गुरुवार, २५ जून, २०२०

प्रसिद्धी पराङमुख संशोधक तारा...

डॉ. आर.व्ही. तथा राजाराम विष्णू भोसले सर. एक थोर खगोलशास्त्रज्ञ. भारतातील पहिला रेडिओ टेलिस्कोप बनवणारा संशोधक. सौरवाताचा वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासणारा संशोधक. आपले कार्य उच्च दर्जाचे असूनही प्रसिद्धीपासून दूर राहणारा, पण मातृभूमी, जन्मभूमीवर मनस्वी प्रेम करणारा सूज्ञ नागरीक. त्यांचे १४ जून २०२० रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.….......
 

--------------------------------------------------------------------------------------------

त्यावेळी एम.एस्सी.त होतो. १९९च्या फेब्रुवारीत, पुढील वर्षापासून विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात स्पेस सायन्स म्हणजेच अवकाश विज्ञान हा नवीन उपशाखा अभ्यासक्रम सुरू होत असल्याची चर्चा सुरू झाली. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असणारे प्रा. डॉ. आर.व्ही. भोसले सरांचे विभागात येणे सुरू झाले. उंचीने कमी, प्रसन्न चेहरा. चेहऱ्यावर कायम विलसणारे स्मि आणि सेवानिवृत्त झाले हे जाणवूही नये, असे व्यक्तीमत्व लाभलेले भोसले सर! ही व्यक्ती किती थोर आहे, हे हळूहळू लक्षात यायला लागले. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मनोमन प्रसन्न वाटे. रेडिओ टेलिस्कोप निर्माण करणारा आणि सौरवाताचे निरीक्षण करणारा संशोधक आमच्यापुढे सहज वावरत होता. आपल्या भव्य कार्याचा’ त्यांच्या वागण्यात कोठेही दिसत नसे.

पुढे माझे पीएच.डी. सुरू झाले आणि अवकाश विज्ञान ही एक महत्त्वाची शाखा बनू लागली. उत्तम गुण मिळणारे विद्यार्थी या क्षेत्राचे अध्ययन करू लागली. ही संधी केवळ भोसले सरांमुळे शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लाभली. भोसले सर वर्गात प्रत्यक्ष अध्यापन करत. ते लवकरच विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. त्यांनी या अभ्यासक्रमासाठी आवश्यक अनेक उपकरणे मिळवायला सुरुवात केली. ही उपकरणे सामावून घेण्यासाठी भौतिकशास्त्र विभागात पुरेशी जागा नव्हती. प्रयोगशाळा कोठे उभ करायची, हा प्रश्न होता. वरचे लागेबांधे वापरून चांगल्या खोल्या मिळवणे त्यांना शक्य झाले असते; मात्र विद्यमान व्यवस्थेला हात लावता भौतिकशास्त्र विभागाच्या टेरेसवर प्रयोगशाळा उभ केली. त्यासाठी कच्चे बांधकाम केलेली एक खोली बनवून त्यात प्रयोगशाळा उभ केली. उत्तम उपकरणे आणि त्तम अध्यापन याचा मेळ घालत, या भागातील विद्यार्थ्यांसाठी एका आधुनिक विषयाच्या शिक्षणाची दारे खुली करून दिली.

प्रा. राजाराम विष्णू भोंसले. कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवडे (ता. कागल) योथील वारकरी परंपरेतील भोंसले-पाटील घराण्यात त्यांचा जन्म झाला. आईंचे शिक्षण झालेले नसले तरी अनेक अभंग, ओव्या त्यांना पाठ असत. आईबरोबर ते तीन-चार वेळा पंढरपूरला वारीलाही गेले. वडिलांचे त्या काळातील सातवी म्हणजे व्हर्नाक्युलरपर्यंत शिक्षण झालेले. त्या काळात एवढ्या शिक्षणावर अनेकजण शिक्षक होत असत. साहजिकच त्यांच्यावर सुसंस्कार आपोआप घडत गेले. त्यांचे शिक्षण नागोजीराव पाटणकर विद्यालयातून झाले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. माध्यमिक जीवनामध्ये ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये राहात असताना त्यांना संस्थाचालकांनी सेक्रेटरी बनवले. त्यांच्याकडे कपाटाच्या किल्ल्या दिल्या. त्या कपाटात एक रेडिओ होता. त्यावरील गाणी ऐकण्याचा त्यांना छंद लागला.

गाणी ऐकत कोठे तरी दूरवर लावलेली गाणी कोल्हापुरातील, वसतीगृहातील त्या रेडिओसंचावर कशी ऐकायला येतात? त्या लहरी कशा पोहोचत असतील? असे आकलनापलिकडील प्रश्न त्यांना पडत. याच रेडिओने त्यांच्या मनात रेडिओ लहरींचा विचार पेरला आणि त्या लहरी त्यांच्या आयुष्याचा भाग बनल्या. त्यांच्या जीवनातील काही अनमोल स्मृतींचा ठेवा असणाऱ्या ‘स्मृतीतरंग’ या पुस्तकातही त्यांनी या प्रसंगाचा आणि रेडिओचा आभारदर्शक उल्लेख केला आहे. त्यानंतर राजाराम महाविद्यालयात बी.एस्सी. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी कला-क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध केले. ते ड्रामा व बोटिंग क्लबचे सेक्रेटरी होते.

