मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

गरज काळजीपूर्वक अंमलबजावणीची…


नव्या शैक्षणिक धोरणावर सांगोपांग चर्चा होण्याची गरज आहे. या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये उच्च उद्दिष्ट ठेवण्यात आली आहेत. कोठारी कमिशनच्या शिफारशींची पूर्णपणे अंमलबजावणी झाली असती तर आज शिक्षण क्षेत्र वेगळ्या उंचीवर पोहोचले असते. या नव्या शैक्षणिक धोरणातील सर्व अपेक्षित परिणाम साध्य करावयाचे असतील तर त्याची अंमलबजावणी खूप काळजीपूर्वक करणे गरजचे आहे. दैनिक पुण्यनगरीच्या दिनांक ६ सप्टेंबर २०२० च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख दैनिक पुण्यनगरीच्या सौजन्याने येथे प्रसिद्ध करत आहे......                            

--------------------------------------------------------------------------------------------

  जुलैच्या अखेरीस बहुचर्चित नवे शैक्षणि‍क धोरण केंद्रीय मंत्रीमंडळाने स्व‍िकारले. कोरोनाच्या प्रभावाखाली असताना हा नवा विषय चर्चेचा बनला. तसे पाहता सर्वात महत्त्वाचे मात्र सदैव दुर्लक्षित राहणारे हे शिक्षण क्षेत्र. भारतात १९५० साली प्रथम राधाकृष्णन समितीने उच्च शिक्षणाचा विचार केला आणि नंतर १९६६ मध्ये कोठारी आयोगाचा शालेय शिक्षणावरील अहवाल आला. या दोन अहवालानंतर पुन्हा १९८६ साली शिक्षणाबाबतचे नवे धोरण स्वीकारण्यात आले. पुढे तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यात बदलही झाले. त्यानंतर २०२० मध्ये ३४ वर्षांनंतर नवे शैक्षणिक धोरण स्वीकारले जात आहे. या अहवालातील तरतुदी केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या
पुन्हा येथे सांगण्यापेक्षा हे धोरण का आणावे लागले? आणि हे राबवताना आपण काय काळजी घ्यायला हवी? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

नवे शैक्षणिक धोरण स्वीकारताना पूर्वीचे धोरण उपयोगाचे नव्हते, त्याने काहीच साध्य झाले नाही, असे म्हणता येत नाही. पूर्वीच्या शिक्षणपद्धतीतून घडलेल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांनी अणूशक्ती, अवकाश संशोधन, प्रक्षेपणास्त्र तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी, कृषी इत्यादी क्षेत्रातील संशोधन आणि तंत्रज्ञानात भारताला जागतिक पातळीवर स्थान मिळवून दिले आहे. तसेच या शिक्षण पद्धतीतून घडलेले अनेक भारतीय संशोधक, तंत्रज्ञ, अभियंते, अर्थशास्त्रज्ञ देश-विदेशात महत्त्वाच्या पदावर सेवा बजावतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, आपण जर राधाकृष्णन समिती आणि कोठारी आयोगाच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी केली असती, तर, भारतीय शिक्षणव्यवस्था आज वेगळ्या उंचीवर पोहोचली असती. आपण ते करू शकलो नाही, हे वास्तव आहे. कोठारी आयोगाच्या अहवालातही नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणेच अपेक्षा होत्या. आकलनाधारित शिक्षण पद्धती, नैतिक शिक्षणाचे महत्त्व हे पूर्वीच्या अयोगांनाही अपेक्षित होते. मात्र आपणास तशी शिक्षण पद्धती निर्माण करता आली नाही. ज्या काही संस्थांत ती निर्माण झाली, तेथे घडलेल्या बहुतांश उत्तम संशोधक, विद्वानांची पावले विदेशाकडे पडतात.

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये देशभक्ती, देशप्रेम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे आणि परदेशाकडे जाणारे तंत्रज्ञ, संशोधक आणि विद्वान भारताशी बांधील राहावेत. त्यांनी येथे त्यांचे योगदान द्यावे, या दृष्टीने शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची मानसिकता घडवणे अभिप्रेत आहे. त्यासाठी भारताची प्राचीन संस्कृती आणि दिव्य वारसा या मुलांच्या मनावर बिंबवायचा आहे. हे साध्य करताना या देशाच्या खऱ्या संस्कृतीची मुलांना ओळख होईल, याची दक्षता घ्यायला हवी. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पुष्पक विमानाचा दाखला देत आमच्याकडे विमानविद्या होती, हे सांगण्यात काहीही अर्थ नाही. भारतात धातूशास्त्र, स्थापत्यकला, आयुर्वेद प्रगत होते, हे खरे आहे. मात्र औद्योगिक क्रांतीनंतर हा केंद्रबिंदू पाश्चात्य राष्ट्राकडे गेला. आपल्या प्राचीन परंपरेतून देशप्रेम जागृत व्हावे, मात्र विज्ञान-तंत्रज्ञानाचा वृथा आभिमान नको. केवळ त्याचे गोडवे गाऊन प्रगत, ज्ञानाचे केंद्र असणारा भारत निर्माण होणार नाही. म्हणून शिक्षण क्षेत्रातील सर्व संबधित घटकांनी नवे धोरण राबवताना नव्या जगाशी जुळवून घेणारा, समतेचे मूल्य जपणारा, देशप्रेमी नागरिक घडवण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. अर्थात यासाठी शिक्षणामध्ये, नव्या धोरणात अपेक्षित असणारी सर्वसमावेशकता आणावी लागेल.

