शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

नरसिंहा, मित्रा, जायची घाई केलीस...



(शिवाजी विद्यापीठातील संगीतशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. एन.व्ही. चिटणीस यांचे रात्री निधन झाले. एक जिंदादिल माणूस. मैत्रीच्य एका वेगळ्या उंचीवर दिसणारा. त्यांचे निधन मनाला चटका लावणारे. त्याना भावपूर्ण श्रद्धांजली... व्ही. एन. शिंदे)                                 
--------------------------------------------------------------------------------------------
         
       डॉ. एन.व्ही. तथा नरसिंह चिटणीस सर. संगीतशास्त्र अधिविभागप्रमुख. वयाने आमच्यापेक्षा नऊ -दहा वर्षनी मोठे. वयाची बंधनं कधीच विसरलेले. प्रशासनातील लोकात मिसळलेले. मी २००३ मध्ये सोलापूरहून आलो आणि या माणसाशी कधी जोडला गेलो कळलेच नाही. ओळख झाली आणि नकळत मैत्रीत रूपांतर झाले. आम्ही आमची मैत्री घरापर्यंत नाही नेली. कार्यालयापुरतीचं ठेवली. मात्र त्यात ओलावा होता. एकमेकाला समजून घेणारा हा माणूस होता. काही सल्ले देणारे, माहिती देणारे हे व्यक्तीमत्त्व. एनव्ही एक जिंदादिल माणूस होता हे मात्र खरे.  डॉ. गीरीष कुलकर्णी, डॉ. एन.पी सोनजे, श्री. संजय कुबल, आणि मी ही त्यांची मुख्य प्रशासकीय इमारतीत भेट द्यायची ठिकाणे. माझी परीक्षा विभागात बदली झाली, तर ते तिथे भेटायला यायचे. तत्कालीन वरिष्ठांची माझ्यावर खपा मर्जी असली तरी त्याची त्यानी पर्वा केली नाही. परीक्षा भवनमध्ये आवर्जून भेटायला येणारा हा माणूस. २००९-१०च्या त्या कठिण कालखंडात सदैव भेटत असायचा. एक आत्मविश्वास देत असायचा. "व्हीएन, तु पुढे जाणार रे. दिवस बदलत असतात. हा एक बॅडपॅच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. जास्त विचार करू नको" असा आत्मविश्वास द्यायचे. एक फार वेगळे व्यक्तीमत्व. नाटक हा त्यांचा आत्मा. नाटकाला साजेशा खर्जातील आवाज. मात्र व्यावसायीक रंगभूमीकडे न वळता अध्यापनात आलेला माणूस. विभागाच्या कामात काही अडचण आली की हा माणूस फोन करायचा.
      फोनवर त्यांच्या खास आवाजात "व्हीएन, मी चिटणीस बोलतोय. मोकळा आहेस का? मला जरा बोलायचं होतं". असं म्हणायचे. आपण जरा काम आहे असं सांगीतल की यांच पुढे सुरू. "तू कधी कामात नसतोस. नाटकं करणे आमचं काम आहे. तू नको नाटक करू. हे बघ मी येतोय. मला पाचं मिनिटे पाहिजेत. मी दहा मिनिटात येतो". असे सांगून दहाव्या मिनिटाला खरंच येणारे चिटणीस सर. त्यांचा आवाज प्रदिप भिडेंच्या आवाजाची आठवण करून द्यायचा. सुरूवातीला आम्ही त्याना अहो-जाहो करायचो. पण २००८ मध्ये तत्कालीन कुलगुरू माणिकराव साळुंखे सरानी मणीपाल भेटीसाठी विद्यापीठातील अधिकारी, विभागप्रमुख, अधिष्ठाता आणि कांही अधिकार मंडळाच्या सदस्याना नेले. त्यामध्ये आम्ही बसताना चिटणीस सराना आमच्या बसमध्ये घेतले. आणि आम्ही जवळ आलो. धमाल मस्ती केली. बसमध्ये कोणीचं झोपायचे नाही असे ठरवले. मात्र मी आणि कुबल सोडून सर्वजण झोपले. कोणीही झोपले की मी त्यांचा फोटो काढणार म्हणून दम पण दिला. पण सारेजण झोपले आणि सर्व पुरूष मंडळी झोपली असताना आम्ही टिपली. चिटणीस सर आमच्या बसमध्ये असल्याने प्रवास हलका झाला. अहो-जाहोची भाषा त्यानी सोडली तरी आम्ही अरे तुरे करत नव्हतो. मग चिटणीस सरानी आमचं प्रबोधन केले आणि "साल्या मला अहो जाहो करून म्हातारा करतोस काय?" असा प्रश्न केला. आमचा नाइलाज झाला. ट्रिपमध्ये अरे तुरे झाले. पण तरीही आम्ही आजही त्याना अहो-जाहो करायचो. कधीकधी ते पुन्हा पहिल्या लयीमध्ये येत वयाचा विचार सांगायचे.