सन १९५० साली बी.एस्सी. उत्तीर्ण झाले. राजाराम महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य गोकाक यांचे पत्र घेऊन एम.एस्सी.ला प्रवेश घेण्यासाठी ते पुण्याला गेले. त्यावेळी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात दोन अभ्यासक्रम उपलब्ध होते. त्यांनी प्रथम रेडिओ कम्युनिकेशनचा पदविका अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केला. त्यानंतर एम.एस्सी. (वायरलेस)  या अभ्यासक्रमाला प्रा. एम.के. परांजपे यांनी बोलावून प्रवेश दिला. १९५४ साली ते प्रथम श्रेणीत एम.एस्सी. परीक्षा उत्तीर्ण झाले. परांजपे सरांकडे काही संशोधक विद्यार्थी पीएच.डीसाठी काम करत होते. दरम्यान त्यांना पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाची संधी मिळाली. मात्र येथे अध्यापन करत असताना संशोधन करता येणार नाही, हे समजताच त्यांनी नोकरीचा विचार सोडला. त्यावेळच्या शिक्षणमंत्री इंदुमती सेठ यांची अहमदाबादला शिक्षणसंस्था होती. या संस्थेत रेडिओ इंजिनिअरिंगचा एक पदविका अभ्यासक्रम होता. तेथील अध्यापक सरकारी सेवेत गेल्याने त्यांना एका अध्यापकाची गरज होती. योगायोगाने तेथील नोकरी सोडून जाणारे शिक्षक भोसले सरांचे गुरू होते. त्यांनीच भोसले सरांचे नाव सुचविले आणि सर अहमदाबादला गेले.

अहमदाबाद येथे दरमहा रूपये पाचशे इतक्या पगारावर ही नोकरी सुरू झाली. शाळेतच राहण्याची व भोजनाची सोय झाली. सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत अध्यापनकार्य असे. नंतरचा वेळ मोकळा होता. अहमदाबाद येथेच फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी होती. या संस्थेची स्थापना डॉ. विक्रम साराभाई यांनी केली होती. या संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. के.आर. रामनाथन यांना सर भेटले. आपली संशोधन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी भोसले सरांना ज्युनिअर रिसर्च असिस्टंट या पदावर रूजू होण्यास सांगितले आणि सरांचा १९५५ मध्ये या संस्थेत प्रवेश झाला.

या कालावधीत सरांनी रेडिओ टेलिस्कोपची उभारणी केली. पाच वर्षे या यंत्रणेवर काम करून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. ती भारतातील पहिली रेडिओ टेलिस्कोपिक दुर्बीण होती. पृथ्वीच्या उच्च वातावरणावर या काळात सरांनी संशोधन केले. खरे तर ही टेलिस्कोपची उभारणी मोठी गुंतागुंतीची आणि प्रचंड वेळखाऊ होती. ही उभारणी करताना सरांना खूप कष्ट घ्यावे लागले. मात्र या आपल्या सर्वोत्तम कार्याची मांडणी आपल्या चरित्रपर पुस्तकामध्ये केवळ एका परिच्छेदात केली आहे. हीच सरांची विनयशीलता आमच्यासारख्या प्रत्यक्षात त्यांचे विद्यार्थी नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी भावत असे. पीएच.डी. पदवी प्राप्त होताच उच्च संशोधनासाठी त्यांना कॅनडा येथे जाण्याची संधी मिळाली. तेथेही सोलर रेडिओ पोलारीमीटर हे उपकरण बनवले. त्यावर आधारित संशोधन निबंध जागतिक दर्जाच्या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध केले. तेथून ते अमेरिकेला गेले. स्टॅनफर्ड विद्यापीठामधील प्राध्यापक प्रा. गॅरियट आणि एशेलमन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सरांचे उच्च दर्जाचे संशोधन पाहून त्यांना ‘नासा’मध्ये व्हिजिटिंग रिसर्च असोसिएट म्हणून बोलावून घेतले. तेथे त्यांनी तीन वर्षे काम केले. दरम्यान डॉ. साराभाई आणि डॉ. रामनाथन यांनी त्यांना भारतात येण्याविषयी सुचविले आणि भोसले सर भारतात परतले.

तोपर्यंत पीआरएल या संस्थेला स्वत:ची तीस एकर जागा मिळाली होती. त्या जागेत नव्या टेलिस्कोपची उभारणी करण्यात आली. सूरत आणि राजकोट येथेही टेलिस्कोप बसविले. सूर्याच्या वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजण्याची यंत्रणा निर्माण केली. यावेळी डॉ. विक्रम साराभाई यांच्यासह अनेक दिग्गज संशोधकांसह त्यांनी काम केले. याविषयी त्यांना भरभरून लिहिता आले असते. मात्र चरित्र ग्रंथात याचाही उल्लेख ओझरता येतो. तेथे सरांनी पंधरा वर्षे काम केले आणि नोव्हेंबर १९८८ मध्ये सर निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही सरांना मानद शास्त्रज्ञाचे पद देण्यात आले. या पदावर एक वर्ष संशोधन कार्य केले. त्यानंतर सरांनी १९८९ मध्ये कोल्हापूरला येण्याचे निश्चित केले.

त्या वेळी प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. के.बी. पोवार कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. सर त्यांना भेटले. आपल्याला संशोधनामुळे अध्यापन करता आले नाही. विद्यापीठामध्ये अध्यापन करण्याची संधी मिळावी, अशी विनंती केली. हाताशी असणारे मानद शास्त्रज्ञाचे पद नाकारून सर मातृभूमीतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी आले. पोवार सरांनी त्यांना स्पेस सायन्स ही विशेष अभ्यासशाखा सुरू करावी, असे सुचविले. तसेच ‘ऑनररी प्रोफेसर ऑफ स्पेस सायन्स’ हे पदही दिले. त्यांनी हा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केला. तेथे ते स्वत: अध्यापन करत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सोळा विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांनी सर शिवाजी विद्यापीठामध्ये आल्यानंतर हे संशोधन कार्य केले.

