शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

बहुगुणी, औषधी आवळा

 

आवळा.. नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. बहुगुणी, औषधी मूळापासून पानापर्यंत उपयुक्त… आवळा… आवळ्याची फळे आता बाजारात सर्वत्र दिसतात… आवळ्याचा रस, आवळा लोणचे, मुरंबा करायचे हे दिवस… धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व असणाऱ्या आवळ्याचे महत्त्व मोठे आहे. आवळ्यावरच्या कथा तर अनेक आहेत. असा हा आवळा प्रत्येकाने जरूर खावा… अशा या आवळ्याविषयी सारे मला भेटलेले सारे काही…

____________________________________________________

ll१ll

काही पदार्थ, फळे वा वस्तू अशा असतात की त्यांना पाहिल्यावर, उचलण्यासाठी हात आपोआप पुढे होतात. मोराचे पीस दिसल्यानंतर, ते न उचलता पुढे जाणारा माणूस विरळाच. चिंच पाहून तोंडाला पाणी नाही सुटले तरच नवल. तसेच तुकतुकीत कांतीचा आवळा पाहिला, की तोंडाला पाणी सुटतेच. चिंचेनंतर सर्वाधिक लोकप्रिय आणि मनाला मोहवणारे फळ म्हणजे आवळा. गोल, मोठ्या गोटीच्या आकाराची, जाळीदार पांढरी नक्षी असणारी आवळ्याची फळे पाहिल्यावर कोणालाही ती खावीशी वाटतात. आवळा प्राचीन काळापासून वापरले जाणारे फळ असल्याने त्याला धार्मिक आणि सांस्कृतीक पातळीवरही मोठे स्थान मिळाले. त्याचे औषधी गुणधर्म तर अलौकिकच! त्यामुळेच आवळ्याच्या झाडाला तुळशीइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

आवळा पूर्णत: भारतीय मूळ असलेले झाड. हिंदीमध्ये आमला, आंवला, ब्रम्हमुली, ब्रम्हवृक्ष, गुजरातीमध्ये आमला, कन्नडमध्ये बेट्टाडा नेल्लीकायी, दोड्डा नेल्ली, बेट्टा नेल्ली, कोकणीमध्ये आवाळो किंवा आवळो, पंजाबीमध्ये औला, नेपाळीमध्ये अमला, ओरियामध्ये अन्ला, तमिळ आणि मल्याळममध्ये अमालकम, नेल्ली, मणिपूरीमध्ये हैकरू, पालीमध्ये आमलक नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये आवळ्याला अकर, अमलिक, आमलक:, आमलकी, अमृतफल, अमृता, श्रीफला, धात्री, धात्रिका, तमका, तिष्या, ब्रम्हवृक्ष, राधा, वज्रम, मंडा, विलोमी, शिवा, शंभुप्रिया, श्रीफली, सुधा अशी विविध अर्थपूर्ण नावे आहेत. हे झाड हजारो वर्षांपासून भारतीयांना माहीत आहे. आवळ्याचे विविध उपयोग लोकांनी शोधून काढले आणि वापरत आले. याच्या औषधी गुणधर्मांचे वर्णन अनेक संस्कृत ग्रंथांमध्ये पाहावयास मिळते. बहुतांश नावे ही या झाडाच्या विविध घटकांच्या औषधी गुणधर्मामुळे किंवा धार्मिक कथांवरून देण्यात आली आहेत. इंग्रजीमध्ये याला इंडियन गुजबेरी, इमलिक मायरोबालन म्हटले जाते. याचे वैज्ञानिक नाव ‘फिलॅन्थस इमलिका’ असे आहे.

भारतातील बहुतांश राज्यांमध्ये आवळ्याची झाडे आढळतात. भारतासह म्यानमार किंवा ब्रम्हदेश, पाकिस्तान, उझबेकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, चीन, मलेशिया आणि नेपाळ या देशांमध्ये आवळ्याची झाडे आढळतात. उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यामध्ये आवळ्याची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असल्याने हा जिल्हा ‘आवळ्याचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. येथे आवळ्याची मोठ्या प्रमाणात रोपे बनवून देशाच्या विविध भागात पुरवण्यात येतात. आवळ्याची झाडे सर्व प्रकारच्या हवामानामध्ये वाढतात. हिमालयापासून कन्याकुमारी आणि कोकणापासून अरूणाचल - मेघालयापर्यंत सर्वत्र आवळा आढळतो. समुद्रसपाटीपासून अगदी २३०० मीटर उंचीवरही आवळ्याची झाडे वाढतात. आवळा समशितोष्ण वातावरणात चांगला वाढतो. पाण्याचा निचरा होणारी, हलकी, मध्यम किंवा भारी जमिनीत आवळा वाढतो. 

प्रामुख्याने आवळ्याची लागवड बियांपासून करतात. आवळ्याच्या फळात गोल कठीण आवरणाखाली दोन ते सहा बिया असतात. हे आवरण अत्यंत कठीण असल्याने त्याची नैसर्गिक पद्धतीने बियांपासून मोठ्या प्रमाणात रोपे तयार होत नाहीत. त्यामुळे हा बीजधारक गोळा आठ ते दहा दिवस उन्हात ठेवतात. उन्हामुळे कठीण कवच आपोआप फुटते. त्यातून दोन ते सहा तपकिरी रंगाच्या बिया बाहेर पडतात. या बिया उन्हात पुन्हा वाळवून मातीमध्ये पुरल्या आणि पाणी दिले की दहा ते बारा दिवसांत त्या रूजतात आणि रोपे उगवतात. झाडाच्या मुळांपासून फुटवा फुटूनही रोपे तयार होतात. शक्यतो रोपे प्लॅस्टिकच्या पिशवीत तयार करतात. छिद्र असलेल्या पिशवीमध्ये लाल आणि काळ्या मातीचे मिश्रण घालून दोन-तीन सेंटिमीटर खोलीवर बिया पुरतात. त्यांना हलकेसे पाणी घालतात. पिशव्यांना कोवळे ऊन मिळेल, अशी व्यवस्था केली जाते. पिशव्या पूर्ण उन्हात ठेवल्यास कडक उन्हामुळे रोपाचे कोवळे कोंब जळण्याची शक्यता असते. त्यामुळे बालपणी आवळ्याच्या रोपांची चांगली काळजी घ्यावी आणि पुढे आयुष्यभर आरोग्यवर्धक मधुर फळे खावी.