      मध्ये एका माहितीच्या अधिकाराच्या अर्जाने ते बरेचं वैतागले. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमध्ये येऊन तासभर चर्चा केली. काहीही मदत पाहिजे असली की एनव्ही आणि व्हीएन भेटणे आले. कधी कधी एकटे जरा वेळ मिळाला की यायचे. काय सर काय विशेष असं म्हटलं की जरा तुझ्याकडून चहा प्यायचाय रे म्हणायचे. किती दिवस भेटला नाहीस. काम होत म्हटलं की बस कर की नाटक म्हणयचे. जरा गप्पा मारायचे. मला व्ही.एन. हे संबोधन प्रथम वापरायला सुरूवात केली ती चिटणीस सरानी. खरंतर मी सुरूवातीला माझं नाव विलास शिंदे असे वापरायचो. पण चिटणीस सर आवर्जून व्ही.एन.चं म्हणायचे. मी म्हणयचो पण तुम्ही एनव्ही म्हणून माझे व्हीएन करता का? यावर ते फक्त हसायचे पण व्ही.एन.चं म्हणायचे.
      मध्ये दोन वर्ष नांदेडला असताना संपर्क कमी झाला. मी नांदेडवरून परत आलो आणि चिटणीस सर आजारी होते असे कळाले. परत भेटी सुरू झाल्या. ते आजारातून बरे झाले. तर मी आजारी पडलो. ते फोन करून घराजवळ यायचे. बोलायचे. घरी चला म्हटले की "आजारी माणसाचं करून घरची कंटाळतात, आणखी आपण कशाला त्रास द्यायचा म्हणायचे." मात्र भेटत राहायचे. पाय मोडला तेंव्हाही हा नाटकातला माणूस सदैव संपर्कात असायचा. "व्हीएन, लवकर बरा हो. तुला फिरताना बघायला बरं वाटतं. बेडवर आडवा व्हीएन मला बघायचा नाही" हा डायलॉग एक दोन दिवसातून ऐकावा लागायचा.
      मात्र आज रात्री एक वाजून अठरा मिनीटानी प्रा. विजय ककडे सरांचा व्हॉटसअप मेसेज आला. नरसिंहा इज नो मोअर. सकाळी मी तो सर्व अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर टाकला. पण लगेचं काढून टाकला. म्हटल एनव्ही नाटकातला माणूस. हेही नाटकच असणार. एवढ्यात तो जाणार नाही. त्याला जायची घाई थोडीचं आहे. त्याला अजून बरीचं कामे करायची आहेत. तुम्हाला माझ्या कथावर एकांकिका बनवायची होती. त्यासाठी चर्चा करणार होता. सारे काही राहिले. ही बातमी खोटी ठरो. मनात असे विचार सुरू होते, तेवढ्यात जीएस कुलकर्णी सरांचाही संदेश आला. भ्रमणध्वनीवरून परत ककडे सराकडून खात्री करून घेतली. मात्र दुर्दैवाने ती बातमी खरी होती. अनेक नाटकातून "वन्स मोअर" घेणारे कलावंत घडवणाऱ्या एनव्हींच्या बाबत "नरसिंहा इज नो मोअर" हे नाटक नव्हत... मन अस्वस्थ करणारे वास्तव होत. ते स्वीकारणे भाग पडले.इतराना नाटकात काम कसं करायचे हे शिकवणारा आणि मला मात्र "नाटक करू नको," असा हक्कान दम देणारा एनव्ही उर्फ नरसिंहा आज नाही.
      प्रश्न आणि एकचं प्रश्न... सर, आम्ही अहो-जाहो बोलायला नको होते...कारण आमच्यापेक्षा तुम्ही म्हातारा ठरत होतात. मग ही आज अचानक जायची घाई का केली?

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

चरित्र त्यांचे पहा जरा...



(वाचले तर पाहिजेच, मात्र या वाचनामध्ये चरित्र वाचन फार महत्त्वाचे. शिवाजी महाराज अलौकिक राजे बनले. मात्र त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटापुढे त्यानी हार न मानता, मात केली म्हणून. आपल्या करिअरशी संबंधीत व्यक्तींची चरित्रे आपणास प्रेरणा देतात.... यावर्षी "बदलते जग" या वाचन संस्कृती विषयावरील २०१८च्या दीपावली अंकामध्ये मला चरित्र वाचन या विषयावर व्यक्त होता आले. "चरित्र त्यांचे पही जरा...." हा लेख "बदलते जग"च्या सौजन्याने आपल्यासाठी प्रसिद्ध करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)                                 
--------------------------------------------------------------------------------------------
  
'वाचाल तर वाचाल' हे वाक्य आपणास शाळेत वारंवार ऐकावयास मिळते. पुढे आपली वाचनकला हळू हळू वाढत जाते. ती ठरावीक विद्यार्थ्यामध्ये वृद्धींगत होत जाते आणि अगदी थोड्या लोकामध्ये टिकून राहते. खरंतर शाळेत गेलेल्या प्रत्येकाने ही कला जोपासली आणि टिकवली पाहिजे. मात्र वस्तूस्थितीत तसे सुशिक्षीत सर्वंचजण वाचत असतात. पण बहुतांश लोक गरजेपुरते वाचतात. प्रशासकीय सेवेतील लोक खालच्या कर्मचाऱ्याकडून ठेवल्या जाणाऱ्या नोटस वाचतात. ग्राहक दुकानांचे बोर्ड वाचतो. प्रवास करताना रस्त्यातील फलक वाचन सुरू असते. काही ना काही प्रत्येकजण वाचत असतो. मात्र गरजेपूरते, गरजेनुसार. यामध्ये ठरावीक वर्ग आवर्जून साहित्य वाचणारा असतो. त्यामध्ये कथा, कादबंरी वाचणारा वर्ग मोठा आहे. नाटकाची पुस्तके वाचणारे त्याहून कमी. कविता वाचणारे बोटावर मोजावेत असे. सध्या जाणिवपुर्वक चिंतनशील लेखन वाचणारा वर्ग वाढत आहे हे विशेष.