या अध्यापनाबरोबर पन्हाळा येथे चांगल्या दर्जाचे केंद्र उभा करावे, असा त्यांचा मानस होता. त्यांच्या प्रयत्नातून पन्हाळा येथे विद्यापीठाला पाच एकर जागा उपलब्ध झाली आहे. अमेरिका किंवा रशियाच्या स्वतंत्र ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहेत. भारताचीही अशी यंत्रणा असावी, असे इस्रोच्या संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी १०५ संदेशग्राहक (Receiver) देशभर उभा केले जात आहेत. या यंत्रणेसाठीचा तेविसावा ग्राहक विद्यापीठाच्या पन्हाळा येथील जागेत बसवण्यात आला आहे. या संदेशग्राहकाकडून अत्यंत चांगल्या दर्जाचे कार्य होत आहे. सरांचे विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयत्न आणि त्याला प्रशासनाने दिलेली सकारात्मक साथ यामुळेच हे केंद्र उभारणी शक्य झाली. महाविद्यालयीन पातळीवर खगोल व अवकाशशास्त्र हा विषय सुरू करण्यातही सर यशस्वी झाले. पन्हाळ्यावरील जागेवर स्वतंत्र चांगली इमारत व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. विद्यापीठाने त्याची तयारीही सुरू केली होती. मात्र पन्हाळगड ऐतिहासिक वारसा यादीत असल्याने तेथे नवे पक्के बांधकाम करण्यास परवानगी मिळू शकली नाही.

लोकांच्यामध्ये विज्ञानप्रेम वाढावे, यासाठी सर मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यात शिवाजीराव पवार सरांच्याबरोबर कार्य करत असत. त्यांना कोणत्याही विषयाचे बंधन नव्हते. वृक्ष आणि उद्यानाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या गार्डन क्लबचेही ते सदस्य बनले. सन २००८-०९ पर्यंत सर विभागात येत असत. त्यांना कोल्हापूर भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने डी.लिट. पदवी प्रदान केली. महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्स, इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्स यांनी त्यांना सदस्यत्व दिले. मात्र राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर म्हणावे तसे कौतुक झाले नाही. त्यांचा ‘ॲक्टिंग’वर नव्हे तर ‘ॲक्शन’वर भर होता. कायम कार्यात मग्न असणारे सर प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओझरती ओळख करून देणारे ‘स्मृतीतरंग’ हे पुस्तकही त्यांचे मित्र आणि कुंभी कासारी शिक्षण मंडळाचे सचिव पी.टी. पाटील सर यांच्यामुळे प्रकाशित झाले.

पुढे दोन वर्ष २०१० ते २०१२ या कालावधीत मी नांदेडला असल्याने सरांशी थेट संपर्क नव्हता. मात्र २०१२ मध्ये वेगळ्या कारणाने त्यांची भेट झाली. कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने कोल्हापरात विज्ञान केंद्र आणि नेहरू तारांगणाच्या धर्तीवर तारांगण सुरू झाले पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. त्यासाठी त्यांचा वारंवार पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेला प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. पुढची दहा वर्ष ते या प्रकल्पाचा पाठपुरावा करत होते. विद्यापीठाने हे विज्ञान केंद्र आणि तारांगण विद्यापीठात उभारण्यासाठी तयारी केली होती. सुवर्णमहोत्सवी वर्षात हा प्रकल्प मंजूर व्हावा, यासाठी प्रयत्नही केले. मात्र त्यांचे हे स्वप्न अद्याप प्रत्यक्षात उतरू शकलेले नाही.

माणसावर प्रेम करणारा माणूस, प्रेमळ पण कर्तव्यदक्ष पिता, समाजामध्ये वैज्ञानिक दृष्ट‍िकोन वाढीला लागावा म्हणून कार्य करणारा विज्ञानप्रसारक, परदेशात उत्तम संधी हाती असतानाही देशावरील प्रेमापोटी भारतात परतणारा देशप्रेमी, देशासाठी संशोधन केल्यानंतरही तेथेच कार्य करण्याची संधी असतानाही जन्मभूमी कोल्हापूरला परतणारा सूज्ञ नागरिक, आपले ज्ञान अखेरपर्यंत देण्याचा प्रयत्न करणारा गुरू अशा अनेक अंगानी सरांना पाहता येते. ‘विद्या विनयेन शोभते’ हे सुभाषित सरांसाठीच तयार झाले असावे. असा हा अनोखा संशोधक, कोल्हापूरचा थोर सुपुत्र. विज्ञान केंद्र आणि तारांगणाचे स्वप्न पाहात १४ जून २०२० रोजी कालवश झाले. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरावी!


गुरुवार, ४ जून, २०२०

एक पत्र कोरोनास…

पाच जून हा दिवस आपण ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करतो. याच पर्यावरणाचे आपण किती आणि कसे नुकसान करत आहोत, हे मागील तीन महिन्यापासून, कोरोना आल्यापासून आपणास सातत्याने जाणवत आहे. तरीही कोरोनाच्या परिणामापासून मुक्ती मिळणे आवश्यक आहे. एकिकडे ‘निसर्ग’ वादळ मानवी जिविताचे नुकसान न करता जाते. मानवावर दया दाखवते. तर दुसरीकडे केरळमध्ये मानवातील दानव एका हत्तीणीची क्रुरपणे हत्या करताे. या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ला लिहिलेले पत्र आपणासाठी..........                       --------------------------------------------------------------------------------------------

