मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

उत्तमतेची आस; सर्वोत्कृष्टतेचा ध्यास!


(रवळनाथ को-ऑपरेटीव्ह हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे दिनांक १४ एप्रिल २०१८ रोजी गडहिंग्लज येथे आयोजित कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाचा गोषवारा येथे प्रकाशित करत आहे........धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)

--------------------------------------------------------------------------------------

       मित्रहो, प्रस्थापित व्यवस्था किंवा पद्धती जेव्हा लोकांच्या गरजा, अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा नव्या संस्थेची स्थापना होत असते. अशी संस्था स्थापन होत असताना काही आदर्श, काही उद्दिष्ट्ये डोळयासमोर ठेवून स्थापन होत असते. अशा नव्याने सुरू होणाऱ्या संस्थेने स्वत:ची अशी एक कार्यपद्धती ठरवलेली असते. त्या उद्दिष्टानुरूप कार्यपद्धतीचा वापर करत पुढे जाणाऱ्या संस्थेचा लौकिक वाढत जातो आणि ती संस्था नावारूपाला येत असते. आज रवळनाथ हौसिंग सोसायटीने स्वत:ची अशी ओळख निर्माण केली आहे. आजरा, गडहिंग्लज भागातील शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना चांगले घर उभे करता यावे, त्यांना आर्थिक पाठबळ सहज उपलब्ध व्हावे, या हेतूने १९९६ मध्ये रवळनाथ को-ऑपरेटीव्ह हौसिंग फायनान्स सोसायटीची स्थापना झाली. यामध्ये शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी दोन्ही घटकांचा समावेश करून संस्थेने सुरूवातीपासून सर्वसमावेशकता साधण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व मंडळी नोकरदार असल्याने वसुलीचा प्रश्न सोपा झाला. आजरा येथे सुरू झालेल्या या संस्थेच्या आज आठ शाखा आहेत आणि नववी शाखा लवकरच कुडाळ येथे सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही सोसायटीने शाखाविस्तार सुरू केला असून आता तिचे स्वरूप मल्टीस्टेट झाले आहे. संस्था अशा पद्धतीने वाढवण्यात कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोठे असते. कर्मचारी त्यांच्या कामाने संस्थेचा लौकिक वाढवत असतात.
      कर्मचाऱ्यांची विश्वासार्हता संस्थेसाठी फार महत्त्वाची असते, याचे एक उदाहरण सांगावेसे वाटते. अशाच एका सोसायटीमार्फत कर्ज वितरण होत असे. तशी ही सोसायटी फार मोठी नव्हती. एका कार्यालयापुरते तिचे कार्यक्षेत्र मर्यादित होते. काही हजारांत कर्ज दिले जात असे. ते कर्ज कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करून सोसायटीकडे जमा होत असे. हा हप्ता वेतनातून कपात होऊन गेला तर हातात पडणारा पगार कमी दिसत असे आणि त्या कर्मचाऱ्याला अन्य संस्थेचे बँकेचे कर्ज मिळण्यात अडचण येत असे. यावर उपाय म्हणून काही हुशार कर्मचाऱ्यांनी नामी शक्कल शोधून काढली. ती अशी की हा हप्ता रोखीने वेतनापुर्वीच भरायचा. त्यामुळे ती कपात वेतनपत्रकात येऊ देत नसत. हातात पडणारे वेतन जास्त दिसत असे. त्यामुळे अन्य बँकाचे कर्ज घेता येणे शक्य होत असे. पुढे पुढे कर्मचारी हा हप्ता सोसायटीच्या एका कर्मचाऱ्याकडे देऊ लागले. तोच कर्मचारी वेतनातून कपात करावयाची रक्कम कळवण्याचे कामही करत असे. तो अशा कर्मचाऱ्यांची रक्कम कळवत नसे. काही दिवस ही पद्धत सुरळीत चालली. पुढे सोसायटीचा कर्मचारी ही रक्कम वापरू लागला आणि काही दिवस ही रक्कम वापरून पुन्हा भरत असे.  अशी रक्कम तो मोठ्या प्रमाणात वापरू लागला. अन्य ग्राहकांना ही पद्धत कळाल्यानंतर अनेक जण असे करू लागले. त्यातच अशी रक्कम मोठ्या प्रमाणात जमा केलेली असताना आणि ती संस्थेत भरण्यापूर्वी अचानक त्या सोसायटीच्या कर्मचाऱ्याचे निधन झाले. पैसे जमा करणाऱ्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याने त्यांचे असे दिलेले पैसे बुडाले. यात ग्राहकांच्या विश्वासाला मोठा तडा गेला. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने कोणत्याही संस्थेतील कर्मचाऱ्यांची विश्वासार्हता ही फार महत्त्वाची असते.
      दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे संस्थेतील कर्मचाऱ्यांची विचारसरणी. सकारात्मक विचारसरणीने कार्य करणारे कर्मचारी संस्था मोठी करण्यामध्ये मोठे योगदान देत असतात. संस्था आपली आहे, असे समजून कर्मचाऱ्याने काम करणे आवश्यक आहे. आपले कोणतेही कृत्य संस्थेला बाधा पोहोचवणारे असणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक ठरते. संस्थेत येणारा ग्राहक हा आपला पगार देणारा आहे. तो आहे म्हणून आपण आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक असला पाहिजे. ग्राहकाला 'कमीत कमी त्रास आणि त्याचे पूर्ण समाधान' यासाठी आपणास वेतन दिले जाते, याची जाणीव ठेवून काम व्हायला हवे. ग्राहक समाधानाने जात असेल तर तो संस्थेची नकळत जाहिरात करून संस्थेचा लौकिक वाढवण्यास कारण ठरतो हे आपण जाणले पाहिजे आणि त्यानुसार आपले वर्तन ठेवले पाहिजे.
      पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येकाला संस्थेचे काम हे आपले काम वाटले पाहिजे. आपल्या घरात आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतो, तसेच संस्थेतील प्रत्येक गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रत्येक कर्मचारी हा तीन भूमिकांमध्ये जगत असतो. घरात तो कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबाचा घटक असतो. समाजातील तो एक घटक असतो आणि संस्थेचा कर्मचारी म्हणून तिसरी भूमिका तो पार पाडत असतो. यातील संस्थेतील नोकरी ही सर्वात महत्त्वाची असते. या नोकरीमुळे त्याला समाजात एक स्थान प्राप्त झालेले असते. समाजात वावरताना संस्थेचे वलय त्याच्याभोवती असते आणि समाजात वावरताना आपल्या वर्तनाने संस्थेच्या लौकिकास बाधा पोहोचणार नाही, हे त्याने पाहिले पाहिजे. यातील कुटुंबाचा घटक म्हणून वावरतानाही आपले घर चालवण्यास संस्थेतील वेतन सहाय्यकारी आहे याचे भान ठेवायला हवे. आपले कोणतेही काम संस्थेच्या लौकिकात वाढ करणारे असले पाहिजे.
