मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

मागणे हमी भावाचे... शेतकऱ्यांच्या हक्काचे!



 छत्रपती शिवाजी महाराज, एक प्रजाहित दक्ष, लोक कल्याणकारी राजा. लोकशाहीची मूल्ये आचरणात आणणारा जाणता राजा. शेतकरी... केवळ राज्याचा, देशाचा नव्हे; तर, अखिल विश्वााला जगविणारा घटक. या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजानी हमी भावाची संकल्पना राबवली. आज देशातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी शेतमालाला हमी भाव हीच आहे. हा हमी भाव काय आहे? आणि जाणत्या राजाने नेमका तो कसा अंमलात आणला होता हे मांडण्याची संधी 'अक्षर भेट २०१८ दिवाळी अंकाने दिली होती. आज शिवजयंतीच्या निमित्त तो लेख आज याठिकाणी प्रसिद्ध करत आहे. धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
------------------------------------------------------------------------------------ 
       
शेतकरी... केवळ राज्याचा, देशाचा नव्हे; तर, अखिल विश्वाचा जीव जगविणारा घटक. या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सर्व स्तरांतील लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या, शेतकरी आंदोलनांमुळे शेतकरी वर्ग सातत्याने चर्चेत आहे. त्याला कारणे अनेक आहेत. मात्र जो सर्वांना अन्न पुरवतो, त्या अन्नदात्याला सातत्याने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते, हे दुर्दैवी आहे. ही एक धोक्याचा इशारा देणारी बाब आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे; मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. त्यामुळे शेतकरी वारंवार रस्त्यावर उतरतो किंवा जीवनाचा शेवट करून घेताना दिसतो.

      शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीसाठी त्यालाच आज अनेक जण दोष देतात; मात्र, शेतकऱ्याच्या आजच्या अवस्थेस सर्वाधिक जबाबदार ठरतो तो घटक म्हणजे अनियंत्रित आणि अविचारी पद्धतीने होणारे औद्योगिकीकरण. आज ज्या उद्योगाला मोठ्या प्रमाणावर पाणी लागते, तो म्हणजे बिअर निर्मितीचा उद्योग हा सातत्याने दुष्काळ झेलणाऱ्या औरंगाबादला वसला आहे. त्याचप्रमाणे निम्म्यापेक्षा जास्त भागात सिंचन सुविधा उपलब्ध नसलेल्या सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने उभारण्यात आले आहेत. ही दोन उदाहरणे उपरोक्त विधानाच्या समर्थनार्थ पुरेशी आहेत. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी घेतल्या जातात. त्यामुळे उत्पादक शेतीचे क्षेत्र शेती उत्पादनासाठी अनुत्पादक ठरते. अनेक प्रकल्पांसाठी अशी हजारो हेक्टर अत्यंत सुपीक जमीन घेण्यात आली आहे. तसेच, शेतीसाठी निर्माण केलेल्या जलसाठ्याचा वापर आगंतुकपणे येणाऱ्या उद्योगांसाठी होतो आणि शेतीला पाणी कमी पडते. प्रकल्पात गेलेल्या शेतीच्या मोबदल्यात शेतीचे पुन्हा त्याच दर्जाचे, तेवढेच क्षेत्र विकसित होत नाही. मिळालेल्या पैशामुळे अनेक कुटुंबे ही काही क्षणांचे सुखासीन जीवन जगतात. पैशाची उब संपली की, चक्क ही कुटुंबे उद्ध्वस्त होतात.
      वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे पडलेले तुकडे आणि त्यातून अल्पभूधारक शेतकऱ्यांची वाढती संख्या ही आपल्या शेतकऱ्याला पाश्चात्य राष्ट्रांतील शेतकऱ्यांप्रमाणे व्यापक शेती करण्यावर मर्यादा घालते. ग्रामीण भागात कमी होत चाललेल्या शेतमजुरांच्या संख्येमुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत जातो. पहिल्या हरित क्रांतीने शेतकऱ्याला रासायनिक खते आणि कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरण्यास शिकवले. पुढे ती सवय लागली. कीड आणि किटकांनी या रसायनावर मात केली. त्यामुळे अधिक तीव्रतेची आणि महागडी रसायने वापरणे क्रमप्राप्त ठरू लागले आणि यामुळे उत्पादन खर्च भरमसाठ वाढू लागला. असे सर्व प्रयत्न केल्यानंतर आलेल्या शेती उत्पादन मातीमोल भावाने विकण्याची पाळी आल्यानंतर शेतकरी राजा रडेल नाही तर काय? यातून अनेक शेतकरी कर्जबाजारी होणे, आत्महत्या आणि आंदोलने होणे अपरिहार्य होऊ लागले आणि या प्रश्नाची भीषणता वाढतच चालली आहे. या सर्व आंदोलनांत हमी भाव हा शब्द वारंवार वापरला जातो, सरकारकडूनही याबाबत काही निवेदने प्रसिद्ध होतात. असा हा हमी भाव आहे तरी काय? शेतीला आज काही जण व्यवसाय म्हणतात; मात्र, या शेतीला व्यवसायाचे सर्व नियम लावले जात नाहीत. उदाहरणार्थ, बाजारात एखादे उत्पादन वाढले तर त्याचे भाव पडतात. शेती उत्पादनातही आवक वाढली की भाव झपाट्याने कमी होतात. आवक कमी झाली तर भाव वाढणे अन्य उत्पादनांना लागू होते. शेती उत्पादनाबाबत मात्र आवक कमी झाली की तो घटक परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात करून भाव नियंत्रित केला जातो. उत्पादन वाढल्यानंतर मात्र निर्यात वाढवून शेतकऱ्याला मोठा लाभ होण्यासाठी तातडीने पावले उचलली जात नाहीत.