प्रिय (!,?) कोरोनास,

      सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

तू आल्यापासून निसर्ग आणि मानवी जीवन पूर्णत: बदलले आहे. तू आमच्या निसर्गाप्रती असणाऱ्या सर्व चुकांचा आरसा दाखवत आहेस. मात्र तू करत असलेल्या जिवित आणि आर्थिक नुकसानीमुळे आमच्या मनात तुझ्याबद्दल भयानक राग आहे. खरे तर, तुझ्या येण्यामुळे आमच्या हातून निसर्गाप्रती घडलेल्या चुका ठळकपणे दिसू लागल्या आहेत. पण माझ्यासारख्यांची फार मोठी अडचण आहे. आता हेच बघ ना. तुला पत्र लिहिताना मी नेहमीप्रमाणे ‘प्रिय’ असे लिहिले. मात्र त्यानंतर कंसात दोन चिन्हे लिहावी लागली. दुसऱ्यांच्या पत्रात काय आहे, हे जाणून घ्यायची माणसाला हौस असते. ‘आपलं ठेवायचं झाकून अन्…’ हा जणू आमचा स्थायीभाव बनलाय. त्यामुळे तुला लिहिलेले पत्र अनेक जण वाचणार. म्हणूनच जे वाचतील, त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारी ही दोन चिन्हे. तुला ‘प्रिय’ लिहिले, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. त्यांच्यासाठी उद्गारवाचक चिन्ह. तुला मी ‘प्रिय’ कसा काय म्हणू शकतो, हा अनेकांना प्रश्न पडेल. त्यांच्या दृष्टीने हा वेडेपणा आहे. म्हणून प्रश्नचिन्ह. तसाही मी वेडाच आहे, म्हणूनच तुला पत्र लिहू शकतो. अनेक जण मला ‘वेडा’ म्हणतात. विज्ञानातला न्यूटनचा तिसरा नियम लक्षात न ठेवणारे आम्ही ‘जशास तसे’ वागतो. मी मात्र ‘न केलेल्या पापाचे माप’ माझ्या पदरात टाकणारांचाही ऋणी राहतो. त्यांच्या त्या कृतीने मला काही ना काही चांगले शिकवलेले असते, म्हणून त्यांचा तिरस्कार करत नाही. असे वागणारा माणूस आमच्या दुनियेत वेडाच ठरतो. तू तर इतके काही शिकवलेस की तुझा तिरस्कार करणे कसे शक्य आहे? म्हणूनच तुला ‘प्रिय’ म्हटले. उगाच तुझाही गैरसमज व्हायला नको, म्हणून नमनालाच हे स्पष्टीकरण.

कोरोना, तू आलास आणि बघता बघता सारे जग बदलले. जगात सर्व काही प्रथमच थांबले. सर्वजण घरात

कोंडले. यंत्रांचा खडखडाट थांबला. पक्ष्याकडे बघून आकाशात उडण्यासाठी आम्ही विमान बनवले. पक्ष्यापेक्षांही उंच उडणाऱ्या त्या विमानांची घरघर थांबली. धूर ओकणारे कारखाने बंद झाले. कामगारांचे हात थांबले. रेल्वे, गाड्या थांबल्या. नद्यांना प्रदूषित करणारी कारखान्यांची पाईपलाईन प्रथमच कोरडी झाली. सारे काही थांबले. हे आम्हीच थांबवले. औरंगजेबाच्या सैनिकांनी संताजी, धनाजीचा घेतला नसेल इतका धसका आम्ही तुझा घेतला. तू दिसत नाहीस, तरीही आम्ही तुला घाबरून सारे काही थांबवले. हे शक्य झालं ते सुद्धा आम्ही विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळेच. आम्ही पटकन सावध झालो आणि तुला भिऊन आम्ही घरात कोंडून घेतले. त्यामुळे जिवितहानीचे अपेक्षेएवढे नुकसान तुला करता आले नाही. पण आर्थ‍िक नुकसान जे केलेस तेही मोठे आहे. जे गेलेत ते जीवही कमी नाहीत. पण दर वर्षी रस्ते अपघातात साडेतेरा लाख लोकांचे प्राण जायचे. दोन ते पाच कोटी लोक कायम किंवा तात्पुरते अपंग बनायचे. प्रत्येक २४ सेकंदाला एक जीव जायचा. ‘वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, तर अपघातात जीव जाउ
शकतो’ हे आ
म्हाला माहित आहे. नियम न पाळल्यानेच बहुतांश अपघात घडायचे. तरीही आम्ही निय मोडायचो, अपघात व्हायचे. मात्र तू जीव घेऊ शकतोस, हे लक्षात येताच आम्ही वाहने लॉक केली आणि अपघातात जाणारे अनेक जीव वाचले. तू घेतलेल्या जीवांनी जणू त्याची भरपाई केली. पण तरीही तुझ्यामुळे झालेले नुकसान कमी, याचा आनंद मानायचा; की तू आम्हाला घरात कोंडून टाकलेस, अनेकांचे जीव घेतलेस, त्याचे दु:ख? काहीच कळत नाही. 