      मी ज्यावेळी शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होतो त्यावेळचा एक प्रसंग आठवतो. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या. मला गावी जायचे होते. कोल्हापूर ते बार्शी त्यावेळी पस्तीस रूपये तिकीट होते. सवलत अर्जावर पदव्युत्तर प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांची स्वाक्षरी घेतली तर साडेसतरा रूपये वाचत. ही रक्कम तीस वर्षांपूर्वी तशी फार मोठी होती. मी त्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी त्या विभागात गेलो. त्यावेळी दरवाज्यातच मला त्यांचे मोठ्याने रागावणे ऐकायला येत होते. अधिकाऱ्याची केबीन म्हणजे पाच सहा कपाटे लावून आडोसा तयार केलेला होता. त्यामुळे आतले सर्व बाहेर सहज ऐकायला येत होते. सवयीने मी शिपाई मामाकडे पाहिले. त्यांनी सांगितले, 'तवा लय तापलाय, आत जावू नको. जरा थांब.' मी बाहेरच थांबलो. कान मात्र त्या अधिकाऱ्याच्या कक्षातून येणाऱ्या आवाजाकडे होते. अधिकाऱ्याचे रागावणे सुरू होते. 'ही काय पत्ता लिहिण्याची पद्धत आहे. असा पत्ता लिहिलेले पाकिट त्यांच्या हातात पडल्यावर त्यांच्या मनात विद्यापीठाबद्दल काय प्रतिमा तयार होईल. असा पत्ता लिहितात का? कोणी नोकरीवर घेतलं तुम्हाला?'  आतून महिला कर्मचारी बोललेले ऐकायला आले, 'सॉरी सर'. अधिकारी पुढे म्हणाले ' सॉरी काय सॉरी, एवढे साधे काम करता येत नाही. पाकिटावर पत्ता नीट लिहिता येत नाही. घेवून या एक पाकिट.' ती महिला लेखनिक बाहेर आली आणि पाकिट घेवून पुन्हा आत गेली. आता माझे कानाबरोबर डोळेही आतमध्ये केंद्रित झाले. कपाटाच्या फटीतून ते काय सांगतात, याकडे माझे लक्ष होते. कपाटाच्या फटीतून आतले स्पष्ट दिसत होते. असे चोरून ऐकणे, पाहाणे हे वाईट आहे, याचे भान मला नव्हते. ते माझे वर्तन आज मला चुकीचे दिसत असले तरी मला फार मोठी शिकवण देणारे होते. त्या अधिकाऱ्याने ते पाकिट हातात घेतले. त्याचे घडी घालून चार भाग केले आणि ते सांगू लागले, ''डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात 'प्रेषक' लिहून कुलसचिवांचा शिक्का मारायचा. उजव्या हाताकडील वरच्या भागातील डाव्या कोपऱ्यात खाली 'प्रति' लिहावयाचे आणि त्याखाली असणाऱ्या उजव्या कोपऱ्यातील एक चतुर्थांश भागातच ज्यांना पत्र पाठवायचे आहे, त्यांचा पत्ता लिहायचा. असे पाकिट भरून पत्ता लिहितात का कोणी?'' आता त्यांचा आवाज बदलला होता. ते अधिकारी एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्या कर्मचारी महिलेला समजावून सांगत होते. या घटनेतील त्या अधिकाऱ्याला साध्या पाकिटावरील पत्त्यातून विद्यापीठाबाबत पत्र स्वीकारणाऱ्याच्या मनात तयार होणाऱ्या प्रतिमेची चिंता होती. ही चिंता, काळजी संस्थेच्या लौकिकास बाध पोहोचू नये, या भावनेतून होती. ही चिंता प्रत्येकाच्या मनात आपल्या प्रत्येक कृतीबाबत असली पाहिजे. आपले काम हे पाट्या टाकण्याचे नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण कामातून आनंद घ्यायला शिकले पाहिजे. आपले काम कोणत्या तरी चांगल्या कार्यासाठी आहे, याची जाणीव आपणास हवी. आपण 'रूटीन काम' म्हणून त्याकडे पाहायला लागलो; तर, ते आनंददायी ठरत नाही आणि त्यातून संस्थेची आपणास जाणवत नसले तरी आपण हानी करत असतो. आपल्या कृतीने संस्थेच्या लौकिकात भर पडणे म्हणजे हानी न होणे असते.
      एका गावात गावकऱ्यांनी निधी जमवून एक सुंदर मंदिर बांधले. त्या मंदिरात ठेवण्यासाठी त्यांना तशीच सुंदर मूर्ती हवी होती. अनेक मूर्ती घडवणाऱ्यांमधून त्यांनी तीन मूर्तीकार निवडले आणि त्यांना सांगितले की, ज्याची मूर्ती आम्हाला आवडेल, त्याला आम्ही मोठे बक्षीस देऊ. ज्याचे काम आम्हाला आवडणार नाही, त्याचेही आम्ही नुकसान करणार नाही. त्याला जेवढा रोजगार मिळाला असता, तेवढे पैसे आम्ही देऊ. या तीन मूर्तीकारांची गावात राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या पसंतीचे दगड शोधण्यासाठी त्यांना येणारा खर्च गावाने केला आणि ते दगड मंदिर परिसरात आणून देण्यात आले. दिवसभर हे तीन मूर्तीकार मूर्ती घडवण्याचे काम करू लागले. अनेक दिवस मनोभावे काम सुरू असल्याचे सर्वांना दिसत होते. त्यांच्यापैकी एकाची मूर्ती निवडली जाणार होती. तिघेजण भर उन्हातही हे काम करत होते. त्या गावात एक बाहेरगावचा पाहुणा आला होता. त्याला गावात मंदिर बांधण्यात आल्याचे समजले होते. त्याचप्रमाणे तीन मूर्तीकारांपैकी ज्याची मूर्ती अधिक छान बनेल, तिची तिथे प्रतिष्ठापना होणार असल्याचेही समजले. संध्याकाळच्या वेळी त्याने मंदिराकडे जायचे ठरवले. तो त्या मंदिराजवळ ज्या ठिकाणी मूर्ती घडवत होते तिथे गेला. तसे हे तिघेजण बऱ्यापैकी अंतर राखून काम करत होते. छिन्नीने दगड घडवताना तो कोणाला लागू नये, याची काळजी घेत होते. मात्र एकमेकांचे काम एकामेकाला दिसत होते. ही स्पर्धा होती. परीक्षा होती. जो सर्वोत्तम प्रदर्शन करणार तो जिंकणार, हे उघड होते. म्हणून ते आपले कार्य-कौशल्य लपवण्याचा प्रयत्न करत नव्हते. सर्वांचे काम खुलेपणाने सुरू होते. पाहुणा पहिल्या मूर्तीकाराकडे गेला. तो आधीच त्रस्त चेहऱ्याने काम करत होता. पाहुण्याने पहिल्या मूर्तीकाराला विचारले, 'काका, तुम्ही काय करताय?' मूर्तीकार वैतागून म्हणाले, 'दिसत नाही होय, दगड फोडतूय. या देवळात बसवायला मूर्ती पायजेल हाय. रोजगार मिळतूय म्हणून काम करतूय पोटासाठी'. तो पाहुणा पहिल्याचे ऐकून पुढे गेला. त्याने दुसऱ्या मूर्तीकाराला तोच प्रश्न विचारला. दुसऱ्या मूर्तीकाराने उत्तर दिले. 'पोटाचा प्रश्न आहे बाबा. पापी पेट भरायचं तर काम कराय लागतंय. ही जी मंदिर बांधलय नव्हं त्याच्यात देव बसवायचाय, त्याला मूर्ती पायजेल. आम्हा तिघास्नी बोलवून घेतलं. त्यातली एक बसवायची म्हणतेत. पैसा मिळतूय म्हणून करायचं काम.'
      तो पाहुणा तिसऱ्याकडे गेला आणि हाच प्रश्न विचारला. तिसऱ्या मूर्तीकाराने उत्तर दिले, 'समोर जे सुंदर मंदिर बांधले आहे. त्यामध्ये बसवायला एक सुंदर मूर्ती हवी आहे. ती मूर्ती मी घडवतो आहे.' त्याचा आत्मविश्वास पाहून पाहुण्याला राहवले नाही. त्याने पुढचा प्रश्न केला, 'पण तुमची मूर्तीच बसवतील कशावरून? बाकीचे लोक पण तेचं काम करतेत ना?' तेंव्हा तो मूर्तीकार परत बोलला, 'बाकीचे काय करतात माहित नाही. पण मला इथं त्या कामासाठी बोलावलंय आणि मी ती मूर्ती घडवतोय'. पाहुण्याने मनोमन ओळखले की याचीच मूर्ती बसवली जाणार तरीही त्याने विचारले 'मग पोटापाण्याचे काय करता?' मूर्तीकार बोलला, 'काम चालूच हाय की, हातातली कला उपाशी राहू देती व्हय. कामातून मिळतेत चार पैसे, पोटभर देतूय त्यो. पोटाची काळजी कराय तो खंबीर हाय. आपण आपलं काम करायचं, बास्स'. कांही दिवस गेले. आणि तिघांच्या मूर्तीपैकी तिसऱ्या मूर्तीकाराची मूर्ती सर्वाना आवडली आणि तिची प्राणप्रतिष्ठा त्या मंदिरात करण्यात आली. त्याबद्दल गावाने त्याला मोठे बक्षीसही दिले.