     यातील महत्त्वाचा भाग म्हणजे अन्य व्यवसायांतील उद्योजकाला आपल्या उत्पादनाचा दर ठरवण्याचा अधिकार असतो. शेतकऱ्याला मात्र हा अधिकार मिळत नाही. तो बिचारा शेतात राब-राब राबतो. शेतीमाल घेऊन पंचायत समितीच्या दारी जातो. तेथील अडत व्यापारी दर ठरवतो आणि माल विकत घेतो. यामध्ये माझा माल आहे, त्याचा दर मी अमूक अमूक एवढा लावणार. पसंत असेल तर घे, नाही तर जा, असे म्हणण्याची ताकत शेतकऱ्याकडे नसते. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्याकडून माल घेणारा हा थेट ग्राहक नाही. मधला दलाल आहे. तो मात्र हेच उत्पादन विकताना स्वत: दर ठरवतो आणि माल विकतो. यामध्ये खरेदी केलेल्या किंमतीमध्ये किती नफा घ्यावा, याचे काहीही निकष पाळले जात नाहीत. दलालाकडे मोठी साठवण क्षमता असल्याने त्याला माल विकण्याची घाई नसते. समजा भाव पडले तर तो मालाची विक्री थांबवू शकतो आणि आणि त्याला पाहिजे तसा नफा मिळताच माल विक्री करतो. शेती उत्पादन हे विशेष काळजी न घेता साठवण्याचा प्रयत्न केल्यास नाश पावतात. या मजबुरीचा गैरफायदा घेतला जातो. केवळ शेतकऱ्याकडे धान्य साठवण्याची सुविधा नसल्याने, घेतलेले कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याला लवकरात लवकर माल विकावा लागतो आणि याचाच फायदा ही मध्यस्त मंडळी उठवत असतात. शेतकऱ्याला त्या त्या हंगामातील पीक विकावेच लागते, अन्यथा पुढचे पिक पेरण्यासाठी त्याला पुन्हा कर्ज घ्यायची पाळी येते. त्याव्यातिरिक्त शेतात शेतकऱ्याला जगण्यासाठी लागणारे सर्वच उत्पादन करता येत नाही. या इतर गरजा भागवण्यासाठी त्याला शेत माल विकणे आवश्यक असते. यातून अनेकदा तोटा सहन करण्याची पाळी येते आणि मग काही जण आत्महत्या करतात तर काही आंदोलने करतात.

      यातली बहुतांश आंदोलने यशस्वी होत नाहीत याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी वर्ग पुरेसा संघटित नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात पोल्सन डेअरीने दुधाच्या दराबाबत शेतकऱ्यांची कोंडी केली. तेव्हा सरदार पटेलांचे मित्र आणि स्वातंत्र्यसेनानी त्रिभुवनदास पटेल यांच्य नेतृत्त्वाखाली शेतकरी एकवटले. त्यातून मोठा लढा उभारला. लोकांनी दूध रस्त्यावर ओतले, मात्र पोल्सनला विकले नाही. यानंतर मुंबईसारख्या शहरांना दुधाचा पुरवठा थांबला आणि तो लढा यशस्वी झाला. त्यातून अमूल दूधचा प्रकल्प उभा राहिला आणि तो आज भारतातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा अव्वल निर्माता आहे. त्याच धर्तीवर काही दिवसांपूर्वी आंदोलन झाले आणि दुधाचे दर काही प्रमाणात वाढवण्यात आले. असा लढा स्वातंत्र्यानंतरही वारंवार उभारला गेला. यातून पहिल्या हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला आणि त्यातून हमी भाव कसा असावा, जेणे करून शेतकरी जगेल, टिकेल याबाबतच्या शिफारशी सरकारला करण्यात आल्या.
      स्वामीनाथन आयोगाने सुस्पष्ट शब्दात शिफारस केली की, शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळणे आवश्यक आहे. हा उत्पादन खर्च कसा काढावा, याचेही सूत्र या अहवालामध्ये देण्यात आले आहे. मागील सरकारने या शिफारशी मान्य केल्या नाहीत. आताही त्या अंशत: स्वीकारल्याचे दिसते. प्रत्यक्षात हा २०१४च्या निवडणुकांतील विरोधकांचा प्रमुख मुद्दा होता. त्यामुळे त्या शिफारशी जशाच्या तशा लागू करणे आवश्यक होते; मात्र, तसे झाल्याचे दिसून येत नाही. यामध्ये शेतीमालाला दीडपट हमी भाव दिल्यास बाजारव्यवस्था नष्ट होईल, असे सांगण्यात येते. म्हणजे शेतकरी मेला तरी चालेल; मात्र, बाजारव्यवस्था टिकली पाहिजे, असे समजायचे काय?
      सुरवातीपासून हमी भाव काढण्यासाठी तीन पद्धती वापरण्यात येतात. पहिल्या पद्धतीमध्ये शेतकरी जो खिशातून खर्च करतो, तेवढाच उत्पादन खर्च म्हणून धरण्यात येतो. यामध्ये बी-बियाणे, खते, मजूर, मशिनरी आणि जमीन जर भाडेतत्त्वावर घेतली असेल तर जमिनीचे भाडे एवढेच घटक उत्पादन खर्चात समाविष्ट होतात. या उत्पादन खर्च काढण्याच्या पद्धतीला ए-२ पद्धत म्हणतात. यामध्ये शेतकऱ्याच्या घरचे लोक काम करत असतील, तरी त्याचा विचार केला जात नाही.
      दुसरी पद्धत ही ए-‍२ अधिक एफएल म्हणून ओळखली जाते. या पद्धतीमध्ये वरील घटकांसमवेत शेतकऱ्याच्या घरातील शेतात काम करणाऱ्या लोकांचा समावेश अनपेड फॅमिली लेबर म्हणून धरला जातो. याचा समावेश केला तर उत्पादन खर्च वाढतो आणि हमी भाव वाढविणे क्रमप्राप्त होते. मात्र या दोन्ही पद्धतींमध्ये शेतीसाठी केलेली प्राथमिक गुंतवणूक गृहित धरलेली नसते. शेतीसाठीच्या प्राथमिक गुंतवणुकीचा विचार येथे करण्यात येत नाही. अन्य उद्योगधंद्यात उत्पादनाची किंमत ठरवताना या बाबी समाविष्ट केलेल्या असतात.