नव्या शिक्षण धोरणात आताचा १०+२ हा आराखडा बदलून तो ५+३+३+४ असा बदलला आहे. यामध्ये तीन वर्षांनतर मूल प्रत्यक्ष शिक्षणाच्या प्रवाहात येणार आहे. वय वर्ष एक नंतर मुलांवर कसे संस्कार व्हावेत, हे एनसीइआरटीई ठरवून देणार आहे. मुलांना या पद्धतीत शिक्षण देताना ते कशा पद्धतीने द्यावे लागेल, याबाबत मोठ्या प्रमाणात विचार मंथन होण्याची आणि त्यानुसार अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्याची गरज आहे. तीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद कराव्यात, असे हे धोरण सांगते. ग्रामीण भागातील अनेक मुले शहरी शाळांमध्ये जातात. त्यामुळे गावातील शाळांची पटसंख्या कमी होते. यातून मोठ्या प्रमाणात शाळा बंद होतील. त्या बंद होऊ नयेत, यासाठी या शाळांची पटसंख्या वाढवण्याचे आव्हान गांभीर्याने घ्यावे लागेल. यातील काही शाळा बंद होणे टाळता येईल. तसेच, सहावीच्या विद्यार्थ्यांने किमान एक कौशल्य आत्मसात करायला हवे, असे अपेक्षित आहे. त्यासाठी त्याने अशा व्यवसायाच्या ठिकाणी दहा दिवस पूर्णवेळ थांबायचे आहे. याची अंमलबजावणी करताना आपणास हे लक्षात घ्यावे लागेल की ग्रामीण भागात असे व्यवसाय मर्यादित आहेत. शहरी भागात असे व्यवसाय मोठ्या प्रमाणात असतात. यातून ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये फरक पडू नये, यासाठी कृती आराखडा बनवताना दक्षता घ्यावी लागणार आहे.

अकरावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे महत्त्व आज विज्ञानशाखेच्या बोर्ड परीक्षेचे आहे, तसेच राहणार आहे. आजही अभियांत्रिकी आणि वैद्यक प्रवेश हे प्रवेश परीक्षेच्या गुणावर होतात. ‘टाय’च्या वेळी बोर्डाचे गुण उपयोगी पडतात. त्यामुळे बोर्ड परीक्षा रद्द झाली, असे म्हणता येणार नाही. उलट आजवर आठवीपर्यंत बाह्य यंत्रणेकडून परीक्षा नव्हती. आता तिसरी, पाचवी आणि आठवीला विद्यार्थ्यांचे बाह्य यंत्रणेकडून मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे तीन परीक्षा वाढल्या आहेत. तसेच नववी ते बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना कोणतेही विषय निवडण्याची मोकळीक आहे. हा बदल स्विकारार्ह आहे. विद्याशाखेचे बंधन (आजच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान) नसल्याने उच्च शिक्षणासाठीचे सर्व प्रवेश, प्रवेश परीक्षेवर होणार आहेत.

उच्च शिक्षणातील आजची संलग्नित महाविद्यालयांची संकल्पना जाणार आहे. सर्व उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये आपली पदवी स्वत:च देणार आहेत. त्यामुळे सध्याच्या राज्य विद्यापीठांच्या अर्थकारणावर मोठा परिणाम संभवतो. यासाठी राज्य विद्यापीठांनी वेळीच उपाय करायला हवेत. यामध्ये विद्यार्थी संख्या वाढवणे, पदवी अभ्यासक्रम सुरू करणे, संचलित महाविद्यालये सुरू करणे अशी पावले उचलावी लागतील. आज या विद्यापीठाना महाविद्यालयांचे संलग्नीकरण शुल्क आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क यातून मोठा निधी उपलब्ध होतो. मात्र हे दोन्ही मार्ग भविष्यात बंद होणार आहेत. उच्च शिक्षणातील आजच्या संस्थांची तीन गटांत विभागणी होईल. संशोधन संस्था, अध्यापन व संशोधन करणारी विद्यापीठे आणि पदवी अध्यापन करणारी महाविद्यालये असे हे प्रकार असतील. संशोधनांसाठी भरीव तरतुदींची योजना आहे. महाविद्यालये बहुविद्याशाखीय असतील आणि तेथे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात अध्ययन करता येईल. त्यामुळे महाविद्यालयातील प्रशासनाला आपल्या महाविद्यालयात पायाभूत सुविधांसह बदल करावे लागतील.