      मित्रहो, आपली काम करत असतानाची भावना तिसऱ्या मूर्तीकाराप्रमाणे असली पाहिजे. आपल्या कामासाठी पगार द्यावयाची काळजी संस्था घेतच असते. त्यासाठी व्यवस्थापक मंडळ आणि संचालक मंडळ सक्षम असते. आपण त्या गोष्टीचा विचार न करता ही संस्था, संस्थेचा लौकिक वाढवण्यासाठी आपली नियुक्ती झाली आहे, हे कदापि विसरता कामा नये. आपले काम सर्वोतम असले पाहिजे आणि त्यासाठी आपण अंत:करणापासून या कार्यात लक्ष दिले पाहिजे. संस्थेमध्ये आपले काम सर्वोत्कृष्ट ठरेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जसे हे तीन मूर्तीकार काय करतात, ते परस्परांना दिसत होते. आपले काम कोणी झाकून, लपवून करत नव्हते. तसा पारदर्शकपणा आपल्या कार्यात असला पाहिजे. पारदर्शकता ही प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामात ठेवून सर्वोत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही सर्वोत्कृष्ट बनण्याची निकोप आणि निरोगी स्पर्धा संस्थेतील वातावरण चांगले ठेवते. तिथे 'हेल्दी वर्क कल्चर' निर्माण होते आणि त्यातून संस्था नावारूपाला येतात. चांगले वातावरण ठेवण्यामध्ये संस्थेच्या अधिकाऱ्याइतकेच कर्मचाऱ्यांचे आपसात असणारे संबंधही महत्त्वाचे असतात. आपसातील संबंध जितके खुले आणि मोकळे तितकी त्या संस्थेची भरभराट होत असते. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब असते, ती म्हणजे आपण स्वत:शी प्रामाणिक राहायला शिकले पाहिजे. कोण काय म्हणते? यापेक्षा आपल्या अंत:करणाला माहित पाहिजे की आपण 'कोणतेही चुकीचे काम करत नाही की ज्यामुळे आपण स्वत:ला दोषी धरावे'.  विद्यापीठातच घडलेला एक छान किस्सा इथं सांगावासा वाटतो.
      विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना बढत्या देण्यासाठी एक समिती असते. समितीत चार-पाच वरिष्ठ अधिकारी असतात. या समितीसमोर जे कर्मचारी पदोन्न्तीस पात्र असतात, त्यांची यादी ठेवली जाते. समितीच्या बैठकीत सर्व कागदपत्रांची, गोपनीय अहवालांची, वैयक्तिक नस्तीची पडताळणी करून शिफारशी केल्या जातात आणि नंतर प्रशासकीय आदेश काढले जातात. अशीच एकदा पदोन्नती समितीची बैठक झाली. बैठकीनंतर समिती सदस्यापैकी एकजण काही कामानिमित्त विद्यापीठातील पतसंस्थेत गेले होते. ते अधिकारी त्यांच्या हुशारीमूळे सर्वत्र चर्चेत असत. विद्यापीठात काहीही घडले तर त्याच्या पाठीमागे त्या अधिकाऱ्याचा हात आहे, असे म्हटले जायचे; प्रत्यक्षात त्या अधिकाऱ्याला त्या घटनेबद्दल काही माहित नसले तरी. हे अधिकारी विद्यापीठातच शिकले होते. इथेच नोकरीला लागलेले. त्यामुळे १०-२० वर्षे नोकरी झालेल्या लोकांनी त्यांना विद्यार्थी दशेपासून पाहिलेले होते. पतसंस्थेत त्यांच्या विद्यार्थीदशेपासून परिचित असलेला एक कनिष्ठ अधिकारी भेटला. एरवी अनेक वेळा ते दोघे एकत्र असत. मात्र त्या दिवशी या दुसऱ्या अधिकाऱ्याला पदोन्नती देण्याचा निर्णय झाला होता. नेहमीप्रमाणे चहा घेण्याबाबत चर्चा झाली. दोघेजण कँटीनला गेले. त्याठिकाणी आम्ही अगोदरच बसलेलो होतो, त्यामुळे या घटनेचा साक्षीदार होता आले.
      कँटीनमध्ये नेहमीच्या पद्धतीने कनिष्ठ अधिकारी काउंटरकडे जाऊ लागला. वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला थांबवले. स्वत: कुपन घेतले आणि चहा घेतला. यावर कनिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना विचारले 'सर, असे का? चहाला तर मी जाऊ या, म्हटले होते. बिल मी द्यायला पाहिजे होते.' त्यावेळेस त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जे सांगितले ते लाखमोलाचे आहे. ते म्हणाले, 'तुमचा आज प्रमोशनसाठी विषय होता. ती बैठक झाली आहे. आपण दोघे इथे चहाला आलो आहोत, याची चर्चा तर होणारच. बढतीच्या बैठकीनंतर आपण दोघे चहाला गेलो म्हणून. याठिकाणी तुम्ही बिल दिले काय आणि मी दिले काय? रक्कम ती किती? मात्र मी आज तुमच्या विषयानंतर तुमच्याकडून चहा घेतला, ही चर्चा करणाऱ्या लोकापेक्षा आजचा चहा मी तुमच्याकडून घेतला नाही, तर तो मी तुम्हाला दिला आहे, याची माझ्या मनाला खात्री हवी होती. आता मी निर्धास्त आहे. कोणी काहीही बोलू देत. माझ्या मनाला खात्री आहे, मी तुमच्याकडून संभाव्य चर्चेतला लाभ घेतला नाही. ही खात्री आपल्या मनाची असेल तर जग काय म्हणते याची काळजी कशाला?'  आज या प्रसंगाबाबत प्रशासनाचा एवढी वर्षे अनुभव घेतल्यानंतर मला त्या अधिकाऱ्याचे वागणे अनेक कारणानी खूप महत्त्वाचे वाटते.
      त्यातील पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे त्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने माणूस म्हणून पूर्वीपासून असलेले संबंध जपले. त्या दुसऱ्या अधिकाऱ्याबरोबर चहाला जायला नकार दिला नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पदोन्नती समितीची बैठक आणि त्यामधील विषयपत्रिका ही सर्वांना माहित असते. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्याला त्याची पदोन्नती झाली की नाही, हे कुठेही सांगितले नाही. त्यामुळे त्यांनी कोणतीही गोपनीय माहिती सांगितली नाही. जग काय म्हणते यापेक्षा आपल्या अंतर्मनाचा आवाज त्या अधिकाऱ्याला महत्त्वाचा वाटत होता आणि त्याप्रमाणे त्या अधिकाऱ्याचे वर्तन होते. हा आवाज ऐकायला आपण सुरूवात केली पाहिजे. आपली कृती नियमबाह्य नाही, मानवता सोडून नाही, नैतिकता सोडून नाही आणि याची साक्ष कोण परकी व्यक्ती नाही, तर आपले अंतर्मन देते, यापेक्षा कोणतेही मोठे प्रमाणपत्र नाही.
      सर्वांची कार्यतत्परता, कौशल्य, संभाषण चातुर्य हे सारखे असते, असे नाही. प्रत्येकाची जमा मानके आणि वजा मानके असतात. प्रत्येकाकडे काही चांगले गुण आणि कौशल्ये असतात तसेच एखाद्या गोष्टीची कमतरता सुद्धा असते. अशा सर्वांना बरोबर घेऊन कार्यालयीन कामकाज करावयाचे असते. या सर्वांना एकसंघ ठेवण्याचे कसब अधिकाऱ्यांच्या अंगी असावे लागते. अधिकाऱ्यांनी निष्पक्ष राहणे आणि सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक देणे हे त्याचे कर्तव्य असते. अधिकारी पक्षपाती वागू लागला तर त्या कार्यालयाचे मोठे नुकसान होते. अधिकाऱ्याने टीमवर्क व्हावे, यासाठीची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. सर्व कर्मचारी सारख्या क्षमतेचे नसतात. प्रत्येकाच्या क्षमता ओळखून जबाबदारी सोपवली की अनेक गोष्टी सोप्या होतात. कर्मचाऱ्यांनीदेखील हे लक्षात घेतले पाहिजे की कोणतेही काम हलके किंवा मोठे नसते. कोणतीही जबाबदारी ही संस्थेचे काम असते आणि कामासाठी आपली नियुक्ती झालेली असते. संघकार्य उत्तम तर शाखेचे काम उत्तम आणि प्रत्येक शाखा अशी काम करू लागली, तर संस्था मोठी होण्यास वेळ लागत नाही.
      शेवटी मला इलेनोर रूझव्हेल्ट यांचे एक वाक्य सांगावेसे वाटते. हे वाक्य अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहे. याठिकाणी मी कोणाला विचारणार नाही की, तुम्ही यातील काय करता? कसे वागता? प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे, आपले वर्तन कसे आहे. रूझव्हेल्ट यांचे ते सुभाषित असे आहे, 'Great minds discuss ideas, average minds discuss events and small minds discuss peoples.' म्हणजे काय? तर, लहान मनाची माणसे ही लोकांबद्दल चर्चा करतात, खरेच आहे. अनेक लोक आपले काम सोडून कोण कसा चुकला, याचंच मूल्यमापन करत असतात. त्याना सांगावंस वाटतं, 'पहिलं तू काम करायला शिक. म्हणजे तो कसा चुकला, ते कळेल'. सर्वसाधारण मनाची माणसे ही घटनांबद्‌दल चर्चा करतात. एखादी घटना कशी घडली, कार्यक्रम आणखी चांगला कसा करता आला असता; कार्यक्रमात काय चांगले होते, काय चांगले नव्हते, वगैरे. मात्र त्यांचा सूर निव्वळ दुसऱ्याची मापे काढण्याचा नसतो. तर मोठ्या मनाची माणसे भविष्याचा वेध घ्यायचा प्रयत्न करत असतात. ती कल्पना मांडतात, त्यावर चर्चा करतात.
