखे हे शिक्षणतज्ज्ञ, पाच विद्यापीठांचे कुलगुरू, थोर रसायनशास्त्रज्ञ, अनेक कंपन्यांचे संस्थांचे सल्लागार म्हणून सुपरिचित व्यक्तीमत्व. मला त्यांच्यासमवेत अनेक वर्षे काम करता आले. त्यातील पावणेपाच वर्षे जवळून काम करता आले. त्या अनुभवामध्ये मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यामुळे माझ्यासाठी ते गुरुस्थानी. त्यांच्यावर मी ‘चैतन्याचा झरा…’ हा लेख माझ्या ब्लॉगवर ( http://drvnshinde.blogspot.com/2022/09/blog-post.html ) प्रकाशित केला. नुकतेच त्यांचे मनोविकास प्रकाशनामार्फत ‘विद्येच्या प्रांगणात’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. या पुस्तकावरील मनोगत, ग्रंथ परीक्षण या सदरात ‘समाज प्रबोधन पत्रिके’च्या एप्रिल-मे-जून २०२३ च्या अंकात प्रकाशित झाला आहे. तो लेख आपल्यासाठी येथे साभार प्रकाशित करत आहे.. 
__________________________________________________

    दरवर्षी अनेक पुस्तके प्रकाशित होतात. मुद्रणतंत्र जसे सोपे झाले, तसे पुस्तक प्रकाशनाचे प्रमाण वाढले. यातील अनेक पुस्तकांचे आयुष्य खूप कमी कालावधीचे असते. अनेकजण तर गौरवग्रंथ छापतात. आप्तस्वकीयांत वाटण्यापुरता त्यांचा उपयोग असतो. याउलट, काही लोकांचे आयुष्य असे असते की त्यांची जीवनकहाणी वाचण्याची, ऐकण्याची च्छा अनेकांना असते. अशा अलौकिक कार्याचे धनी असणाऱ्या व्यक्ती स्वत:चे चरित्र सांगण्याच्या प्रयत्नात पडत नाहीत. त्यांना बोलायला भाग पाडावे लागते. त्यांनी लिहिणे तर आणखी कठीण असते. मात्र पाच विद्यापीठांचे कुलगुरूपद भुषविणाऱ्या डॉ. माणिकराव साळुंखे यांना लिहिते करण्यामध्ये मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यशस्वी झाले आहेत.

      शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राजस्थान केंद्रिय विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, सिंबायोसिस विद्यापीठ, पुणे आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे या पाच विद्यापीठांचे कुलगुरूपद भुषविण्याची संधी डॉ. माणिकराव साळुंखे यांना मिळाली. ही सर्व विद्यापीठे वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यांना ही संधी नशिबाने मिळालेली नाही; तर, त्यांनी त्यांच्या अथक शिकण्याच्या वृत्तीतून स्वत:चे अनुभवाचे दालन समृद्ध केल्याने आणि त्यांच्या संस्थेप्रती, कामाप्रती असलेल्या निष्ठेतून मिळाली आहे. त्यांनी जेथे कार्य केले, तेथे आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यामुळेच एका संधीतून दुसरी संधी त्यांना मिळाली आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी जे जे शक्य आहे ते पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तीचे आत्मचरित्र यावे, असे मनापासून वाटत होते. एक तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली होती. दुसरे त्यांचे शैक्षणिक प्रशासन त्या कालखंडात जवळून पाहिले होते आणि त्याचा प्रभाव कळत-नकळत माझ्यावरही झालेला आहे. तिसरे कारण म्हणजे २०१५ मध्ये माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना द्यावी अशी मी केलेली विनंती त्यांनी मान्य करून दीर्घ प्रस्तावना त्यांनी दिली होती. त्यातून त्यांचे मराठीतील लेखन कौशल्य समजले होते.

      त्यामुळे नेहमी वाटायचे की सरांनी आत्मचरित्र लिहायला हवे. त्यांचे विविध टप्प्यांवरील प्रयत्न, त्यांना सहाय्य करणारे शिक्षक, मार्गदर्शक, त्यांच्या मार्गात पेरले गेलेले काटे आणि त्या अडचणींवर त्यांनी केलेली मात हा सर्व प्रवास वाचनीय असणार, याची खात्री होती. मात्र सर स्वत:बद्दल बोलायला कधी फारसे उत्सुक नसतात. शिवाजी विद्यापीठात केलेल्या कामाचे श्रेय संबधित अधिकाऱ्यास देताना त्यांना पाहिले होते. त्यामुळे अरविंद पाटकर यांनी त्यांना लिहिते केले याबद्दल खरे तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यातून तयार झालेले ‘पाच विद्यापीठांचं कुलगुरू पद भूषविलेल्या ज्ञानयात्रीचे आत्मकथन – विद्येच्या प्रांगणात’ हे पुस्तक मराठी साहित्यातील आत्मचरित्राच्या दालनातील एक समृद्ध पान बनले आहे.

      या पुस्तकाला भालचंद्र मुणगेकर यांची प्रस्तावना आहे. मुणगेकरांनी राजस्थान येथील लेखकाचे कार्य जवळून पाहिले आहे. पुस्तकाची पाठराखण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. राम ताकवले आणि डॉ. अनिल कर्णिक यांचे या पुस्तकाबाबतचे अभिप्रायही सुरुवातीला छापले आहेत. त्यातून या पुस्तकात काय असावे, हे लक्षात येते. मात्र नेमके काय आहे, हे समजून घेण्यासाठी संपूर्ण पुस्तक वाचायला हवे. बालपणापासून ते भारती विद्यापीठाच्या कुलगुरूपदापर्यंतचा कालखंड या पुस्तकात आला आहे. प्रदीर्घ शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द त्यांनी ती नेमकेपणाने शब्दबद्ध केली आहे. मात्र त्यामध्ये त्यांच्या कार्यकौशल्याचे, शैक्षणिक व्यवस्थापनाचे आदर्श उदाहरण ठरू शकणारे अनेक प्रसंग राहिले आहेत, अशी हुरहूर त्यांचे कार्य जवळून पाहणाऱ्यांना जरूर वाटेल.

      पुस्तकाची विभागणी दोन भागांत आहे. पहिल्या भागात आठ प्रकरणे आहेत. या आठ प्रकरणांमध्ये प्रामुख्याने त्यांच्या शिक्षणाचा भाग येतो. दुसऱ्या भागामध्ये त्यांच्या नोकरीतील विविध टप्प्यांचे वर्णन येते. पहिल्या भागाच्या पहिल्या प्रकरणात ते साळुंखे घराण्याचा संक्षिप्त इतिहास देतात. मात्र हा भाग वाचत असताना ते कसे घडले, यासोबत त्या कालखंडात सण कसे साजरे होत, सामाजिक वातावरण कसे होते, लोकांची मानसिकता, शेती, शिक्षण व्यवस्था, तंत्रज्ञानात झालेले बदल, क्रीडासंस्कृती, गावातील परिस्थिती, नातेसंबंध, नात्यातील जिव्हाळा या सर्व बाबींची नकळत माहिती मिळत जाते. त्यांच्या गावात असणारे म.भा. भोसले गुरूजी, त्यांचे कार्य आणि त्यांचा लेखकावर असणाऱ्या प्रभावामागील कारण ‘विद्येच्या प्रांगणात’ हे पुस्तक वाचताना लक्षात येते. या भागात आईबद्दलच्या भावना सहज आल्या आहेत. ‘आमच्या घरातील बहुतेक स्त्रिया काळाच्या मानाने खूपच कर्तबगार होत्या’ (पान क्र.३०), अशा वाक्यातून लेखकाचा स्त्रियांबाबतचा आदरभावही समजतो.

शाळेत नाव घालण्याचा प्रसंग वाचताना पन्नाशी उलटलेला वाचक आपल्या बालपणात गेल्याशिवाय राहात नाही. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये लेखकाने वर्णन केल्याप्रमाणेच चित्र होते. नव्या शाळेतील प्रथांची माहिती नसल्याने पहिल्या बाकावर कायम बसणारा विद्यार्थी पुढे कायमचा शेवटच्या बाकावर का बसू लागतो, हे प्रत्येक शिक्षकांने समजून घ्यायला हवे (पान क्र.३५). नव्या विद्यार्थ्याला अशा कारणाने मिळालेला मार, त्यावर कसा आघात करू शकतो, याचे ते उत्तम उदाहरण आहे. शाळेत मिळालेला वाचनसंस्कार सरांनी आयुष्यभर जपला. पुस्तकाच्या याच भागात त्यांची वैद्यकीय शिक्षण घेण्याची अपुरी राहिलेली इच्छा, ती पूर्ण करण्यासाठी घरच्यांची जमीन विकण्याचा केलेला विचार, आणि लेखकाने केलेला पक्व विचार करत जमीन विकण्यास केलेला विरोध, त्यातून आलेले नैराश्य आणि त्यावर मात करत शेवटी बी.एस्सी.ला प्रवेश घेण्याचा निर्णय हे प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शक ठरावे. पालकांनीही ते आवर्जून वाचायला हवे. राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेताना ते राजकारणाच्या जवळ आले. महाविद्यालयातील निवडणुकांमध्ये सक्रीय भूमिका वठवली. परिणामी त्यांना स्वत: एम.एस्सी. करत असताना निवडणूक लढवावी, असे वाटले. त्यांनी ती लढवली आणि विद्यार्थी मंडळाचे अध्यक्षही झाले. त्यातून पुढे एन.एस.यु.आय.चे पश्चिम महाराष्ट्राचे सचिवपद त्यांच्याकडे आले. या सर्व घटनांमुळेच पुढे त्यांच्या मनात विद्यार्थी हितास सातत्याने सर्वोच्च प्राधान्य राहिले. पुढे संशोधनामध्ये स्वत:ला समर्पित करत ते राजकारणापासून दूर झाले. असे असले तरी ते राजकारणाकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहातात. हे वर्णन वाचल्यानंतर वाचकाचा राजकारण वाईट, हा गैरसमज दूर होईल.

शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर लेखकाला अनेक शिक्षक भेटत गेले. यातील ज्या शिक्षकांचा त्यांच्यावर काही ना काही प्रभाव पडला, त्यांचा उल्लेख आवर्जून येतो. त्यामध्ये म.भा. भोसले सरांपासून सुरुवात होते आणि डॉ. पारीख, डॉ. जगदाळे यांच्यापर्यंत जाते. पुढे सर्व पदव्या प्राप्त केल्यानंतर संशोधनामध्ये स्वत:ची जागा निर्माण करताना देश विदेशातील अनेक मार्गदर्शक लेखकाला भेटले. त्यांच्यापासून जे-जे चांगले घेता येईल, ते लेखकाने घेतले. त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख येतो. त्याचप्रमाणे राजाराम महाविद्यालयातील शिक्षक एस.जी. पवार यांना ‘जस्ट हॅव अ लुक’ असे वारंवार म्हणायची सवय होती. एका तासात ते किती वेळा म्हणतात, हे मोजल्याचे वर्णन वाचकालाही महाविद्यालयीन जीवनात नेल्याशिवाय राहात नाही. 

भारतात शिवाजी विद्यापीठ, इन्ड‍ियन इन्स्ट‍िट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमध्ये त्यांच्या संशोधनाची सुरुवात झाली. संशोधनाला देश विदेशात स्विकृती मिळू लागल्यानंतर त्यांना परदेश खुणावू लागले. इंग्लंड, इस्राईल, ऑस्ट्रिया, अमेरिका या देशात संशोधनाची नवी दिशा घेऊन ते शिवाजी विद्यापीठात परतले. इथंपर्यंत त्यांच्या संशोधनाची आणि खऱ्या अर्थाने त्यांची शिक्षक आणि संशोधक म्हणून कारकीर्द सुरू झाली. यात त्यांनी भारतातील विद्यापीठीय शिक्षणाचा आढावा घेताना शिक्षण कसे आहे आणि कसे असायला हवे, याबाबतचे विचार स्पष्टपणे मांडले आहेत. ‘कुलगुरू हा गुरूकुलाचा आद्य आचार्य असावा,’ अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे (पान क्र.७१). त्याचबरोबर ४७ हजार महाविद्यालयांपैकी केवळ १३ हजार महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतल्याची शिक्षण क्षेत्राचे भीषण चित्र दाखवणारी आकडेवारीही नमूद केली आहे. विद्यापीठात उच्चपदी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचे नातेसंबंध असणेही किती त्रासाचे ठरू शकते, हे वाचताना मन सुन्न होते. त्यामुळे लेखकाला विद्यापीठाबाहेर जावे वाटणे आणि त्यांचे जाणे, हे सर्व वाचून शिक्षणक्षेत्रातील कोत्या मनोवृत्तीची चीड येते.

शिवाजी विद्यापीठातून बाहेर पडून डॉ. साळुंखे इन्स्टिट्युट ऑफ सायन्स मुंबई या संस्थेत गेले. तेथे त्यांच्या संशोधनाला आणखी गती मिळाली. संशोधनात सहाय्यकारी व्यक्तीमत्वे जशी भेटली, तशीच त्रास देणारीही भेटली. मात्र अनेकांच्या सहकार्यातून तेथे एक संस्कृती त्यांना निर्माण करता आली. ती कशी निर्माण केली, हे मुळातून वाचायला हवे. या प्रकरणाच्या सुरुवातीला त्यांनी संस्थेची गौरवशाली परंपरा मांडली आहे. याच संस्थेत त्यांना संचालकपद मिळाले. त्यावेळी दुखावली गेलेली माणसं कशी वागतात, हे वर्णन लेखकाने अत्यंत संयतपणे केले आहे. त्यामध्ये कोठेही अशा व्यक्तींना खलनायकत्वाकडे नेले नाही. त्यामुळे हे आत्मचरित्र भावते. त्याचसोबत विविध संस्थांसोबत त्यांनी प्रस्थापित केलेले साहचर्य हे या क्षेत्रात कार्यरत अनेकांना मार्गदर्शक ठरावेत.

इन्स्टिट्यूटमधील संचालकपदाचा अनुभव घेऊन लेखक पुन्हा शिवाजी विद्यापीठात आले, ते कुलगुरू म्हणून. ज्या विद्यापीठात पदोन्नती रखडली, अडवली गेली, त्याच विद्यापीठात कुलगुरू झाल्यानंतर एखाद्याने धडा शिकवण्याचा प्रयत्न केला असता. मात्र लेखकाने विद्यापीठाच्या प्रगतीचा ध्यास घेतला. विद्यापीठाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. एकीकडे विद्यार्थ्यांच्या हिताची सदैव काळजी घेताना, त्यांनी अनेक नवे प्रयोग केले. यातील बहुतांश प्रयोगांचा मी सहभागी साक्षीदार आहे. परीक्षा विभाग, संलग्नता, पात्रता, पीजीबीयुटीआर, पदव्युत्तर प्रवेश अशा विविध विभागात त्यांनी अनेक सुधारणा केल्या. विद्यापीठाच्या जलसंधारणाच्या प्रयोगाला गती दिली. त्यांनी रचलेल्या पायावरच पुढे २०१७ मध्ये शिवाजी विद्यापीठ जलस्वंयपूर्ण झाले. मात्र अनेक प्रयोगांचा या कथनात उल्लेख नाही; तर काहींचा ओझरता उल्लेख येतो. पान. क्र.१२९ वर लेखकाने विद्यापरिषद बैठक वेळेत संपावी म्हणून केलेला प्रयोग लिहिला आहे. ही बैठक ४ एप्रिल रोजी होती. १ एप्रिल रोजी लेखकाचा वाढदिवस. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेल्यानंतर त्यांनी ही बैठक लवकर संपवण्यासाठी नियोजन कसे करता येईल, याबाबत ३५० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा करून निर्णय अंतिम करून ४ एप्रिलची बैठक पाच वाजण्यापूर्वी संपवली. दिवस कोणताही असो, निमित्त कोणतेही असो, संस्थेच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. इन्फोसिससोबतच्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करताना सर्वच शिक्षकानी जबाबदारी स्वीकारायला नकार दिल्यानंतर त्यांनी चक्क प्रशासनामार्फत त्याची अंमलबजावणी केली. तंत्रज्ञान विभाग सुरू झाल्यानंतर तेथील वसतिगृह अधिक्षकाची जबाबदारीही अशीच प्रशासनातील अधिकाऱ्यावर सोपवली. असे अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले. माणसे पारखण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळे कोणाकडे कोणती जबाबदारी द्यावी, याचे निर्णय ते लगेच घेत आणि त्यामुळे त्यांना प्रशासन गतीमान ठेवता आले. त्यामुळे हे आत्मचरित्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्रत्येकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे, असे आहे.

शिवाजी विद्यापीठात त्यांनी केलेले कार्य अद्वितीय होते. शिवाजी विद्यापीठातील कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांची नियुक्ती राजस्थानमधील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झाली. तेथेही अनुभवसमृद्ध आणि ज्ञानसमृद्ध कुलगुरू म्हणून त्यांनी कामाचा झपाटा लावला. एखाद्या नव्या संस्थेची उभारणी करताना येणारे सर्व अडथळे आणि संकटे यावर मात करत एक चांगले विद्यापीठ असा विद्यापीठाचा लौकिक झाला. हे सर्व त्यांनी ठरवले आणि झाले, असे नाही. अगदी सुरूवातीला भाड्याने जागा मिळवण्यापासून ते केंद्रीय विद्यापीठासाठी जागा मिळवेपर्यंत हे प्रयत्न सुरू राहिले. त्यानंतरही बांधकामे आणि प्रशासनाच्या पातळीवरही अनेक अडचणींवर मात करत हे विद्यापीठ उभे राहिले. भरती प्रक्रियेतील अडचणी, त्यामध्ये असणारे हितसंबंध, त्यातून येणारे तणाव याबाबतचे अनुभव वाचनीय आहेत. नव्या संस्थेची उभारणी करताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात केली, कोणी सहाय्य केले, विद्यापीठ कसे घडले, हे सर्व वाचण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांचे वागणे, बेशिस्त, अचानक घडणाऱ्या घटना आणि त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याने घ्यावयाचे निर्णय, त्यांचे वर्तन हे अभ्यासण्यासारखे आहे. अनेकांना यात आपले अनुभव दिसतील.