नवे शैक्षणिक धोरण आता मंत्रीमंडळाने स्वीकारले आहे. त्याचे विधेयकात रूपांतर होऊन ते संसदेमध्ये सादर होईल. बरोबरीने ते राबवण्यासाठीचा कृती आराखडा बनवण्याचे काम सुरू झाले आहे. आपण यामध्ये सहभागी सदस्यांपर्यंत याबाबत विधायक सूचना पोहोचवायला हव्यात. त्यातूनच नव्या शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करणारी शिक्षणप्रणाली विकसित करता येऊ शकेल. त्यातूनच समानतेचे मूल्य जपणारा ज्ञानाधिष्ठित समाज असणारा भारत निर्माण होऊ शकेल. 

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

तो एक गुरू...!

 

(शिक्षक दिन विशेष-२ प्रा. शाम तथा एस.एच. कुलकर्णी सर)
आज महाविद्यालयीन शिक्षणाचा सुवर्णकाळ येतोत्यामुळे स्वप्न पाहायला पूर्ण मोकळीक असते. इथे जाणिवा समृद्ध व्हायला सुरुवात होते. या वयात चांगल्या शिक्षकांचा परिसस्पर्श झाला किंवा आपण गुरूरूपी परिसाच्या जवळ गेलो, तर आयुष्याचे सोने होते त्यासाठी शिक्षकाचा सहवास अनुभवावा लागतो. मी स्वत:ला या बाबतीत नशीबवान समजतो. मला वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या तर जवळ जाता आलेच; पण ज्यांच्या विषयाचा विद्यार्थी नव्हतो, अशा अनेक शिक्षकांच्याही सहवासाचे भाग्य लाभले. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकता आल्या. आजच्या शिक्षक दिनानिमित्त मला वर्गात कधीच शिकवणाऱ्या पण अनेक कौशल्ये शिकवणाऱ्या गुरूंचे अर्थात शाम कुलकर्णी सरांविषयी......                            

--------------------------------------------------------------------------------------------

विद्यार्थी मातीचा गोळा असतो. कुंभार जसा मातीला आकार देऊन त्यातून भांडी तयार करतो, तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. शालेय जीवनात तर शिक्षक मुलांसाठी सर्वस्व असतात. त्या वयात शिक्षकांनी सांगितलेले सारे काही खरे वाटते. आपले वडील एखाद्या विषयाचे कितीही मोठे तज्ज्ञ असले तरी मुलांना शिक्षकांनी शिकवलेली पद्धतीच योग्य वाटते. ‘आमच्या टिचरनी असे सांगितले आहे’, हे वाक्य बहुतांश पप्पा-मम्मीने ऐकलेले असते. पुढे उच्च माध्यमिकचा कालावधी, विद्यार्थी दशेतील अत्यंत कठ काळ. त्या वयात खरे तर काहीच कळत नसते. मात्र आपल्याइतके जगात कोणालाच कळत नाही, असा भ्रम असतो. तो हळूहळू कमी होत जातो. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाचा सुवर्णकाळ येतो. जबाबदारी काहीच नसते, त्यामुळे स्वप्न पाहायला पूर्ण मोकळीक असते. इथे जाणिवा समृद्ध व्हायला सुरुवात होते. या वयात चांगल्या शिक्षकांचा परिसस्पर्श झाला किंवा आपण गुरूरूपी परिसाच्या जवळ गेलो, तर आयुष्याचे सोने होते. मात्र त्यासाठी शिक्षकाचा सहवास अनुभवावा लागतो. मी स्वत:ला या बाबतीत नशीबवान समजतो. मला वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या तर जवळ जाता आलेच; पण ज्यांच्या विषयाचा विद्यार्थी नव्हतो, अशा अनेक शिक्षकांच्याही सहवासाचे भाग्य लाभले. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकता आल्या. आजच्या शिक्षक दिनानिमित्त मला वर्गात कधीच शिकवणाऱ्या पण अनेक कौशल्ये शिकवणाऱ्या गुरूंचे अर्थात शाम कुलकर्णी सरांचे स्मरण होते.


