बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८

मनोगत : असे घडले...भारतीय शास्त्रज्ञ

                                        
 (दिनांक २८ फेब्रुवारी हा दिवस १९८६ पासून आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करायला सुरूवात केली. या निमित्ताने माझे 'असे घडले... भारतीय शास्त्रज्ञ' हे पुस्तक आज डॉ. पी.पी. वडगावकर, वैज्ञानिक, राष्ट्रीय रासायनीक प्रयोगशाळा पुणे यांचे हस्ते आणि प्रा. डी.टी. शिर्के यांचे अध्यक्षतेखाली होत आहे. रसायनशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमामध्ये हे प्रकाशन झाले आहे. सदर पुस्तकातील मनोगत आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
----------------------------------------------------------------------------------------------
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही सी-36) या भारतीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने 104 उपग्रह एकाचवेळी अंतराळात सोडले. पीएसएलव्ही या श्रेणीतील उपग्रहाचे अशा प्रक्षेपकाद्वारे भारतातील सदतिसावे प्रक्षेपण होते. हे प्रक्षेपण 15 फेब्रुवारी, 2017 रोजी भारतातील श्रीहरीकोटा केंद्रावरून यशस्वीरित्या पार पडले. पीएसएलव्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचा प्रक्षेपक आहे. या प्रक्षेपणाद्वारे 101 परदेशी आणि तीन भारतीय असे एकूण 104 उपग्रह अंतराळात यशस्वीरित्या सोडण्यात आले. परदेशी 101 उपग्रहात अमेरिकाचे 96 तसेच इस्त्राईल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरात या देशांच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा आणि भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश होता. भारताने पृथ्वी निरिक्षण कार्यक्रम किंवा रिमोट सेन्सींग सॅटेलाईट मालिकेतील कार्टोसॅट-2 श्रेणीतील कार्टोसॅट-2-डी हा 730 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह पाठविला. तसेच आय.एन.एस. 1-, आय.एन.एस. 1-बी या प्रत्येकी 30 किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहांचा यात समावेश होता.
या घटनेने भारताबाबत नवा इतिहास लिहिला गेला, कारण हा एक प्रक्षेपकाच्या सहाय्याने एवढ्या मोठ्या संख्येने उपग्रह पाठवण्याचा जागतिक विक्रम होता. यापूर्वी एकाच प्रक्षेपकाच्या सहाय्याने जास्तीत जास्त उपग्रह पाठवण्याचा विक्रम रशियाच्या नावावर होता. 2014 मध्ये रशियाने एकाच वेळी 37 उपग्रह अंतराळात पाठविले होते. त्या खालोखाल अमेरिकेच्या नासाने एकाच वेळी 29 उपग्रह अवकाशात सोडले होते. तर आपल्या इस्त्रोने एकाचवेळी 20 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते. या घटनेची जगभरातील सर्व वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात दखल घेतली. वॉल स्ट्रीट जर्नलने "इंडीयाज रेकॉर्ड ब्रकिंग लाँच" या शब्दात मोठे वृत्त प्रसिद्ध केले. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असणाऱ्या देशाचे उपग्रह प्रक्षेपण भारत करतो आणि मोठी रक्कम उभी करतो, ही भारताच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे.
मात्र हे यश असे एका रात्रीत मिळालेले नाही. या यशामागे अनेकांचे कष्ट आहेत. भारताला फार
मोठी परंपरा आहे. येथील विज्ञान फार प्रगत आहे. आम्ही हे करायचो आणि ते करत होतो. हा वाद ही चर्चा आजच्या युगात महत्वाची नाही. कारण अशा प्रगत आणि संपन्न राष्ट्रावर दिडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले. गोव्यासारखा प्रांप्त भारताच्या स्वातंत्र्यानंतरही काही वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. अर्थात इंग्रज आणि युरोपियन लोकांना भारत आणि जगातील अन्य राष्ट्रात सत्ता काबीज करताना त्यांना सर्वात सहाय्यकारी ठरली ती त्यांच्याकडील शस्त्रे. विज्ञानाच्या प्रगतीसोबत तंत्रज्ञान निर्मिती आणि अशा वस्तुंचे औद्योगिक उत्पादन घेण्यात युरोपियन राष्ट्रानी आघाडी घेतली. त्यामुळे अधिक हानिकारक शस्त्रांची निर्मिती होत गेली आणि राजकिय इच्छाशक्तीला शस्त्रांची जोड मिळताच जगभर अशा वसाहती निर्माण होत गेल्या. हा पारतंत्राचा अंध:कार दूर व्हायला दिडशे वर्ष जावी लागली.