राजस्थानसारख्या नव्या प्रदेशात असे उत्तुंग कार्य केल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू झाले. येथे मात्र त्यांना मनाप्रमाणे कार्य करता आले नाही. राजकीय दबावाखाली काम करणे, राजकारणी लोकांचे हितसंबंध जपत राहण्याऐवजी त्यांनी राजीनामा देणे पसंत केले. यंत्रणेतून बाहेर पडले. तथापि, या दबावामध्येही त्यांनी आपला संयतपणा आणि निर्णयातील ठामपणा सोडला नाही. तेथेही आपला निर्णय योग्य असल्याची न्यायालयीन मोहोर उमटल्यानंतर ते बाहेर पडले. तत्कालीन कुलपतींनी निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला देऊनही ते बाहेर पडले. याबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातम्या त्यांनी पुस्तकात छापल्या आहेत. त्या आणि न्यायालयीन निकाल वाचल्यानंतर चांगले वागणे किंवा नियमाप्रमाणे वागणे कुलगुरूंनाही किती कठीण झाले आहे, हे लक्षात येते.

नाशिकच्या मुक्त विद्यापीठानंतर काही काळ ते काश्म‍िरमध्ये कार्यरत होते. त्यानंतर काही दिवसात त्यांनी सिम्बायोसिस विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी स्विकारली. अर्थात मध्यप्रदेशातील हे विद्यापीठ कौशल्य विद्यापीठ म्हणून उभे करण्याचे स्वाती मुझुमदार यांचे प्रयत्न होते. तेथेही ते फार काळ राहिले नाहीत. त्यानंतर ते भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू झाले आणि २०२२ पर्यंत तेथे राहिले. भारती विद्यापीठामध्ये २०१७ पासून कार्यरत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. या क्षेत्रातील संशोधन, चाचणी यासाठी विद्यापीठाने दिलेले योगदान मोठे आहे. त्याचबरोबर पीएच.डी. प्रबंधांचे मूल्यमापन, त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च यामध्ये कपात करण्यासाठी केलेल्या उपाययोजना हा सर्व भाग मुळातूनच वाचायला हवा. त्यांचे आणि पतंगराव कदम यांचे संबंध आणि एक राजकीय नेतृत्वही कसे माणूस म्हणून उत्तुंग असते, हे समजून घेण्यासारखे आहे. भारतीय विद्यापीठ संघ आणि राष्ट्रीय पातळीवरील अनुभवाची प्रकरणेही आहेत. त्यातही संशोधनाची फलश्रुती हा भाग प्रत्येक संशोधकाने वाचायलाच हवा.

शेवटच्या काही प्रकरणांमध्ये डॉ. साळुंखे आपले विद्यार्थी, नातेवाईक, कुटुंब याबद्दल मोजक्या शब्दांत व्यक्त झाले आहेत. तरीही लेखकाच्या कार्यात त्यांचे सहकार्य आणि त्याप्रती लेखकाची कृतज्ञता शब्दाशब्दात जाणवत राहते. मागे वळून पाहताना आपली जडणघडण नेमक्या शब्दात लेखकाने साररूपात दिली आहे. शेवटच्या परिच्छेदात गावाच्या बदललेल्या रूपावर भाष्य करतानाच, आपण गावासाठी काही करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करतात. हा भाग मनाला चटका लावून जातो. पुस्तकाच्या शेवटी लेखकाचा संक्षिप्त परिचय छापण्यात आला आहे. त्यामधून लेखकाच्या जीवनातील शिक्षण आणि नोकरीसंदर्भातील महत्त्वाचे टप्पे वाचकांना समजतात.

केवळ २६८ पानांचे हे आत्मचरित्र अनेक अर्थांनी वेगळे आहे. सर्वसाधारण आत्मचरित्रांमध्ये आढळणारी ‘मी’पणा यामध्ये डोकावत नाही. लेखकाच्या मूळ स्वभावात यशाचे श्रेय सहकाऱ्यांचे आणि अपयशाची जबाबदारी माझी, ही भावना असल्याने ते स्वाभाविकही आहे. मात्र त्यांना सहकार्य केलेल्या प्रत्येकाचे नाव नमूद करून त्यांनी काय सहकार्य केले हे लेखकाने लिहिले आहे. ती भाषा कृतज्ञतेची आहे. एवढ्या प्रदीर्घ अनुभवात वाईट अनुभव नव्हते किंवा लेखकाला आले नाहीत, असे नाही. मात्र ते लिहिताना त्यांची भाषा अशा प्रसंगांत इतरांना खलनायक ठरवणारी नाही. लेखकाने हे आत्मकथन अशा पद्धतीने केले आहे की, ते इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासकांसाठीही महत्त्वाचे ठरावे. बालपण लिहिताना ते सणांबद्दल व्यक्त होतात. शालेय शिक्षणाबद्दल लिहितात. पुस्तक वाचताना शिक्षक कसे होते, हे समजते. आपोआप त्यांच्याशी तुलना करत सद्यस्थितीबद्दलचे चिंतन सुरू होते. महाविद्यालयीन शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाबद्दल, शैक्षणिक व्यवस्थापनाबद्दल आणि संशोधनाबद्दल लेखक व्यक्त होतो. हा भाग लिहिताना ते प्रत्येक संस्थेचा इतिहास लिहितात. थोडक्यात असलेल्या या निवेदनातून त्या संस्थेबद्दल, विद्यापीठाबद्दल एक चित्र वाचकाच्या डोळ्यांसमोर उभे करण्यामध्ये लेखक यशस्वी झाले आहेत.

लेखकाचे निवेदन ओघवते आहे. अशा आत्मकथनामध्ये संदर्भ पुढे येणे अनिवार्य असते. मात्र ते लिहिताना कोठेही पाल्हाळ नाही. गरजेपुरता, मुद्दा स्पष्ट होण्यापुरता तो संदर्भ येतो. अत्यंत नेटकेपणाने लिहिलेले हे आत्मचरित्र आहे. त्यामुळे वाचकाला वाचन सुरू केल्यानंतर ते ठेवावे असे वाटत नाही. प्रकरणे छोटी आहेत. त्यातही प्रत्येक प्रकरण समेवर जाऊन संपते. त्यामुळे वाचनामध्ये खंड जरी आला तरी पुस्तक पुन्हा हाती घेतल्यानंतर सूर पुन्हा लगेच जुळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी सुंदर वाक्यांची पेरणी झालेली आढळते. उदाहरणार्थ, पहिल्या परदेशवारीबद्दल लिहित असताना कसलेल्या साहित्यिकाच्या लेखणीतून वर्णन यावे, अगदी तसे वर्णन येते. तेथील वातावरणाचे वर्णन करताना ते लिहितात, ‘तेथील वातावरण अद्भूत होतं. कमालीची शिस्त! गोंधळ गजबजाट अजिबात नव्हता. अंगावर येणारी शांतता जाणवे.’ यातील ‘अंगावर येणारी शांतता’ (पान क्र.५७) ही कल्पनाच वेगळी वाटते. त्याच वर्णनामध्ये ते पुढे लिहितात, ‘कमालीची स्वच्छता, शांतता आणि पशु-पक्षी, रस्ते असं सृष्टीचं विलोभनीय रूप वाटलं.’ अशी अनेक सुंदर वाक्ये जागोजागी सापडतात. परदेश भेटीदरम्यान संशोधनाव्यतिरिक्त इतर प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. त्या भेटीचे वर्णन वाचनीय आहे. त्या स्थळाबाबतचे अनेक तपशील धारावाही वर्णनाच्या माध्यमातून पोहोचवतात. एखादी संस्था सोडतानाचे वर्णन करताना लेखक भावूक झाल्याचे भाषेवरून समजते. तसेच, त्या भागाविषयी, संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करत ते पुढच्या प्रवासाला निघतात. जेथे त्रास झाला, त्या संस्थांविषयीही ते असेच व्यक्त झाले आहेत. यातून लेखकाच्या क्षमाशील स्वभावाचे दर्शन होते. एके ठिकाणी ते खऱ्या भारताच्या चित्रण न करणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन पाहिल्यावर ते तेथे न थांबता निघून जातात. अशा अनेक घटना आणि प्रसंगातून लेखकाचे देश, संस्था, कार्यशैली, मानवता, इत्यादींबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट होत जातो. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, असे  आहे. अनुभवसंपन्नतेसोबत सहज भाषाशैलीमुळे हे पुस्तक संग्राह्य झाले आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मांडणी चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केली आहे. कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर मुखपृष्ठ बनवले आहे. पुस्तकाच्या नावास अनुसरून रांगोळीच्या माध्यमातून पाच दीप घेतले आहेत. पाच विद्यापीठांसाठी हे दीप असावेत, हे सहज लक्षात येते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नऊ शब्द आहेत. त्यातील सात शब्द एका पाच ज्योतीच्या दिव्यावर लहान अक्षरात घेतले आहेत. तर सुवर्णअक्षरात मोठ्या आकारात ‘विद्येच्या प्रांगणात’ ही अक्षरे घेण्यात आली आहेत. दिव्याच्या मध्यातून निघणारी रेषा पुस्तकाच्या शीर्षकाच्या आणि लेखकाच्या नावाच्या मधून जात पूर्णविरामावर थांबते. कलाकाराच्या कलाकृतीमागे आणखीही विचार असू शकतात. मात्र या बाबी अगदी सहज लक्षात येतात आणि पुस्तक घेण्यासाठी वाचकास हे मुखपृष्ठ भाग पाडते.