      वाचन हे मुलत: ज्ञानप्राप्तीसाठी केले जाते. वेळ जात नाही, म्हणून कांहीजण वाचन करतात. असे वाचन प्रवासात आवर्जून करणारे अनेकजन आहेत. वाचनातून आनंद मिळावा, या हेतूनेही वाचन केले जाते. ज्ञान प्राप्तीसाठी वाचन केले जात असताना जर मनामध्ये आनंदतरंग उठत असतील तर वाचकाला ज्ञानप्राप्ती सहज होते. वाचताना माणूस जर त्या कथेच्या भावविश्वात शिरला, तर, त्याला येणारी अनुभूती ही अद्भूत असते. वाचनातून आपणास हवे त्या विषयाचे, प्रांताचे, समुहाचे, देशाचे, धर्माचे, ज्ञान घेता येते. मात्र त्यासाठी आपले वाचन अष्टावधानी असावे लागते. तसेचं हे वाचन मनापासूनही असावे लागते. अनेकजन वृत्तपत्र दहा मिनीटात वाचून संपवतात. कांहीजनांचे चार तास वृत्तपत्र वाचन सुरू असते. बरेचंजन त्यातील फक्त बातम्या बघतात. काहीना चित्रपट जाहिराती पहातात. काहीना ठरावीक वृत्तपत्रातील आकड्यात रस असतो. आकडे कसले तेवढे विचारू नका. संपादकीय पानाचा समावेश वृत्तपत्रात का असतो? हे माहित नसणारे किंवा त्या पानाकडे ढुंकूनही न बघणारे अनेक वृत्तपत्र वाचक भेटतील.
      काय वाचावे? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जे मिळेल ते वाचावे, हे त्याचे सोपे उत्तर आहे. मात्र जे वाचले त्यातील सकारात्मक, चांगले तेवढे जवळ बाळगावे बाकी सर्व सोडोनी द्यावे, हे उत्तम. संत तुकडोजी महाराजानी काय वाचावे? कशासाठी वाचावे? याचे सुंदर उत्तर दिलेले आहे. "भाविक जनासी लावावया वळणl आकळावया सकळ ज्ञान " वाचन केले पाहिजे. वाचन हे विविधांगी हवे. बाल वाड:मय ते विज्ञान साहित्य,  कथा, कादंबरी, नाटक, कविता, ग्रामीण साहित्य, इतिहास, ललित, नाटक, वृत्तपत्र सारे काही वाचावे. या वाचनातून प्रत्येकवेळी नवीन गोष्टीचे ज्ञान आपणास होत असते. पुस्तकांच्या सहवासात एकटेपणा कधी येत नाही. ग्रंथ हे उत्तम मित्र असतात. ते आपणास अनेक प्रश्नांची उत्तरे देत असतात. ते आपणास भोवतालच्या वातावरणाचा विसर पाडायला लावतात. ऐतहासिक पुस्तके आपल्याला भूतकाळाची सफर घडवतात, तर विज्ञानकथा आपल्याला भविष्य काय असेल याचे दर्शन देत असतात. प्रवासवर्णनातून आपणही नकळत त्या ठिकाणाची सफर करत असतो. कथा, कादंबरी आणि नाटकातून रंजन होते. तर अनेक कविता, पोवाडे आपल्याला प्रेरणा देतात. चरित्र आणि आत्मचरित्र वाचनातून जीवनाला दिशा आणि प्रेरणा मिळते. आपल्या समस्येवर काय उपाय आहे, हे ही अनेकदा समजते. ललित साहित्य एखाद्या विषयाचे विविध पैलू आपल्यासमोर घेऊन येते. आपल्या जीवनाला पैलू पाडण्याचे काम साहित्य करत असते. भाषेवरील प्रभुत्त्व वाचनातून येते. बोलणे ओघवते बनते. मोठ्याने वाचल्याने उच्चारात स्पष्टता येते. बोलण्यामध्ये आत्मविश्वास यायला सुरूवात होते.
      साहित्याच्या विविध प्रकारात चरित्र आणि आत्मचरित्र हा फार महत्त्वाचा आहे. चरित्र लेखनाची मराठीत तशी फार जूनी परंपरा आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनातील घटना आणि प्रसंगाची विनयपुर्वक नोंद म्हाइंभट यानी करायला सुरूवात केली. त्यातून "लीळाचरित्र" हा ग्रंथ तयार झाला. हा ग्रंथ म्हणजे श्री चक्रधर स्वामींचे चरित्र. हे तसे पहिले चरित्रात्मक पुस्तक. त्यानंतर अनेक लोकानी विविध व्यक्तींची चरित्रे लिहीली. विद्यार्थ्यासमोर विविध मोठ्या व्यक्तींचे चरित्र यावे या उद्देशाने महादेवशास्त्री कोल्हटकर (कोलंबस), कृष्णशास्त्री चिपळूणकर (सॉक्रेटीस), रा. गो. करंदीकर (नाना फडणवीस, बेंजामीन फ्रँकलीन) आदिनी चरित्रलेखन केले. त्यानंतर मात्र मराठीतून चरित्र आणि आत्मचरित्र लेखन विपूल प्रमाणात सुरू झाले. संत तुकडोजी महाराजांच्या शब्दात  "महाराष्ट्री संत - कवी परंपराl तैसाची चरित्र ग्रंथाचा पसारा वळणी लावावया पसाराl ग्रंथ लिहिले बहुतानी". परिणामी आज अनेक नामवंत व्यक्तींची चरित्रे उपलब्ध आहेत. विविध लेखकानी आपल्या शैलीनुसार त्या व्यक्तीचे चरित्र शब्दांकित केलेले आहे. एकाचं व्य्क्तीचे अनेकानी चरित्रलेखन केले आहे आणि करत आहेत.