देश स्वतंत्र झाला त्यावेळी या देशाची गणना एक मागास देशात करण्यात येत होती. काळी जादू करणाऱ्यांचा, अंधश्रद्धाळूंचा आणि साप-गारूड्यांचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाई. आर्थिक दृष्ट्या भारताची मोठ्या प्रमाणात लूट झाली होती. नैसर्गिक साधन संपत्ती आणि अल्पशिक्षित समाज यातून या देशाला पुन्हा उभा करायचे होते. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढ्यासोबत अनेक विचारवंत वैज्ञानिकांनी देश उभा करण्यासाठी विज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे, हे ओळखून संशोधनावर लक्ष केंद्रीत केले. याचे केंद्र हे जरी कलकत्ता होते, तरी देशाच्या विविध भागातील वैज्ञानिकांचा सहभाग होता.
 एखादा देश जेव्हा प्रबळ होतो किंवा जगाच्या नेतृत्वाचा दावेदार बनू पाहतो, तेव्हा त्या राष्ट्राने
त्यापूर्वीची काही वर्षे त्या त्या क्षेत्रात उदारमतवादाचे आणि सर्व समावेशकतेचे धोरण स्विकारत एकजूटीने काम केलेले असते. त्यातून त्या देशाचा त्या क्षेत्रातील पाया भक्कम होतो आणि त्यावर त्या राष्ट्रांची ताकत निर्माण होते. भारत देशाच्या त्या त्या क्षेत्रातील तत्कालीन धुरीणांनी देशाच्या कानाकोपऱ्यातील विज्ञान क्षेत्रात योगदान देऊन इच्छिणाऱ्या युवकांना सामावून घेतले आणि या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. भारत आज अवकाश संशोधन क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त झालेला देश आहे. भारताला अन्नधान्याची टंचाई ही काही नवी गोष्ट नव्हती. अवकाश संशोधन, अणुशक्ती, कृषी अशा विविध क्षेत्रात भारताची होत असलेली प्रगती ही अत्यंत अभिमानास्पद आहे. मात्र हे यश केवळ चमत्कार नाही किंवा एका रात्रीत प्राप्त करता आलेले नाही. विविध क्षेत्रात भारताला अग्रेसर बनवण्यासाठी पाया रचणारे अनेक मातब्बर संशोधक मंडळही या देशात होऊन गेले. त्यांनी त्या त्या क्षेत्रात भरीव योगदान दिले. भारताच्या या विश्वविक्रमी प्रक्षेपणाबाबतचे वृत्त वाचत असताना मला हे प्रकर्षाने जाणवले आणि माझ्या डोळ्यासमोर गतकालातील अनेक वैज्ञानिकांची नावे येवू लागली.
स्वातंत्र्यपूर्व काळात 1930 मध्ये बंगाल प्रांतात भीषण दुष्काळ पडला. लाखो लोकांचे यात प्राण गेले. हे भूकबळी पाहून डॉक्टर न होता, कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे एम.एस.स्वामीनाथन, भारतातील युवकांना काम देण्यासाठी उद्योगधंदे उभे करणे आवश्यक असल्याचे ओळखून रसायन उद्योगांची उभारणी करणारे प्रफुल्लचंद्र रॉय, वनस्पतींना भावना असतात, त्यांनाही विषबाधा होऊ शकते, असे सांगणारे जगदिशचंद्र बोस, भारताला नोबेल पारितोषिक मिळवून देणारे आणि रमण परिमाण शोधणार सी. वी. रमण अशी अनेक नावे समोर आली.
ऑक्टोबर, 2015 मध्ये कोल्हापूर आकाशवाणीच्या प्रविण चिपळूणकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून भारतीय संशोधकांच्या जीवन कार्यावर मालिका लिहिण्यास भाग पाडले होते. त्यामुळे या सर्व वैज्ञानिकांचे जीवन आणि कार्य संक्षिप्त रूपात का होईना विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविणे आवश्यक आहे, असे वाटू लागले. भारताचा एडिसन म्हणून अमेरिकेने ज्या शंकर आबाजी भिसे यांचा गौरव केला त्यांचे नाव तरूण पिढीपर्यंत अपवादानेच जाते. म्हणून या व्याख्यानासाठी लिहिलेल्या मसुद्यांचे रूपांतर चरित्रात्मक लेखात करावे असे वाटू लागले. या पुस्तकात निवडलेल्या संशोधकांची निवड करताना भिन्न क्षेत्रातील संशोधकांचा समावेश करणे, हा उद्देश होता. त्यांचा क्रम हा त्यांच्या जन्म तारखेनुसार घेण्यात आला अाहे आणि बऱ्याच व्यक्तींनी भारतीय संशोधन कार्याने समृद्ध केले आहे. या सर्वांचा समावेश‍ याठिकाणी करणे शक्य झाले नसले तरी मला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे.
माझ्या एककांचे मानकरी या पहिल्या पुस्तकास वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असे घडले भारतीय वैज्ञानिक" हे पुस्तकही वाचकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.