लेखकाच्या सर्वच अनुभवांची, त्यांनी ज्या घटना आणि प्रसंग अनुभवले, त्यांचा समावेश या पुस्तकात झाला नाही. काही प्रसंग आणखी विस्ताराने लिहिले असते तर ते युवावर्गास उपयुक्त झाले असते. उदाहरणार्थ, कोल्हापुरातील नामवंत सायबर संस्थेमध्ये निर्माण झालेला प्रश्न. हा प्रश्न सोडवताना राजकीय दबाव होता. विद्यार्थ्यांनी आंदोलनेही केली. अनेक प्रकारचे दबाव येऊनही त्यांनी हार मानली नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेले. तेथे विद्यापीठाचीच भूमिका मान्य झाली. मात्र यातून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान त्यांना अस्वस्थ करत होते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी विद्या परिषदेसमोर यासंदर्भातील विषय ठेवून, नियमांची कोठेही तोडमोड न करता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य पूर्ण करून घेण्याचा आणि नंतरच त्यांना पदवी देण्याचा मार्ग सांगितला. त्यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारले. पूर्वी जे लोक या विद्यार्थ्यांना पदवी देता कामा नये, अशा भूमिकेत होते, त्यांनीही या विचाराला पाठिंबा दिला आणि एकमताने विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी देण्याचा निर्णय झाला. यामध्ये त्यांचे विद्यार्थ्यांचे हित जपण्यापासून, नियमांची काटेकोर अंमलबजावणी, राजकीय दबावास बळी न पडणे या बाबींचे दर्शन होते. त्याचप्रमाणे केवळ नियमावर बोट ठेवून विद्यार्थ्यांचे किंवा कोणत्याही घटकाचे नुकसान होऊ न देता प्रशासन कसे चालवता येऊ शकते, हेही समजते. डॉ. डी.एस. कोठारी यांनी सामान्य प्रशासनापेक्षा शैक्षणिक प्रशासन वेगळे असल्याचे सांगितले होते. डॉ. साळुंखे सरांचे प्रशासन हे डॉ. कोठारी यांना अभिप्रेत असणारे शैक्षणिक प्रशासन राहिले. त्यामुळे अशा सर्व घटना यात येणे आवश्यक होते, असे वाटते.

पुस्तकामध्ये आणखी थोडे संपादकीय संस्कार व्हायला हवे होते आणि काही ठिकाणी मुद्रणदोष निराकरण काटेकोरपणे होणे आवश्यक वाटते. अर्थात पुढील आवृत्तीमध्ये हे दोष सुधारून घ्यावेत. एका घटनेमध्ये त्या कुलसचिवांचे नाव सर्वत्र टाळलेले असताना शेवटी एका ठिकाणी ते तसेच राहिले आहे. संघटनेचा उल्लेखही एका ठिकाणी थोडा चुकला आहे. ज्यांनी डॉ. साळुंखे यांचे कार्य, कार्यशैली जवळून पाहिली आहे, त्यांच्याच लक्षात या बाबी येतात. पुस्तक वाचण्यामागे वाचकांचा जो हेतू असतो, तो पूर्ण होण्यात मात्र कोणतीही अडचण येत नाही.

एकूणच एक चांगले आत्मचरित्र वाचावयास मिळाल्याचे समाधान देणारे हे पुस्तक आहे. प्रत्येक शिक्षणप्रेमींने हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे, असे आहे. डॉ. साळुंखे सरांनी यावरच न थांबता आणखी मराठी भाषा आणि वाचकांचे भावविश्व समृद्ध करणारे लेखन करावे, ही अपेक्षा!


पुस्तकाचे नाव - विद्येच्या प्रांगणात

लेखक                - डॉ. माणिकराव साळुंखे

प्रकाशन             - मनोविकास प्रकाशन

पृष्ठे                  - २६८

किंमत              - ₹ ३५०

बुधवार, १२ जुलै, २०२३

प्रयोगशील विज्ञानाचा प्रणेता : गॅलिलिओ गॅलिली

‘एककांचे मानकरी’ या माझ्या पहिल्या पुस्तकामध्ये भौतिकराशींच्या एमकेएस पद्धतीतील एककांना (units) ज्या संशोधकांची नावे देण्यात आली आहेत त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्यावर लेखन केले होते. या पुस्तकाची प्रस्तावना २०१५ मध्ये प्रा. माणिकराव साळुंखे यांनी माझ्याकडून अशाच स्वरूपाचे सीजीएस आणि इतर एककांना ज्या संशोधकांची नावे दिली आहेत त्यांच्या कार्याबद्दल पुस्तक लिहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला आत आठ वर्ष होत आहेत. लवकरच ‘एककांचे इतर मानकरी’ हे पुस्तक आपल्या भेटीला येत आहे. या पुस्तकातील प्रयोगशील संशोधक ज्यांचे नाव गुरूत्वीय त्वरणाच्या सीजीएस पद्धतीच्या एककास देण्यात आले ते म्हणजे गॅलिलिओ गॅलिली यांच्या जीवनावरील संपादित लेख अंधश्रद्धा निर्मुलन पत्रिकेच्या फेब्रुवारी २०२३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. तो लेख आणि मूळ पुस्तकातील लेख आपल्यासाठी येथे प्रसिद्ध करत आहे… 

____________________________________________________

कुसुमाग्रजांच्या अनेक लोकप्रिय कवितामधील एक कविता म्हणजे ‘पृथ्वीचे प्रेमगीत’. ही कविता चिरतरूण आहे. आजही वाचली तरी ती ताजी वाटते. ती अनेक अंगानी महत्त्वाची आहे. मानवी भावनांचा, अत्युत्कृष्ट अविष्कार म्हणजे ही कविता.

‘परी दिव्य ते तेज पाहून पूजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा

तूझी दूरता त्याहूनी साहवे’

या ओळीतून प्रेम कोणावर करावे आणि कसे करावे याचे सुंदर दर्शन होते. ज्या व्यक्तीवर प्रेम करते, तीचे प्रेम प्राप्त झाले नाही तर तडजोड करायला ही प्रेयसी तयार नाही. दुसऱ्या कोणाची होण्यापेक्षा, आपल्या प्रियकराच्या आठवणीत विरह सहन करायची तिची तयारी आहे. प्रेम कसे असते हे उलगडून सांगणारी ही कविता. शेवटच्या कडव्यात आणखी उंच होते. प्रेमातील नाते मित्रत्वाच्या पातळीवर घेऊन जाते. ती आपल्या प्रियकराला शेवटी म्हणते, ‘अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धुलि:कण’. ती आपल्या प्रियकराला मित्र मानत असताना त्याचे मोइेपण सांगते. स्वत:ला कमीपणा घेत धुलि:कण मानते. प्रेमात हेच तर आवश्यक असते. जोडीदाराचे मोठेपण दोघांनीही स्विकारले की आपोआप मित्रत्त्वाचे नाते येते. त्यामुळेच ही कविता सर्वांना भावते.

   एकिकडे मानवी भावनांचा उत्कृष्ट अविष्कार असणारी ही कविता दुसरीकडे वैज्ञानिक सत्यांची मांडणी करते. ही कविता म्हणजे कविकल्पनेला दिलेले निव्वळ शब्दरूप नव्हे. तर चंद्र हा सूर्याचाच प्रकाश घेतो, आणि फुकटचा भाव खाऊन जातो. केवळ सूर्याकडे स्वत:चा प्रकाश आहे. ध्रुव तारा उत्तरेला स्वत:ची जागा न बदलता बसलेला आहे. मंगळ लाल रंगाचा दिसतो. तर शुक्र पहाटे दर्शन देतो, अशा अनेक वैज्ञानिक सत्यांना प्रेम भावनेबरोबर गुंफून तयार झालेले हे सुंदर काव्य.

मात्र मनामध्ये नेहमी प्रश्न पडतो पूर्वीच्या धर्मसंकल्पनाच आजही कायम असत्या तर कुसुमाग्रजांचे हे नितांत सुदर काव्य तयार झाले असते का? अनेक वर्ष पृथ्वी सपाट आहे. तिच्याभोवती सूर्यासह इतर सर्वजण फिरतात, अशा संकल्पना पाश्चात्य राष्ट्रात होत्या. त्या धर्मसत्तेने स्विकारल्या होत्या. अरिस्टॉटल आणि टोलेमी या तत्त्वज्ञांनी त्या मान्य केल्या होत्या. त्यांचा दरारा इतका होता की अनेक देशात अरिस्टॉटल यांच्याविरोधात भाष्य करणे धर्मसत्तेला सोडा, अनेक विद्यापीठातील प्राध्यापकांनाही मान्य नव्हते. अशा त्या कालखंडात निकोलस कोपर्निकस आणि विल्यम गिल्बर्ट यांनी या कल्पनांना छेद देणारे कार्य केले. गिल्बर्ट यांना धर्मसत्तेचा त्रास झाला नाही. तसे ते सुदैवी. तसेच त्यांचे मुख्य कार्य हे चुंबकावर होते. तेच जास्त चर्चेत राहिले. त्यांनी आपल्या लेखनात धर्मसत्ता, धार्म‍िक संकल्पना यावर भाष्‍ केले नाही. त्यांना उलट राजसत्तेने भरपूर सहकार्य केले. कोपर्निकस हे चतुर होते. त्यांनी आपले लिखाण आणि कार्य धर्मसत्तेला रूचणार नाही हे लक्षात येताच आपले पुस्तक पोप पॉल तृतिय यांना अर्पण केले. त्यामुळे ते शिक्षेचे धनी झाले नाहीत. मात्र त्यांच्या पुस्तकावर बंदी आलीच. सूर्य, पृथ्वी आणि ग्रहताऱ्यांच्या या संकल्पना आजही तशाच असत्या, तर, कुसुमाग्रजांचे हे काव्य असे उतरू शकले असते का? कुसुमाग्रजांनी या कवितेत मानवी भावभावना आणि विज्ञान यांचा जो सुरेख मेळ घातला आहे, त्याला तोड नाही.