        आम्ही उत्सवप्रिय. लग्न असो किंवा यश. आम्हाला ते उत्सवाच्या स्वरूपात साजरे करायचे असते. त्यासाठी
खर्चाची आम्हाला पर्वाच नव्हती. ‘ऋण काढा, पण, सण साजरा करा’ हा जणू आमचा मूलमंत्र बनला होता. आकाशात लग्न, समुद्रात लग्न ‘डेस्टिनेशन वेडिंग’ ही संस्कृती रूजू लागली होती. जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गातही हे सारे रुजू लागले होते. तर दुसरीकडे आपल्या वडिलांकडे लग्नाचा खर्च उचलण्याइतके पैसे नाहीत, म्हणून काही युवती आत्महत्या करू लागल्या होत्या. लग्नाचा खर्च अनावश्यक आहे, हे आम्हाला कळते. पण खोट्या प्रतिष्ठेपायी, आम्ही ते कर
त होतो. मात्र तुझ्या येण्याने आमच्या उत्सवप्रियतेवरच घाला घातला आहेस. आता पंधरा-वीस लोकांच्या उपस्थितीत लग्न लागू लागले आहे. लग्नातील अनावश्यक खर्च टाळला जायला लागला आहे. मात्र यानिमित्ताने वापरले जाणारे हारतुरे, गुच्छ हे सारे काही बंद झाले. जेवणावळी थांबल्या. मोठमोठे मंडप घालणे बंद झाले. मंदिरे बंद झाली. आज देवही कुलुपात बंद झाले आहेत. देवाला केले जाणारे दानही थांबले. तेथे वापरली जाणारी फुले शेतातच सडली जाऊ लागली. नाईलाजाने शेतकरी फुलांची शेती नांगरून टाकत आहे. ज्या देवासाठी त्यातील अनेक फुले वापरली जात असत, ते देवही आज तुझे संकट टाळण्यासाठी येत नाहीत. लग्न आणि उत्सवातील अनावश्यक खर्चाचा भार कमी झाला, लग्नपद्धती बदलत आहे, याचा आनंद मानायचा, की शेतकऱ्याला आपली बहरलेली फुलशेती नांगरावी लागते, याचे दु:ख? 

तुझ्या आगमनाने आमची शिक्षण पद्धतीही बदलली आहे. ‘चॉक आणि टॉक’ संस्कृती बदलण्यास तयार नसलेले, आम्ही आता ‘ऑनलाईन’ व्याख्याने देऊ लागलो आहोत. उच्च शिक्षणच नाही, तर, माध्यमिक शिक्षणातही ही संस्कृती रुजू लागली आहे. हे मोठ्यासाठी ठिक झाले. पण शाळेतील मुलांचा किलबिलाट थांबला आहे. महाविद्यालयातील तरूणाईने बहरलेले चैतन्यमय वातावरण नाहीसे झाले आहे. आता कार्यशाळा, चर्चासत्रेही ‘वेबीनार’च्या रूपात होऊ लागली आहेत. एवढेच काय, आज ‘फॅकल्टी इंप्रुव्हमेंट प्रोग्राम’ही असेच ‘ऑनलाईन’ होऊ लागले आहेत. पण सुरुवातीला मोफत असणाऱ्या या वेबीनारसाठी आता शुल्क आकारले जाऊ लागले आहे. चार-पाच दिवसात सूचना काढायची. वक्ते ठरवायचे. त्यांनी होकार देताच, एक फलक तयार करून तो ‘व्हॉटसअप’च्या माध्यमातून सर्वत्र पसरवायचा आणि त्यातून ‘ऑनलाईन पेमेंट’ घेऊन वेबीनार आयोजित करायची. अशी वेबीनार जणू नव्या धंद्याचे रूप घेत आहेत का? अशी शंका यावी, इतपत हे एक-दोन महिन्यातच बदलू लागले आहे. हे सुरू असताना काही मंडळी घरातील वस्त्रावर असतात. काहीजण व्याख्यानाने मन तृप्त करून घ्यावयाच्या वेळेत, आपल्या जिव्हेला तृप्त करत असतात. त्यांच्यामागे इतरांची हालचाल सुरू असते. यामुळे या व्याख्यानांचे गांभिर्य कमी होत आहे. मात्र या नव्या संस्कृतीमुळे प्रवास टळला आहे. त्यामुळे गाड्यांचा वापर होत नाही. प्रदुषण, कर्ब उत्सर्जन कमी होत आहे. या सर्व परिस्थितीत गाड्यांचा वापर कमी झाला, आमची शिक्षण संस्कृती आधुनिक तंत्रज्ञान वापरू लागली याचा आनंद मानायचा की शिक्षणाचे गांभिर्य संपत चालले, मुलांचा किलबिलाट थांबला, महाविद्यालयातील चैतन्याने भारलेले वातावरण लुप्त झाल्याचे दु:ख? 

या पूर्वी तुझ्या पूर्वजांनी अनेकदा मानवावर हल्ले केले. मोठ्या प्रमाणात बळी घेतले. सहाव्या शतकातील 'जस्टिनाईनचा प्लेग’ ही यातील सर्वात मोठी नोंद. जस्टिनाईनच्या सम्राटाने इजिप्तचा भूभाग जिंकला. त्याला नजराणा म्हणून पाठवलेल्या धान्यासोबत काळे उंदीर आणि प्लेग निर्माण करणाऱ्या पिसवा गेल्या. त्यातून सहा कोटी लोकांचा जीव घेणारा प्लेग पसरला. बळींची संख्या त्यावेळच्या जगाच्या लोकसंख्येच्या पंचवीस टक्के होती. हे बळी प्लेगने घेतले, की मानवाच्या साम्राज्य वाढवण्याच्या हव्यासाने, की सामर्थ्यशाली राजाला खुश करण्यासाठी नजराणे देणाऱ्या लाचारांनी? कोणामुळेही असो. त्यावेळीही गेले ते गरीबच. पुन्हा चौदाव्या शतकात ‘द ब्लॅक डेथ प्लेग’ पसरला. त्याने जगातील एक तृतीयांश लोकसंख्या संपवली. वीस कोटी लोकांचा मृत्यू झाला. या साथीने अनेक वर्षांपासूनचे फ्रांस आणि इंग्लंडचे युद्ध संपवले. ब्रिटनमधील सरंजामी व्यवस्था पूर्णपणे संपून गेली. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता त्यांच्या राजधानीत, लंडनमध्ये मात्र हा प्लेग तीनशे वर्षे अधूनमधून त्रास देत होता. हे कलह, अनिष्ट प्रथा संपवल्याचा आनंद मानावा, की वीस कोटी लोकांच्या मृत्यूचे दु:ख?