रोप उगवून येताना पहिली दोन पाने साधी असतात. त्याच्या आतून येणारी पाने ही संयुक्त पानासारखी दिसतात. प्रत्यक्षात त्या छोट्या फांद्या असतात. सुरुवातीला हिरव्या खोडावर एकाआड एक या फांद्या फुटत राहतात. त्या फांद्यांना साधी पाने येतात. पाने एकाआड एक येतात. ती एक ते दीड सेंटिमीटरपर्यंत लांब, दंडगोलाकार असतात. कोवळ्या पानाला लाल रंग असतो. पानाच्या वरचा भाग हिरवा तर मागचा भाग पांढरा होतो. कडाचा लाल रंग हळूहळू कूी होत जातो. मात्र पानाच्या कडा पिवळसर पोपटी रंगाच्या राहतात. पातळ पाने खोडावर इतकी जवळ असतात की ती चिंचेच्या पानासारखी भासतात. या फांद्यांना तीस ते साठ पानांच्या रांगा दोन्ही बाजूंना आल्याने ते जणू संयुक्त पानच भासते. मात्र सूक्ष्म निरीक्षण केल्यास हा भेद सहज लक्षात येतो. पानांच्या मध्ये शीर असते. त्यावर एकाआड एक उपशीरा फुटतात. मात्र त्या अत्यंत लहान आणि अस्पष्ट दिसतात. फांदीच्या टोकाला असणारी तांबूस कोवळी पाने या वृक्षाचे सौंदर्य वाढवतात. ही पाने शेळ्या आणि मेंढ्यांना अतिशय प्रिय असतात. त्यामुळे कोवळ्या रोपांचे या जनावरांपासून रक्षण करणे महत्त्वाचे असते. अशा छोट्या फांद्या या नऊ ते बारा इंच लांबीच्या असतात. आवळ्याच्या पानांचे देठ अतिशय लहान असते. हिवाळ्यात आवळ्याची पानगळ होते. पानगळ झालेली झाडे ओकीबोकी आणि रूक्ष दिसतात - अगदी विरक्त मनुष्यासारखी. अशा झाडांना पाहायला नको वाटते. आवळ्याची पडलेली पाने जमीन भुसभुशीत आणि कसदार बनवतात. वसंत ऋतूच्या चाहुलीबरोबरच झाडाला कोवळी पालवी यायला सुरुवात होते.


     आवळ्याचे रोप उंच होत असताना, त्याला छोट्या फांद्या फुटू लागतात. वरती येणारा कोंब आणि खोड तांबूस किंवा तपकिरी रंगाचे असते. त्यावर बारीक लव असते. ही लव तपकिरी लालसर रंगांची दिसते. टोकाची पाने लालसर तांबूस रंगाची असतात. काही वेळा त्यांचा रंग पिवळसर पोपटीही दिसतो. पुढे ही पाने पोपटी आणि नंतर गडद हिरव्या रंगाची बनतात. रोपे पुरेशी वाढल्यानंतर पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर ती लावतात. दोन झाडांतील अंतर पंधरा फूट ठेवतात. शक्यतो पावसाळ्यात रोपांची लागवड केली जाते. पावसाळा संपल्यानंतर रोपे एक वर्षाची होईपर्यंत त्यांना दर आठवड्याला पाणी द्यावे लागते. त्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. एक वर्षानंतर पाणी देण्याची गरज राहात नाही.

खोड मोठे होत जाते, तसतसा त्याचा रंग बदलत पांढरट करडा होत जातो. खोडावरील सालीचा रंग आतमध्ये लाल असतो. साल तीन ते सात सेंटिमीटर जाडीची असते. आतमध्ये एक पिवळा पापुद्रा असतो. आवळ्याचे झाड मध्यम आकाराचे असते. ते पंचवीस ते तीस फुटापर्यंत वाढते. आवळ्याचे खोड चाळीस सेंटिमीटर व्यासाचे होते. खोडावरील साल कात गळावी, तशी गळत राहते. गळणारी साल करड्या रंगाची असते. गळणाऱ्या सालीचा आतला रंग पिवळा, गुलाबी किंवा लालसर असतो. आवळ्याचे लाकूड कठीण असते. लाकडाचा रंग लालसर किंवा पिवळा असतो. हे लाकूड पाण्यात लवकर कुजत नाही. आवळ्याच्या लाकडाला पॉलिशही चांगले होते. त्यामुळे या लाकडाचा उपयोग बांधकामामध्ये, फर्निचर आणि शेतीची अवजारे बनवण्यासाठी केला जातो. लाकडाच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणात उष्मा मिळत असल्याने जळणासाठीही त्याचा उपयोग करतात. लाकडाचे आणि फांद्यांचे तुकडे पाण्यात टाकल्यास त्याच्या तुरटपणामुळे पाणी स्वच्छ होते. साल, पाने आणि फळांचा उपयोग कातडी कमावण्यासाठी तसेच कापडांसाठीचे रंग बनवण्यासाठी करण्यात येतो.