या सर्व संकल्पना, वैज्ञानि‍क सत्यांना उलगडून दाखवण्याचे कार्य एका संशोधकांने केले. अरिस्टॉटलचे म्हणणे आणि धर्मग्रंथात लिहिलेले चूकीचे आहे. मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो ते पाहा आणि खात्री करा, असे सांगणारा एक संशोधक जन्मला. मात्र ऐकता कोण? धर्मसत्तेने त्याच्या या कार्यावर आक्षेप घेतला. पुस्तकावर बंदी घातली. त्याला कैदेत टाकले. जीवन संपवून टाकणारी शिक्षा भोगण्याऐवजी माफीचे नाटक केले. तरीही याला नजरकैद भोगावी लागली. या नजरकैदेतही आपले संशोधन करत राहिला. सुंदर ग्रंथाची निर्मिती करून ते गुचचूप बाहेर पाठवले. लोकांच्या मनात प्रायेागिक विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. न्यूटनच्या संशोधनासाठी सुपिक जमीन तयार करून दिली. असा आद्य संशोधक म्हणजे गॅलिलिओ गॅलिली.

गॅलिलिओ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी इटलीतील पिसा या शहरामध्ये झाला. विन्सेन्झो गॅलिली यांना एकूण सात मुले होते. यातील गॅलिलिओ सर्वात मोठे. विन्सेन्झो हे बंडखोर विचाराचे संगितकार होते. तंतूवाद्यांच्या तारावरील ताण आणि आवाज यावर त्यांनी गॅलिलिओ यांच्यासमवेत त्यांनी काही प्रयोगही केले होते. बंडखोर वृत्तीची देणगी गॅलिलिओ यांना वडिलाकडूनच मिळाली होती. वडिलाप्रमाणे गॅलिलिओ सतारीसारखे ‘ल्यूट’ हे तंतूवाद्य वाजवायला शिकले होते. विन्सेन्झो यांचा लोकरीचा आणि कापडाचा व्यवसायही होता. गॅलिलिओ यांनीही या व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. विन्सेन्झो यांनी फ्लॉरेन्स येथे कुटुंब स्थलांतरीत केले. तेथून जवळच असलेल्या वॅलोमब्रोसा येथील धार्म‍िक शाळेमध्ये गॅलिलिओ शिक्षण घेऊ लागले. या शाळेत ते थोडे जास्तच रमले. मठातील शिक्षण ते पूर्णपणे आचरणात आणू लागले. ते भिक्षाही मागत. फावल्या वेळात चर्चची कामे करत. त्यांची वाटचाल धर्मगुरू होण्याकडे सुरू होती. आपल्या चिरंजिवाचे लक्षण ठिक नाही, हे विन्सेन्झो यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच त्यांची शाळा बदलली.  त्यांना आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचे होते.

विन्सेन्झो यांनी मोठे प्रयत्न करून गॅलिलिओना पिसा विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी मॅट्रीकची परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली आणि वैद्यक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मात्र त्यांचे या अभ्यासक्रमामध्ये मन रमत नव्हते. ते गणिताच्या तासाला जाऊन बसत. शेवटी त्यांनी वडिलांच्या इच्छेविरूद्ध गणिताच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. अभ्यास नीट सुरू होता. मात्र, कुटुंबाची आर्थ‍िक परिस्थिती बिघडली होती. त्यामुळे पदवी न घेताच त्यांनी १५८५ मध्ये विद्यापीठ सोडले. गॅलिलिओ यांना लहानपणापासून यांत्रिकीचीही आवड होती. एखादे यंत्र दिसले की ते खोलायचे आणि पुन्हा जोडायचे. ते कसे चालते हे समजून घ्यायचे, हा त्यांचा आवडता छंद. गणित हा तर त्यांचा आवडता विषय. शिक्षण बंद करून ते पुन्हा फ्लॉरेन्सला आल्यानंतर, आर्थिक अडचण सोडवण्यासाठी गावातील श्रीमंत मुलांच्या शिकवण्या घेऊ लागले. शिकवण्यामुळे त्यांना जसा पैसा मिळाला तशाच शहरातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांच्या ओळखीही झाल्या.

असे म्हटले जाते की ते सतरा वर्षाचे असताना एकदा चर्चमध्ये गेले होते. प्रवचन ऐकताना त्यांना कंटाळा आला म्हणून ते वर लावलेल्या झुंबराकडे पहात होते. ते झुंबर हवेने हलत होते. त्याचे ते दोलन त्यांच्या मनात एक प्रयोगाचे बीज सोडत होते. ते घरी आल्या आल्या प्रयोग करू लागले. त्यांनी लंबक (पेंडूलम) तयार केला. लंबकाला झोका जास्त दिला काय किंवा कमी दिला काय लंबकाला एक आवर्तन पूर्ण करण्यास लागणारा कालावधी सारखाच असतो. लंबकाला खाली कमी किंवा जास्त वजन ठेवले तरी लंबकाचा आवर्तन काल तोच राहतो. मात्र, लंबकाची लांबी बदलली तर आवर्तन कालावधी बदलते. याच लंबकाचा वापर करून त्यांनी गतीचे नियम मांडले. तर ह्युजेन्सने लंबकाचे घड्याळ बनवले. गॅलिलिओंच्या या प्रयोगावेळी घड्याळ निर्माण झाले नव्हते. म्हणून वेळ मोजण्यासाठी त्यांनी आपल्या नाडीचा उपयोग केला. त्या चर्चमध्ये आजही एक जूना दिवा आहे आणि त्याला ‘गॅलिलिओचा दिवा’ म्हणून ओळखले जाते.

      विद्यार्थी असताना त्यांना अरिस्टॉटलच्या विचारांचा अभ्यास करावा लागला होता. त्यांना स्वत:लाही हे तत्त्वज्ञान शिकवावे लागत होते. त्यांना अनेक गोष्टी खटकत असत. मुलांना अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवावे लागले, तरी, त्यांच्या मनात याबाबतचे विचार सुरू असत. फ्लोरेंस आणि सिएना भागात त्यांचे हे अध्यापन चालत असे. या कालखंडात त्यांनी पदार्थांचे वजन करण्यासाठी द्रवस्थितीक तुला (हायड्रोस्टॅटिक बॅलन्स) तयार केला. १५८६ मध्ये त्यांनी यावर ‘ला बिलान्सेटा’ म्हणजेच ‘छोटा तराजू’ ही पुस्तिका प्रकाशीत केली. तसेच त्यांनी बोलोना विद्यापीठामध्ये गणिताच्या प्राध्यापक पदासाठी अर्ज केला. मात्र त्यांची निवड झाली नाही. द्रवस्थितीक तुलेमुळे मात्र त्यांना लोक ओळखू लागले. त्याचवेळी गतीच्या नियमावर कार्य सुरू केले. पुढे वीस वर्ष ते या विषयावर कार्य करत होते. दरम्यान त्यांना फ्लोरेन्टाईन ॲकेडमीने ‘जगाची रचना’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी बोलावले. त्यांच्या अभ्यासाने आणि वक्तृत्वाने श्रोते फारच प्रभावित झाले. तसेच त्यांनी स्वत: गुरूत्वाकर्षण केंद्राबाबत काही गणितीय सिद्धांत एका पुस्तीकेत मांडले होते. यामुळे अनेक गणितज्ञ त्यांना ओळखू लागले होते. या कार्यामुळे प्रभावित झालेले गिडाबाल्डो डी मोंटे या विद्वान गणितज्ज्ञ आणि तंत्रज्ञाच्या शिफारशीवरून गॅलिलिओ यांना पिसा विद्यापीठामध्ये १५८९ मध्ये गणित अध्यापकाची नोकरी मिळाली.