जुलै १९८६ मध्ये मी दयानंद महाविद्यालयात गेलो. पूर्वीपासून माझा ओढाग्रुपकडे होता. त्यामुळे वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांची निवड करण्याचा प्रश्नच नव्हता. त्या वेळी महाविद्यालयात एकापेक्षा एक दिग्गज शिक्षक होते. कला, साहित्य क्षेत्रातील डॉ. नरेंद्र कुंटे मराठीचे शिक्षक संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. पदार्थविज्ञानशास्त्राचे डॉ. धायगुडे सर ( http://drvnshinde.blogspot.com/2019/09/blog-post.html ) आणि धायगुडे मॅडम यांचे वर्तमानपत्रातून विज्ञान विषयावर लेख येत. गणिताच्या डी.जी. आणि एल.जी. कुलकर्णी सरांच्या शिकवण्याचा मोठा दबदबा होता. असेच वनस्पतीशास्त्राचे दोन शिक्षक होते. डॉ. प्रमोद पाटसकर आणि शाम कुलकर्णी सर. दोघे विज्ञानाचे असूनही साहित्याच्या प्रांतात मुक्त संचार करत. विद्यार्थ्याचा विषय असो किंवा नसो, सर्वांना माहित असणारे असे बरेच शिक्षक दयानंदमध्ये होते.

महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आम्ही इकडे तिकडे खूप भटकत असू. महाविद्यालयाचा परिसर मोठा. ६५ एकराच्या परिसरात विज्ञान अधिविभागासाठी स्वतंत्र इमारती होत्या. भौतिकशास्त्र, भूगोल आणि भूशास्त्र विषयाची इमारत पूर्व परिसराच्या उत्तर बाजूला होती. मध्येच शिक्षणशास्त्र महाविद्यालय. त्याला जोडून एनसीसीचे शस्त्रागार आणि त्याला बिलगून वनस्पतीशास्त्र विभाग. त्याच्यापलिकडे प्राणीशास्त्र विभाग. सर्वात दक्षिणेकडील भागात रसायनशास्त्र विभाग होता. त्याच्या डोक्यावर सूक्ष्मजीवशास्त्र विभाग. या इमारतींच्या मागे आमचे वसतीगृह होते. आमचे विषय उत्तरेच्या कोपऱ्यात विसावलेले. मात्र वसतीगृहाच्या दक्षिण द्वारातून निघून आम्ही मित्रांना सोडत भौतिकशास्त्र विभागाकडे जात असू. त्या पलिकडे आमच्या विभागातील अन्य विद्यार्थ्यांचा दक्षिण बाजूस संबंध नसे. विभागाच्या स्वतंत्र सूचनाफलकाखेरीज मुख्य सूचनाफलक पश्चिम बाजूच्या परिसरात होता. तिकडे प्राचार्यांचा कक्ष, गणित विभाग, कला विभाग विधी आणि वाणिज्य महाविद्यालये होती. एका भव्य इमारतीच्या मध्ये ग्रंथालय. ग्रंथालयाकडे जाणाऱ्या जिन्याच्या ठिकाणी तळ मजल्यावर मुख्य सूचनाफलक होता. तेथे आठवड्यातून दोन वेळा जाऊन सर्व विद्यार्थ्यांना सूचना पाहाव्या लागत. मोकळ्या जागेत रस्ता आणि झाडे भरलेली होती. या इमारतींची रचना आकाशातून प्रमाणे दिसायची. त्याचे छायाचित्र कला शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कक्षात लावलेले होते. महाविद्यालयाचा परिसर आणि एकूण वातावरण कथा कादंबऱ्यातील वर्णनाप्रमाणे रम्य होते.

प्रवेश घेतल्यानंतर प्रथमच मुख्य सूचनाफलक पाहताना, सर्वात मध्यभागी असलेल्या फलकाजवळ मी थांबलो. तेथे अक्षरमंचनावाचे हस्तलिखित भित्तीपत्रक लावलेले होते. अतिशय सुंदर पद्धतीने सजवलले आणि साहित्याने भरलेले भित्तीपत्रक पाहून मनापासून आनंद झाला. अकरावी-बारावीत असताना मी कविता करायचो. कविता म्हणून त्या किती चांगल्या, किती वाईट, हे आज काही सांगता येत नाही. कारण त्या आज माझ्याजवळ नाहीत. मात्र दोन्ही वर्षी बार्शीच्या श्री  शिवाजी महाविद्यालयाच्या नियतकालिकात त्यातील दोन कविता छापल्या गेल्या होत्या. अर्थात त्यामुळे उगाचच भविष्यातल्या महान कवीपणाची स्वप्ने त्या काळी मला पडत असत. असे त्या वयात जवळ जवळ प्रत्येकालाच वाटत असते. आपण लिहू शकतो, यापेक्षा आपले अक्षर खूप चांगले आहे, असाही माझा समज होता. ‘अक्षर चांगले आहे’, असे म्हणणाऱ्या बहुतेकांचे अक्षर खूपच खराब होते. त्यामुळे ते सापेक्षतेनुसार खरे होते. आज माझ्यापेक्षा सुंदर हस्ताक्षर असणारे अनेकजण मला माहीत आहेत. मात्र अक्षराबाबत अनेकांनी सांगितल्याने मलाही असे वाटायचे की, जगातील सर्वात चांगले हस्ताक्षर आपले आहे. अशा सर्व मानसिकतेमुळे या भित्तीपत्रकाचे- अक्षरमंचचे  काम आपण आणखी चांगले करू, असे वाटले.