आवळ्याच्या झाडांवर खोडअळी, गॉल माशी, पिठ्या किंवा पिढ्या ढेकूण, तांबेरा, ब्ल्यू मोल्ड, बड नेक्रोसिस हे रोग पडतात. यातील गॉल माशी खोडांवर हल्ला करते. खोडाला अगदी कडेपासून एका सरळ रेषेत खात जाते. याचा बाहेरून लवकर अंदाज आला नाही, तर खोड त्या ठिकाणी करवतीने कापल्यासारखे मोडते आणि झाड पडते. यासाठी झाडाभोवती स्वच्छता ठेवावी लागते. या रोगांवर औषधे फवारून नियंत्रण मिळवले जाते. आवळ्याच्या झाडांमध्ये अंतर असल्याने आणि सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत येऊ शकतो. याचा फायदा घेऊन आंतरपिक घेण्याबरोबर बुंध्याजवळचा भाग स्वच्छ ठेवण्याची हुशारी काही शेतकरी दाखवतात. शक्यतो कडधान्यांचे आंतरपीक घेतले जाते. त्यामुळे आवळ्याला खत मिळते आणि आवळ्याची फळे परिपक्व होण्याच्या दिवसांत जमीन मोकळी राहते. 

आवळ्याच्या झाडाला विशिष्ट असा आकार नसतो. आवळ्याच्या फांद्या वरच्या दिशेने जशा वाढतात, तशाच त्या जमिनीकडे किंवा जमिनीस समांतरही वाढतात. यातील छोट्या फांद्या गळून पडतात. पाच ते सहा वर्षांनंतर झाड मोठे होते. पाच-सहा वर्षांनंतर छोट्या फांद्यांना पानांजवळ गोंडस कळ्या येतात. त्या इतक्या लहान असतात की जवळ जाऊन पाहिल्याखेरीज लक्षात येत नाहीत. काही दिवसांत कळ्यांचे फुलात रूपांतर होते. फुलेही खूप नाजूक आणि सुंदर असतात. फुलांचे सौंदर्य एकदा नजरेने टिपले की पाहातच राहावे असे वाटते. फुले साधारण दोन ते चार मिलीमीटर लांब असतात. फुलांचा रंग हिरवट पिवळसर असतो. त्यांना एक प्रकारचा मंद सुगंध असतो. डहाळीवरील पानांच्या देठातून एक किंवा दोन कळ्या येतात. नर आणि मादी फुले स्वतंत्र असतात. नर फुलामध्ये सहा सुट्या पाकळ्या आणि तीन पुंकेसर असतात. मादी फुलांमध्ये सहा सुट्या पाकळ्या (संदले), बीजांडकोश आणि तीन दुभंगलेले स्टिग्मा असतात. यातूनच परागकण बीजांडकोशांपर्यंत पोहोचतात. मादी फुले ही नर फुलांपेक्षा मोठी असतात. संख्येने नर फुलांची संख्या मात्र जास्त असते. नर आणि मादी फुलांतील फरक सहज डोळ्यांना दिसत नाही. ही फुले छोट्या फांद्यांच्या चारी बाजूने फुलतात. छोट्या फांद्यावर आलेली ही फुले गजऱ्याचे रूप धारण करतात. फुले फुलू लागली की मधमाशा, मुंग्या आणि इतर कीटक झाडांवर गर्दी करतात. एकापाठोपाठ एक फुलांवरून त्या मध गोळा करत राहतात. नकळत परागीभवन घडवत राहतात. निसर्गातील प्रत्येक जीव निसर्गातून काही घेताना, देणाऱ्याला काही तरी देत असतो. निसर्गातील हे दृष्य पाहणारा माणूस, हा गुण का घेत नाही? असा प्रश्न मनात येतोच.

परागीभवन झालेल्या फुलांच्या पाकळ्या आणि नर फुले गळून जातात. फुलांच्या गजऱ्याचे बारीक हिरव्या मण्यांच्या माळेत रूपांतर होते. फुलांची जागा छोटे हिरवे आवळे घेतात. हळूहळू ते वाढू लागतात. आवळे जसजसे मोठे होत जातात, तशी पाने गळत जातात आणि झाडांवर केवळ आवळेच लगडलेले दिसतात. पावसाळा संपताना त्यांचा रंग पिवळसर व्हायला सुरुवात होते. काही झाडांची फळे लालसर दिसतात. फळांची कांती मऊ, तुकतुकीत असते. फळांचा आकार खाली आणि वर थोडा चपटा असतो. अगदी पृथ्वीच्या आकारासारखा! कदाचित त्यामुळेच त्याला धात्रिका हे नाव आले असावे. फळांमध्ये असणाऱ्या शीरा अगदी पृथ्वीच्या गोलावरील रेखांशासारख्या दिसतात. काही जातीच्या आवळ्यामध्ये शीराजवळचा भाग थोडा आत खेचल्याने सहा फुगीर भाग दिसतात. फळे दीड ते दोन सेंटिमीटरपासून चार-पाच सेंटिमीटरपर्यंत व्यासाची असतात. फळांच्या केंद्रस्थानी कठीण कवचात दोन ते सहा तपकिरी रंगाच्या बिया असतात. कठीण कवचावर एक ते दोन सेंटिमीटर गर असतो. हा गर खायला आवडतो. आवळ्याची झाडे ६५ ते ७० वर्षांपर्यंत फळे़ देतात. आवळ्याचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होते. त्या खालोखाल गुजरातचा क्रमांक लागतो. आज लाखो हेक्टरवर आवळ्याचे उत्पादन घेतले जाते.          

कार्तिक महिना सुरू झाला की आवळ्याची फळे खुणावू लागतात. आवळ्याच्या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी तत्त्वे असतात. खाण्यायोग्य गराच्या १०० ग्रॅममध्ये पाणी ८१ टक्के असते. कार्बोहायड्रेट्स १४ टक्के, लोह १.२ टक्के, प्रथिने ०.५ टक्के, स्निग्धांश ०.१ टक्के, स्फुरद ०.०२ टक्के, कॅल्शियम ०.०५ टक्के, जीवनसत्व ‘ब’ ०.०३ टक्के, जीवनसत्व ‘क’ ०.६ टक्के, खनिजद्रव्ये ०.७ टक्के, तंतुमय पदार्थ ३.४ टक्के, लोह १.२ टक्के असतात. काही प्रमाणात निकोटिनिक आम्लही असते. आवळ्याच्या शंभर ग्रॅमपासून ५९ कॅलरी ऊर्जा मिळते. फळ चवीला तुरट, आंबट असते. आवळा कच्चा खाल्ला जातो. तसेच त्यापासून मुरंबा, सॉस, कँडी, चकत्या, च्यवनप्राश, तेल, आवळा सुपारी, जेली, लोणचे, टॉफी, पावडर बनवली जाते. ताप, हगवण, मधुमेहावर आवळा उपयोगी पडतो.