      चरित्र हे एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि कार्य दोन्ही सांगत असते. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवर अमूक एका व्यक्तीचा प्रभाव होता किंवा आहे, असे आपण म्हणतो. तेंव्हा त्या प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा त्यामध्ये फार मोठा वाटा असतो. त्या व्यक्तीनी केलेल्या लेखनातून किंवा त्यांच्यावर झालेल्या लेखनातून हे त्यांचे कार्य जगासमोर आलेले असते. साम्यवादी विचारसरणीमध्ये हेगेल यांचा मार्टिन ल्यूथर किंग, कार्ल मार्क्स आणि कार्ल मार्क्स यांचा लेनीनवर मोठा प्रभाव होता. महात्मा ज्योजीबा फुले यांच्यावर थॉमस पेनी यांचा प्रभाव होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर केळूसकर गुरूजी यानी दिलेल्या बुद्ध चरित्राने फार मोठा प्रभाव टाकला. अनेक थोरांची चरित्रे ही निश्चितच नव्या पिढीला प्रेरणादायी असतात यात शंका नाही.
      प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी बनायचे असते. कोणतेच उद्दिष्ट डोळयासमोर न ठेवता जगणारा माणूस विरळाचं. समजा असा कोणी असेल, आहे त्यात समाधान मानणारा, कोणतेही ध्येय नसणारा तरी अशा माणसाच्या जीवनात बदल घडवण्याचे सामर्थ्य या चरित्रामध्ये असते.  आपले दैनंदिन जीवन जगत असताना अनेक चढउताराचे प्रसंग येत असतात. अनेकदा अशी परिस्थिती येते की, आपण एकदम निराश होतो. अशा वेळी आपल्याकडे असणाऱ्या कलेत, आवडीच्या छंदात आपण मनाला थोडा वेळ गुंतवले तर मनावरील मळभ दूर होते. नैराश्य क्षणात दूर करण्याची ताकत त्यामध्ये असते. आपल्याला गाणी ऐकल्यानंतर प्रसन्न वाटत असेल तर, त्यातून आपण आनंद मिळवू शकतो. एखादी परीक्षा आपणास कठीण जाऊ शकते. व्यवसायात कठिण प्रसंग येतात. नोकरीमध्ये विविध प्रसंगाना सामोरे जावे लागते. अशा वेळी आपण थोरांचे चरित्र अभ्यासले, आठवले तरी फार मोठा बदल घडू शकतो. राजाराम महाराज एकदा किल्ल्याला दिलेल्या वेढ्यात अडकले असताना त्यानी छत्रपती शिवाजी महाराज अशाप्रसंगी काय करत याची विचारणा केली होती.   
      जीवन जगताना ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर, चांगल्या पुस्तकांचे वाचन करायला पाहिजे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या क्षेत्रात आहोत किंवा ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचली पाहिजेत. या चरित्र वाचनातून त्या त्या क्षेत्रांतील व्यक्तींना कोणत्या हालअपेष्टांतून जावे लागले, ते समजते. नामवंत संशोधक फॅराडे हा जन्मत:चं वैज्ञानिक नव्हता. वयाच्या तेराव्या वर्षी तो पुस्तक बांधणीच्या कारखान्यात पुस्तक बांधणीचे काम करणारा कामगार होता. त्याने सहावीत शाळा सोडली होती. तरीही तो संशोधक बनला.  आईनस्टाईनही सुरूवातीला पेटंट ऑफिसमध्ये काम करीत होता. वॉल्ट डिस्नेची कंपनीही बुडाली होती. तरीही तो यशस्वी बनला. चरित्र वाचनाने ही यशस्वी व्यक्तीमत्त्वे त्यांच्या आयुष्यात किती मोठ्या संकटाना, कशी धैर्याने सामोरी गेली, ते लक्षात येते आणि मग आपले संकट, आपल्यासमोरील अडचण छोटी वाटू लागते; नैराश्य दूर होते.
      एक घटना आठवली. संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर मी माझे काम संपवत असताना एक वयस्कर महिला एका विद्यार्थ्याबरोबर आली. त्या महिलेने सांगीतले की "हा माझा मुलगा. विद्यापीठात शिकतोय. मागच्या वर्षी त्याचे वडील वारले आणि आता हा शिकायचं नाही म्हणतोय. हाच माझ्या जगण्याचा आधार हाय. त्यानं दोनदा जीव द्यायचा पण प्रयत्न केला. आता असाचं वेड्यासारखा करतोय. यानं जर जीवाचं काही बरंवाईट करून घेतलं तर मी जगू कोणासाठी?". मी त्या महिलेला बसायला सांगीतले. त्या मुलाशी बोलायला सुरूवात केली. बी.एस्सी.पर्यंत त्या मुलाचे गुण चांगले होते. मला त्या मुलाशी संवाद आवश्यक वाटला. त्याच्या आईला बाहेर थांबायला सांगून त्या मुलाशी मी संवाद वाढवला. त्या मुलाचे म्हणणे असे होते की 'त्याला खुप मोठे व्हायचे होते, पण वडील गेल्याने आता सारं काही संपलय. मी आता मोठा होऊच शकत नाही. मग जगून काय करायचं?'