      या सर्व घटकांचा विचार करणारे सूत्र वापरून जो उत्पादन खर्च काढला जातो, त्याला काँप्रिहेन्सिव्ह कॉस्ट किंवा सी-२ पद्धती म्हटले जाते. यामध्ये बी-बियाणे, खते, मजूर, मशिनरी आणि जमीन भाडेतत्वावर घेतली असेल तर जमिनीचे भाडे, घरातील काम करणाऱ्या लोकांची मजुरी आणि मूळ गुंतवणकीवरील व्याज आणि शेतीकामासाठी गुंतविलेल्या रकमेवरील व्याज या सर्व घटकांचा विचार करून उत्पादन खर्च काढला जातो. स्वामीनाथन आयोगाने या सी-२ सूत्रानुसार उत्पादन खर्च काढण्याची शिफारस केली आहे. शेतकरीही यासाठीच आग्रही आहेत; मात्र तसे होताना दिसत नाही.
      खरे तर ही शिफारस मान्य होऊन सरकारने या प्रश्नात खऱ्या अर्थाने लक्ष घातले तरच शेतकरी जगणार आहे. त्याचे कारण म्हणजे शेतकऱ्याचा व्यवसाय हा आखलेल्या आडाख्यानुसार अपवादानेच होतो. पाऊस आणि त्याचा लहरीपणा हा कळीचा मुद्दा आहे. पावसावर कोणीही कोणत्याच पद्धतीने नियंत्रण आणू शकत नाही. पावसाच्या लहरीपणाबरोबर हवामानातील बदल हेही कृषी उत्पादनात बदल करू शकतात. हवामानावर नियंत्रण आणणे ही बाबही मानवाच्या आवाक्याबाहेरची आहे. भारतात हा उत्पादन खर्च विविध प्रांतात वेगवेगळा येतो. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास जमिनीची किंमत आदिवासी भागातील जमिनी आणि महानगरालगतच्या जमिनी यांची तुलनाच होऊ शकत नाही. खताचे आणि कीटकनाशकांचे दर समान असू शकतात. मात्र सेंद्रिय खताचे दरही विविध प्रांतात वेगवेगळे आढळतात. यावर शासनाने यापूर्वीच कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस स्थापन केले आहे. हे कमिशन देशभरातील शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाची शासनाला वेळोवेळी माहिती देत असते. त्यानुसार सरकारने वेळोवेळी हमी भाव जाहीर करणे आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या संपूर्ण मालाची खरेदी करणे आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने हमी भाव जाहीर होत नाहीत आणि झाले तरी ते पुरेसे किंवा योग्य नसतात. याबाबत यावर्षी जाहीर झालेल्या हमीभावापैकी एका पिकाचे उदाहरण पाहू या.
      सध्या ज्वारी या पिकासाठी रूपये १७०० इतका हमी भाव जाहीर झाला आहे. या पिकाचा उत्पादन खर्च काढला तर ए-२ सूत्रानुसार रूपये १२१४ इतका येतो. ए-२ अधिक एफएल सूत्रानुसार रूपये १५५६ आणि सी-२ सूत्रानुसार २०८९ रूपये इतका होतो. ए-२, ए-२ अधिक एफएल आणि सी-२ सुत्रानुसार उत्पादन खर्च मान्य केल्यास हमी भाव अनुक्रमे रूपये १८२१, २३३४ आणि ३१३३ इतका येतो. म्हणजे जाहीर झालेला हमी भाव या सूत्रांना मान्य करून झालेला नाही. न्यूनतम उत्पादन खर्चापेक्षाही तो कमी आहे. असे असूनही शासन सर्व उत्पादन खरेदी करू शकत नाही, कारण शासनाकडे सक्षम आणि पुरेशी साठवण क्षमता असणारी गोदामे नाहीत. अजूनही स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी हे त्यामुळे निव्वळ स्वप्न असून त्याच्या पूर्ततेसाठी किती कालावधी जाणार आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. बरे, सर्व उत्पादन शासन खरेदी करू शकत नसल्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा मध्यस्थाकडे म्हणजे दलालाकडेच जावे लागते. तिथे गेल्यानंतर शेतकऱ्याला अनेकदा उत्पादन मूल्यही मिळू शकत नाही. तोट्यात धान्य विकावे लागते.
      या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन व्यवस्था कशी होती, हे पाहणे उद्बोधक ठरेल. शिवाजी महाराजांनी सर्वात अगोदर सर्व शेतीचे सर्वेक्षण केले. कोणती जमीन कसदार आहे? कोणत्या जमिनीत पिके चांगली येत नाहीत, याची तपशीलात नोंद घेतली. त्यानुसार, शेतसारा जमिनीच्या दर्जावर आकारला जाऊ लागला. हा सारा वसुली करणारे आपला हिस्सा ठेवून उरलेली रक्कम शासनदरबारी जमा करत. महाराजानी प्रथम हिस्सेदारी बंद केली. वसुली करणाऱ्यांना वेतन सुरू केले. यामुळे आपला हिस्सा जास्त मिळावा म्हणून शेतकऱ्यांना नाडण्याचे प्रकार थांबले. त्यानंतर शेतकऱ्यांना खते आणि बी-बियाणे गडावरून देण्याचा शिरस्ता पाडला. बैलांसाठी कर्जही दिले जायचे. त्यामुळे कोणत्या पिकाचा किती पेरा होणार आहे आणि किती उत्पादन निघेल, याचा ढोबळ अंदाज प्रशासनाला घेता येणे शक्य झाले. तसेच एखाद्या शेतकऱ्याला काही नैसर्गिक आपत्तींमुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही, तर देण्यात आलेल्या बी-बियाणे, खते आदींची वसुली केली जात नसे. ते माफ केले जात असे. शेतकऱ्याने पीक काढल्यानंतर त्याला आवश्यक असणारे धान्य ठेवून घ्यावयाचे आणि उरलेले उत्पादन गडावर आणून जमा करावयाचे ही पद्धत राबवली. गडावर धान्य जमा केलावर त्याला त्या धान्याचा प्रकार आणि आकारमानानुसार मोबदला दिला जायचा. म्हणजेच आजच्या भाषेत ते धान्य विकायचे. त्या काळी किल्ले हे आजच्या मार्केट कमिटीचे काम करायचे. विकत घेतलेले धान्य गोदामात जतन केले जायचे. गोदामे भक्कम आणि सुरक्षित होती. दर शेतकऱ्याला अगोदरच माहित असायचा. त्यानुसार मोबदला मिळत असल्याने शेतकरी त्या काळात खूश असे. दुष्काळ पडला तर सारावसुली होत नसे. शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते, ते यामुळेच सार्थ ठरते.