      आपण यापैकी कोठे बसतो. आपण लोकांबद्दल चर्चा करत असतो का? उत्तर जर, 'हो' असेल तर, आपण कोत्या मनाचे आहात का? आपले मन विशाल नाही का? आपले मन लहान आहे का? असे प्रश्न विचारून कोणाला कमी लेखण्यासाठी किंवा उघडे पाडण्यासाठी मी येथे आलेलो नाही. या प्रश्नाच्या उत्तराची खात्री ज्याची त्याने करावी. आपणच आपले चांगले परीक्षण करू शकतो. आपणच स्वत:ला चांगले ओळखत असतो. आपल्यातल्या उणिवा आणि बलस्थाने ही आपल्याला माहित असतात. ती मी तुम्हाला विचारणार नाही. मात्र एक विनंती आहे ती अशी की, आज जर आपण लोकांबद्दल चर्चा करत असू, तर ती थांबवू या आणि आपण घटना, कार्यक्रम कसा झाला आणि तो आणखी कसा चांगला करता आला असता, याबाबत चर्चा करायला सुरूवात करू या. आज आपण जर कार्यक्रमाबद्दल चर्चा करत असू तर आपण भविष्यातील कल्पना मांडायला आणि त्यावर चर्चा करायला सुरूवात करू या. जे आज नव्या कल्पना मांडतात आणि अंमलात आणायचा प्रयत्न करतात, त्यांच्या कार्यावरच संस्थेचा विकास आणि वाढ होत असते. आपण अशा लोकांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा प्रयत्न करू या. निश्चितपणे आपल्या या प्रयत्नातून संस्थेला मोठी उर्जा प्राप्त होईल आणि संस्थेची प्रगती होत राहील. यात फूल नाही, फुलाची पाकळी आपली राहील, यादृष्टीने प्रत्येक कर्मचारी कार्यरत राहील, अशी आशा बाळगतो.
      आज संस्था दोन राज्यांत पोहोचली आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून ती लवकरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, सर्व राज्यांत संस्थेच्या शाखा स्थापन व्हाव्यात, यासाठी माझ्या संस्थेस मन:पूर्वक  शुभेच्छा!
___0___

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

तत्सवितुर्वरेण्यं


(शेतीप्रगती मासिकाचा दिवाळी अंक २०१५ अपारंपरिक ऊर्जा या विषयावर होता. त्या अंकामध्ये आपरंपरिक ऊर्जा आणि कृषी या विषयावर माझा लेख प्रसिद्ध झाला. तो माझा लेख शेती प्रगती मासिकाच्या सौजन्याने येथे आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)

------------------------------------------------------------------------


‘‘ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्यः धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ‘‘



गायत्री मंत्र हिंदू संस्कृतीमधील सर्वोत्तम मंत्र मानला जातो. आज जगातील अनेक देशात या मंत्रावर संशोधन सुरू आहे. मात्र भारतात तयार झालेला, लिहिलेला हा मंत्र उर्जा अभ्यासावर आधारीत असावा किंवा आहे असे म्हटले तर वावगं ठरू नये. हा मंत्र सुर्यदेवतेची उपासना करण्यासाठीचा मंत्र मानला जातो. सुर्य हे प्रत्यक्ष दिसणारे प्रकाश उर्जेचे रूप आहे आणि अनंत काळापर्यंत यापासून आपणास उर्जा प्राप्त होणार आहे. या मंत्राचा अर्थ हा अशा उर्जा स्त्रोताकडे निर्देश करतो की तो स्वयंभू आहे आणि ज्याच्यामुळे आपले जीवन आहे. ‘‘हे ईश्वरा, तुझ्यामुळे आमचे जीवन आहे, तूच आमचे दुःख आणि वेदना नष्ट करतोस, तूच आम्हाला सुख आणि शांती प्रदान करतोस. आम्हाला शक्ती दे, की आम्हाला उज्वल शक्ती मिळेल आणि कृपया आमच्या बुध्दीला योग्य मार्ग दाखव‘‘

                अन्य अर्थ बाजूला ठेवले तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, आज भूतलावर वापरली जाणारी बहुतांश उर्जा ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सुर्यापासून प्राप्त होते. उर्जा म्हणजेच कार्य करण्यासाठी प्राप्त शक्ती होय. एखादी वस्तू किंवा व्यक्ती किती कार्य करू शकते हे उर्जेवर अवलंबून आहे. उर्जा साधनांची पारंपारिक आणि अपारंपारिक अशी दोन गटात मुख्यतः विभागणी होते. पारंपारिक उर्जा साधनांमध्ये खनिज तेल, कोळसा आणि नैसर्गिक उर्जा साधनांमध्ये सुर्यप्रकाश, पवनउर्जा, जल उर्जा, भूऔष्मिक उर्जा, बायोमास, जैवइंधन, समुद्रलाटांपासून मिळणारी उर्जा किंवा टायडल एनर्जी इत्यादींचा समावेश होतो. या सर्व उर्जा साधनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबध सौर उर्जेशी आहे.
                पृथ्वीवर वापरली जाणारी बहुतांश उर्जा सुर्यापासून मिळते. सुर्यापासून मिळणा-या उर्जेमुळे हवा तापते आणि वारे वाहू लागते म्हणून आपणास पवनचक्की पासून पवन उर्जा मिळवता येवू शकते सुर्यामुळेच भरती, ओहोटी येते आणि लाटा निर्माण होवून आपणास टायडल उर्जा मिळते. सुर्यामुळे पाण्याची वाफ होवून ढग तयार होतात, पाउस पडतो, जलाशय भरतात. धबधबे वाहतात आणि आपण जलविद्युत निर्माण करू शकतो. वनस्पती सुर्यप्रकाशाचा वापर करून प्रकाषसंश्लेषण प्रक्रियाव्दारा अन्न निर्माण करतात. त्यातून आपणास आवश्यक असणारी कर्बोदके, प्रथिने, मेद, स्निग्ध पदार्थ, अल्कोहोल निर्मिती मिळू शकते. मानव आणि प्राणी वनस्पती खातात, या शाकाहारी प्राण्यांना इतर मांसाहारी प्राणी खातात आणि आपली उर्जेची गरज भागवतात. वनस्पती आणि प्राणी गाडले गेल्यानंतर अनेक वर्षानंतर त्यांचे कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायुत रूपांतर होते. एकूणच सुर्य हा उर्जेचे मुख्य साधन आहे.
सुर्यापासून पृथ्वीवर येणारी उर्जा ही १.८ X १०११ मेगावॅट इतकी आहे. आज ही उर्जा पृथ्वीवर वापरल्या जाणा-या उर्जेच्या वीस हजार पट जास्त आहे़. भारतात सरासरी प्रतिदिन १८०० ज्यूल्स प्रती चौरस सेमी एवढी उर्जा उपलब्ध आहे. तरीही मागील काही वर्षापासून विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने आणि तो पुरेसा होत नसल्याने कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात प्रत्यक्ष उर्जा मिळवण्यासाठी होणारी वृक्ष तोड आणि नव्याने निर्माण होणारी सिमेंटची जंगले याचा थेट परिणाम निसर्गचक्रावर होत असल्याने जिरायती शेतीदेखील धोक्यात येत आहे.
कृषी क्षेत्राला किफायती बनविण्यासाठी पूरक जोडधंदे आणि अपारंपरिक उर्जा संसाधनांचा परिणामकारक वापर अत्यंत आवश्यक बनत आहे. कांही वर्षापूर्वी आलेल्या ‘‘फॉरेनची पाटलीण‘‘ या चित्रपटातील विदेशी सून या प्रश्नावर पवनचक्कीच्या सहाय्याने उत्तर शोधते असे दाखवले होते. ती फॉरेनच्या पाटलीणीची कृती देशी पाटलीण बाईंनी स्विकारायची व त्याचे अनुकरण करायची गरज निर्माण झाली आहे. अपारंपरिक उर्जा साधनाचा कृषी क्षेत्रासाठी वापर सुरू झाला तर कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक अडचणी टळू शकतात. अर्थात यातील अनेक साधने खर्चिक असल्याने कमी क्षेत्रधारक शेतक-यांना अवलंबणे शक्य दिसत नाही. मात्र सधन शेतक-यांनी सरकारी विद्युत पुरवठयावरचा आपला भार कमी केला आणि अपारंपरिक साधने वापरण्याचा प्रभावी प्रयत्न केला तर निश्चित एक नवी दिशा मिळू शकते. या सर्व अपारंपरिक उर्जा साधनांचा वापर प्रभावीपणे केला तरच पुढील काळात प्रगती होवू शकते.