      पगार कमी असला तरी आता स्थैर्य प्राप्त झाले होते. आता आपण अध्यापन करत असलेल्या अरिस्टॉटलच्या विचाराबद्दल त्यांच्या मनात विचार सुरू झाले. त्यांनी प्रयोगाच्या माध्यमातून त्यांची पडताळणी करायचे ठरवले. असाच अरिस्टॉटलचा सिद्धांत होता की उंचावरून एक जड आणि एक हलकी वस्तू खाली सोडली तर जड वस्तू लवकर पोहोचेल. गॅलिलिओ यांना हे पटत नव्हते. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यासह प्रत्यक्ष पिसाचा झुकता मनोरा गाठला. तेथे वर जाऊन दोन एकाच आकाराचे मात्र वेगवेगळ्या वजनाचे चेंडू वरून खाली टाकले. ते चेंडू एकाच वेळी खाली आले. अरिस्टॉटलच्या प्रसिद्ध तत्त्वापैकी एका तत्वाला गॅलिलिओ यांनी प्रयोगातून खोटे ठरवले. पदार्थ्यांच्या गतीवर त्यांनी ‘डी मोटू’ म्हणजेच गतीविषयक ही माहितीपुस्तीका प्रसिद्ध केली. त्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पिसा विद्यापीठात गॅलिलिओ स्वत:ला अरिस्टॉटलपेक्षा श्रेष्ठ मानतात अशी वंदता पसरली. त्यांचे अनेक सहकारी प्राध्यापकही नाराज झाले. दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. पिसा विद्यापीठातील त्यांचे नोकरीचे कंत्राट १५९२ सालच्या पुढे सुरू ठेवण्यास विद्यापीठाने नकार दिला.

      पिसा विद्यापीठातील नोकरी गेली तरी त्यांना लगेच पडुआ विद्यापीठामध्ये नोकरी मिळाली. पिसा विद्यापीठापेक्षा येथे वेतनही जास्त होते. या विद्यापीठात ते १६१० पर्यंत अध्यापन करत होते. विद्यापीठाकडून मिळणारे वेतन जास्त असले तरी कुटुंबाच्या वाढत्या जबाबदाऱ्याना ती रक्कम पुरेशी होत नव्हती. त्यांनी पुन्हा शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वत: रचना केलेले कंपास आणि भौमितीक साहित्य विक्री करायलाही सुरुवात केली. हे साहित्य जमीन मोजणीसाठी अत्यंत उपयुक्त होते. साहित्य बनवण्यासाठी त्यांनी एक कारागीर नियुक्त केला होता. तो त्यांच्या घरीच हे काम करत असे. त्यांनी लग्न केले नाही. मात्र ते व्हेनिसच्या मारीना गाम्बा यांच्यासह रहात. त्यांना व्हर्जिनिया आणि लिव्ह‍िया या दोन मुली आणि व्हिन्सेन्झ‍ियो हा मुलगा अशी अपत्ये होती. मुले लहान असतानाच गांबा यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी मुलांचे संगोपन स्वत:च केले.

त्यांनी गतीविषयक आपले संशोधन नेटाने पुढे नेले. एखादी वस्तू फेकली असता ती अन्वस्तीय (पॅराबोलीक) आकाराचा मार्ग क्रमण करते. त्या वस्तूने क्रमण केलेले अंतर हे वस्तूने तेथपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेल्या वेळेचा वर्गाच्या प्रमाणात असते. हे दोन्ही निष्कर्ष पुन्हा अरिस्टॉटलच्या सिद्धांतांच्या विरूद्ध होते. वैद्यकिय शाखेच्या विद्यार्थ्याना खगोलशास्त्र शिकवताना टोलेमीच्या साहित्याचा अभ्यास करावा लागत असे. याचकाळात केपलर यांनी कोपर्निकसचे प्रकाशीत केलेले पुस्तक पडले. या पुस्तकात पृथ्वी स्वत:भोवती चोवीस तासात एक तर सूर्याभोवती एका वर्षात एक परिक्रमा पूर्ण करते असे लिहिले होते. हे पुस्तक वाचून त्यांनी केपलरना एक गुप्त पत्र पाठवले. त्यात लिहिले होते की, ‘असे असेल तर माझी खगोलशास्त्रीय समीकरणे याच्याशी तंतोतंत जूळत आहेत’. 

      सारे काही बरे चाललेले असताना, १६०९ मध्ये गॅलिलिओ यांच्या आयुष्यात वेगळेच वळण आले. ‘हॉलंड/नेदरलँडसच्या काही लोकांनी असे काही उपकरण तयार केले आहे की त्यातून पाहिल्यावर खूप दूरवर असणाऱ्या गोष्टी अगदी जवळ दिसतात’ अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. गॅलिलिओ यांनी लवकरच ते उपकरण मिळवले. त्यांनी सवयीप्रमाणे ते खोलले आणि त्याचे गुपीत समजून घेतले. यामध्ये साध्या भिंगांचा वापर करण्यात आला होता. याचा वापर प्रामुख्याने सैनिकी कारणासाठी केला जात असे. शत्रू सैन्याच्या हालचाली पाहण्यासाठी हे उपकरण छानच होते. गॅलिलिओ यांनी हे जमिनीवरील निरीक्षणासाठी वापरले जाणारे उपकरण आकाशाकडे वळवले. त्यातून ते आकाशातील ग्रह, तारे यांचे निरीक्षण करू लागले. त्या दुर्बिणी फक्त दुप्पट-तिप्पट मोठी प्रतिमा दाखवत होत्या. आज खेळण्यात मिळणाऱ्या दुर्बिणी यापेक्षा जास्त शक्तीमान असतात. तरीही त्याकाळी या दुर्बिणी सर्वत्र चर्चेचा विषय बनल्या होत्या.

एकिकडे आकाशाचे निरीक्षण सुरू असताना या उपकरणात दुरूस्ती कशी करता येईल याचे विचार गॅलिलिओ यांच्या मनात सुरू होते. बहिर्गोल आणि अंतर्गोल भिंगांच्या विविध प्रकारे रचना करून दुर्ब‍िणीची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्यांनी आठ पट मोठी प्रतिमा दाखवणारी दुर्बिण तयार केली. व्हेनेटियन पार्लमेंटमध्ये या दुर्ब‍िणीचे प्रात्यक्ष‍िक दाखवले. या दुर्बिणीमुळे गॅलिलिओ यांना मोठा सन्मान मिळाला. त्याना विद्यापीठात आजीवन प्राध्यापक पद मिळाले. तसेच त्यांचे वेतन दुप्पट करण्यात आले. गॅलिलिओ विद्यापीठातील सर्वोच्च वेतन घेणारे प्राध्यापक बनले. त्यांनी सुरूवातीला या उपकरणाचा शोध हा शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी असाच केला होता. त्यांनी सैन्यदलाला त्याप्रमाणे सहाय्य केलेही. मात्र त्यांचे चित्त अवकाशाकडे लागले होते. त्यांनी भिंगांना आकार देण्याची कलाही आत्मसात केली. विविध प्रयोग करून त्यांनी वीसपट मोठी प्रतीमा दिसणारी दुर्बिण बनवली. तरीही ते दुर्बिणीची क्षमता आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी त्यांनी बत्तीस पट मोठी प्रतिमा दाखवणारी दुर्ब‍िण बनवली.

गॅलिलिओ यांनी आकाशातील ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण सुरू करेपर्यंत अरिस्टॉटल यांच्या म्हणण्यानुसार सर्व काही लोक मानत होते. पृथ्वी सपाट आहे. पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि तिच्याभोवती सर्व अवकाशातील ग्रह तारे प्रदक्षिणा घालत असतात. पृथ्वी ही विश्वाचा मध्य आहे. मनुष्यप्राणी हा सर्वात महत्त्वाचा प्राणी आहे. तो ईश्वराचा सर्वात आवडता आहे. माणसासाठीच विश्वाची निर्म‍िती झाली आहे. पृथ्वीच्या खाली नरक आहे तर वरती स्वर्ग आहे. अशा अनेक भन्नाट कल्पना होत्या.

अरिस्टॉटलने इसवी सन पूर्व चवथ्या शतकात जी विचारसरणी मांडली ती जनमानसांच्या मनात इतकी घट्ट झाली होती की त्याविरूद्ध कोणी बोलले तर त्याला वेडा ठरवले जात असे. पुढे टोलेमी या महाशयानी याला धर्माची सांगड घालत व्यवस्थित रचले. त्यानंतर तर हे विश्व जणू अरिस्टॉटल आणि  टोलेमी यांनी आखून दिलेल्या नियमानुसार चालते, अशी सर्वांची समजूत झाली. हे सारे ख्र‍िश्चन धर्मग्रंथानुसार होते. त्यामुळे त्याकाळात पोप यांची सत्ता निरंतर चालणार अशी सर्वत्र धारणा झाली होती. पोप यांचा निर्णय सर्वोच्च असे. या सर्व संकल्पनातून ग्रह-ताऱ्यांच्या गतीची गणिते सुटत नव्हती. त्यामुळे काही विद्वानानी याला छेद देणाऱ्या भूमिका मांडल्याही. अरिस्टार्कस या खगोल शास्त्रज्ञाने तिसऱ्या शतकात पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे कोणीही ऐकले नाही. त्यानंतर गिल्बर्ट आणि कोपर्निकस यांनी या विषयावर काम केले. गिल्बर्ट यांनी पृथ्वी सपाट नाही, ती गोल आहे, हे सांगीतले. त्याकाळातील दळणवळणाच्या सुविधा मर्यादित असल्याने त्यांचे विचार रोममधील धर्म पीठापर्यंत कदाचित पोहोचले नसावेत.