अक्षरमंचच्या त्या अंकाच्या उजव्या कोपऱ्यावर मार्गदर्शक म्हणून डॉ. नरेंद्र कुंटे आणि प्रा. शाम कुलकर्णी यांची नावे होती. त्या खाली संपादक म्हणून दोन विद्यार्थ्यांची नावे होती. एका सिनियरला भेटून अक्षरमंच, कुलकर्णी सर आणि कुंटे सरांची माहिती घेतली. कुलकर्णी सर वनस्पतीशास्त्र विभागातील आहेत, ते कथा खूप छान लिहितात, त्यांचे कथाकथन तर इतके भन्नाट असते की हसून हसून पोट दुखते, असे बरेच काही समजले. नरेंद्र कुंटे सर मराठीचे होते़. कुंटे सर आणि कुलकर्णी सर कोण, ते लांबून पाहून घेतले. का माही नाही पण त्यावेळी कुंटे सरांकडे जायला भिती वाटली. त्यांचा चेहरा करारी होता. त्यांना कसे बोलावे, असा प्रश्न पडायचा. पुढे त्यांच्याशीही अनेकदा खूप चांगला संवाद झाला. पण कुलकर्णी सरांना पाहताच ते आपलेसे वाटले. त्यातच कुंटे सरांचा विभाग सकाळच्या सत्रात असायचा. शास्त्र विषयाच्या विभागांना दहा वाजता जाग येत असे. त्यामुळे मी शाम कुलकर्णी सरांना भेटायचा निर्णय घेतला.

सावळा वर्ण, मध्यम उंची, थोडे जाडसर ओठ असे मध्यम चणीचे कुलकर्णी सर वनस्पतीशास्त्र विभागाच्या शिक्षक कक्षात बसलेले होते. मी रामहरी आगलावे नावाच्या मित्रासह गेलो होतो. आम्हाला बाहेर पाहताच दरवाजाजवळ शिपायानेकाय आहे?’ असे विचारले. मी सांगितले,कुलकर्णी सरांना भेटायचे आहे.त्याने सरांना निरोप देताच ते लगेच उठून बाहेर आले. ‘आपल्याकडे आलेल्या मुलांचा वेळ जाऊ नये आणि इतर शिक्षकांना त्रास होऊ नये,म्हणून ते नेहमी असे करत, हे नंतर आमच्या लक्षात आले. हा माझ्यावर झालेला पहिला संस्कार होता. मी आजही मला भेटायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीच ताकळत ठेवत नाही. अगदी कुलसचिवपदी कार्य करत असतानाही हे कटाक्षाने पाळले. सर आम्हाला प्रयोगशाळेत घेऊन गेले आणिहं बोला, काय काम आहे’, असे विचारले. मी माझा परिचय करून दिला आणि अक्षरमंचचे काम करायचे असल्याचे सांगितले. सरांनी विचारले, ‘काय लिहिता?’ मी महान कवी असल्याच्या विर्भावात सांगितले, ‘कविता करतो.आमच्या मित्राने पुढे सांगितले, ‘सर, त्याचे अक्षर खूप चांगले आहे.अक्षर चांगले आहे आणि कविता करतो म्हटल्यावर सरांनी परीक्षा घ्यायचे ठरवले असावे.

सर पुन्हा शिक्षक कक्षात गेले आणि एक लेख घेऊन आले. मागच्या वर्षीच्या कुठल्या तरी मुलाने दिलेला, वापरलेला लेख होता तो. दोन कागदही दिले. त्या कागदावर तो व्यवस्थित लिहून आणि सजवून आणायला सांगितले. मी रात्री लगेच रंगीत पेन, स्केच पेन वापरून त्याला जास्तीत जास्त आकर्षक वाटेल, असे सजवले. तो घेऊन दुसऱ्या दिवशी सरांना शोधू लागलो. त्या दिवशी सर आले नव्हते. मला ते कधी एकदा सरांना दाखवेन, असे झाले होते. मात्र एक दिवस प्रतीक्षा करावी लागणार होती. तिसऱ्या दिवशी सरांना भेटलो. ते दाखवले. सरांनी प्रथम अक्षर चांगले असल्याचे सांगितले. नंतर डिजाइनचासेन्चांगला असल्याबद्दल कौतुक केले. नंतर मला स्टूलवर बसायला सांगितले आणि ड्रॉवरमधून स्केचपेन काढून कोऱ्या कागदावर मी जसे लिहिले होते, तसेच मात्र वेगळ्या रंगाच्या पेनने लिहिले. म्हणाले, ‘तू जी रंगांची संगती लावली ती आणि आता मी काढताना वापरलेली रंगसंगती यातील डोळ्यांना चांगली कोणती चांगली वाटते ते पाहा’. अर्थातच सरांनी केलेली रंगसंगती धिक नेत्रसुखद होती. सर पुढे म्हणाले, ‘आता रंगांची अशी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स तयार करून समोर ठेवायची आणि दुसऱ्याच कोणीतरी काढली आहेत, असे समजून त्यातील कोणते चांगले वाटते, ते आपणच ठरवायचे. आपण आपल्याच गोष्टीकडे तटस्थपणे पाहायला लागलो, की आपल्या चुका आपल्याला कळतात. स्वतःत सुधारणा करू शकतो. तेव्हा आपली कला इतरांपुढे सादर करण्यापूर्वी आपण तटस्थपणे त्याकडे पाहायलाशिकले पाहिजे.हा कुलकर्णी सरांचा महत्त्वाचा संदेश मला अनेक टप्प्यांवर आठवतो आणि प्रशासकीय जीवनातही उपयोगी पडतो.