      छत्रपतींच्या निधनानंतर महाराष्ट्र एकीकडे दुष्काळात सापडला आणि तिकडे औरंगजेबाने स्वारी केली. स्वराज्यातील जनतेला अन्न कमी पडू लागले. त्यावेळी संभाजी राजानी जिंजीहून १५,००० बैलगाड्या धान्य आणले आणि रयतेला वाटले. शेतकऱ्याला हमीभाव हा बाजारमूल्यापेक्षा जास्त होता. एखाद्या वर्षी भाव घसरले तरी किल्ल्यावरील खरेदी जाहीर दराने होत असे. होणारी तूट स्वराज्याच्या खजिन्यातून भरून काढली जात असे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी आपला माल गडावर विकत असत. साडेतीनशे वर्षांपूर्वी आखलेली ही पद्धत आजही उठून दिसते, ती यामुळेच. या कालखंडात अनेक संकटांना सामोरे जावे लागले तरी रयत समाधानी होती. इथला शेतकरी सुखी होता.
      मात्र आज स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षे उलटूनही आपण अन्नदात्याला खुश ठेवू शकत नाही, याची खंत वाटते. यासंदर्भात अनेक घोषणा होतात, आयोग नेमले जातात, अहवाल येतात. मात्र शेतकरी समाधानी नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. नवे कायदे, कायद्याचे प्रस्ताव आले तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत नाही. आजच्यासारखी परिस्थिती आणि प्रगती नसलेल्या कालखंडात छत्रपतींनी जे साध्य केले ते आजही आपणास जमलेले नाही. खरे तर तोच पाठ पुढे चालवण्याची गरज आहे. मात्र अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास सुरू आहे. सर्वसमावेशक रितीने प्रश्न सोडवले नाहीत तर असंतोषाचा भडका उडतो. असंतोष साठत राहीला तर स्फोट अटळच. त्यामुळेच हमी भाव आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांचा एकत्रित विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी काही अत्यावश्यक व तातडीची पावले उचलणे गरजेचे आहे.
      शेतकऱ्याला विक्रीस उपलब्ध मालावर किमान आधारभूत मूल्य मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला बियाणे आणि खते शासकीय यंत्रणेमार्फत किंवा भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेमार्फत व्हायला हवे. शेतीच्या सुपिकतेवर शेतकऱ्याचे कष्ट आणि किमान आधारभूत किंमत ठरवणे शक्य नाही. हमी भाव हा सर्व कृषी उत्पादनांना लागू करण्यात यावा. यामध्ये फळे आणि भाजीपाला यांचाही हमीभाव ठरवण्यात यावा. यासाठीचे बियाणे विक्री नियंत्रित झाल्यास उत्पादन किती येणार याचा अंदाज येईल आणि आर्थिक तरतूद पुरेशी करता येणे शक्य होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शाळा कॉलेजची मान्यता देण्यासाठी शासन बृहत आराखडा तयार करते, तसा शेतीपूरक उद्योग, लघुउद्योग, कुटीरोद्योग आदींचा तसा दीर्घ मुदतीचा आराखडा तयार करणे आणि त्याप्रमाणेचं अंमलबजावणी करणे बंधनकारक राहिले पाहिजे. मुळात दहा वर्षांनंतरचा, वीस वर्षांनंतरचा असा आराखडा सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असला पाहिजे. बाजारात त्यातूनही अपेक्षेपेक्षा उत्पन्न्‍ जास्त आले तर ते विकत घेण्यासाठी निधी असला पाहिजे. आयात आणि निर्यातीच्या धोरणाची सांगड हमी भावाशी असली पाहिजे. मात्र उत्पन्न जास्त झाले की आयात करून शेतकऱ्याला फायद्यापासून रोखायचे आणि जास्त झाले की निर्यात धोरण ठरवायला उशीर करून रडवायचे, हा खेळ थांबवला पाहिजे. अन्यथा उत्पादन जास्त झाल्याने व उत्पादन मूल्यही मिळत नसल्याने ते रस्त्यावर फेकण्याचे प्रकार आणि त्यातून येणारी उद्विग्नता हे दुष्टचक्र असेच चालू राहणार. शेतकऱ्यासाठी कर्जावरील व्याजाचा दर हा वेगळा आणि कमी असावा. सर्व प्रकारच्या, सर्व राज्यांतील निसर्गावर अवलंबून असणाऱ्या उत्पादकासाठी पिक विमा योजना राबविणे बंधनकारक असले पाहिजे. शाश्वत वीज पुरवठा आणि तो न झाल्यास वीज कंपनीस दंड अशा तरतुदी आवश्यक आहेत. या सर्व घटकांचा विचार करून योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाल्यास शेतकरी आजच्या तुलनेत अनेक पटीने सुखी होईल. आणि तो सुखी राहिला तर देश समाधानी राहील. मात्र हे करणार कोण, हाच तर खरा प्रश्न आहे.
--००----००--

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

सारे बदलले तरी…


 गेल्या रविवारीउरी' हा चित्रपट पाहिला! थिएटरमध्ये जाऊन -  अनेक वर्षानंतर. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला, त्याला वीस-बावीस वर्ष तरी उलटली. या दोन तपाच्या कालखंडात चित्रपट पाहिले, पण टीव्हीवर. एवढ्या मोठ्या कालखंडानंतर पुन्हा चित्रपटगृहात गेलो आणि माझ्या आयुष्यातील चित्रपटांच्या आठवणीचा पट डोळ्यांसमोर तरंगू लागला. तोच आपल्यासाठी येथे मांडला आहे.  धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
------------------------------------------------------------------------------------ 



गेल्या रविवारीउरी' हा चित्रपट पाहिला. थिएटरमध्ये जाऊन -  अनेक वर्षानंतर! चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला, त्याला वीस-बावीस वर्ष तरी उलटली. या दोन तपाच्या कालखंडात चित्रपट पाहिले, पण टीव्हीवर. एवढ्या मोठ्या कालखंडानंतर पुन्हा चित्रपटगृहात गेलो आणि माझ्या आयुष्यातील चित्रपटांच्या आठवणीचा पट डोळ्यांसमोर तरंगू लागला.