रान आवळा आणि पांढरा आवळा असे आवळ्याचे दोन प्रकार आहेत. मोरावळा आणि रायआवळा असेही दोन प्रकार आहेत. यातील राय आवळ्याची पाने खोड, फळे ही वेगळी असतात. राय आवळा, बिमल, करमल ही सुद्धा आवळ्यातीलच वेगळी झाडे आहेत. यांची फळे वेगळी असतात. यातील राय आवळा खाण्यासाठी वापरला जातो. राय आवळ्याचे झाड अत्यंत देखणे असते. या झाडाची पाने संयुक्त पाने असतात. याच्या खोडाला कळ्या, फुले, आणि फळे लागतात. फळांचे मोठ्या प्रमाणात खोडाला लगडलेले घोस खूप देखणे दिसतात. फळे दोन्ही बाजूला नेहमीच्या आवळ्यापेक्षा जास्तच चपटी आणि मध्येच फुगीर असतात. ही फळे पाहिली की आकाशातील चांदणी फुगून बसली की काय, असे वाटते. हे फायलॅन्थस कुळातील झाड आहे. खोडाला जेथून पाने येतात, तेथेच कळ्यांचे घोस आणि फळे लागतात. ही फळे लोणचे बनवण्यासाठी वापरतात. आदिवासी भागात भाजीतही घालतात. 

नेहमीच्या आवळ्याच्या झाडांपासून संकरित वाणांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. बनारसी, कृष्णा (एनए-५), चकिया, कांचन (एनए-४), हाथीझूल (फ्रांसिस), नरेंद्र-६, नरेंद्र-७, आनंद-१, आनंद-२, आग्रा बोल्ड (एनए-१०), बीएसआर-१ इत्यादी संकरित वाण आज मोठ्या प्रमाणात लावले जातात. बियांपासून येणाऱ्या झाडांना फळे उशिरा येतात. फळे मूळ झाडांप्रमाणे येतातच असे नाही. त्यामुळे कलम पद्धतीने किंवा डोळे भरून रोपे बनवली आणि लावली जातात.  

आवळ्याच्या एका झाडापासून तीस ते शंभर किलो आवळ्याचे उत्पादन मिळते. फळांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अनेक कंपन्या फळे थेट खरेदी करतात. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. आवळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही मोठे आहे. आवळ्याच्या झाडाचे असणारे फायदे आणि उपयोग लक्षात घेता हे झाड प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर असायलाच हवे.  

ll२ll

आवळा अत्यंत उपयुक्त फळ आहे. त्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. लोणचे, मुरंबा, सुपारी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. अनेकजण आवळ्याच्या बारीक चकत्या करून त्यावर मीठ आणि थोडेसे तिखट टाकून सकाळी नियमित सेवन करतात. आवळा तुरट, शीतल असतो. आवळ्याच्या वाळलेल्या फळांना आवळा काठी म्हणतात. वाळलेली फळे अतिसार, आमांश, रक्तस्राव अशा विकारांवर उपयुक्त ठरतात. मधुमेह, खोकला, श्वसन नलिकेचा दाह, दमा, कावीळ, त्वचारोग, तरूणपणी केस पांढरे होणे, इत्यादी रोगांवर आवळा फळ गुणकारी आहे. हिरडा आणि बेहडा फळांच्या सालीबरोबर वाळलेल्या आवळ्याची भुकटी मिसळून त्रिफळाचुर्ण बनवले जाते. आवळ्यातील ‘क’ जीवनसत्व स्कर्व्ही विकारावर गुणकारी ठरते.

आवळ्याचे मूळ आणि साल तूरट असते. कावीळ, हगवण, व्रण किंवा अल्सरवर साल आणि मूळ उपयुक्त ठरते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त आहे. आवळा पित्तशामक आहे. आवळ्याचे पाव चमचा चूर्ण उगळलेल्या चंदनासोबत घेतल्यास आम्लामुळे होणाऱ्या उलट्या थांबतात. डोळ्यांची आग होत असल्यास भिजवलेली आवळा काठी आणि तीळ बारीक उगाळून त्याचा लेप बंद डोळ्यावर ठेवतात. आम्लामुळे होणारी जळजळ आवळा चूर्ण, साखर आणि साजूक तूपाचे मिश्रण खाल्ल्यास कमी होते. घोणाळा फुटल्यास (नाकातून रक्त येत असल्यास) आवळा चूर्ण टाळूवर लावतात.