मात्र, आम्ही हुशार. प्लेग माणसाच्या संपर्कात आल्याने होतो, हे आमच्या लक्षात आले. व्हेनिस राज्यातील ‘रागूसा’ शहरात नवी पद्धत सुरू केली. इतर देशाची येणारी जहाजे आम्ही बंदरातच तीस दिवस नांगरून ठेवायचो. त्यातील कोणी आजारी नाही पडले, तरच त्यांना शहरात प्रवेश दिला जायचा. ही क्वारेंटाईन करण्याची मानवी इतिहासातील पहिली वेळ. हा शब्द आम्ही इटलीतून घेतला. आम्ही तुझ्या त्या पूर्वजाला, प्लेगला नामशेष केले. त्याने फार दमवले, पण आम्ही त्याला संपवले. तो संपला या आनंदात त्यापासून काहीच न शिकता पुढे तसेच वागू लागलो.

वेळोवेळी सावध करायला तुझे अनेक भाऊबंद आले. त्यांनी आम्हाला सतावले. भरपूर त्रास दिला. अनेक लोकांचे जीव घेतले. देवी, इबोला, एन्फ्ल्यूएंझा, कांजिण्या, चिकनगुनिया, टॉयफॉईड, डांग्या खोकला, डेंग्यू, देवी, धनुर्वात, नारू, मलेरिया, कॉलरा, पोलिओ, प्लेग, कुष्ठरोग, क्षय असे किती सांगावेत? प्रत्येकावर आम्ही मात करत चाललो. ज्यांनी या आजारावर मात करण्याचे उपाय शोधले, मग ते लुई पाश्चर असोत किंवा देवीवरची लस शोधणारे एडवर्ड जेन्नर. आम्ही त्यांना महामानव ठरवले. तरिही तू, वेगवेगळ्या रूपात आम्हाला सावध करण्यासाठी येत राहिलास. आम्हाला सावध करायचा प्रयत्न केला. पाठोपाठ कोणी ना कोणी महामानव तयार झाला. आम्ही तुझ्या त्या रूपावर मात केली. आम्ही सर्वश्रेष्ठ याचा गर्व बाळगत राहिलो. तू पुन्हा पुन्हा रूप बदलत आलास… तसाच आताही तू आलास.

तू भयंकर विनाश करणार, हे आम्ही ओळखले. आम्ही क्वारेंटाईन झालो. तुझा उघड सामना आम्ही आज तरी करू शकत नाही. आमच्या नियमाप्रमाणे आम्ही आमची लाज वाटते म्हणून तोंड झाकून घेतले आहे, असे तुला वाटते. खरंय ते. पण आमच्यातील अनेकांना आजही आपल्या कृत्याची, आम्ही निसर्गाशी केलेल्या क्रूर वर्तनाची लाज वाटत नाही. त्यांनी केवळ तुझ्या भितीने तोंड झाकले आहे. आम्हाला खरंतर जगायला काय लागते? शुद्ध हवा, शुद्ध पाणी, चांगले अन्न आणि उन, वारा पाऊस यापासून वाचण्यासाठी निवारा. मात्र आम्ही प्राणीधर्म विसरलो. आम्हाला स्वार्थाने आंधळे केले. मेल्यानंतर पाच बाय चार फुटाची जागा पुरते. मात्र जिवंतपणी टोलेजंग घर बांधू लागलो. त्यासाठी मोठी वृक्षतोड करत राहिलो. आम्ही गरजेपेक्षा जास्त ओरबडत राहिलो. ‘माझेही माझेच आणि तुझेही माझेच,’ असे वागत राहिलो. ज्यांनी आम्हाला आसरा दिला. आमच्या संस्कृतीचा विकास करायला मदत केली. त्या नद्या आम्ही संपवल्या. गंगेपासून पंचगंगेपर्यत ही समस्या वाढवली. जिवनदायिन्या मृत्यूदायिन्या बनवल्या. पाण्याचे साठे खराब केले. तेलाचे, खनिजांचे अमर्याद साठे उपसले. त्यांना जाळून हवेचे प्रदूषण केले. आमची प्रगती मोजण्यासाठी ‘ऊर्जेचा आधिक वापर’ हे परिमाण वापरू लागलो. प्रत्येक देश ऊर्जेचा वापर वाढवत गेला. त्यातून वायूचे प्रदूषण वाढवले. परिणामी, आमच्यापासून पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त उंचावरील ओझोनच्या थराला धोका निर्माण केला. तो थर संपला तर सूर्याच्या अतिनील किरणांनी आम्ही भाजून जाऊ. तरीही आम्ही ऊर्जेचा वापर वाढवतच गेलो.