लहानपणी आम्हाला चित्रपट हा प्रकारच माहित नव्हता. गाव अगदी छोटे. आमच्या गावात एस.टी. आजही येत नाही. एक किलोमीटर चालत गेल्यावर बस जाते त्या रस्त्याला आम्ही पोहोचतो. शाळा गावातच. अशा आडवळणी गावात वर्तमानपत्रं यायची, ती पण चार पाच घरांत. जवळच्या गावात शिक्षक म्हणून नोकरी करणारे काही शिक्षक ती आणायचे. वर्तमानपत्र बातम्यांसाठी वाचायचे असते, अशी सर्वांची ठाम समजूत. पुढे सातवीत गेल्यावर वर्तमानपत्र आम्हाला स्वतंत्ररित्या वाचायला मिळू लागले.  वर्तमानपत्रात बातम्यांखेरीज आणखी बरेच काही असते, हे लक्षात आले.
त्यात चित्रपट या शब्दाची पहिल्यांदा ओळख झाली. त्या काळी म्हणजे ४० वर्षांपूर्वी साधारण एक पानभर चित्रपटांच्या व नाटकांच्या जाहिराती असायच्या. त्या पाहून 'सामान्यज्ञान' वाढवण्यासाठी आम्ही थेट गुरूजींना प्रश्न विचारला, ‘चित्रपट म्हणजे काय?’ प्रश्न विचारून पूर्ण व्हायच्या आत आमचे गाल लाले लाल झाले. 'चित्रपट म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट. त्यामुळे अनेक घरे बरबाद होतात. संसार उघड्यावर येतात. त्याचा नाद फार वाईट'. हे आणि असे बरेच काही ऐकून घ्यावे लागले. 'चित्रपट ही वाईट गोष्ट असते', असा आम्ही बोध घेतला आणि विषय सोडून दिला.
आठवीला पांगरीच्या शाळेत गेलो. त्यावेळच्या विज्ञान प्रदर्शनात मी उपकरण तयार करून ठेवले. गेलेल्या बल्बपासून होल्डर ॲडॉप्टर तयार केला होता. ते १९८१ साल होते. प्रदर्शन तालुक्याच्या गावी बार्शीत भरले होते. आम्ही आठ नऊजण त्यासाठी सरांसोबत बार्शीला आलो होतो. आमचे गाव वीस किलोमीटरवर. मात्र त्याकाळी दररोज ये जा करण्यापेक्षा शाळेतच मुक्काम करायचे, ठरले होते. भगवंत मंदिराशेजारील मॉडेल हायस्कूल हे प्रदर्शनाचे ठिकाण. दोन-तीन दिवस ते प्रदर्शन चालणार होते. दोन मुक्काम होते. पहिला दिवस सर्व ठिकठाक लावण्यात गेला. दुसऱ्या दिवशी परीक्षण झाले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
आमच्याबरोबर आलेल्या विज्ञानाच्या सरांनी संध्याकाळी चित्रपट बघायला जायचे ठरवले. मला एकदम भिती वाटायला लागली. वर्षभरापूर्वीची गालावरची 'लालिमा' गेली असली तरी चित्रपट वाईट असतो, हे संस्कार कायम होते. सरांना मी पटकन बोललो. 'मी येणार नाही. सिनेमा वाईट असतो'. बाकीची मुले अगोदरच घोड्यावर बसून तयार होती. सरांनी समजूत काढली. 'एकटाच कसा राहणार' असा प्रश्न विचारला. रात्री मी एकटा शाळेत राहणे अवघड होते. पानगाव, वैरागच्या शाळेची मुलेपण सिनेमाला जाणार होती. शाळेशेजारी भगवंत मैदान. अगोदरच्या रात्री उशिराने तेथे वर्दळ दिसली नव्हती.  गावातील मी एकटाच होतो. आमच्या वर्गातील पण कोणी आलेले नव्हते. मी सांगितल्याखेरीज कोणालाही चित्रपट पाहिल्याचे कळण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे मी शेवटी तयार झालो. संध्याकाळी ९ ते १२च्या खेळाला जायचे होते. बुरूड गल्लीजवळ लता चित्रमंदिर. तेथेजानी दुश्मननावाचा चित्रपट लागला होता. अनेक कलाकार असलेला हा गाजलेला सिनेमा. १९७९मध्ये प्रदर्शित झालेला. दोन वर्षानंतर बार्शीत आलेला. बार्शीतही तो हाऊसफुल्ल चालला होता. सरांनी कोठून काय माहित, पण सर्वांसाठी तिकीटे मिळवली. आम्ही सर्वजण गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदा मी चित्रपट पाहिला, तोही 'जानी दुश्मन'. शत्रुघ्न सिन्हा, सुनिल दत्त, संजीव कुमार असे अनेक नट होते. मला त्यांची ओळखही नव्हती. मात्र पुढे हळूहळू सर्वच परिचयाचे झाले. काही आपले वाटू लागले.