                मी त्या मुलाशी अर्धा तास बोलत होतो. त्यावेळी मी वॉल्ट डिस्नेचे चरित्र वाचले होते. मी वॉल्ट डिस्नेच्या जीवनातील प्रसंग त्या मुलाला सांगीतले. डिस्नेचे वडील त्याला कसे शिकू देत नव्हते. तो पॉकेटमनीसाठी पेपर टाकायचा. त्याने एक पेपरची लाइन वाढवून पैसे कसे जमा केले, तो कसा शिकला? धंद्याचे दिवाळे निघाल्यावर तो कोणत्या परिस्थितीत जगला? त्यानंतर त्या मुलाला चांगला माहित असणारा संशोधक मायकेल फॅराडे याचे जीवन थोडक्यात सांगीतले. संशोधन सहाय्य्क असणाऱ्या मायकेल फॅराडेना हंफ्रे डेव्हीच्या बायकोने कसे वागवले. फॅराडे अपमान गिळून संशोधन क्षेत्रात टिकून राहीला म्हणून आपण त्याचे सिद्धांत अभ्यासतो, हे जाणिवपुर्वक सांगीतले. तसेच तूझी आई तर तूला शिकवायला तयार आहे. तू शिकले पाहिजे. तू आईच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी आणि वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जास्त जिद्दीने अभ्यास केला पाहिजे.  असे बरेचं काही सांगत राहिलो. अर्ध्या तासाच्या या संभाषणानंतर मुलगा जरा प्रफुल्लित दिसू लागला. त्याने शब्द दिला की तो आत्महत्येचा विचार करणार नाही. तो अभ्यास करेल आणि काहीतरी बनेल. त्यानंतर त्याच्या आईला आत बोलावले. आईसमोर त्याने हसत हसत शिकायचे मान्य केले. पुढे काळाच्या ओघात, दैनंदिन कामात मी हा प्रसंग विसरलो. तीन वर्षानंतर तो मुलगा अचानक पेढ्याचा बॉक्स घेऊन आला. त्यानेचं हा प्रसंग सांगीतला. त्या दिवसानंतर त्याने मन लावून अभ्यास केला. मी ज्यांची माहिती थोडक्यात सांगीतली होती, त्यांची चरित्रे वाचली. पदव्यूत्तर शिक्षण पुर्ण केले. पुढे नेट आणि सेट दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. आता त्याची एका महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून निवड झाली होती. त्या आनंदात तो पेढे घेऊन आला होता. तो या सर्व बदलाचे श्रेय मला देत होता. मला मात्र हे श्रेय अनेक संकटावर मात करून आयुष्यात यशस्वी होणाऱ्या त्या महान विभूतींच्या चरित्राचे वाटत होते. एक जीवन वाचवण्याचे आणि घडवण्याचे सामर्थ्य त्या चरित्रात असल्याची साक्ष मला त्या दिवशी मिळाली.
      अनेकदा आपली एक अडचण असते, ती म्हणजे आपण यशस्वी व्यक्तींना मोठेपणाचे लेबल चिकटवतो.  त्याना मोठेपण दिले की, नंतर आपण मोठे नसल्याचा वृथा साक्षात्कार आपणास होतो. आपण त्यांच्याप्रमाणे मोठे नाही, आपण काही करू शकणार नाही असे वाटते. निराशेचे ढग मनाला घेरतात. आपण निराश होतो. त्यामूळे चरित्र वाचताना आपण प्रथम ज्यांचे चरित्र वाचतो ती व्यक्तीही सर्वसामान्याप्रमाणे जन्मली होती, हे लक्षात घेऊन ते वाचले पाहिजे. याबाबतीत सर्वाना माहित असलेले उदाहरण पाहू या. छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांना आपण मोठे म्हणतो आणि विषय सोडून देतो. मात्र त्यांना हे मोठेपण मिळवताना कोणत्या मानसिक आंदोलनांना, संघर्षमय परिस्थितीला सामोरे जावे लागले असेल, याचा विचार करत नाही. चरित्रवाचन त्या दृष्टीने विचार करायला शिकवते. छत्रपतींचा जन्म झाला, त्यावेळी त्यांचे पिता शहाजीराजे त्यांच्यापासून शेकडो मैल दूर आदिलशहाकडे सरदार म्हणून काम करत होते. महाराजांना स्वराज्य उभा करताना बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरेसारख्या अनेक सुहृदांना गमवावे लागले. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि लाडक्या पत्नीचा मृत्यू झाला. अफजल खानाची स्वारी, शायीस्तेखानाचा लाल किल्ल्याला वेढा ही स्वराज्यावरील फार मोठी संकटे होती. स्वराज्य निर्माण होत असताना मोगलांशी तह करावा लागला. मिर्झाराजेंसोबतच्या तहाची पुर्तता म्हणून महाराज संभाजीराजासमवेत आग्र्याला गेले. तेथून मोठ्या शिताफीने सुटका करून घेतली. पण परतताना लाडक्या शंभू बाळाला मथूरेसारख्या अनोळखी प्रदेशात सोडून परतावे लागले. त्यावेळी पिता म्हणून त्याना झालेल्या यातना आपणास कळत नाहीत. राज्याभिषेक झाल्यानंतर अगदी थोड्याच दिवसांत महाराजांच्या जीवनाच्या शिल्पकार माँसाहेब जिजाऊंचे निधन झाले. पुढे संभाजी राजाबरोबर दक्षिण स्वारीची तयारी केली आणि त्यांना वगळून स्वारी पूर्ण करावी लागली. हे आणि असे बरेच प्रसंग पाहताना, त्या प्रसंगाना धीरोदात्तपणे सामोरे गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे पाहिले की, आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे त्यापुढे कितीतरी छोटी वाटायला लागतात. आपण किती क्षुल्लक गोष्टींना अनाठायी महत्त्व देतो, हे जाणवायला लागते. अशा अनेक प्रसंगाना सामोरे जात, त्यावर मात करत, अशी मोठी व्यक्तीमत्त्वे घडलेली असतात. त्यांचे चरित्र समजून घेणे म्हणजे ऊर्जेचे कुंभ प्राशन करण्यासारखे असते. अशा थोर व्यक्तींच्या चरित्रातून आपल्याला कायम प्रेरणा मिळते. म्हणूनचं चरित्रे वाचली पाहिजेत. कुसुमाग्रजांनी तर म्हणूनच ठेवले आहे की, 'इतिहासाचे पान उलटूनी चरित्र त्यांचे पाहा जरा, त्यांच्यासम आपण व्हावे हाच सापडे बोध खरा!'

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

ऊर्जा मातीची...

(ऊर्जा... प्रत्येकाला हवी असते. प्रत्येकाची गरज आहे. ही ऊर्जा मातीतही आहे. माती.. जीला आपण मूल्यहीन म्हणतो, भाव कमी मिळाला तर शेतकरी मातीमोल भावाने विकावे लागले असे सहज बोलतो. या मातीत मला मोठी ऊर्जा जाणवली. त्यावरील लेख "नवे गाव आंदोलन" मासीकाच्या नोव्हेंबर २०१८च्या ऊर्जा विशेषांकात प्रसिद्ध झाला. तो मूळ लेख येथे प्रकाशित करत आहे. धन्यवाद... व्ही. एन. शिंदे)

--------------------------------------------------------------------------------------------


माणूस जन्माला येतो आणि जमिनीशी पहिलं नातं निर्माण होते. जन्माला आल्यानंतर पहिले कांही दिवस, म्हणजे रांगायला येईपर्यंत, ‍बाळ आणि जमिनीमध्ये कपड्याचे अंतर असते. एकदा ते पालथं झोपायला लागले की ते प्रथम मातीच्या संपर्कात येते. हळूचं पालथे असताना जड असणारे डोके जमिनीला टेकते. जीभ मातीला चिकटते आणि मातीची चव चाखली जाते. पुढे अनेक लहान मुले चक्क माती खातात. त्यासाठी मारही खातात. हळूहळू सवय मोडत जाते. माती खाणे बहुतेकांचे सुटते, मात्र जगण्यासाठी मातीने दिलेलेचं खावे लागते. माणूस ते खात राहतो. जगतो आणि एक दिवस मरतोही. माणसाचे हे नाते मृत्यूनंतर संपते. मेल्यानंतर जात धर्म कोणताही असो तो मातीत मिसळून जातो. जाळले, तर राखेच्या रूपात आणि दफन केले तर थेट. माणूस, पक्षी, अन्य पाळीव व जंगली प्राणी आणि सर्वांचे संगोपन करणाऱ्या वनस्पती, या सर्वांचे अस्तित्व हे या मातीवर अवलंबून आहे. माती हा घटक नसता तर काय झाले असते? समजा खडकांच्या जमिनीचा भूप्रदेश असता, तर, त्या खडकावर सिमेंटची इमारत बांधणे सोपे झाले असते. पण खाल्ले काय असते? खडकावर गिरीपुष्प यासारखी वनस्पती सोडली तर कांहीच उगवत नाही. मग आपणास आवश्यक असणारे धान्य पिकवता आले असते का? हे प्रश्न नकळत मनात आले आणि हळूहळू जाणवायला लागले, माती ही एक ऊर्जा आहे. सर्वशक्तीमान ऊर्जा. पृथ्वीवरील जीव निर्माण करण्याची आणि तो मेल्यानंतर त्याला सामावून घेण्याची ताकत असणारी ती एक शक्ती आहे. या मातीचे महत्त्व "ॲग्रीकल्चर टेस्टामेंट" या पुस्तकातून सर्वप्रथम अल्बर्ट हॉवर्ड या संशोधकाने जगाला सांगीतले.