शेती, सिमेंटची जंगले, कारखाने उभारण्यासाठी आम्ही जंगलांची कत्तल केली. झाडांनी दिलेल्या ऑक्सिजनशिवाय आम्ही जगू शकत नाही. झाडे ही पावसाची ‘एटीएम’ यंत्र आहेत. झाडाशिवाय पाऊस पडू शकत नाही. झाडामुळे जमिनीची धूप कमी होते, हे ठावूक असूनही आम्ही झाडे तोडत राहिलो. मी तोडले म्हणून काय फरक पडतो? असा प्रत्येकांचा विचार. झाडेच राहिली नाहीत, तर ऑक्सिजन कोठून येणार? याचा विचार आम्ही एकविसाव्या शतकातही करत नाही. हेच आमच चुकतंय. आम्हाला ते कळतंय, पण वळत नाही. पर्यटनस्थळी जायची आम्हाला फार हौस. संधी मिळाली की जातो. मात्र, त्या सुंदर ठिकाणावरून परतताना सर्वत्र अस्वच्छता पसरवतो. समुद्राच्या किनारे, तलाव, जंगल… जे जे सुंदर आहे, ते आम्हाला उपभोगायचे आहे… तो आम्ही आमचा हक्क मानतो. पण ते सुंदर ठेवण्याची जबाबदारी आम्ही नाकारतो. जंगलातील, समुद्रकिनाऱ्यावरील असणाऱ्या प्राण्यांचे जीवन नष्ट करत आम्ही आमची प्रगती केली. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे’ ही विंदांची शिकवण आम्ही शब्दश: घेतली. देणाऱ्या निसर्गाचे हातही आम्ही ओरबाडून घेतले. विंदाना अपेक्षित दानशूरपणाचा गुण घेतलाच नाही. उलट चीनच्याच माओ जेडोंग या हुकूमशहाने चिमण्या धान्याचे नुकसान करतात, म्हणून सारा देश चिमण्यामुक्त केला. मग पिकावर कीड आणि अळ्यांनी हल्ला केला. धान्याचे उत्पादन घटले. निसर्गावरचा हल्ला किती महाग पडू शकतो हे आम्ही अनुभवले. तरीही शिकलो मात्र शून्य. त्याचेच फळ आज आम्ही भोगतो आहोत.

शाकाहारी माणसे तोंडाने पाणी पितात. मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितात. यावरून आमचे शरीर खरे तर शाकाहारासाठी बनलेले आहे. आम्ही वनस्पती खायच्या. त्या वाढवायच्या. पण आम्ही मांसाहार सुरू केला. दुधदुभत्यासाठी पाळलेल्या मेंढ्यापासून सुरुवातीला लोकर मिळवली आणि नंतर मांस खायला मारू लागलो. शेळ्यांचा वापरही तसाच सुरू केला. उपयोगाचे आहेत तोपर्यंत प्राण्यांचे अन्य फायदे घेतो आणि ते बंद झाले की त्यांना मारून मांस खातो. कोंबड्यांची अंडी पुनरूत्पादनासाठी नव्हे, तर आमच्या जिव्हेचे चोचले पुरवण्यासाठी असे मानत खाऊ लागलो. ते कमी पडू नयेत म्हणून आम्ही संकरित वाण तयार करू लागलो. ते कमी पडू लागले म्हणून कुत्र्या-मांजरापासून वटवाघळापर्यंत सर्व प्राणी खायला सुरुवात केली. वाघ खायला नाही तर बसायला व्याघ्रासन हवे म्हणून मारले. कोणाची शिकार करायचे बाकी ठेवले नाही आम्ही. ज्यांचा आम्हाला त्रास होतो, तो प्रत्येक जीव आम्ही नष्ट करायचा नतद्रष्टपणा करतो. त्याच्या परिणामांचा आम्ही विचारच केला नाही. तू आणि तुझ्या पूर्वजांनी वारंवार इशारे दिले, पण आम्ही गर्वाच्या शिखरावर बसलो. ‘आम्हीच सर्वश्रेष्ठ’ असा गर्व झाला आम्हाला. भ्रमात राहिलो की आमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही. पण तू आलास आणि वाघाला न घाबरणारे आम्ही, तू न दिसताही तुला घाबरलो. इतके घाबरलो की कोणाजवळ जायचे झाले तरी तुझ्या भितीने मन जाऊ देत नाही. भाजी घेताना मनात शंका; धान्य घेताना, औषध घेतानाही भिती वाटू लागली तुझी. तुझ्या धाकाने का होईना आम्ही घरात बसलो आणि…

माणसांच्या गर्दीने फुललेली ठिकाणे आता ओस पडली आहेत. गर्दीने भरलेले मोकळे रस्ते भयाण भासू लागले आहेत. गाड्यांचा आवाज नाही. हॉर्नचा आवाज नाही. सर्वत्र स्मशान शांतता भासू लागली आहे. आकाशात चंद्र आहे, चांदण्या आहेत, मंद वारा आहे, फुललेल्या रातराणीचा गंध आहे, पण सारे नि:शब्द आहे. ही शांतता मनाला अस्वस्थ करते. आम्हाला सवयच नाही, तुझा नि:शब्द शांततेत आनंद घ्यायची. पण आम्ही ज्यांना त्रास देतो, ते पक्षी मुक्तपणे निसर्गात विहार करत आहेत. त्यांना आता आमची भिती वाटत नाही. झाडांच्या जंगलातील प्राणी सिमेंटच्या जंगलात निर्धास्तपणे वावरू लागले आहेत. गाणारे पक्षी कित्येक वर्षानंतर ऐकायला मिळाले. खाडीत फ्लेमिंगोचा थवा जमला आहे. आम्ही त्याच्याही बातम्या करत आहोत. पुन्हा खूप सुंदर वातावरण अनुभवायला मिळते आहे. कित्येक वर्षानंतर या प्राण्यांना आमच्या त्रासाशिवाय फिरता यायला लागले आहे. वेगवेगळ्या बागातील लॉन हिरवेगार झाले आहे. मात्र त्यांचा जवळून आनंद घेता येत नाही. मोरांना नाचताना पाहायचे आहे, फ्लेमिंगोचा थवा पाहायचाय, कोणत्या पक्ष्याचा आवाज कसा आहे, बघायचे आहे, पण बाहेर पडता येत नाही. त्यामुळे हे पक्षी, प्राणी आम्हाला वाकुल्या दाखवतात, असे वाटू लागले आहे. जीवाची घालमेल होतेय. पुन्हा बाहेर यावेसे वाटते. पण तू कधी कोठे हल्ला करशील ही भीती बाहेर पडू देत नाही. तू खूप नुकसान केले, असे मी म्हणणार नाही. उलट तू आम्ही करत असलेल्या पर्यावरणाच्या नुकसानीची जाणीव करून दिलीस. लोकांना माझे हे म्हणणे वेडेपणाचे वाटेल. कारण आम्हाला सवय झाली आहे, सर्व गोष्टी पैशात मोजायची. त्यापुढे निसर्गाचा विचार करणे आम्ही कधीच सोडून दिलंय. नाही तर, हेच सांगण्यासाठी धडपडणारी ती ग्रेटा नावाची मुलगी ‘ॲस्पर्जर सिंड्रोम’ने आजारी आहे, असे म्हणत त्याचे भांडवल केले नसते. आम्ही इतके कोडगे झालो आहोत की माणसाच्या भावनांची सुद्धा किंमत करत नाही, म्हणूनच देशात वृद्धाश्रमांचे पीक आले आहे. तू अनेकांचे जीव घेतलेस, तरीही स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेस; तरीही प्रश्न आहे, आमच्या टँकरवाड्यात खरेच शुद्ध पाणी मिळत असेल?