त्यानंतर पुढच्या वर्षी मी मुंबईत शिकायला गेलो. तेथे मुलुंडला ज्या इमारतीत आम्ही रहात होतो. त्या इमारतीतील गायकवाडाच्या घरी टीव्ही आला होता. १९८२ साली एशियाड भारतात भरले होते. त्यामुळे टीव्हीचा मोठा प्रसार झाला होता. त्या काळात सह्याद्री वाहिनीवर शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी सिनेमा असायचा. आम्ही सर्व अपार्टमेंटवासी त्याचा एकत्र आनंद घ्यायचो. त्या एका वर्षात पाहिलेले हिंदी चित्रपट आठवत नाहीत. मात्र 'कन्हैय्या' चित्रपट आणि त्यातील राजकपूरचे 'रूक जा ओ जानेवाली रूक जा' हे गाणे मात्र कायम लक्षात राहिले; का ते माहित नाही. मात्र मराठीतील गोष्ट एका लाखाची, भालू असे अनेक चित्रपट त्या काळात पाहिले. त्यातले काही निवडक लक्षात राहिले. दहावीला परत बार्शीला आलो. बार्शीत अधून मधून चित्रपट पाहायला लागलो. बार्शीमध्ये त्यावेळी लता, आशा, चित्रा आणि उदय ही चार चित्रपटगृहे होती. या सर्व चित्रपटगृहांत मी अनेकदा गेलो. मात्र त्याची घरात कोणाला माहिती  नसे. बोलणी आणि मार खाण्याचा प्रश्नच नव्हता. तसेच चित्रपट वाईट असतात, हा विचार निघून गेला. एनटीएस परीक्षेसाठी मी सोलापूरला गेलो. परीक्षा संपल्यानंतर जॅकी श्रॉफचा 'हिरो' पाहिला. त्यातील गाण्यांनी सर्वाना वेड लावले होते. मला 'डिंगडाँग' पेक्षा 'लंबी जुदाई' हे गाणे लक्षात राहिले.
केवळ मनोरंजनासाठीच तयार केल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये जितेंद्रचे अनेक चित्रपट होते. त्याचे तोहफा, हिम्मतवाला, मवाली असे अनेक चित्रपट पाहिले. केवळ तीन तास डोकं रिकाम करण्यासाठी चित्रपट पाहायचे असतात, असे त्यावेळी वाटायचे. पण व्ही. शांताराम यांचा 'पिंजरा' पाहिला आणि प्रत्येक चित्रपटात काही बोध आहे का, हे शोधायला लागलो. मास्तरच्या तोंडात शेवटी असणारेव्यक्ती मेल्या तरी चालतील, पण आदर्श टिकले पाहिजेत, हे वाक्य त्याला कारण ठरले. त्यानंतर मी चित्रपट वेगळ्या भूमिकेतून पाहू लागलो. अकरावी बारावीमध्ये हा सिलसिला असाच चालू राहिला.

बंडखोरीचं ते वय. साम्यवादी विचारांचा प्रभाव आपोआप येत असे. मनोजकुमारचे देशभक्तीने भरलेले चित्रपट भारावून टाकत. निव्वळ मसालापटही मित्रांमुळे पाहावे लागत होते. मला ते आवडत नव्हते, असे नाही. मात्र चांगले चित्रपट पाहावेत, असे वाटायचे. नवा चित्रपट पाहण्याअगोदर विविध वृत्तपत्रांतील समीक्षण वाचत असे. त्यातून चांगले वाईट असे बरेच काही समजत असे. त्या परीक्षणामुळे अनेकदा चित्रपट पाहायचो. पण मर्यादित स्वरूपात.
पुढे बी.एस्सीसाठी सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याठिकाणी अनेक गोष्टी वेगळ्या होत्या. प्रथमच घरातील कोणाचे माझ्यावर बंधन नव्हते. त्यातच  एक अर्थार्जनाचे साधन मिळाले. घरातून येणारे आणि आपण कमावलेले पैसे. त्यामुळे पैसा हा प्रश्न नव्हता. मात्र वसतीगृहाचे नियम कडक होते. नऊच्या आत वसतीगृहात परत यावे लागत असे. रात्रीचाशोबधण्याची सोय नव्हती. त्यामुळे दर रविवारी चित्रपट पाहायला जाऊ लागलो.
त्यातचं होस्टेलवर एक कलंदर मित्र भेटला. रामहरी. दोन देवाचे नाव एकत्र घेऊन मिरवणारा हा पठ्ठ्या चित्रपटांचा जबरा शौकिन. त्याला जुने चित्रपट आवडत असत. सोलापुरात त्यावेळी भागवत चित्र मंदिरातच चार टॉकिज होत्या. त्याठिकाणी नवे चित्रपट येत असत. आम्हाला तर जुने चित्रपट हवे असत. जुने चित्रपट आणणारे एकच चित्रपटगृह होते. ते म्हणजे सरस्वती. साधारण आठवड्याला ते जुना चित्रपट बदलत. क्वचितच दोन आठवडे असायचा. या रामहरीने एक नवी शक्कल काढली. गावाहून मनी ऑर्डर आली की कॉलेजच्या पोष्ट ऑफिसमध्ये जाऊन पंधरा रूपयाची शंभर पोष्ट कार्ड आणायचा. ती आम्हा सहा सात मित्रांत वाटत असे. रविवारी कोणता चित्रपट पाहायचा, हे तो ठरवत असे. सर्वांना तो त्यांच्या अक्षरात आणि शब्दांत टॉकिजच्या व्यवस्थापकांना पत्र लिहायला लावत असे. पत्रातला साधारण मजकूर असा असायचा
मा. व्यवस्थापक, सरस्वती चित्र मंदिर, सोलापूर. आपण आपल्या चित्रपटगृहात जुने गाजलेले चित्रपट लावता. हे करून आपण चित्रसृष्टीची एक प्रकारे सेवा करत आहात. केवळ तुमच्यामुळे आम्हाला जुने, दर्जेदार आणि चांगले चित्रपट पाहायला मिळतात. आपल्या सेवेमुळे लोकांची अभिरूची टिकून राहण्यात मोठी मदत होत आहे. आपण असेच जुने चित्रपट दाखवावेत आणि आम्हा रसिकांची भूक भागवावी. मला ..… (जो चित्रपट पाहायचा त्याचे नाव) हा चित्रपट पाहायचा आहे. मात्र तो अनेक दिवस, कोठे लागला नाही. आपण तो लावलात तर फार बरे होईल. आपल्या हातून अशीच कलेची सेवा घडत राहो. आपणास उदंड आरोग्य आणि आयुष्य लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. कळावे आपला कृपाभिलाषी सिने चाहताआणि खाली मस्त सही ठोकायची. अशा प्रकारे अनेक पत्रे पाठवून रामहरीने अनेक उत्तम जुने चित्रपट सरस्वती चित्रमंदिरच्या व्यवस्थापकांना लावायला भाग पाडले.