आवळ्यामध्ये चार संत्री किंवा मोसंबीइतके ‘क’ जीवनसत्व असते. दोन आवळे रोज खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. आवळ्यापासून बनवलेले च्यवनप्राश हे वार्धक्य दूर ठेवणारे औषध म्हणून सर्वपरिचित आहे. आवळ्यांमध्ये तुरट, आंबट, गोड, खारट आणि कडू हे पाच रस असतात. त्यामुळे त्वचा निरोगी आणि सतेज राहते. मोरावळा रोज खाल्ल्यास पित्तदोष येत नाही. नेत्ररोगावर आवळ्याच्या पानांचा रस वापरला जातो. आवळा काठी रात्रभर भिजत ठेवून त्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्ररोग दूर होतात. कोरडी खरूज, त्वचारोग, आवळा काठीच्या पाण्याने दूर होतात. आवळा काठी आणि दुधाचा उपयोग ताप आल्यास केला जातो. आवळा खाताना आंबट लागत असला, तरी आवळा खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास पाण्याची चव गोड लागते. मिरची, खोबरे, जिरे घालून त्याची चटणी बनवतात. मुरंबा आणि जामही बनवला जातो. आवळ्याच्या रसाने स्मरणशक्ती वाढते. स्त्रियांच्या आजारात आणि संततीप्राप्तीसाठीही आवळा उपयुक्त असल्याचे संदर्भ मिळतात. जंताचा त्रास होत असल्यास आवळ्याचा रस आणि ओल्या नारळाचे दूध दिले जाते. आव पडणे, आतडी कमजोर होणे या त्रासावर आवळ्याचा रस उपयुक्त ठरतो. आवाज बसला असल्यास आवळा चूर्ण खाण्यास दिले जाते. उचकी लागत असेल, तर आवळा आणि पिंपळापासून औषध बनवले जाते. आले, आवळा आणि गुळापासून वातावरील औषध बनवले जाते. त्यामुळे सांधेदुखी कमी होते. आवळा सावलीत सुकवला, तर त्यातील जीवनसत्वांचे प्रमाण वाढते. १०० ग्रॅम सुकवलेल्या आवळ्यामध्ये २४०० ते २६०० मिलीग्रॅम ‘क’ जीवनसत्व असते. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास आवळा उपयुक्त ठरतो. आवळा सेवनाने रक्तक्षय होत नाही. रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवण्यातही आवळा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आवळ्याच्या पाण्याने आंघोळ केल्यास आरोग्याचे दोष नाहीसे होतात. आवळ्यामध्ये कर्करोग प्रतिबंधक क्षमता आहे. भारताप्रमाणेच चीन, युनानी, तिबेट आणि श्रीलंकेतही औषधी वनस्पती म्हणून आवळ्याकडे पाहिले जाते.

केसांचे आरोग्य आणि आवळा यांचे नाते आता सर्वांना ज्ञात आहे. केस गळत असल्यास आवळ्याचा रस, ज्येष्ठमध, चंदन, पिंपळी आणि नीलकमल यांच्यापासून बनवलेले तेल वापरले जाते. ब्राम्ही आणि आवळा यांच्यापासून बनवलेले ‘ब्राम्ही-आवळा’ तेल केसांसाठी फारच गुणकारी असते. आवळा, रिठा, शिकेकाई आणि इतर वनौषधीपासून बनवलेली शिकेकाई पावडरने केस धुतल्यास केसांना चकाकी प्राप्त होते. केस गळायचे थांबतात.

कविकुलगुरू कालिदास ‘ऋतुसंहारम’ या गीतकाव्यात ग्रीष्म ऋतूमध्ये करावयाच्या उपचारांबद्दल, तसेच केस सुगंधित करण्यासाठी स्त्रिया कषायचूर्णाने स्नान करतात, असे लिहितात. सुश्रुतसंहिता, धन्वंतरी निघंटूमध्ये याचे औषधी गुणधर्म जागोजागी वर्णिले आहेत. हा वृक्ष मातापित्याप्रमाणे आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणारा असल्याने, आवळ्याला आवळा आणि आवळी, किंवा हिंदीत आमला आणि आमली अशी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही प्रकारची नावे मिळाली असावीत. शरदिनी डहाणूकर या ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाच्या अभ्यासिका. त्या म्हणायच्या, ‘जर पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर जायचे असेल आणि एकच झाड सोबत न्यायची परवानगी असेल, तर मी आवळ्याचे झाड नेईन.’  

आवळ्यापासून अनेक पाककृती, पदार्थ बनवले जातात. आवळा लोणचे बनवण्यासाठी आवळे थोडसे वाफवून त्याच्या फोडी करतात. भिजत घातलेली मोहरी वाटून घेतात. थोडा गुळ तळून पूड केलेली मेथी पावडर, चवीनुसार तिखट, हळद, हिंग आणि मीठ घालतात. आवळ्याचा रस तयार करताना आवळ्याच्या फोडीबरोबर पुदीन्याची पाच-सहा पाने, कोथिंबीर, जिरे पूड आणि पाणी घेतले जाते. आवळा सुपारी बनवताना, आवळे धुवून फोडी किंवा कीस करून घेतात. थोडेसे आले घालतात. त्यात थोडे मीठ, जीरे पूड घालून मिसळतात आणि वाळवतात. आवळा, गुळ, लवंग, दालचिनी, काळे मीठ, जीरे पूड, बडीशेप आणि लाल तिखट वापरून आवळ्याचा चुंदा बनवतात. आवळ्याच्या फोडी, तूरडाळ, मेथी, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ वापरून तुपाची फोडणी देऊन आवळ्याची आमटी बनवतात. आवळा, नारळाचा कीस, जिरे, काळी मिरी, कढीपत्ता, कोथिंबीर, साखर, हिरवी मिरची, मीठ वापरून तुपाच्या फोडणीसह आवळ्याचे सार बनवतात.  

ll३ll

      आवळा फळ त्यातील औषधी गुणधर्मामुळे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. आवळा हा ‘भरणी’ नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा आराध्यवृक्ष आहे. आवळ्याच्या झाडात वेगवेगळ्या देवता राहतात, असे मानले जाते. आवळ्याच्या मूळात विष्णू, खोडामध्ये ब्रम्हदेव आणि छोट्या फांद्यामध्ये शंकर वास्तव्य करतात, अशीही धारणा आहे. काही लोक मुळांमध्येच ब्रम्ह, विष्णू आणि महेश राहतात, असे मानतात. फांद्यामध्ये मुनी, छोट्या फांद्यामध्ये देव, पानांमध्ये वसु आणि फळांमध्ये प्रजापती राहतात. जो आवळ्याच्या झाडाची पूजा करतो, त्याला भगवान विष्णू प्रसन्न होतात, अशी अनेक लोकांची धारणा आहे. त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय मानला जातो.