कोपर्निकस यांना आपल्या संशोधनावर विश्वास होता. मात्र, धर्मसत्तेचा रोष नको असल्याने त्यांनी सरळ आपले पुस्तक पोपनाच अर्पण केले. त्यानंतरही या पुस्तकातील विचार हे अरिस्टॉटल-टोलेमी यांच्या तत्त्वाविरूद्ध आहेत, हे लक्षात आल्यानंतर ‘त्यामध्ये सुधारणा करेपर्यंत त्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली’. मात्र तोपर्यंत हे पुस्तक अनेकापर्यंत पोहोचले होते. या पुस्तकामध्ये ग्रहताऱ्याबद्दल त्यांनी अनेक सिद्धांत मांडले होते. सामान्य माणसाला पृथ्वी फिरते, हे पटणार नाही पण विद्वानांना गणिताच्या आधारे हे पटवून देता येईल, अशी त्यांची धारणा होती. त्या काळात कॅलेंडरमध्ये अनेक त्रुटी होत्या. त्या कोपर्निकसच्या सिद्धांतानुसार दुरूस्त करता येत होत्या. त्यानुसार कोपर्निकसचे सिद्धांतांचा दिनदर्शिकेतील त्रुटी काढण्यासाठी वापर सुरू ठेवण्यात आला. मात्र त्यांच्या पुस्तकावर बंदी कायम राहिली.

या सर्व संकल्पना वाद विवादावर शेवटचा घाव गॅलिलिओ यांनी घातला. त्यांनी कोपर्निकसचे सिद्धांत सिद्ध केले असे नाही तर अरिस्टॉटल आणि टोलेमीचे म्हणणे चूकीचे आहे हे सिद्ध केले. त्यांनी आपली दुर्ब‍िण आकाशाकडे वळवली आणि चंद्राच्या कलांचा अभ्यास केला. चंद्राचा पृष्ठभाग पाहिला. चंद्रावरील खडक, दऱ्याखेऱ्यांचे दर्शन घेतले. चंद्राला स्वत:चा प्रकाश नाही. चंद्र हा ही पृथ्वीप्रमाणे दगड मातीचा असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी आपले निरीक्षण चंदा्रपुरते मर्यादित ठेवले नाही. गुरू या ग्रहाभोवती चंद्राप्रमाणे चार उप्रग्रह आहेत. केवळ डोळ्यांना न दिसणारे असंख्य तारे अवकाशात आहेत. शनीचा अवतार इतरापेक्षा वेगळा असल्याचे पडुआ विद्यापीठात त्यांच्या लक्षात आले होते. मात्र फ्लोरेंस येथे आल्यानंतर शनीभोवती कडे असल्याचे त्यांनी शोधून काढले. चंद्राप्रमाणच शुक्रालाही कला असतात, या कलांचे निरीक्षण करणारे गॅलिलिओ हे पहिले मानव. या सर्व निरीक्षणावर त्यांनी ‘दी स्टोरी मेसेंजर’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यांच्या लेखनावर आणि संशोधनावर निर्माण होणारे वाद लक्षात घेऊन ते परत फ्लोरेन्सला परतले. फ्लोरेन्स विद्यापीठात ते अध्यापन करू लागले.

दरम्यान केपलर यांनीही अशाच प्रकारचे सिद्धांत मांडले होते. त्यांनी गॅलिलिओ यांना एक दुर्ब‍िण द्यावी, अशी विनंती केली. मात्र गॅलिलिओ यांनी अशी दुर्ब‍िण आपल्याकडे शिल्लक नसल्याचे व नवी बनवण्यासाठी वेळ नसल्याचे कळवले. त्यावेळी निरीक्षण आणि दुसरीकडे पुस्तके प्रकाशनाचे काम जोरात सुरू होते. दरम्यान १६१३ मध्ये त्यांचे सौर डागासंदर्भातील निरीक्षणावर ‘लेट्टर्स ऑन सनस्पॉट’ हे पुसतक प्रकाशीत झाले. त्यांच्या कार्याने त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले होते. गॅलिलिओ अरिस्टॉटल-टोलेमी यांच्या सिद्धांताना विरोध करतात आणि कोपर्निकसच्या सिद्धातांची पाठराखण करतात अशा तक्रारी चर्चकडे गेल्या. त्या तक्रारीनंतर १६१६ मध्ये गॅलिलिओ यांना ‘कोपर्निकसच्या सिद्धांताना मानू नये, शिकवू नये आणि त्याचा प्रसार करू नये’ अशी सक्त ताकित देण्यात आली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आठ पुसतकांचे लेखन केले. गॅलिलिओ आपले विचार आणि निरीक्षणे प्रकाशीत करत. एवढेच नाही तर प्रत्यक्ष लोकांना दुर्ब‍िणीतून दाखवत. त्यामुळे लोकांचा त्यावर विश्वास बसू लागला. यावर त्यांच्या हितशत्रूनी गॅलिलिओ लोकांना जादूटोणा करून भ्रमीत करतात. यातून धर्माला धोका निर्माण झाला आहे. अशा तक्रारी पुन्हा होऊ लागल्या.

या तक्रारी सुरू असतानाच त्यांचे मित्र आणि त्याकाळातील प्रसिद्ध गणितज्ञ मफिओ बार्बेरिनी हे पोप झाले. गॅलिलिओना आता पुन्हा मुक्तपणे संशोधन करता येईल असे वाटत होते. ते पोप झाल्यानंतर गॅलिलिओ त्यांना भेटले. तसे ते स्वत: वैज्ञानिक असल्याने गॅलिलिओ यांचे कार्य आणि त्याचे महत्त्व ओळखून होते. त्यांनी गॅलिलिओंना मानाने वागवले. तसेच कोपर्निकसच्या कार्यावर संशोधन करण्यासही अनुमती दिली.

मात्र अनेक लोक गॅलिलिओंच्या विरोधात तक्रारी करतच होते. पोप यांच्यावर दबाव वाढत होता. तरीही पोप यांनी गॅलिलिओ यांना विश्वाबद्दल लेखन करण्यास सशर्त परवानगी दिली. त्यांना अट घालण्यात आली होती की त्यांनी कोपर्निकसच्या सिद्धांतांचे उदात्तीकरण करू नये. उलट कोपर्निकसचे कार्य हे केवळ काल्पनिक असल्याचे सांगावे. १६३० मध्ये त्यांनी कोपर्निकस आणि टोलेमी यांच्या संकल्पनावर आधारीत पुस्तक तयार केले आणि पोप यांच्या मान्यतेसाठी रोमला पाठवले. मात्र त्याचकाळात उद्भवलेल्या प्लेगच्या साथीने त्यांना रोमवरून प्रतिसाद मिळू शकला नाही. शेवटी त्यांनी फ्लोरेन्स येथेच त्या लिखाणाची पडताळणी व्हावी असा आग्रह धरला. रोममधून त्यांच्या लेखणावर मोठे आक्षेप घेण्यात आले होते. शेवटी १६३२ मध्ये हे लेखन काल्पनिक असल्याचे नमूद करून फ्लोरेन्समध्ये पुस्तक प्रकाशीत झाले.     

त्यांच्याविरूद्धच्या तक्रारी लक्षात घेऊन त्यांना रोमला चौकशीसाठी बोलावण्यात आले. १६३२ मध्ये त्यांची चौकशी सुरू झाली. गॅलिलिओना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येत होती. मात्र पोप वगळता अन्य सदस्य ‘गॅलिलिओ, धर्म बुडवायला निघाला आहे’, असे म्हणत त्याची बाजू ऐकायला तयार नव्हते. गॅलिलिओ उपकरणाच्या सहाय्याने निरीक्षण करायची विनंती करत होते. तीही मानत नव्हते. अखेर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असे अध्यक्षांनी सूचविले. अन्य सदस्यही त्याच मताचे होते. मात्र पोप यांनी रदबदली करून त्यांनी माफी मागीतली तर नजरकैदेची शिक्षा द्यावी, असे सूचवले. त्यानुसार गॅलिलिओ यांनी ‘मी गॅलिलिओ, फ्लॉरेन्स विद्यापीठातील गणित व वास्तवशास्त्राचा प्राध्यापक असे जाहिरपणे कबूल करतो की माझी मते चूकीची आहेत. सूर्य हा विश्वाचे केंद्र व पृथ्वी त्याभोवती फिरते, हे माझे मत चूकीचे आहे. ते मी मागे घेतो. तसेच पवित्र चर्चच्या विरूद्ध जे जे आहे. त्या सर्व मतांचा मी मन:पुर्वक आणि दृढतेने, श्रद्धेने त्याग करतो’ असे निवेदन केले. त्यामुळे त्यांची फाशी टळली. सुरुवातीला शासनाने ठरवलेल्या वाड्यात आणि नंतर त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले. विशेषत: तीन मित्रांच्या अरिस्टॉटल, कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांच्या सिद्धांतावर गप्पा असणारा ‘दि डायलॉग’ हा ग्रंथ धर्मपीठाच्या रागाचे कारण होता. या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. मात्र तोपर्यंत त्याच्या अनेक प्रती विदेशात पोहोचल्या होत्या.