पवन उर्जा :-
पवन उर्जा फार पूर्वीपासून वापरली जात होती. पवन उर्जेचा वापर करून पूर्वी गलबते एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पाठवली जात असत. भारताची पवन उर्जेची क्षमता ४८५०० मेगावॅट इतकी मानली जाते. तांत्रिकदृष्टयाया ही क्षमता १४७७५ मेगावॅट इतकी गृहीत धरली जाते, कारण काही ठिकाणी पवनचक्या उभी करणे हे शक्य होत नाही. उपकरणांची कार्यक्षमतेच्या आधारेही तांत्रिक क्षमता कमी होते. महाराष्ट्रामध्ये ३०६० मेगावॅट इतकी पवनउर्जा उपलब्ध होवू शकते. सहयाद्री आणि बालाघाटातील काही डोंगररागांवर उच्च शक्तीच्या पवनचक्क्या फिरताना दिसतात. पवनचक्क्यांचा वापर केवळ विद्युतनिर्मितीसाठी नाही. फार पूर्वीपासून धान्याची उफणणी करण्यासाठी आपण पवन उर्जाचे वापरत होतो. मानवी श्रम कमी करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी आपण मळणी यंत्राचा वापर करून पवनउर्जेचा वापर बंद केला इतकेच. मात्र आज आपण पवनचक्कीचा उपयोग करून धान्य मळणी, पाणी उपसणे ही कामे करू शकतो. यासाठी फार मोठया पवनचक्क्या बसवण्याचीही गरज नाही. भारतात तांत्रिक क्षमतेच्या केवळ दहा टक्केचं म्हणजे १४२६ मेगावॅट क्षमतेचे पवनउर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यासाठी शासनाकडून विविध सवलती देण्यात येतात. गावातील डोंगरमाथ्यावर असा प्रकल्प उभारून विद्युत निर्मिती केल्यास निर्माण झालेली जास्त वीज शासन विकत घेते.
कोल्हापूर जिल्हयातील बाळूमामा देवस्थानने असा प्रयत्न केला असून त्यांचा प्रकल्प सौर आणि पवन उर्जेचा संयुक्त प्रकारचा प्रकल्प आहे. त्यांच्या आजच्या गरजेपेक्षा जास्त विद्युत निर्मिती होते आणि ती विद्युत हे देवस्थान शासनास पुरवते. भारतापेक्षा छोटया असणा-या जर्मनीत ही पवन उर्जा ८१०० मेगावॅट इतकी विद्युत उर्जेत रूपांतरीत होते. भारतात पवन उर्जा स्थानकात तामिळनाडू राज्याने आघाडी घेतली असून तेथे ३९ केंद्रे आहेत तर महाराष्ट्रात २६ केंद्रात पवन उर्जेचे विद्युत उर्जेत रूपांतर होते.
बायोमास :-

पृथ्वीवरील सर्व देशात बायोमासचा उर्जा उपलब्धतेसाठी वापर करणा-या देशामध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो आणि भारताची या क्षेत्रात वैश्विक नेतृत्वकरण्याची क्षमता आहे. बायोमास या व्याख्येत मनुष्य आणि प्राण्यांच्या नैसर्गिक विधीतून बाहेर पडणा-या कार्बनयुक्त कच-याचाही समावेश होतो. त्याचप्रमाणे भाज्या, वनस्पती या पासून वाया जाणारे भाग यांचा समावेश होतो. भारतात प्रतिवर्ष ५४० दश लक्ष टन इतका भाज्या आणि पिकापासून उर्वरित भाग यांचा कचरा उपलब्ध आहे. आज उस काढल्यावर पाचट जाळून रान भाजण्याच्या कृतीतून आपण प्रदुषणात भर घालत असतो. मात्र याचा वापर बायोगॅस निर्मितीसाठी केला तर प्रदुषणात किंचितही भर पडत नाही. २५ किलो जनावराचे ताजे शेण घेतले आणि त्याच्या गोव-या केल्या तर त्यापासून ५ किलो गोव-या मिळतात आणि त्यापासून १०४६ किलो कॅलरी इतकी उपयुक्त उर्जा मिळते तर शिल्लक राहणारी राख तशी शेतीसाठी काहीच उपयोगाची नाही मात्र हेच २५ किलो ताजे शेण बायोमास गॅसिफायर मध्ये घातल्यास त्यापासून २५९२ किलो कॅलरी इतकी उपयुक्त उर्जा मिळते आणि शिल्लक १० किलो वाळलेला उर्वरित भाग शेतीला खत म्हणून वापरता येतो.
बायोगॅस हा पर्यावरण पूरक आणि आधिक कार्यक्षम आहे, यामध्ये अॅनअॅरोबिक फर्मेटेशन प्रक्रियेने निर्माण होणारा ज्वलनशील वायू हा ६० टक्के मिथेनयुक्त असणारा असतो. त्याच्या ज्वलनातून मिळणा-या उर्जेवर स्वयंपाकासह विविध उर्जेच्या गरजा भागवल्या जातात आणि जो लवकरच संपणार आहे त्या नैसर्गिक वायूवरील ताण कमी होतो. या प्रकारच्या कृषी उत्पादनातून  वाया जाणा-या भागांचा वापर करून १६००० मेगावॅट उर्जा निर्मितीची भारतामध्ये क्षमता आहे. या व्यतिरिक्त सर्व साखर कारखान्यांनी या प्रकारची यंत्रणा विकसित केल्यास अधिकची ५५० मेगावॅट उर्जा निर्मिती होवून शेतक-याला आणखी चांगला दर देता येवू शकेल आणि राष्ट्राची उर्जा निर्मितीची गरज अंशतः भागू शकेल.
जैवइंधन:-
                भारत सरकारने नुकतेच पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल घालण्यास परवानगी दिली आहे
. विविध वनस्पतीपासून जैवइंधन मिळवण्याचे प्रयत्न अनेक वर्षापासून सुरू आहेत, मात्र सरकारच्या या परवानगीमुळे भारतात दरवर्शी ३.६ अब्ज लिटर इतक्या इथेनॉलची गरज निर्माण झाली आहे. आजमितीला इथेनॉल प्रकल्प मुख्यत्वे साखर कारखान्यांनी उभारलेले आहेत. तरीही सर्वच साखर कारखाने इथेनॉल निर्मितीकडे पुरेसे लक्ष देताना दिसून येत नाहीत. वाढत्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी इथेनॉल निर्मिती जो आजचा यशस्वी प्रयोग आहे यामध्ये साखर उद्योगाने आणखी गुंतवणूक करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बायोमास ब्रिक्वेटींग :-
बायोमास ब्रिक्वेटींग तंत्रज्ञान हे अत्यंत उपयुक्त आणि कृषी क्षेत्राला पुरक असणारे तंत्र आहे. यामध्ये प्रामुख्याने वनस्पतीपासून मिळणारा कचरा जैविक कचरा याचे अधिक घनता असणारे ठोकळे तयार केले जातात. मुंबई महानगर पालिकेसमोर बागांतील कचरा आणि झाडांच्या छाटणीनंतरच्या फांदयांचा कच-याची विल्हेवाट लावण्याचे फार मोठे आव्हान होते. मुंबई विद्यापीठातील कांही शिक्षकांच्या पुढाकाराने घाटकोपर येथे या स्वरूपाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. लाकूड, गवत, पाला पाचोळा या सर्वांचा वापर करून येथे विविध आकाराच्या ठोकळयात रूपांतर केले जाते. हे ठोकळे विविध कंपन्यांची इंधनाची गरज भागवण्यास उपयुक्त ठरतात. ज्या ठिकाणी उष्मा निर्मितीसाठी दगडी कोळसा वापरला जातो. तेथे या ब्रिक्वेटस वापरल्या जातात. या प्रकारे ब्रिक्वेट निर्मितीला कचरा गोळा करण्यासह अंदाजे ४.५० रूपये प्रतिकिलो इतका खर्च येतो, तर या ब्रिक्वेटची विक्री रूपये ५.५० प्रती किलो दराने होते. यातून होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे शहरातील उभा होणारा कच-याचा डोंगर आपेाआपच घटतो. दगडी कोळशावरचा ताण कमी होतो. यामुळे उष्मा तर अधिक मिळतेच पण तयार होणारी राख ही तुलनेने कमी असते. या राखेत गंधक, फॉस्फरस यांचे प्रमाण नसते. तसेच पण जळतानाही या मुलद्रव्यानीयुक्त हवा तयार होत नाही. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण उपकरणाची गरज भासत नाही. या प्रकारच्या ब्रिक्वेट हाताळणे, एका जागेवरून दुस-या जागेवर नेणे सोपे जाते. त्यांचा आकार एक समान असल्याने साठा सहज करता येतो.