        असे घडले...भारतीय शास्त्रज्ञ
प्रकाशक अक्षर दालन
लेखक डॉ.व्ही.एन.शिंदे
पृष्ठसंख्या - 105
किंमत रू. 150/-

सदर पुस्तक खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
अक्षर दालन,
2141, बी वॉर्ड,
मंगळवार पेठ, कोल्हापूर
संपर्क क्रमांक : 0231 2646424.

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

या... हो... दूधकट्ट्याची साद

         
 (कोल्हापूर एक वेगळेचं गाव आहे. कोल्हापूरच्या प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा आहे. हा वेगळेपणा खाण्यापिण्यातही आहे. झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, मिसळ, बटाटेवडा, भेळ प्रसिद्ध आहेतच, पण त्यापेक्षाही वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे दुधाची, म्हणजे दुधकट्ट्यांची. येथे घुमणारी 'है या...' ही साद कोल्हापूरकराना साद घालत आहे. कोल्हापूर पुण्यनगरीच्या वर्धापन  दिन पुरवणीमध्ये दि. १९ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला दूध कट्टा या विषयावरील लेख आपल्यासाठी येथे प्रकाशीत करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)
-------------------------------------------------------------------------------------
पिण्यासाठी दूध विकणारे ठेले किंवा दुकाने अनेक शहरात आहेत. सोलापूरला नवी पेठमध्ये रस्त्यावर दूध उकळत बसलेले दुकानदार, गरमागरम दूध विकतात. थोडीशी साखर आणि बदाम-पिस्त्याचे तुकडे घातलेले दूध, थंडीच्या दिवसात पिताना एक वेगळाच आनंद मिळतो. पुण्यात कोजागिरीचे दूध असते तसे आटवलेले मसाला दूध मिळते. मुंबईत एकाच ठिकाणी मसाला दूध, ड्रायफ्रुटचे तुकडे घातलेले दूध आणि फक्त साखर घातलेले दूध ग्राहकांच्या इच्छेनुसार प्यायला मिळते. नागपूरलाही दुधाची विक्री करणारी मंडळी रस्त्यावर दूध तापवत बसलेली असतात.
मात्र, रस्त‌्याकडेला प्रत्यक्ष्‍ा म्हैस बांधून, तुमच्यासमोर काढलेले दूध ग्लासमध्ये भरून, प्यायला देणारे फक्त कोल्हापूरातच भेटतात. कोल्हापूरात धारोष्ण दूध प्यायला मिळते. अशा पद्धतीने फक्त कोल्हापूरातच दूध पिता येते आणि अशा या ठिकाणांना "दूधकट्टा" म्हणतात. कोल्हापूरात असे एकूण सहा दूधकट्टे आहेत. कोल्हापूरचे पैलवान पूर्वी प्रसिद्ध होते. मल्लविद्या शिकण्यासाठी अन्य राज्यांतून पैलवान येत असत. या मल्लांच्या आहारातील महत्वाचा घटक म्हणजे दूध. या भागाला निसर्गाची साथ असल्याने पशुपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी अनुकूल परिस्थिती. त्यात मल्लविद्येमुळे ग्राहकही चांगला. या मल्लांना सहज, चांगले दूध उपलब्ध व्हावे, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी दगडी बांधकाम करून दूध कट्ट्यांची निर्मिती केली.
गंगावेस, मिरजकर तिकटी, महानगरपालिकेजवळ, शिवाजी पुतळा, पापाची तिकटी, शिवाजी पेठेमध्ये बलभीम बँकेजवळ आणि बीटी कॉलेजजवळ हे दूधकट्टे आहेत. या सर्व कट्ट्यांचे बांधकाम दगडांच्या सहाय्याने करण्यात आले आहे. या ठिकाणी गवळी किंवा म्हशीचे मालक आपली दुभती जनावरे घेऊन येतात. त्यांना त्या ठिकाणी चारा दिला जातो.
जनावरांचे दूध काढणे हे मोठ्या कौशल्याचे काम आहे. उघड्या जागेत दूध काढण्यासाठी त्या जनावरांचा विश्वास संपादन करावा लागतो. या सहा कट्ट्यांवर दररोज तीनशे ते साडेतीनशे म्हशी आणल्या जातात. पूर्वी हा आकडा हजारात होता. पापाची तिकटी वगळता इतर कट्ट्यांवर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस हा व्यवसाय चालतो. म्हशी आणणे, त्यांना चारा घालणे, त्यांचे दूध काढणे, गिऱ्हाईकांना दूध देणे, त्यांचे पैसे घेणे, त्यांचे शेण वेळी काढून स्वच्छता करणे, हे सर्व करण्यासाठी किमान दोन माणसांची गरज असते. आज साठ ते सत्तर रूपये लिटर दराने या ठिकाणी दुधाची विक्री होते.
या दूधकट्ट्यामुळे पैलवानांना शुद्ध आणि ताजे दूध उपलब्ध होते. मल्लाप्रमाणे काही नागरिकही त्याठिकाणी शुद्ध‍ दुधाचा आस्वाद घेतात. काहीजण दररोज त्या ठिकाणी जाऊन घरगुती वापरासाठी दूध घेऊन येतात. आरोग्यासाठीची जागरूकता या ठिकाणी येणाऱ्या गिऱ्हाईकांमध्ये जाणवते. एका म्हशीचे दूध पिण्यासाठी दहा ते पंधराजणांना पुरते. या दुधाचे माप घालताना ते अंदाजे वीस टक्के कमी भरते, कारण या धारोष्ण दुधामध्येे फेस तयार झालेला असतो. ग्राहकालाही हे माहित असते. त्या फेसासह दुधाचा दर ठरलेला असतो आणि ग्राहक तो दर गुणवत्तेची हमी असल्याने आनंदाने द्यायला तयार असतो.
मात्र कोल्हापूरच्या दूध कट्ट‌यांची संस्कृती नष्ट होते की काय ? अशी भीती वाटते. या व्यवसायात पुढे उतरायला तरूण पिढी तयार नाही. शहरात म्हशीसारखे प्राणी पाळणे आणि त्यांचे उत्तम संगोपन करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येने आणखी समस्या निर्माण होत आहेत. दुधाचा हा व्यवसाय प्रतिष्ठेचा मानायला तरूण पिढीतील अनेकजण तयार नाहीत. ग्राहक मात्र या व्यवसायाबद्दल आणि त्याठिकाणी मिळणाऱ्या दुधाच्या दर्जाबाबत पूर्ण समाधानी दिसतात. पूर्वी हा व्यवसाय सकाळी सहा-सात तास चालत असे. आता तो वेळही कमी होत चालला आहे. ग्राहकांच्या आणि दूध विक्रेत्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. दूधवाला, म्हशी आणि ग्राहकांत एक नाते निर्माण झालेले असते. कांही म्हशी तर सवयीचे गिऱ्हाइक दिसताचं पान्हा सोडतात.  या व्यवसायात सुट्टी नाही, रजा नाही, आदर नाही, प्रतिष्ठा नाही, म्हणावा तसा पैसा नाही, मात्र अतूट प्रेमाचे नाते जुळले गेले आहे आणि हे नातेच या व्यवसायाला टिकवून ठेवणारे मुख्य कारण आहे. या व्यवसायात त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. दुधाचा दर, कमी नफा आणि समाजात प्रतिष्ठा नाही, असा समज, यामुळे अनेक दूध विक्रेते काही दिवसांत हा व्यवसाय बंद करण्याचा विचार बोलून दाखवतात.
म्हशींची किंमत, तिला द्यावा लागणारा चारा, खुराक, निगा राखण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ या सर्वांचा विचार करता दूध विक्रीतून मिळणारे पैसे हे तोंडमिळवणी करणारे ठरतात. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या दूध विक्रेत्यांचे म्हणणे पटते. डॉ..एम. गुरव या शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य विभागातील प्राध्यापक महोदयानी दूधकट्टा या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी प्रत्यक्ष दूध विक्रत्यांशी ग्राहकांशी २०१२ मध्ये संवाद साधून आपले निष्कर्ष काढले आणि या व्यवसायात व्यावसायिक दृष्टीने नफा मिळत नसल्याचे सिद्ध केले आहे.