त्यानंतर नरेंद्र आंभोरे यांच्यासमवेत अक्षरमंचसंपादनाची जबाबदारी १९८६ मध्येच माझ्यावर सोपवली गेली. पुढची दोन वर्षे मी सिनियर झालो. इतर विद्यार्थ्यांनी मला साथ दिली. पहिला अंक कधी निघेल, असे मला झाले होते. तो काढला आणि सर्वांना आवडलाही. त्यानंतर त्या महिन्यात कोणाची पुण्यतिथी आहे, कोणाची जयंती आहे. महिन्याभरात कोणती महत्त्वाची घटना घडली आहे, या सर्व गोष्टींचा आढावा घेणे, लिहित्या मुलांंकडून लेख मागवायचे, त्यासाठीच्या सूचना लावायच्या, आलेल्या लेखांची छाननी करून आपल्या मतासह कुलकर्णी सरांना दाखवायची. हे सलग तीन वर्षे केले. अक्षरमंच आपण एकटे पाहात नाही, तर कुंटे सरही त्याचे भाग आहेत, हे कुलकर्णी सर कधीच विसरत नसत. सर्व लेख आणि आम्हाला घेऊन ते कुंटे सरांकडे जात. त्यांच्याकडून सर्व लेखांची, कवितांची आणि छायाचित्रांची निवड अंतिम करून घेत. कुंटे सर त्या लेखातील व्याकरणाच्या चुका आणि अपवादात्मक परिस्थितीत शब्द दुरूस्ती करून देत. त्याबरहुकूम लिहावे लागत असे. अध्यापन, संशोधन किंवा इतर बाबी सांभाळत त्यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत असे. ‘वेळ नाहीहे वाक्य या शिक्षकद्वयांकडून आम्हाला कधीच ऐकायला मिळाले नाही.

अनेकदा कामासाठीचे ड्रॉइंगशिट मिळायचे नाही, कधी स्केचपेन संपत, अशा वेळी कुलकर्णी सर खिशातील पैसे काढून देत. आम्हाला वाटायचे, याचे त्यांना ऑफिसकडून पैसे मिळत असतील. मात्र पुढे माहीत झाले की ती सरांची पदरमोड होती. कारण अशा खरेदीचे बिल त्यांनी मच्याकडे कधीच मागितले नाही आणि बिल नसेल तर कोणतेही कार्यालय पैसे दा करत नाही. दर महिन्याला एक अंक निघावा, असा त्यांचा कटाक्ष असे आणि त्यासाठी त्यांनी केलेली ती पदरमोड असे.  

आमच्याकडून उशी झाला की त्यांचा निरोप आलाच म्हणून समजायचे. स्वत: कलाक्षेत्रात रमणारे असूनही विलंब त्यांना चालत नसे. अक्षरमंचचा अंक तयार झाला की, प्रथम तो कुलकर्णी सरांना दाखवला जात असे. त्यामध्ये काही चुका आहेत का, हे ते तपासून पाहात. त्यानंतर तो कुंटे सरांना दाखवला जात असे. कुंटे सरांनीठी आहे’, म्हटल्यावर तो सूचनाफलकावर लावला जाई. १९८८ मध्ये एक अंक असाच दाखवला. अगोदर फायनल केलेले सर्व लेख आणि कविता लिहिल्यानंतर थोडी जागा शिल्लक राहिली होती. त्या जागेवर अंतिम निवडीत नसणारी एक छोटी कविता मी लिहिली. कुलकर्णी सरांच्या ते लगेच  लक्षात आले. त्यांनी तो अंक पुन्हा लिहायला लावला. तसेच पुन्हा असे करायचे नाही’, हे निक्षून सांगितले. आपण सर्वजण मिळून काम करत असताना सर्वांनी मिळून निर्णय घेतल्यानंतर तो कधीही एकट्याने बदलायचा नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच बदल केला पाहिजे, हा धडा त्यावेळी रागावता दिला. प्रशासनात आल्यानंतर या गोष्टीचाही मला खूप फायदा झाला.