निसर्गाने या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस दिला कारण कदाचित निसर्गाला तू येणार आणि आम्हा मानव प्राण्यांना पाण्याची जास्त गरज भासणार, हे त्याने ओळखले असावे. निसर्गावर आम्ही अनंत अन्याय, अत्याचार केले तरी तो केवळ द्यायचाच विचार करतो. निसर्ग मात्र सर्वांचे हित पाहतो. पुराने केलेले नुकसान डोळ्याआड होऊन निसर्गाने त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूची, मानवाची काळजीच घेतली, असे वाटते. इटलीच्या प्रसिद्ध लेखिका फ्रांसिस्का मेलँड्री यांनी ‘फ्रॉम युअर फ्यूचर’ हे मानवाला सावध करणारे पत्र लिहिले. मात्र खरेच बदलणार आहोत का आम्ही? हा प्रश्न माझ्याही मनात आहे. केरळमध्ये भुकेने व्याकूळ गरोदर हत्तीणीच्या तोंडात अननसामध्ये पेटते फटाके देऊन जीव घेणारे मानवातील ‘दानव’ ही शंका निश्चितच रास्त ठरवतात. तरीही खूप झाले रे… आता संपव हे सगळं. मला खात्री आहे, तुला संपवणारी लसही आम्ही शोधून काढू. तुला नामशेष करण्यात शास्त्रज्ञ आणि संशोधक निश्चितच यशस्वी होतील. मात्र तोपर्यंत तुझा प्रकोप लांबवू नकोस. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी, आमच्या पुढच्या पिढीला स्वच्छ पाणी, शुद्ध हवा मिळेल, यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. जल, जंगल आणि जमीन

याचा समतोल साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आम्ही जन्मलो तेव्हा हे जग जितके सुंदर होते, त्यापेक्षा जास्त सुंदर बनवण्यासाठी कटिबद्ध राहू. आमच्या नातवंडाना, परतवंडांनाही आजी चिऊ-काऊचा घास भरवू शकेल, यासाठी सर्व सजीवांना जगण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध राहील, याची काळजी घेऊ. निव्वळ वृक्षारोपणाचे फोटो झळकवण्यासाठी झाडे न लावता आम्ही ती जगवू… पण तू आता जा. ‘पुढच्या पिढीला जरब बसलीय’ अशी समस्त मानव जातीतर्फे नाही, पण बहुसंख्येने असणाऱ्या सामान्य जनांच्या वतीने मी तुला खात्री देतो. नाही तरी तुझे बहुतांश बळी हे सामान्य जनांचेच असतात. ही सामान्य माणसे ही ‘ॲक्टिंग’वर नाही तर ‘ॲक्शन’वर भर देत असतात. त्यांना दिखाव्यात रस नसतो. ही मंडळी निश्चितच आता निसर्गासाठी, त्याला जपण्यासाठी आधिक कृतीशील होतील.   
  
अरे, तुझ्यामुळे बालवर्ग पुन्हा घरातील खेळाकडे वळलाय. तो आता सागरगोटे, कॅरम खेळू लागला आहे. 
गाण्यांच्या आणि गावांच्या नावाच्या भेंड्या खेळतोय. पण त्यांच्या सक्षम वाढीसाठी त्यांनी बाहेरही फिरायला हवं. निसर्ग अभ्यासायला हवा. त्यांचा किलबिलाट शाळामध्ये व्हायला हवा. निसर्ग माफ करतो. अगदी ‘निसर्ग’ नाव मिळालेले वादळसुद्धा किती शहाण्यासारखे वागले. त्यामुळे मोठा विनाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण त्यांने काही झाडांचा बळी घेतला. काही पक्षी मृत्यूमुखी पडले. पण त्याच्या एकूण वागण्यातून तुझ्यामुळे अगोदरच त्रस्त झालेल्या मानव प्राण्याला त्यांनी त्रास नाही दिला. ‘निसर्ग’ नावाचे वादळ असे वागत असेल, तर मग तूही निसर्गाचाच भाग आहेस ना. स्वत:ला आवर. आम्हाला घातलेले ‘लॉक’ आता तू ‘डाऊन’ कर. तुला पुन्हा येण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही… आम्ही आमच्यात सुधारणा करू… आणि नाही सुधारलो, तर निसर्गाच्या असमतोलातच आम्ही मरू, हे कळलंय आम्हाला… तेव्हा तू जा… अगदी कायमचा!                                             

                                                निसर्गप्रेमी