ब्रिटनमधील श्रॉपशायर परगण्यात रिचर्ड आणि अॅन हॉवर्ड या दांपत्याच्या पोटी अल्बर्ट यांचा जन्म ८ डिसेंबर, १८७३ रोजी झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रेकिन महाविद्यालयातून झाले. पुढे त्यांनी सेंट जॉन कॉलेजमधून केंब्रिज विद्यापीठाची निसर्ग विज्ञान विषयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर १८७७ मध्ये त्यांनी कृषीशास्त्राचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी १९०२ पर्यंत कृषीशास्त्राचा शिक्षक म्हणून इंपिरिअल डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरल कॉलेजमध्ये काम केले. नंतर त्यांची वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून कृषी महाविद्यालयात नियुक्ती झाली. १९०५ पासून भारताचा कारभार पाहणाऱ्या खात्यामध्ये बदली झाली. ते वनस्पती शास्त्रातील अर्थविषयक सल्लागार म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर त्यांची भारतात पाश्चिमात्य शेती पद्धती रूजविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली.
लॉर्ड कर्झन यांनी भारतात पुसा येथे कृषी संशोधन संस्था सुरू केली होती. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे मोठी जिवीतहानी होत होती. जनतेला वाचवायचे असेल तर कृषी उत्पादन वाढवणे आवश्यक होते. ती नैतिक जबाबदारी सरकारची होती. अन्नधान्य आयात करून सरकार अन्नधान्याची गरज भागवू  शकत नव्हते. त्यासाठी भारतात लॉर्ड कर्झन यांच्या पुढाकाराने कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. त्यामध्ये अनेक संशोधकांच्या नियुक्त्या झाल्या. अल्बर्ट त्यापैकीचं एक. अल्बर्ट यांनी पुसा येथील कृषी संशोधन केंद्रात कार्य सुरू केले. सुरूवातीला त्यानी येथील लोकांच्या आहाराच्या पद्धतीचा अभ्यास सुरू केला. एकदा जंगलात फिरताना त्यांना कांही आदिवासी भेटले. घनदाट जंगलात राहणाऱ्या त्या लोकांची शरीरयष्टी पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांच्या आहार पद्धतींची त्यानी माहिती घेतली. तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की या लोकानी निसर्गत: पिकवलेली फळे आणि अन्य घटक खावूनही ही मंडळी धष्टपुष्ट आहेत. त्यानी आदिवासींच्या शेतीचा अभ्यास केला. इतर ग्रामिण भागातील शेती पद्धतीही अभ्यासली. त्यातून पिकणाऱ्या धान्यातील सकसपणा अभ्यासला आणि त्याना या शेती पद्धतीचे महत्त्व समजले. त्यांच्या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की, मातीमध्ये रासायनीक खते मिसळण्याची गरजच नाही. पाश्चिमात्य शेती पध्दती भारतात रूजविण्यासाठी आलेले अल्बर्ट भारतातील शेती पध्दतीच्या हळूहळू प्रेमात पडू लागले. निसर्गात जे पिकते, त्यातील आवश्यक भाग काढून राहीलेला भाग, शेतातील मातीत मिसळला तर माती सुपिक राहते. पीक चांगले येते. ते भारतीय पद्धत वापरून आधुनिक शेती करू लागले. ते सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते बनले.
      शेतातील पालापाचोळा, जैवीक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याना कुजवण्यासाठी त्यानी इंदौर पॅटर्न नावाने ओळखले जाणारे खड्डे घ्यायला सुरूवात केली. कुजलेले खत शेतात मिसळून अमाप पीक निघते, हे लोकाना दाखवले. मात्र त्यांच्या नेमूनलेल्या कार्यापेक्षा हे विपरीत होते. पुढे पुढे तर अल्बर्ट भारतीय शेतकऱ्यांचा उल्लेख "माय प्रोफेसर्स" असा करू लागले. इंग्रज वरिष्ठाना त्यांचे हे काम मूळीचं पसंत नव्हते. ते नाराज झाले. त्याना परत पाठवण्यापर्यंत विचार सुरू झाला. खत कंपन्यांनाही हे मानवणारे नव्हते. सुरूवातीला शासनाला त्यांचे हे उद्योग पटले नाहीत. मात्र इंग्लंडच्या राणीने जेंव्हा सेंद्रिय शेतीतील आंबे खाल्ले, तेंव्हा ती बेहद खुश झाली. सन १९३४ मध्ये "सर" हा किताब देऊन तीने अल्बर्ट यांचा सन्मान केला. त्यांच्या मते 'माती सशक्त असेल, तर, त्या जमिनीवर पिक चांगले येईल. सशक्त असणाऱ्या पीकांचे धान्य खाल्ले, तर माणूस सशक्त राहील'. या त्यांच्या निष्कर्षावरील "ॲग्रीकल्चर टेस्टामेंट" पुस्तकही वादळी ठरले. हे सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करणारे पुस्तक होते. त्या पुस्तकातील त्यांचे निष्कर्ष अनेकाना मान्य नव्हते. मात्र पुढे लोकाना आणि संशोधकाना त्यांचे म्हणणे पटू लागले आणि आज तर सेंद्रिय शेती हा परवलीचा शब्द बनू लागला आहे. अल्बर्ट यांचे प्रयोग आणि कार्य हे मातीचे महत्त्व सांगणारे होते. माती ही अनमोल आहे. सुदृढ जीवनासाठी सुदृढ जमिनीची आवश्यकता आहे. सुदृढ जमिनीमध्ये जर सजीव माती असेल तरचं शेती ही समृद्ध राहू शकते.