गावोगावी अशा प्रकारचे प्रकल्प उभारल्यास जनावरचे खाद्य नसलेले पिकाचे अवशेष, लाकूड यापासून असे प्रकल्प उभारून आधिक उर्जा देणा-या ब्रिक्वेटसचा उद्योग पुरक उद्योग म्हणून फायद्याचा ठरतो. यामुळे जळावू लाकडासाठी होणारी वृक्षतोड ही कमी होते. जळावू लाकडापासून होणारे प्रदुषण कमी होते आणि आधिक उर्जा उपलब्ध होते.
तरंग उर्जा किंवा टायडल एनर्जी :-
                भारताला जवळ जवळ पाच हजार किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्रात येणा-या लाटा हा उर्जेचा अपारंपारिक उर्जेचा महत्वाचा स्त्रोत आहे. अर्थातच या लाटांच निर्मितीला भरती-
ओहोटी आणि त्यासाठी अप्रत्यक्षरित्या सुर्यचं जबाबदार आहे. समुद्रकिना-याची लांबी १२०० किलोमीटर आणि लाटांची उंची २ मिटर असेल तर त्यापासून आपणास ८४ मेगावॅट इतकी उर्जा मिळू शकते. मात्र अशा प्रकारचे प्रकल्प सर्वत्र तयार करणे शक्य नसल्याने लाटातील उर्जा पूर्ण क्षमतेने विद्युत उर्जेत रूपांतरीत करता येणे शक्य नाही. याचा कृषी क्षेत्राला थेट लाभ पोहचत नसला तरी अशा प्रकारची उर्जा निर्मिती लोड शेडींग कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते. याप्रकारची उर्जा विद्युत उर्जेत रूपांतरीत करण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना करून लाटेच्या सहायाने विद्युत निर्मिती करणारी टर्बाईन फिरवली जातात. पाण्याचा निचरा होण्यासाठी वेगळा मार्ग काढला जातो आणि फिरणारे जनित्र विद्युत निर्माण करते. लाटातील यांत्रिक उर्जा विद्युत उर्जेत रूपांतरित होते. ही विद्युत एकाच वारंवारितेची नसते त्यामुळे प्रथम त्या विद्युत उर्जेचे रूपांतर एकादिष्ट विद्युतमध्ये आणि नंतर इनव्हर्टरच्या सहायाने वापरण्यायोग्य ५० हर्टझ वारंवारितेच्या बदलत्या विद्युतमध्ये करून ग्रीडच्या माध्यमातून पुढे वापरासाठी पाठवली जाते. या सर्व प्रक्रियेत लाटातील प्रत्यक्ष उर्जेच्या ५० ते ५५ टक्के उर्जा वापरात येते. मात्र हा विद्युतनिर्मितीचा स्त्रोत पुर्णतः प्रदुषणमुक्त असल्याने पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. भारतात अशा प्रकारचे दोन विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कच्छ मध्ये आणि गल्फ ऑफ कॅंबे येथे हे दोन प्रकल्प कार्यरत आहेत. फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि इंग्लंडमध्येही अशा प्रकारे विद्युत निर्मिती करण्यात येते.
भूऔष्मिक उर्जा :-
                आपणास ज्ञात आहे की, पृथ्वीच्या गर्भात लाव्हा रस आहे. त्याचे तापमान जास्त आहे.
पाण्याची वाफ १०० डिग्री सेल्सियस तापमानाला होते. भूगर्भात असणा-या या उर्जेचा वापर विद्युत निर्मिती करण्याची कल्पना प्रथम इटालियन शास्त्रज्ञांनी शोधून काढली. इटलीमध्ये प्रथम ३८० मेगावॅट क्षमतेचे भूऔष्मिक विद्युत केंद्र लार्डेर्लो येथे सुरू करण्यात आले. मात्र आज न्यूझीलंडची ४० टक्के उर्जेची गरज भूऔष्मिक उर्जेच्या माध्यमातून भागवली जाते.
                पृथ्वीचे घन आवरण सरासरी ३२ किलोमीटरचे आहे. प्रती ३५ ते ४० मिटर अंतरावर पृथ्वीचे तापमान एक डिग्री सेल्सियसने वाढत जाते. तीन ते चार किलोमिटर खोलीवर पाणी उकळू लागते आणि १५ किलोमिटर खोल गेल्यास तापमान १००० ते १२०० डिग्री सेल्सियस इतके भरते. पण एवढया खोलीवर गेल्यास आणि तेथील भूकवच सक्षम नसल्यास तेथून लाव्हारस बाहेर येण्याची शक्यता असते.
                त्यामुळे भूस्तराचा अभ्यास करून सुरक्षित ठिकाणी पृथ्वीवरून भूगर्भाकडे जाण्यासाठी सुरक्षित छिद्र पाडली जातात. त्यातून जाणा-या आणि असणा-या पाण्याची वाफ तयार होते. ही वाफ वेगाने भूपृष्ठाकडे येते. ती एकत्रितपणे जनित्राकडे पाठवून टर्बाईन्स फिरवली जातात आणि विद्युत निर्मिती होते. जलविद्युत प्रकल्पाप्रमाणेच या प्रकल्पांनाही फारशी देखभाल लागत नाही. कारण आता आधुनिक साहित्याची, गंजरोधक साहित्याची उपलब्धता आहे. मात्र या यंत्रांना सावकाश सुरू करावे लागते आणि बंद करतानाही पुरेसा अवधी देणे आवश्यक आहे. अन्यथा टर्बाईनला धोका उद्भवू शकतो. वाफेबरोबर पाणीही येत नाही ना याचीही काळजी घ्यावी लागते. विहीरीच्या तळाशी १८० डिग्री सेल्सियस तापमान असणे आवश्यक आहे. हे तापमान तीन किलोमीटर अंतराच्या आत उपलब्ध असल्यासच असे ठिकाण सुरक्षित मानले जाते. साधरणपणे १२ इंची बोअरमधून प्रती तास १० टन वाफ तयार होणे ही या प्रकल्पाची गरज असते.
                भारतात लडाख येथे अशा प्रकारचा भूऔष्मिक उर्जेचा प्रकल्प कार्यान्वित आहे. या प्रकारच्या विद्युतनिर्मितीचा वाटा एकूण उर्जेच्या गरजेमध्ये अत्यल्प असला तरी स्थानिक विकासाच्या दृष्टिने या प्रकल्पाचे योगदान फार मोठे आहे. या क्षेत्रामध्ये आणखी तांत्रिक प्रगती होण्याची गरज आहे.
जल उर्जा :-
                जल उर्जा ही सुध्दा अपारंपरिक उर्जेचे रूप आहे. ज्याकाळी बदलती विद्युत (अल्टरनेटींग करंट) वापरातच नव्हता, त्याकाळी निकोला टेस्ला या संशोधकाला त्याच्या बालपणी आपण एका
धबधब्यावर यंत्र जोडत आहोत आणि हे यंत्र जोडून पुर्ण होताच सर्वत्र प्रकाश पडला आहे, अशा प्रकारचे स्वप्न पडायचे. पुढे याच टेस्ला यांनी नायगारा धबधब्यावर जलविद्युत प्रकल्प उभारून ते बालस्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यापूर्वीही जल शक्तीची माहिती लोकांना होती. लाकडी ओंडके वाहून नेण्यासाठी आजही अनेक नदीपात्रांचा वापर केला जातो. नायगारा धबधब्यावर पाते फिरवून त्याचा वापर लाकूड कापण्यासाठी केला जात असे. त्यामुळे जल शक्ती मानवाच्या उर्जेच्या आकलनाबरोबरच वापरात आलेली गोष्ट आहे. कालानुरूप त्या शक्तीचा वापर करण्याचे प्रकार बदलत गेले.
                जल शक्ती हा उर्जेचा सर्वात मोठा अपारंपरिक उर्जा स्त्रोत आहे. पुन्हा पुन्हा उपलब्ध होणारी उर्जा स्त्रोत या व्याख्येत जल शक्तीचाही समावेश होतो. ५०,००० मेगावॅट इतकी उर्जा जल शक्तीपासून उपलब्ध होवू शकते. सध्या ३३,००० मेगावॅट उर्जा या प्रकल्पापासून सध्या उपलब्ध होते. भारतातील ही उर्जा अत्यंत महत्वपूर्ण तर आहेच पण या जल शक्तीच्या माध्यमातून प्रामुख्याने ईशान्य-पुर्व भारतातील राज्यांचा चांगला विकास होवू शकतो. जम्मू काश्मिर, सिक्कीम, हिमाचल प्रदेश या राज्यांची जल विद्युत निर्मितीची मोठी क्षमता आहे. १४,२९२ मेगावॅट क्षमतेच्या आणखी ५,४१५ ठिकाणी जल विद्युत केंद्राची उभारणी होवू शकते.