कार्तिक शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाखाली स्वंयपाक करून जेवण केल्याने पुण्य मिळते, अशी अनेक लोकांची धारणा आहे. आवळ्याच्या झाडाखाली भोजन केल्यास शरीर निरोगी राहते, असे मानले जाते. जेवणापूर्वी झाडाला अर्ध्य देतात. ‘धात्रिदेवी नमस्तुभ्यं सर्वपापक्षयंकरि l नीरोगं कुरु मां नित्यं निष्पापं धात्रि सर्वदा ll’ हा श्लोक म्हटला जातो.  श्री विष्णूची यथासांग पूजा करतात. झाडाच्या सर्व बाजूला तुपाचे दिवे लावतात. आवळ्याभोवती सुताचे हार घालतात. आवळ्याच्या झाडाला ओवाळतात. झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालतात. याला ‘आवळी भोजन’ म्हणतात. किमान या दिवसातील नवमीला तरी असे भोजन करतात. या भोजनावेळी आवळ्याचे पान ताटात पडल्यास शुभ मानले जाते. या पूजेला ‘आवळा नवमी’ असे म्हणतात. आवळ्याची फाल्गुन शुक्ल एकादशी दिवशी पूजा करतात. याला ‘आवळा एकादशी’ म्हणतात. या दिवशी दिवसातून एकदाच फलाहार करतात. श्री विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंगावर ठेवतात. आवळा एकादशी कथेचे वाचन किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण केले जाते. नंतर नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी अन्नदान केल्यानंतर ही पूजा पूर्ण होते. हे व्रत पूर्ण केल्यास शेकडो तीर्थांचे दर्शन केल्याचे पुण्य लाभते. काही भागात अश्विनी पौर्णिमेपासून वैकुंठ कार्तिक शुद्ध चतुर्दशीपर्यंत आवळी पूजन करतात. ऋतुमानाप्रमाणे आपण आपल्या आहारात योग्य त्या फळांचा उपयोग करावा, यासाठी अशा उत्सवांचे नियोजन करण्यात आले असावे. अनेक लोक आवळा तुळशी विवाहापूर्वी खात नाहीत.

      दिपावलीनंतर तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाहात ऊस आणि बोराइतकेच आवळ्याला महत्त्व आहे. अनेक कुटुंबामध्ये डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आवळ्याच्या झाडाखाली साजरा करतात. आवळ्याचे झाड लावणाऱ्या आणि संवर्धन करणाऱ्या व्यक्तीस मोक्षप्राप्ती मिळते, अशी धारणा आहे. आवळ्याच्या वृक्षांची निर्मिती ब्रम्हदेवाने केली, असे मानले जाते. पद्मपुराणामध्ये या वृक्षाची निर्मिती ब्रम्हदेवाच्या मुखरसापासून झाली, असे वर्णन आहे. तर स्कंदपुराणामध्ये आवळा ब्रम्हदेवाच्या आनंदाश्रूतून निर्माण झाला असल्याचे वर्णन आहे. जलप्रलय झाल्यानंतर सर्व जग नष्ट झाले. पुन्हा सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ब्रम्हदेवांनी तप सुरू केले. या तपामध्ये भ्रामक जप करत असताना ब्रम्हदेवाच्या डोळ्यांत पाणी आले. ते अश्रू पृथ्वीवर पडले. त्यातून निर्माण झालेला पहिला वृक्ष म्हणजे आवळा. म्हणूनच याला आदिरोह असेही म्हणतात. आवळ्याच्या वृक्षानंतर पृथ्वीवर विविध जीवांची निर्मिती झाली, अशी कथा आहे. या मूळ वृक्षाची आठवण जरी काढली, तरी गोदानाचे पुण्य मिळते, असे मानले जाते. या झाडाला पाहिले तर दोन गायी दान केल्याचे आणि आवळ्याचे फळ खाल्ले, तर तीन गाई दान केल्याचे पुण्य मिळते. म्हणून आवळ्याच्या झाडाखाली राहणे, भोजन बनवणे आणि जेवल्याने मोक्षप्राप्ती होते, अशी धारणा आहे. शिवपुराणामध्ये जालंधरपत्नी वृंदेच्या चितेमध्ये टाकण्यासाठी सरस्वतीने विष्णूला दिलेल्या बीजातून आवळ्याच्या वृक्षाची निर्मिती झाली, असा उल्लेख येतो. आवळ्याचे झाड कोठे लावावे, यासंबंधीचे वर्णन ब्रम्हवैवर्तपुराणात आहे. आवळा दारिद्र्य नष्ट करते. हे फळ विविध देवांना प्रिय असले तरी, सूर्याला प्रिय नाही. त्यामुळे सूर्याची पूजा करणारे लोक रविवारी आवळ्याला  शिवत नाहीत. मृदून्मान्य नावाच्या राक्षसाने स्वर्गातील देवांना स्थानभ्रष्ट केले. तेव्हा त्यांनी आवळ्याच्या झाडावर आसरा घेतला आणि त्या वेळेपासून हा वृक्ष पूजला जाऊ लागला. आणखी एका कथेनुसार समुद्र मंथनानंतर विष आणि अमृत बाहेर आले. त्यातील अमृताचा थेंब चुकून जमिनीवर पडला आणि त्यातून आवळ्याची निर्मिती झाल्याचे मानले जाते.   