या माफीनाम्यानंतर गॅलिलिओ फ्लॉरेन्स जवळच्या खेडे गावात नजरकैदेत राहण्यासाठी गेले. तेथे प्रत्यक्ष घरात जाण्यापूर्वी त्यांनी ‘इप्पर सी मूव्हज’ असे मातीत लिहिले होते असे म्हटले जाते. चर्चबाहेर की घराबाहेर हे निश्चित नाही. मात्र लिहिले हे निश्चित. या इटालियन भाषेतील वाक्याचा अर्थ होतो, ‘तरीही तीच फिरते’. मी माफी मागीतली तरी सत्य बदलत नाही. सूर्य नाही तर पृथ्वीच फिरते, असे ते सूचवत होते.  १९११ मध्ये गॅलिलिओ यांच्या निधनानंतर एकदोन वर्षात काढलेले एक चित्र प्रकाशीत झाले. गॅलिलिओ यांनाही चित्रकलेची आवड होती. त्यांच्या समकालीन चित्रकाराने काढलेल्या गॅलिलिओच्या चित्रावर ही अक्षरे लिहिलेली आढळली. गॅलिलिओ यांच्या निधनापूर्वी या वाक्याचा प्रसार अनेक देशात आणि विशेषत: इटलीमध्ये झाला होता. गॅलिलिओंच्या प्रथम चरित्रात या वाक्याचा उल्लेख नसला तरी इंग्रजी पुस्तकात हे वाक्य आलेले आहे.

आर्थ‍िक चणचणीमुळे त्यांना मुलींच्या लग्नामध्ये हुंडा देणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी मुलींना धार्मिक शिक्षण दिले. यातील धाकटी कन्या लिव्हिया नन झाली. मोठी कन्या व्हर्जिनिया मात्र त्यांच्यासमवेत रहात असे. तिने आपल्या पित्याची अखेरपर्यंत सेवा केली. गॅलिलिओ यांनी माफी मागीतल्याने त्यांचा शिष्यवर्ग नाराज झालेला असतो. अँड्री सार्टी हा असाच त्यांचा एक आवडता शिष्य होता. मात्र मोठ्या कष्टाने सिद्ध केलेली वैज्ञानिक सत्य स्वत:च नाकारल्याने, तो खुप निराश झाला होता. त्यांने इटलीमध्ये झालेली विज्ञानाची पिछेहाट पाहून हॉलंडला जावयाचे ठरवले. इटली सोडण्यापूर्वी एकदा गुरूला भेटायचे म्हणून तो गॅलिलिओ यांना भेटायला येतो. त्या दोघामध्ये चर्चा सुरू असताना गॅलिलिओ त्याला ‘मेकॅनिक्स अँड लॉज ऑफ फॉलींग बॉडीज’ या ग्रंथाचे हस्तलिखित पृथ्वीच्या गोलातून काढून दिले. या ग्रंथाची मूळ प्रत सैनिकांनी जप्त केलेली होती. ते हस्तलिखित पाहून अँड्री यांना मोठे आश्चर्य वाटते. आपल्या गुरूने माफी मागून युरोपमधील विज्ञान संपवले, असे आजवर त्यांना वाटायचे. मात्र माफी मागीतली नसती तर त्यांना फाशी झाली असती. गॅलिलिओ यांचे कार्य थांबले असते. उलट त्यांनी माफी मागून विज्ञान न थांबू देता, ते वाढवले याची त्यांना खात्री पटली. गॅलिलिओ यांनी आपल्या चरित्राला माफीचा डाग लागू दिला. पण विज्ञानाचीच सेवा केली, विज्ञान वाढवले हे पाहून त्याच्या मनात गॅलिलिओबद्दलच आदर वाढला.

हे पुस्तक अँड्री सार्टी यांना आपल्या जबाबदारीवर न्यायचे होते. पुस्तक त्यांच्याजवळ सापडले असते तर सार्टी यांना शिक्षा झाली असती. त्यामुळे सार्टी यांनी आपल्या इतर पुस्तकात हे हस्तलिखित मिसळले. ज्यावेळी अँड्री इटलीच्या सीमेवरून हॉलंडला जात होता. तेंव्हा त्यांच्या सामानाची झडती झाली. त्यामध्ये बावीस पुस्तके आणि खाली हे हस्तलिखित होते. पोलीसांनी पुस्तके नेमकी कशाची आहेत हे तपासले नाही आणि गॅलिलिओ यांचे हे हस्तलिखित पुस्तक इटलीच्या बाहेर गेले. हे पुस्तक पुढे १६३८ मध्ये इटलीच्या बाहेर प्रसिद्ध झाले.

गॅलिलिओ यांची सर्व काळजी त्यांची मोठी कन्या व्हर्जिनिया घेत होती. गॅलिलिओना हळूहळू अंधत्व येऊ लागले होते. त्यातच १६३४ मध्ये व्हर्जिनियाचे अकाली निधन झाले. त्यांनंतर त्यांची काळजी त्यांचा एक तरूण विद्यार्थी विन्सेन्झो विवियांनी घेत होता. कन्येच्या निधनानंतर ते खचले होते. दुर्ब‍िणीचा वापर पूर्ण थांबला होता. मात्र सळीला वाकवणे, तिची ताकत तपासणे हे त्यांचे प्रयोग सुरूच होते. त्यांनी गतीविषयक प्रयोगही सुरू होते. पूर्ण अंधत्व आले तरी हे प्रयोग विवियांनी यांच्यासमवेत सुरू होते. अखेर नजरकैदेत असताना दिनांक ८ जानेवारी १६४२ रोजी त्यांचे निधन झाले.  

गॅलिलिओ यांच्या इच्छेनुसार त्यांचे दफन अन्य कुटुंबियांच्या दफन स्थळाजवळ करण्यात आले. ते थोर संशोधक होते. त्यांच्या कार्याचे मोठेपण जाणणाऱ्या विवियानी यांनी त्यांचे दफन सन्मानाने थोरांच्या दफन स्थळाजवळ व्हावे असे प्रयत्न आयुष्यभर केले. मात्र त्यांचय प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी विवियांनी यांचे निधन झाले आणि त्यांचे शवही गुरू गॅलिलिओ यांच्याशेजारी दफन करण्यात आले. गॅलिलिओच्या निधनानंतर एक वर्षातच ४ जानेवारी १६४३ मध्ये न्यूटनचा जन्म झाला. कोपर्निकस, केपलर आणि गॅलिलिओच्या खांद्यावर न्यूटन यांचे संशोधन उभे राहीले. त्यानंतर गॅलिलिओच्या कार्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने औद्योगिक क्रांतीची सुरूवात झाल्यानंतर १७३७ मध्ये खास तयार करण्यात आलेल्या ठिकाणी गॅलिलिओ यांचे शव पुन्हा दफन करण्यात आले. तरीही धर्म सत्तेने त्यांच्यावर घातलेली बंधने तशीच कायम होती. सतराव्या शतकात टाकलेला हा बहिष्कार विसाव्या शतकापर्यंत कायम होता.

विज्ञानातील प्रगतीने मानवाने चंद्रावर पाऊल टाकले. पृथ्वी आणि सौर मालेबद्दलच्या अरिस्टॉटल आणि टोलेमीच्या संकल्पना पूर्ण चूकीच्या आहेत हे जगाने मान्य केले. तरीही ही बंदी विसाव्या शतकाच्या अखेर कायम होती. शेवटी हे बहिष्कार प्रकरण फारच हास्यास्पद ठरू लागले. तेंव्हा १९९० मध्ये पोप जॉन पॉल यांनी गॅलिलिओच्या चौकशी प्रकरणाची सर्व कागदपत्रे शोधून काढली. त्या सर्व कागदपत्राचे अवलोकन करून १९९२ मध्ये व्हॅटकिनने गॅलिलिओ यांना पावन करून घेतल्याचे आणि त्यांच्यावरील बहिष्कार उठवल्याचे जाहिर केले. मात्र त्याअगोदर तीन वर्ष गॅलिलिओ नावाचे यान गुरू ग्रहाच्या दिशेने अवकाशात झेपावले होते. ही खऱ्या अर्थाने गॅलिलिओ यांना दिलेली मानवंदना होती. 

१९७८ मध्ये गॅलिलिओ यांच्या सन्मानार्थ सेंटीमीटर-ग्रॅम-सेकंद या एककांच्यामध्ये गुरूत्वीय त्वरण मापनाचे एकक म्हणून गॅल (Gal) या एककास मान्यता दिली. एक गॅल म्हणजे ०.०१ मीटर प्रती वर्ग सेकंद (1Gal = 0.01m/s2) असते. पृथ्वीचे गुरूत्वाकर्षण हे ९७६ ते ९८३ गॅल इतके भरते. ध्रुवावर ते जास्त असते. तर विषुववृत्तावर ते कमी असते. एककाचे नाव लिहिताना gal असे तर एकक म्हणून Gal असे लिहिले जाते. गॅलि‍लिओ यांनी सर्वप्रथम गुरूत्वीय त्वरण मोजले होते. यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे. प्रामुख्याने भूकंपावेळी गुरूत्वीय त्वरणामध्ये होणारे बदल मोजताना हे एकक वापरले जाते. या एककाला गॅलिलिओ असेही उच्चारले जाते.