                जल विद्युत प्रकल्पांच्या उभारणीसाठी तुलनेने जास्त खर्च लागतो. केंद्र सरकारने अशा प्रकारचे प्रकल्प उभारणीसाठी अनुदान आणि आर्थिक सहाय्य देवू केले आहे. या जल शक्तीचा वापर करण्यासाठी प्रथम तलाव बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक भूसंपादन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. या प्रकल्पांच्या उभारणीमध्ये भूसंपादन, लोकांचे स्थलांतरण आणि पुनर्वसन हे प्रमुख अडथळे असल्याने आपण आजही जल शक्तीचा पुर्ण क्षमतेने वापर करूनही जल विद्युत मिळवू शकत नाही.
                खरेतर जल विद्युत प्रकल्पामुळेच औद्योगिकरण शक्य झाले आहे. ज्या ज्या ठिकाणी उंचावरून पाणी पडते त्या त्या ठिकाणी जल विद्युत प्रकल्प उभारणे शक्य आहे. तलावात पाणी साठवून ते उंचावरून खाली सोडले जाते. पाण्यातील गतिज उर्जेने टर्बाइनची पाती फिरवली जातात. त्याच्या सहायाने जनित्र फिरते आणि विद्युत निर्मिती होते. १०० किलोवॅट किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे प्रकल्प उभारणे किफायतशीर ठरते. जलविद्युत ही विश्वासार्ह आहे या प्रकारे मिळणा-या विद्युत उर्जेची वारंवारिता निश्चित राहते. ती बदलत नाही़. कोणतेही प्रदुषण निर्माण करत नाही. छोटया प्रकल्पामुळे पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे जंगल नष्ट होण्याची भिती नाही.
                यापेक्षाही छोटया क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प हिमालयातील नद्यांवर उभारणे शक्य आहे. हया प्रकारचे जनित्र अत्यंत छोटे असते मात्र त्याच्या सहाय्याने उर्जेच्या स्थानिक गरजा भागवता येणे शक्य होते. यांना देखभालीसाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही किंवा खर्चही येत नाही. या छोटया प्रकल्पापासून मिळणारी विद्युत स्थानिक शेतीची गरज भागवते. तसेच स्थानिक उद्योगधंद्यांना वीज पुरवते. अशा प्रकल्पांची जास्तीत जास्त उभारणी झाल्यास लोड शेडिंगचा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो.
सौर उर्जा :-
सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे सौर उर्जा हेच सर्व प्रकारच्या उर्जा साधनांचा मुख्य स्त्रोत आहे. भारताच्या दृश्टीने सर्वात महत्वाची बाब म्हणजे भारत विषुववृत्ताच्या जवळ आहे. त्यामुळे भारतात मोठया प्रमाणात सुर्यप्रकाश उपलब्ध असतो. क्षेत्रफळाच्या दृश्टीने भारताचे क्षेत्रफळ जगात सातव्या क्रमांकाचे आहे. भारतात सरासरी प्रतिदिन ४ ते ७ किलोवॅट इतकी उर्जा प्रती चौरस मिटर क्षेत्रफळास उपलब्ध आहे. यामध्ये वर्षात २५० ते ३०० दिवस पुरेसा सुर्य प्रकाश उपलब्ध असेल असे गृहीत धरले आहे. सर्वाधिक सुर्यप्रकाश राजस्थान या राज्यात उपलब्ध असतो, तर सर्वात कमी सुर्य प्रकाश ईशान्य पूर्व राज्यात उपलब्ध असतो. भारतात सौर उर्जेवर सर्वाधिक संशोधन आणि कार्य सुरू आहे. तसेच सौर उर्जेचा मोठया प्रमाणात वापर व्हावा, यासाठी प्रोत्साहन आणि अनुदान सर्वाधिक प्रमाणात दिले जाते. यामध्ये सौर उपकरणांचा विकास, सोलर फोटोव्होल्टाईक पॅनेल्स, सोलर फोटोव्होल्टाईक पॅनेलचे सोलर वॉटर हिटर, सौर चूल, सोलर जलशुध्दीकरण उपकरणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.
                सौर उर्जा मोफत आणि मोठया प्रमाणात उपलब्ध असल्याने तसेच हा उर्जा स्त्रोत अनंत काळापर्यंत उपलब्ध राहणार असल्याने वैज्ञानिक आणि समाजधुरिणांचे या क्षेत्राकडे सर्वाधिक लक्ष आहे. जगाच्या उर्जेच्या गरजेपेक्षा १५,००० पट जास्त उर्जा सुर्यापासून उपलब्ध होते. भारतात उपलब्ध सौर उर्जेचा विचार करता प्रती चौरस किलोमीटर क्षेत्रावर २० मेगावॅट उर्जेचा प्रकल्प उभा राहू शकतो किंवा तेवढी विद्युत उर्जा उपलब्ध होवू शकते. सौर उर्जा ही दोन प्रकारे प्रामुख्याने उपयोगात आणली जावू शकते. एक तर सौर उर्जेचे उष्णतेमध्ये म्हणजे औष्णिक उर्जेत रूपांतर करून किंवा सौर उर्जेचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करून!
             सौर उर्जा खरे तर कृशी क्षेत्रासाठीचे वरदान आहे. सौर उर्जा पृथ्वीवर प्रकाशकणांच्या स्वरूपात येते. शेतातील पिके, भाजीपाला आणि वनस्पतीमध्ये असणारे हरितद्रव्य प्रकाश असताना, प्रकाषसंष्लेशण प्रक्रियेव्दारा अन्न निर्मिती करते. प्रकाशाविना ही प्रक्रीया शक्य नव्हती. या वनस्पतीमध्ये सर्व अन्नघटक तयार होतात. त्यांचे सेवन करून मानव आणि प्राणी जगतात. वनस्पती चांगल्या वाढण्यासाठी उत्तम सुर्यप्रकाशाची गरज असते म्हणूनच सुर्यप्रकाश भरपूर असणा-या भागात
घनदाट जंगले आढळतात. ध्रुव प्रदेशात मात्र घनदाट जंगले दिसून येत नाहीत.
                हा आणि इतर अनेक प्रकारचा फायदा आपण निसर्गचक्रात घेवून सौर उर्जा वापरात आणत आहोत. मात्र तरीही मोठया प्रमाणात सौर उर्जा, अन्य कारणासाठी, प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी आणि इतर रूपात रूपांतरीत करून सौर उर्जा वापरात आणण्यासाठी मानव प्रयत्नशील आहे. यामध्ये कृषी क्षे़त्रातील उपयोगाचाही समावेश आहे.
                सौर उर्जेचे औष्मिक उर्जेत रूपांतर करून अन्न प्रक्रिया, अन्न शिजवणे याबाबींचा समावेश होतो. तर सौर विद्युत निर्मितीव्दारा तयार वीजेचा घरगुती कारणासाठी, पाणी उपसण्यासाठी, विद्युत उपकरणासाठी वापर करण्यात येतो. सौर उर्जेचा वापर पाणी तापविण्यासाठी आज मोठया प्रमाणात होताना दिसतो. सोलर वॉटर हिटरमध्ये मुख्य दोन भाग असतात. सौर उष्मा ग्राहक आणि पाण्याची टाकी. सौर उर्जा शोषून घेणा-या पृष्ठभागावर पाण्याच्या नळया बसवल्या जातात. हा भाग काळया रंगाचा असल्याने आधिक उष्णता शोषली जाते आणि पाणी तापविण्यासाठी ती उपयोगात येते. उष्मा रोधक पदार्थापासून बनवलेलया टाकीत हे गरम पाणी साठवले जाते. सोलर वॉटर हिटरचा मोठया प्रमाणात हॉटेलमधील वापरासाठी उपयोग होतो. त्याचप्रमाणे कृषीपूरक दुग्ध व्यवसायात तुपाच्या निर्मितीसाठी, स्वच्छतेसाठी आणि निर्जंतूकीकरणाची असे गरम पाणी वापरले जाते. वस्त्रोद्योगात कपडयाची स्वच्छता, छपाई, रंगकाम आणि अन्य कारणासाठी सोलर वॉटर हिटरव्दारा उपलब्ध पाणी वापरले जाते. वाईनरी हा उद्योगही आता कृषी पूरक उद्योग बनत आहे. यामध्ये बाटल्या धुण्यासाठी आणि बॉयलर साठी असे पाणी वापरले जाते.