त्यांनी वनस्पती उद्योग विभागाचे संचालक म्हणूनही काम पाहिले. इंदौर आणि राजपुताना संस्थानाचे ते कृषी मार्गदर्शक होते. त्यांची रॉयल सोसायटीने फेलो म्हणून नियुक्ती केली. इंदौरच्या शेती संशोधन केंद्राचे ते प्रमुख होते. त्यांच्या प्रथम पत्नी गॅब्रिएलाचे निधन झाले. त्यानंतर मेव्हणी ल्यूसी यांच्याशी त्यानी विवाह केला. या दोघीनीपण त्यांच्या संशोधनात मोलाचे योगदान दिले. अल्बर्ट यांनी सेंद्रीय खत बनवण्याचा इंदौर पॅटर्न विकसित केला. तसेच भारतीय शेती पध्दतीचा पुरस्कार करणारे 'फार्मिंग ऑर गार्डनिंग फॉर हेल्थ ऑर डिसिज' हे पुस्तक १९४० मध्ये प्रकाशित केले. या व्यतिरिक्तही त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित केली. रासायनिक खताचा प्रसार करायला आलेला हा संशोधक. मातीचे महत्व ओळखून रासायनिक खताचा दुस्वास करू लागला. मात्र २० ऑक्टोबर, १९४७ ला शेवटचा श्वास घेईपर्यंत हा संशोधक भारतिय शेती पद्धतीचा पुरस्कार करत राहीला. असे हे अल्बर्ट मातीचे महत्त्व जाणणारे पहिले संशोधक. त्यांनी मानवाला खऱ्या अर्थाने मातीचे महत्त्व सांगीतले. ही माती तयार होण्याची दिर्धकालीक प्रक्रिया आहे.
      पृथ्वी सुरूवातीला खडकाळ होती. अनेक वर्षानंतर त्यापासून माती तयार झाली. खडक फुटून सुरूवातीला त्याचे लहानमोठे तुकडे तयार झाले. ही प्रक्रिया वातावरणातील भौतिक बदलातून झाली. त्यानंतर त्यातील मुलद्रवांचे ऑक्सीडेशन, विद्रावीकरण, जल संयोगीकरण, कर्ब पदार्थाचे मिसळणे आदि अनेक प्रक्रिया णाल्या आणि आजची ही माती बनली. तीला लाखो वर्षाचा इतिहास आहे. पुढे निसर्गचक्रात पाऊस आला. पाऊस या मातीवर पडल्यानंतर मातीत ओलावा निर्माण झाला. त्यात असंख्य जीव जन्मू लागले. जगले. त्यानी मातीला सकस बनवत अनेक वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक घटक पुरवायला सुरूवात केली. त्यानंतर आजची सुंदर जीवसृष्टी निर्माण झाली. निसर्गाची यातून वेगवेगळी चक्र सुरू झाली. झाडे वनस्पती या मातीतून स्वत:च्या वाढीसाठी आवश्यक घटक घेतात. मातीचे हे उपकार स्मरत, पावसाने तीची हानी किंवा धूप होऊ नये म्हणून मातीवर स्वत:च्या पानाचे आवरण घालतात. मातीचे सरंक्षण करतात. ही पाणी परत मातीत कुजून तीला आधिक सुपीक बनवतात. मातीचे वाळू, वाळू दुमट, दुमट लोम, गाळ दुमट, चिकण माती असे अनेक प्रकार आहेत. मातीच्या रंगावरूनही काळी माती, लाल माती, पांढरी माती असे मातीचे प्रकार आहेत.
      माती ही सजीव आहे. एका गावाच्या लोकसंख्येपेखा जास्त जीव एक चौरसमीटर जमिनीतील
मातीत जगत असतात. हे जीव त्या मातीवर पेरलेल्या पीकाला आवश्यक घटक पुरवतात. दसऱ्यापुर्वी घटस्थापना करताना त्या मातीत रब्बी हंगामात पेरावयाचे धान्य कसे उगवते हे पाहून शेतकरी धान्य पेरतो. कोणते पीक चांगले येणार याचा अंदाज बांधतो. म्हणजेचं माती प्रतिसाद देते. मातीमध्ये धान्य पेरले की माती त्याला अंकूर फुटेपर्यंत पोटात सामावून घेते. नंतर तो कोंब बाहेर येतो आणि त्याचे स्वतंत्र अस्तित्व जाणवते. त्याची मूळे मात्र मातीत घट्ट रूतलेली असतात. मातीतील अनेक घटक ही मूळे शोषतात. त्यातून ती ऊर्जा साठवत वाढत राहतात. जैवीक ऊर्जा साठवत ती वाढतात. मात्र मूळांना जमीनीतून बाहेर काढताचं ते झाड निस्तेज बनते. मरते. इंजीनातील इंधन संपल्यानंतर ते बंद पडते तसे. झाडाचाही मातीबाहेर येताच ऊर्जा प्रवाह बंद पडतो. म्हणूनचं माती हे चैतन्याने भरलेली आहे. ती मूल्यहीन नाही अनमोल आहे. सचेतन आहे. म्हणूनचं पहिला पाऊस पडताचं मातीचा सुगंध आसमंत गंधीत करतो. शेतकऱ्याला सजीवपणाची जाणिव करून देतो. तीला जपले पाहिजे. माती जगली पाहिजे. माती जगली नाही तर ही जीवसृष्टीही जगणार नाही हे मात्र निश्चित.