लेखांची निवड कशी करायची, त्यांचे संपादन कसे करायचे, हे सर्व सरांसोबत काम करताना हळूहळू लक्षात ये लागले. लेखनात सुधारणा करताना मूळ लेखकाच्या मताचा पूर्ण सन्मान झाला पाहिजे, या गोष्टींची जाणी झाली. महाविद्यालयाच्या भित्तीपत्रकात प्रसिद्ध होणाऱ्या लेखातील मते सकारात्मक असावीत, त्यात विखारीपणा नसावा, भाषा ही बोलीभाषा असली तरी ती त्याबरहुकुम असावी, अशा अनेक गोष्टी सर सांगत. ‘अक्षरमंचत्या काळात खूपच चर्चेत आला. त्यावेळी तरूण भारत (सोलापूर) हे दैनिक दर बुधवारीमध्यमानावाची खास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी प्रकाशित करत असे. ‘अक्षरमंचच्या कामामुळे मध्यमा पुरवणीचे काम मला मिळाले. त्या निमित्ताने तरूण भारतमध्ये जाऊ लागलो. विवेक घळसासी सर त्यावेळी संपादक होते. त्यांना सुरुवातीला लांबून पाहात असे. मात्र नंतर त्यांच्याशी संवाद सुरु झाला. पुढे विज्ञान दिन पुरवणीमुळे स्नेह आणखी दृढ झाला. ‘केसरीमध्ये आमचे मित्र अरूण लोहकरे होते. त्यामुळे १९८६ पासून मी अधूनमधून वृत्तपत्रातून लिहू लागलो. विद्यार्थी दशेतील सर्व लेख डॉ. धायगुडे सरांच्या मार्गदर्शनाखाली लिहायचो. प्रसिद्ध झालेल्या लेखांवर शाम कुलकर्णी सरांची आवर्जून प्रतिक्रिया असायची. त्या काळात सारे काही उत्साहाच्या भरात चाललेले असायचे. या उत्साहात होणारी चूक सांगायला व सुधारायला शाम कुलकर्णी सर असायचे. रामानुजन यांच्यावर मीगणितातील अढळ ध्रुव रामानुजननावाचा लेख केसरी लिहिला. त्यावेळी भेटल्यानंतर कुलकर्णी सरांनी प्रथम लेखाचे कौतुक केले. नंतर म्हणाले, ‘शीर्षकात मात्र चूक झाली. अरे ध्रुव अढळच आहे. हे शीर्षक गणितातील ध्रुव रामानुजनएवढेच हवे होते. अशा चुका टाळल्या पाहिजेत. ‘अक्षरमंचच्या संपादकाकडून अशा चुका अपेक्षित नाहीत.तेव्हापासून शीर्षक लिहिताना खूप विचार करू लागलो. अनेकदा शीर्षक अगोदर तयार असते. तरीही आजदेखील महत्त्वाच्या लेखांचे शीर्षक जवळच्या मित्रांशी चर्चा करून अंतिम करतो. अशा अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून सरांनी कळत-नकळत माझ्यावर अनेक संस्कार केले. त्यातून लेखन कला विकसि व्हायला मदत झाली. त्यामुळे डॉ. धायगुडे सर आणि मॅडम यांच्याप्रमाणेच शाम कुलकर्णी सरही लेखन संस्काराबाबत माझ्यासाठी गुरूस्थानी आहेत आणि अखेरपर्यंत राहतील. महाविद्यालयात विविध निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजित होत. त्यामध्ये मीच नव्हे, तर कोणत्याही विद्यार्थ्याला बक्षीस मिळाले की सर आवर्जून कौतुक रून प्रोत्साहन देत.

सर, कथाकथन खूप छान करायचे. पु.. देशपांडे, .पु. काळे यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या कार्यक्रमाचे मुक्तपणे कौतुक केले होते. कितीही विनोदी प्रसंग असला तरी चेहऱ्यावर हास्य दिसू देता सहजपणे ते सांगत आणि श्रोत्यांना खळखळून हसवत. दरवर्षी वसतीगृहात त्यांचा एक कार्यक्रम आवर्जून होत असे. त्यावेळी वसतीगृहातील हॉल तुडुंब भरलेला असे. सोलापुरात नोकरी करणाऱ्या कुलकर्णी सरांनी हुबळी, जालना, लातूर, पाटण, लांजा, निपाणी, इचलकरंजी अशा अनेक ठिकाणी शंभरावर प्रयोग केले होते. ‘रसिका आवडे विनोदहा त्यांचा कार्यक्रम से, तेव्हा तर श्रोत्यांची तोबा गर्दी हो. हे कौशल्य त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून विकसि केले होते.