                सौर उर्जेचा अन्न शिजवण्यासाठी आता लक्षात येण्याइतपत वापर सुरू झाला आहे. सोलर कुकर मुळे खनीज इंधन, लाकूड आणि विद्युत उर्जेचा वापर टळतो. तसेच या अन्न प्रक्रिया पध्दतीमध्ये कोणतेही प्रदुषण होत नाही. हे अत्यंत साधे उपकरण आहे. ज्यामध्ये एका काचेने बंद केलेल्या पेटीतील भांडयात अन्न पदार्थ ठेवले जातात. सदरचे अन्न पदार्थ शिजवण्यासाठी जास्त उर्जा मिळावी म्हणून विशिष्ट कोनात एक आरसा बसवलेला असतो. त्यावर पडणारा सुर्यप्रकाश परावर्तित होवून त्या पेटीत जातो. पेटीच्या आत काळा रंग दिलेला असल्याने तो भाग आधिक तापतो आणि अन्न शिजते. बॉक्स टाईप सोलर कुकर ५० सेमी X ५० सेमी आकाराचा आणि २० सेमी उंचीचा असेल तर त्याचे अंदाजे वजन १२ किलो असते. या कुकरमध्ये भात ४५ ते ५० मिनीटात तर भाजी एक ते दीड तास कालावधीत तयार होते.
                अर्ध गोलाकृती पृष्ठभागावरून सौर उर्जा एका बिंदूत केंद्रीत करून अन्न शिजवणारे कुकरही तयार झाले आहेत. त्यांचा वापरही आता होतो आहे. मात्र यामध्ये अन्न करपण्याचा धोका राहतो. अन्न शिजवण्याचा कालावधी मात्र कमी असतो आणि तो किती पृष्ठभागावरील सुर्य प्रकाश गोळा हावून वापरला जतो त्यावर अवलंबून राहतो.
                सौर उर्जेचा धान्याच्या निर्जलीकरणासाठीचा वापर मानवी संस्कृतीच्या उदयापासून होत असावा. आजही धान्य वाळवण्यासाठी उन्हात वाळत घालणेत येते आणि हीचं पध्दती सर्वाधिक प्रिय आहे.  नवीन रचनेच्या सोलर ड्रायरचा कृषी उद्योगात मोठया प्रमाणात वापर सुरू झाला असून कृषी उद्योगामध्ये यामुळे मोठे बदल घडत आहेत. विविध आकारात हे ड्रायर उपलब्ध आहेत. भाज्या फळे, दाळी यांच्यामधून अनावश्यक जल काढून टाकण्यासाठी यांचा वापर होतो. घरगुती ड्रायर हे जीआय शीटस आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने तयार करतात. यात सौर प्रकाशाच्या सहाय्याने हवेचे तापमान वाढते आणि शुष्क करावयाच्या घटकातील पाणी काढून टाकले जाते. घरगुती वापरातील कृषी उत्पादनातील व धान्यातील पाण्याचा अंश काढून टाकण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त उपकरण असून त्याचे घरगुती किंवा डोमेस्टिक सोलर ड्रायर, पोर्टेबल फार्म सोलर ड्रायर, फोर्स्ड सर्क्युलेशन सोलर ड्रायर असे विविध प्रकार आहेत. यांचा द्राक्षापासून मनुका तयार करण्यासाठी होणारा उपयोग सर्वपरिचित आहे. त्याचप्रमाणे रेशमाचे कोशापासून धागे अलग करण्यासाठीही उपयोग सुरू झाला आहे.
                सौर उर्जेचा उपयोग शुध्द पाणी मिळवण्यासाठीही करण्यात येतो. सोलर बेसिन स्टीलच्या सहाय्याने डिस्टील्ड वॉटर मिळवले जाते. या शुध्द पाण्याचा उपयोग दवाखाने, बॅटरीसाठी, वाहन देखभाल प्रयोगशाळा वापर यासाठी होतो.

सौर उर्जेचे विद्युत उर्जेत रूपांतर झाल्यानंतर त्यापासून फ्रिज, सौर कंदील, सौर पथ, दिवे यासाठी वापर होतो. सौर उर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी फोटोव्होल्टाईक पॅनेलचा वापर केला जातो. या पॅनेलची कार्यक्षमता ही केवळ १५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी असते. मात्र पॅनेलना सौर प्रारणांच्या दिशेला वळवून आता ३० टक्के आधिक विद्युतनिर्मिती करण्याचे तंत्र विकसीत झाले आहे. या पॅनेलची निर्मिती सिलीकॉनचा वापर करून करण्यात येते. सिलीकॉनचे सेल तयार करून त्यांना धातूने जोडले जाते. या धातूतून विद्युत धारा वाहते आणि विद्युत निर्मिती होते. ही विद्युत थेट इनव्हर्टर मधून अल्टरनेटींग करंट मध्ये रूपांतरीत करून ग्रीडला पुरविले जाते किंवा ती पुनर्भारित बॅट-यांना जोडून आवश्यकतेनुसार वापरली जाते. सोलर सेलची मुळ किंमत जास्त आहे. तथापि ज्या ठिकाणी तारातून वीज नेता येत नाही अशा ठिकाणी हे तंत्र वरदान ठरले आहे.
      शेतीसाठी पाणी पुरवणारे पंप सौर उर्जेच्या सहायाने चालवता येणे शक्य आहे. त्यामुळे रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्याची गरज राहत नाही. अशा प्रकारच्या पंपाच्या सहायाने विहीरीतून, बोअर वेलमधून, कॅनॉलमधून, तलावामधून पाणी उपसता येते.
      पंजाब एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने २००१ मध्ये पंजाब राज्यात अशा प्रकारचे ५०० पंप कृषी उद्योगासाठी बसवले आहेत. १,८०० वॅट क्षमतेचे फोटो व्होल्टाईक पॅनेल्स बसवून त्याव्दारे दोन अश्वशक्ती क्षमतेचे पंप चालवले जातात. १८ ते २० फुट खोलीवरून हे पंप प्रती दिन १,४०,००० लिटर इतके पाणी उपसतात. पाच ते आठ एकर क्षेत्राला हे पाणी पुरेसे होते. या प्रकारचे प्रयोग महाराष्ट्रातही काही ठिकाणी करण्यात आले आहेत. ज्या शेतक-यांना शक्य आहे त्यांनी सौर उर्जेवर चालणारे असे पंप बसवल्यास शासन पुरवत असलेल्या वीज निर्मिती केंद्राकडील वीजेची मागणी कमी होईल.
आपल्या देशात जास्त कारखाने उभारावेत, जास्त लोकाना रोजगार मिळावा असा प्रयत्न प्रत्येक देशाचे नेतृत्व करत असते. आपले पंतप्रधानही विविध देशातील उद्योगपतीना भारतात उद्योग उभारण्याचे आवाहन करत आहेत. यासाठी मोठया प्रमाणात उर्जा स्त्रोतांची गरज भासते. एखाद्या राष्ट्राची प्रगती ही त्या राष्ट्रातील प्रती वर्ष प्रती माणशी उर्जा वापरावर मोजली जाते. आज प्रगत समजल्या जाणा-या अमरिकेत प्रती माणशी प्रती वर्ष ३०० गीगाज्यूल, ऑस्ट्रेलिया २३४, जपान १६३ तर भारतात २३.७६ गीगाज्यूल उर्जा वापरली जाते. आपणाला प्रगती करावयाची असेल तर उर्जेचा वापर वाढवावा लागेल पण त्याचंसोबत प्रदुषण होणार नाही याची दक्षताही घ्यावी लागेल. अन्यथा पृथ्वीचा विनाश अटळ आहे.
                त्यासाठीचं सुर्य उर्जेचा महास्त्रोत! ज्या सुर्याशिवाय जगणे शक्य नाही, ज्याच्याशिवाय जीवसृष्टीची कल्पनाचं करवत नाही. तोच सुर्य उर्जेचा खरा स्त्रोत आहे. सुर्यापासून मिळणारी प्रत्यक्ष प्रकाशरूपातील उर्जा जशी आहे तशीचं आपण वापरात आणतो, तसेचं ती अप्रत्यक्ष रूपातही  विविध घटकाकडून वापरली जाते. उर्जा साधनांची आजची उपलब्धता ही सुर्यापासून आलेल्या उर्जेत आहे. आज मिळणारी उर्जा त्वरीत वापरात आणणारी तंत्रे स्विकारून या पृथ्वीला, वसुंधरेला वाचवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. प्रदुषणमुक्त अशा अपारंपरिक उर्जा साधनांचा वापर करून हे साध्य होणार आहे आणि यात कृषीक्षेत्राचे योगदान मोठे असणार आहे. त्यासाठी आपणच पुढाकार घेवून प्रारंभ करायला हवा!