या पद्धतीने मेरा नाम जोकर, मधुमती, हरियाली और रास्ता, दो आँखे बारह हाथ, निलकमल, सिलसिला, अभिमान, कभीकभी, पत्थर के सनम, दो रास्ते, आनंद, गाईड, आवारा, मदर इंडिया, गोलमाल, दिवार, चोरी चोरी, कागज के फुल, दो बिघा जमीन, आराधना, अमर प्रेम असे अनेक चित्रपट पाहिले. या सर्व प्रकारात व्यवस्थापकाला फसवण्याचा हेतू नव्हता. आम्हाला चांगले चित्रपट पाहायला मिळावेत, हा शुद्ध हेतू होता. ती तीन वर्षे मस्त मजेत गेली. चित्रपट पाहण्याचा खरा आनंद त्यावेळी घेतला.

एम.एस्सी.ला शिवाजी विद्यापीठात आल्यानंतर आमची मोठी अडचण झाली. सर्व चित्रपटगृहे गावात. त्यात संध्याकाळी दहाला शेवटची बस असायची. त्यामुळे रात्रीचा शो बघायची अडचण झाली. तरीही आम्ही रविवारी मस्त फिस्टचे जेवण जेवायचो आणि पिक्चर बघायला जायचो. क्वचित पन्हाळा दौरा असायचा. पण फिरण्यापेक्षा पिक्चरला जाणे आवडायचे. इंग्रजी चित्रपट क्वचितच बघितले. द ब्लॉब, टिचर असे चार पाच पिक्चर वगळता इंग्रजी चित्रपट पाहणे नाही. हिंदी आणि मराठी पिक्चर मात्र क्वचितच सुटायचे. त्यावेळी आजच्यासारखे भरमसाठ पिक्चरही येत नव्हते. पिक्चर बघून आल्यानंतर अभ्यासासाठी नाईट मारायची. मुड कसा अगदी फ्रेश झालेला असायचा. त्यावेळी आलेल्या चित्रपटातले अनेक पिक्चर अनेकदा बघितले.
त्याकाळात एकदा रात्री मोठी अडचण झाली. विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी म्हणून एस.के. पाटील काम पहायचे. कडक शिस्तीचा माणूस. एरवी कधी न दिसणारा. एम.एस्सी. भाग एकमध्ये असताना एकदा रात्री ९ ते बाराचा शो बघायला आम्ही गेलो. शो संपला. चालत अयोध्या थिएटरपासून विद्यापीठात आलो. आठ नंबर गेटमधून थेट रस्ता होता. आम्ही मजेत गप्पा मारत चाललो होतो. तेवढ्यात झाडाच्या सावलीतून पाटील साहेब पुढे आले आणि सर्वांची ओळखपत्रे मागितली. पाकिट मारतात म्हणून आम्ही ती नेली नव्हती. एकाकडेच ते होते. ते त्याला जाऊ द्यायला तयार होते, मात्र बाकीच्यांना सोडायला तयार नव्हते. शेवटी त्याने सर्वांच्या किल्ल्या घेऊन जावे आणि सर्वांची ओळखपत्रे आणावीत, तोपर्यंत आम्ही पाच सहा जणांनी तेथेच थांबायचे, असे ठरले. रात्रीचा दीड वाजत आला होता. तो आमचा मित्र गेला. सर्वांच्या रूम उघडून ओळखपत्रे घेऊन येईपर्यंत अडीच वाजत आले होते. झोपेचे पार खोबरे झाले होते. पिक्चरचा आनंद पुरता गेला होता. त्यावेळी दोन पेपरमध्ये दोन-तीन दिवसाची सुट्टी आली तरी आम्ही पिक्चरला जायचो.
पुढे पीएच.डी.ला विद्यापीठातच प्रवेश घेतला. त्यावेळी हनिफ सोबतीला आला. हा हनिफही वल्ली होता. त्याला माधुरी फार आवडायची. तो मिरजेचा. बोलण्याची त्याची एक स्टाईल होती. माधुरी आवडती हिरॉइन आणि तेजाब त्याचा आवडता चित्रपट. माधुरीचा उच्चार तो ‘महादुरी’ असा करायचा. ‘काय भयंकर दिसते महादुरी’ हा त्याचा पेटंट डायलॉग. त्या अडीच वर्षात किमान हजारवेळा ऐकावा लागला असेल. 'भयंकर' म्हणजे 'सुंदर' असा अर्थ कळायला, अनेक दिवस गेले. त्याच्या माधुरी प्रेमामुळे तेजाब हा पिक्चर सहा सात वेळा तरी पहावा लागला होता. त्याचा आवडता अभिनेता सनी देओल. त्याच्यासाठी ‘घायल’ हा चित्रपट डझनभर वेळा तरी पाहिला असेल. त्यातले डायलॉग मलाही पाठ झाले होते. स्वर्ग, आशिकी, अग्नीपथ, सौदागर, साजन, मैने प्यार किया, हम है राही प्यार के, दिल असे अनेक चित्रपट त्या काळात पाहिले.
त्यानंतर शिक्षक म्हणून बारामतीला रूजू झालो आणि चित्रपटापासून दुरावलो. बारामतीच्या एका वर्षात दोन तीन सिनेमे पाहिले असतील. पुढे लग्न झाले आणि संसारात पडलो. आता पिक्चर पाहायला वेळ मिळत नव्हता. बायकोबरोबर दोन तीन चित्रपट पाहिले. नाना पाटेकर मला आवडायचा. दमदार आवाजातले त्याचे डायलॉग ऐकत राहावे वाटायचे. त्याचा 'यशवंत' बार्शीच्या आशा चित्रपटगृहात पाहिला. मला एकदम त्या चित्रपटगृहाची अवस्था खटकली. हिरो आला की लोकांच्या शिट्टया वाजवणे. जागोजागी लोकांनी लाल केलेल्या भिंती. कचरा पडलेला. लोकानी खाऊनी टाकलेले कागद. सगळे वातावरण बेसूर वाटू लागले. घाण वाटू लागले. त्यानंतर थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघावा, असे वाटेनाच! मला कितीही, कोणीही आग्रह केला तरी पिक्चरला जात नसे. १९९६ नंतर बाहेर जाऊन पिक्चर बघणे पूर्ण बंदच झाले.