सरांचे शिकवणेही खूपच चांगले होते. वनस्पतीशास्त्राचे शिक्षक म्हणून पानांची हिरवाई त्यांनी पूर्ण आत्मसात केली होती. त्यांचे दर्शनच मनाला प्रसन्न करणारे होते. त्यांचे वर्गातील शिकवणे हे रंजक किश्श्यांनी आणि खुमासदार शैलीने भरलेले असायचे, असे आमच्या बॅचचे वनस्पतीशास्त्र विषयाचे विद्यार्थी मित्र सांगायचे. मलाही त्यामुळे आपण सरांचे विद्यार्थी असायला हवे होते, असे वाटायचे. त्यांच्याकडे फक्त पानांचा हिरवटपणा नव्हता, तर, फुलांच्या पाकळ्यांची कोमलताही होती. त्यामुळे त्यांचे बोलणे कोणाला दुखावत नसे. महाविद्यालयात ते एखाद्या टपोऱ्या गुलाबासारखे असायचे. मात्र एवढ्या गोड आणि विद्यार्थीप्रिय सरांना मधुमेहासारखा एक काटा (ज्ञात) जोडला गेला होता. त्यांच्या गोड खाण्यावर बंदी होती. मात्र घरापर्यंत पोहोचणारे कोणी नसले की ते कधी-कधी गोड खात. ‘मधुमेहाला एवढे चालते रे,असे म्हणत. त्यांना आणखी एक कला अवगत होती. विद्यार्थ्याचा चेहरा वाचून तो अडचणीत आहे, हे सर ओळखायचे. प्रयोगशाळेत बोलावून त्याची अडचण समजून घेऊन आपल्या परीने मदत करायचे. त्यांनी केलेली मदत कधी कोणाला कळत नसे.

शाम कुलकर्णी सर म्हणजे चैतन्याचा झरा होते. त्यांच्या घरी कधी जाण्याचा योग आला नाही. आमचा संबंध महाविद्यालयामध्येच येत राहिला. त्यामुळे मला त्यांची इतर कौटुंबिक माहिती नाही. पदवीनंतर आमचे कॉलेज संपले. विद्यापीठात एम.एस्सी. करत असताना १९९१ मध्ये सरांचे निधन झाल्याचे समजले. काही दिवसांनी डॉ. नरेंद्र कुंटे सरांनी त्यांच्यावरउत्साहसूर्य अवेळीच अस्ताला गेलाया शीर्षकाचा ३० जानेवारीच्या दैनिकात लिहिलेला लेख वाचायला मिळाला. त्यामध्ये कुंटे सरांनी त्यांच्याविषयी खूप हळवेपणाने लिहिले आहे. त्यातील एक प्रसंग येथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. साताऱ्याला वसंत व्याख्यानमालेत कुंटे सरांचे व्याख्यान होते. व्याख्यानानंतर कुलकर्णी सर त्यांना भेटले. त्यावेळी ते प्रात्यक्षिक परीक्षेचे परीक्षक म्हणून साताऱ्याला गेले होते. व्याख्यानाचा फलक पाहून ते व्याख्यानाला उपस्थित होते. कुंटे सरांनी व्याख्यानाअगोदर का भेटला नाहीत, असे विचारले. त्यावर कुलकर्णी सरांनी सांगितले, ‘अनोळखी श्रोत्यांपुढे व्याख्यान अधिक रंगते, म्हणून नाही भेटलो.स्वत: अनेक कार्यक्रमात श्रोत्यांना खिळवून ठेवणारे कुलकर्णी सर इतरांच्या सादरीकरणाची अशी काळजी घेत. ते स्वत: उत्कृष्ट कलावंत तर होतेच; पण, चांगले रसिकही होते. त्यामुळेच वक्ता जवळचा मित्र असूनही त्याच्या सादरीकरणाची काळजी त्यांनी घेतली.

मोठेपणा आव बाळगणारे, चांगल्याचे कौतुक करणारे, चु हळूवार निदर्शनास आणणारे, अचूकतेचा आग्रह धरणारे, विद्यार्थ्यांचा उत्साह टिकून राहावा म्हणून पदरमोड करणारे, इतरांचा सन्मान कसा जपावा, याचा नकळत संस्कार करणारे, स्वत:चे दु: झाकून इतरांना खळाळून हसवणारे, अडचणीच्या प्रसंगही विद्यार्थ्यांच्या मदतीला धावणारेकुलकर्णी सर. सरांनी प्रत्यक्ष वर्गात फळ्यावर पानाफुलांच्या आकृत्या काढायला आणि रेषा मारायला मला कधी शिकवले नाही. मात्र साहित्य समजून घ्यायला, त्यातील चुका शोधायला, स्वत:चे लेखन स्वत: तपासायला, रंगसंगती निवडायला शिकवले. लौकिकार्थाने माझे थेट शिक्षक नसणाऱ्या मात्र प्रत्यक्ष जीवनात अनेक गोष्टी शिकवणाऱ्या, अवेळीच अस्ताला गेलेल्या या सच्च्या गुरूला शिक्षक दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!