तरीही दूधकट्टा संस्कृती कोल्हापूरने टिकवून ठेवली आहे. परवाच या लेखाच्या निमित्ताने मी प्रत्यक्ष दूधकट्ट्याला भेट दिली. आजही रू.६०/- प्रति लिटर दराने दूधाची विक्री होत आहे. हा व्यवसाय कोल्हापूरची पाऊलखूण म्हणून टिकून राहणे गरजेचे आहे. नियमित दूध कट्ट्याला भेट देणारे ५० टक्के ग्राहक आहेत. उर्वरित ५० टक्के ग्राहक नवे असतात. मात्र दूध कट्ट्याला भेट देऊन तेथील धारोष्ण, भेसळमुक्त फेसाळलेले दूध पिण्यात मिळणारा आनंद वेगळा आहे. तरूण पिढीने या दूधकट्टयाकडे पावले वळवायला हवीत. पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ खाल्ल्यावर, कोल्ड्रींकसारखे शरीराला हानी पोहोचवणारे पेय प्राशन करण्यापेक्षा दहा रूपयात शरीराला पोषणमूल्य देणारे दूध प्यायला सुरूवात केली, तर हा व्यवसाय निश्चितच ऊर्जितावस्थेत येईल आणि कोल्हापूरची ही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जतन होईल, यात शंका नाही.