दूरदर्शनवर शुक्रवारी रात्री पिक्चर असे. मी तो आवर्जून पाहात असे. त्यावरून अनेकदा घरातील भांड्यांचा आवाजही झाला. मात्र रात्रीचा तो पिक्चर मी पहात असे. पुढे सोलापूर, कोल्हापूरच्या वास्तव्यात अधूनमधून पिक्चर पहायला लागलो, पण ते टीव्हीवर. थिएटरला जाणे टाळतच राहिलो. पुढे दोन वर्षे नांदेडला गेलो. तेथे एकटाच रहात होतो. तोपर्यंत वाहिन्याचा सुळसुळाट झाला होता. घरी केबल असल्याने अनेक उत्तम चित्रपट पाहिले. बसमधून येता-जाता काही नवे चित्रपट पाहायला मिळत होते. त्या काळात किमान पन्नास साठ चित्रपट तरी पाहिले. तानी, देऊळ असे काही मराठी पिक्चर पाहिल्यावर मराठी सिनेमा बदलतोय हे जाणवत होते. मात्र हे चित्रपट पाहाणे घरातच होते. आता, अलिकडे तर मी पिक्चर पाहायला थिएटरमध्ये जायचे असते, हेच विसरून गेलो होतो. घरच्यांनीही 'हा अरसिक' असा शिक्का मारून, मला आग्रह करणेही सोडून दिले. मला त्याचे काही वाटत नव्हते.
मात्र मागच्या आठवड्यात कन्येने आग्रह धरला, 'मलाउरीबघायचाय, तोही तुमच्यासोबत'. मी नेहमीप्रमाणे टाळण्याचा प्रयत्न केला. तिनेही नकार स्वीकारला. मात्रउरीबद्दल अनेक लोकांकडून चांगले ऐकायला मिळाले होते. मीही पुन्हा विचार केला. मुलीचा बाकी कसलाच हट्ट पुरवत नाही. जाऊ या तीन तास तिच्यासोबत सिनेमाला. तिच्या जन्मापासून मी पहिल्यांदाच तिच्यासोबत पिक्चरला गेलो. खरं तर मी चित्रपट दाखवायला तिला न्यायला हवे होते. मात्र आता ती मला घेऊन गेलेली होती. हो, तीच नेत होती. कारण आजच्या जगातले चित्रपटगृहाचे बदललेले रूप मला कुठे माहित होते! शेवटी 'मी 'उरी' पाहायला येतो' म्हटल्यावर तिने लगेच ऑनलाईन दोन तिकिटे बुक केली. पूर्वीसारखे लवकर जाणे नाही. तिकीटांच्या रांगेत उभे राहणे नाही. पाकिट कोणी मारेल का, याची काळजी नाही. हाऊसफुल्ल झाला म्हणून ब्लॅकवाल्याचा शोध नाही. गाजलेल्या पिक्चरची तिकीटे मिळाल्यावर विजयी वीराचा आनंद नाही. दोन मिनिटात तिने सांगितले. रिलायन्स आयनॉक्सची तिकीटे आहेत. मला हे सारेच नवीन होते.
अडीचच्या शोसाठी आम्ही दोन वाजता निघालो. तिची किरकोळ खरेदी करून आम्ही वेळेत पोहोचलो. मोबाईलमधील तिकिटे दाखवून प्रवेश झाला. इथेही चुकल्यासारखे वाटले. डोअर किपरने तिकीटे फाडण्याची पद्धत आढळली नाही. आत सर्वत्र भिंती स्वच्छ होत्या. पिक्चर सुरू असताना फेरीवाले कडमडत नव्हते. तो विक्रेता मधल्या रिकाम्या जागेतून शांतपणे जात होता. गर्दी नव्हती. पिक्चर सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी सारे उठून उभा राहिले. सारे काही शिस्तबद्ध. लेकीने सुरूवातीलाच मोबाईल सायलेंट मोडवर टाकायला सांगितले. राष्ट्रगीत, जाहिराती झाल्यावर सिनेमा सुरू झाला. एक चांगला चित्रपट पहायला मिळाला. मात्र हिरोच्या एंट्रीनंतर कोणीही शिट्ट्या मारल्या नाहीत. कसलाच दंगा नाही. त्या दिवशी भारत-न्युझीलंड वन डे सुरू होती. मॅचचे काय होते? याची मला चिंता लागून राहिली होती. मी अधूनमधून मोबाईलवर स्कोअर पहात होतो. तेवढेही चिमणीला आवडत नव्हते. तिने मोबाईल काढून घ्यायची धमकी देण्यापूर्वीच भारत जिंकला, हे बरे झाले. नाहीतर मी मॅचचे काय होते, या काळजीत चित्रपट पाहिला असता. हिरोच्या मेव्हण्याचे आतंकवादी हल्ल्यात निधन होते. त्याची मुलगी वडिलांचे अंत्यदर्शन घेते आणि मामाला बिलगते. या क्षणाला अख्ख्या चित्रपटगृहातील लोकांचे हात स्वत:चे ओले डोळे पुसण्यासाठी गेले होते. म्हणजे माणसातील भावना त्याच होत्या. माझ्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.

सारे काही बदलले आहे. चित्रपटाचे तंत्रज्ञान, चित्रपटगृहे, माणसाची शिस्त, स्वच्छता…. सारे काही. मात्र माणसाच्या भावना आजही त्याच आहेत, जिवंत आहेत. हा अनुभव दिल्याबद्दल मी माझ्या कन्येचे आभारच मानायला हवेत. एका पिढीच्या अंतराने मी हे सारे अनुभवले.  सारे बदलले असले तरी माणसाचे मन तसेच आहे, हळवे. हे पाहून मनापासून आनंद झाला. पुन्हा आपण सिनेमागृहात जायला काही हरकत नाही.... असे वाटायला लागले. चित्रपट पाहाण्याचा जोश शून्यावरून एकदम 'हाय' झालाय. चला, येताय का माझ्यासोबत?