      आवळा एकादशीला हिंदीमध्ये आमलकी एकादशी म्हणतात. त्या दिवशी कथा वाचली जाते. एक दिवस युधिष्ठरांने श्रीकृष्णाला फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व विचारले. तेव्हा श्रीकृष्णांने सांगितले की, या एकादशीला ‘आवळा एकादशी’ म्हणतात. श्री विष्णूंनी विशेष ज्ञान प्राप्त केले. त्या ज्ञानातून चंद्रासारखा एक बिंदू जमिनीवर उत्पन्न केला. त्यातून आवळा वनस्पती तयार झाली. त्याचवेळी विष्णूने निसर्ग निर्मितीसाठी ब्रह्माची उत्पत्ती केली. विविध देवता, गंधर्व, यक्ष, असुरांची निर्मिती केली. हे सर्वजण या वनस्पतीकडे पाहू लागले. त्यापूर्वी त्यांनी अशी कोणतीही वनस्पती पाहिली नव्हती. त्यानंतर आकाशवाणी झाली की, ‘ही वनस्पती सर्व वनस्पतींमध्ये सर्वोत्तम आहे. ती भगवान विष्णूला सर्वप्रिय आहे. या वनस्पतीला स्पर्श केल्यास दुप्पट आणि फळ खाल्ल्यास तिप्पट पुण्य मिळते. या झाडाची पूजा करणारास विष्णूंचा आशीर्वाद मिळतो.’ हे ऐकून सर्वांनी विचारले, ‘तू कोण आहेस?’ पुन्हा आकाशवाणी झाली, ‘जो भूत, भविष्य आणि वर्तमान जाणतो, जो या सृष्टीचा कर्ताधर्ता आहे, जो अदृष्य अवस्थेत सर्वत्र उपस्थित आहे, तोच मी विष्णू आहे.’ सर्वांनी त्या दिशेला नमन केले. विष्णू सर्वांना प्रसन्न झाले आणि वरदान मागण्यास सांगितले. यावर सर्व ऋषी म्हणाले, ‘तुम्ही आनंदी असाल, तर स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगावा.’ विष्णूंनी उपाय सांगितला, ‘जो कोणी फाल्गुन शुक्ल एकादशीला एकादशीला उपवास करेल, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.’ या कथेतून आवळा एकादशीच्या व्रताची सुरुवात झाली.

      आवळा एकादशीबाबत आणखी एक कथा आहे. फार फार वर्षांपूर्वी चित्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. राज्यात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व होते. राजाची आमलकी एकादशीवर मोठी श्रद्धा होती. एके दिवशी शिकारीला गेलेला चित्रसेन राजा जंगलात खूप दूर गेला. त्या ठिकाणी राजाला काही डाकूंनी घेरले. डाकू राजाला मारायला धावले. मात्र डाकूंच्या हातातील शस्त्र, राजाच्या शरीराजवळ जाताच फुलांमध्ये रूपांतरित होत होते. या सर्व प्रकारात राजाला भोवळ आली आणि राजा बेशुद्ध पडला. राजाच्या शरीरातून एक दिव्य शक्ती बाहेर पडली. तिने सर्व डाकूंचा वध केला. जेव्हा राजा शुद्धीवर आला तेव्हा सर्व डाकू मरण पावलेले दिसले. राजा आश्चर्याने विचार करत असताना आकाशवाणी झाली की, ‘राजा, तुझ्या आमलकी एकादशी व्रताने जे पुण्य जमा झाले, त्याने हे सर्व डाकू मरण पावले.’ हे ऐकून राजा खूप आनंदित झाला. पुन्हा तो आपल्या राज्यात आला आणि आमलकी एकादशी आणखी व्यापक रूपात साजरी करायला सुरुवात केली.

      आवळा नवमीची कथा वेगळी आहे. फार फार वर्षापूर्वी एका वैश्याच्या (व्यापाऱ्याच्या) पत्नीला मूल होत नव्हते. या दांपत्याने उपवास केले. व्रत पाळले. अखेर एका शेजारणीने तिला भैरव देवाला लहान मुलाचा बळी देण्यास सांगितले. तिचे ऐकून तिने भैरव देवाला एका मुलाचा बळी दिला. यामुळे भैरव देवाला संताप आला. या महिलेला पुत्रप्राप्ती तर झाली नाहीच, उलट वैश्याच्या पत्नीला कुष्ठरोग झाला. यामुळे वैश्यपत्नीला आपली चूक उमगली. ती पश्चाताप करू लागली. रोगमुक्त होण्यासाठी ती गंगामातेला शरण गेली. गंगा मातेने तिला कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा खाण्याचा सल्ला दिला. गंगा मातेच्या सांगण्याप्रमाणे तिने आवळा पूजन करून आवळा फळाचे सेवन केले. यामुळे ती कुष्ठरोगमुक्त झाली. आवळ्याच्या प्रभावाने तिला दिव्य शरीर प्राप्त झाले. पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. तेव्हापासून आवळा नवमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली.

      आवळा नवमीबद्दल आणखी एक कथा सांगण्यात येते. कोणे एके काळी एक राजा होता. तो दररोज सव्वा मण आवळे दान केल्यानंतरच जेवण करत असे. आपल्या वृद्धापकाळाला ओळखून राजाने पुत्राला गादीवर बसवले. त्यानंतरही तो हा नियम पाळत असे. सूनेच्या मनात विचार आला हा दररोज असेच आवळे दान करत राहिला, तर तिजोरी खाली होईल. तिने आपल्या नवऱ्याला म्हणजेच राजाला सांगून सासऱ्याचे हे दान बंद करायला लावले. राजाने महाल सोडला आणि तो वनात राहू लागला. राणीही त्याच्याबरोबर गेली. आवळे दान न करता आल्याने, त्याला सात दिवस अन्न खाता आले नाही. पती जेवला नाही म्हणून राणीही उपाशी राहिली. पती-पत्नी तसेच उपाशी झोपले. त्यांची ही निष्ठा पाहून देव प्रसन्न झाला. देवाने रात्रीत जंगलात महाल, आणि आवळ्याची भरपूर झाडे असणारी बाग तयार केली. पहिल्यापेक्षा दुप्पट मोठे राज्य निर्माण केले. सकाळी उठल्यानंतर त्यांनी हा चमत्कार पाहिला. बागेतील आवळे दान करून अन्न ग्रहण केले. तिकडे मुलाने आणि सूनेने आवळ्याचा अपमान केल्याने, त्यांच्यावर भरपूर संकटे आली. राज्यांवर शत्रू हल्ले करू लागले. त्यात त्यांचे राज्य गेले. मजुरी करण्याची वेळ आली. ते मजुरी शोधत, शोधत वडिलांच्या राज्यात आले. त्याची अवस्था इतकी वाईट झाली होती की राजा आणि राणी आपल्या मुलाला आणि सुनेला ओळखू शकले नाहीत. त्यांनी मुलगा आणि सूनेला न ओळखताच कामावर ठेवले. एक दिवस सून सासूचे केस विंचरत होती. त्या वेळी तिला सासूच्या पाठीवरील खूण पाहिली. ‘आपल्या सासूच्या पाठीवरही अशीच खूण होती, हे आठवून तिच्या डोळ्यात पाणी आले. राणीने तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा सून म्हणाली, ‘माझ्या सासूच्या पाठीवरही अशीच खूण होती. माझे सासरे रोज महाराजांसारखेच आवळे दान करायचे. आम्ही त्यांना अडवले. ते निघून गेले. मात्र त्यानंतर आमच्यावर खूप संकटे आली. राज्य गेले. आम्ही रस्त्यावर आलो. आज माझे सासू सासरे कोठे असतील, काय माहीत. तुमच्या पाठीवरील खूण पाहून मला सासूची आठवण आली.’ हे ऐकल्यावर राणीने तिला ओळखले. राजाला सांगितले. उभयतांनी मुलगा आणि सूनेला समजावले, ‘दान दिल्याने कधीच कमी होत नाही, तर वाढतच राहते.’ त्यानंतर राजा मुलगा आणि सुनेसह राणीबरोबर राहू लागला. आवळ्याच्या सहवासात राहिल्याने, आवळे खाल्ल्याने राजा आणि त्याचा परिवार निरोगी आणि दीर्घायुषी झाला. आवळ्याच्या झाडाखाली भोजन करण्यासंदर्भात आजही ‘आवळी, आवळी सदा सावळी, राधाकृष्ण तुझ्या जवळी, नाव घेता आवळीचे पाप जाईल जन्माचेl’ असे म्हटले जाते.

      ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ हा वाक्प्रचार ज्या कथेवरून आला आहे, ती कथाही सुंदर आहे. मोहनलाल नावाच्या तरूणाला अध्ययन न करता ज्ञानी व्हायचे होते. विद्वान म्हणून सन्मान मिळावा असे वाटत होते. आपण महादेवाचा जप केला, तर ते सहज प्रसन्न होतील आणि मागेल ते देतील, हे तो जाणत होता. मोहनलाल गंगेच्या काठावर गेला. तेथे तपश्चर्या करू लागला. तेथून चाललेल्या एका खऱ्याखुऱ्या तपस्व्याच्या लक्षात आले की मोहनलाल मनापासून तप करत नाही. मोहनलालचा ‘आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न लक्षात येऊनही साधूने त्याला विचारले, ‘का रे, देवाचा जप करण्यासाठी गंगाकिनारी कशाला आलास?’ मोहनलालची पंचाईत झाली. गंगाकिनारी खोटे बोलता येत नव्हते. मोहनलाल म्हणाला, ‘लोकांनी मला ज्ञानी म्हणून ओळखावे, असे वाटते. मात्र मला अभ्यास करायचा नाही. त्यासाठी सोपा मार्ग म्हणून मी भोळ्या सांबाचा जप करत आहे. त्यांना प्रसन्न करून घेऊन मी ज्ञानी बनणार आहे.’ हे ऐकून साधू थोडे दूर गेला. काठावरील मूठ-मूठ रेती पात्रात टाकू लागला. मोहनलालला याचे गुढ काही उकलेना. त्याने तप थांबवून, साधूला असे करण्याचे कारण विचारले. तेव्हा साधू म्हणाला, ‘लोकांना सहज ये-जा करता यावी यासाठी गंगामातेवर पूल बांधण्यासाठी वाळूने तिचे पात्र भरत आहे.’ त्यावर मोहनलाल म्हणाला, ‘निव्वळ वाळूने पुल कसा बनेल. यासाठी दगड, चुना, शाडू आणि वाळू याची गरज असते.’ यावर साधूने मोहनलालला सांगितले, ‘हे तुला कळते ना. मग आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न कशाला करतोस. ज्ञानी होण्यासाठी देवाची भक्ती, तप उपयोगाचे नाहीत. त्यासाठी कठोर परिश्रम करून ज्ञान संपादन करावे लागते. या ज्ञानातून लोकांना सन्मार्गाला लावण्याची पात्रता अंगी आणावी लागते. यामुळे भरपूर कष्ट कर. अभ्यास कर आणि ज्ञान प्राप्त करून घे. लोक आपोआप तुला ज्ञानी म्हणतील.’ हे ऐकून मोहनलालचे डोळे उघडले आणि त्याने अभ्यास करण्यास सुरुवात केली.

      च्यवनप्राश आवळ्यापासून बनवले जाणारे औषध आहे. च्यवन ऋषीसाठी देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांनी च्यवनप्राश बनवले, अशी कथा आहे. भृगी ऋषींचे पुत्र च्यवन जंगलात तपस्या करत होते. त्या ठिकाणी शर्याती राजाची कन्या सुकन्या खेळण्यासाठी जात असे. तेथे चुकून तिचा स्पर्श च्यवन ऋषींना झाला. त्या राज्यात पतीखेरीज परपुरूषांस स्पर्श करण्यास मज्जाव होता. त्यामुळे शर्यातीने च्यवन ऋषींना सुकन्येशी विवाह करण्याची विनंती केली. त्यांच्यापेक्षा सुकन्या खूप तरूण होती. तिला शोभेसे रूप धारण करण्यासाठी च्यवन ऋषींना तरूण व्हायचे होते. त्यांनी राजाकडून काही दिवसांची मुदत मागून घेतली. या काळात आवळ्यापासून बनलेले तारूण्य, बल आणि शक्तीवर्धक औषध मिळवले. त्याचे प्राशन करून त्यांनी तारूण्य प्राप्त केले आणि नंतर विवाह केला. आज त्याप्रमाणे तयार केलेले औषध च्यवनप्राश म्हणून ओळखले जाते.

      महाभारतामध्ये ही कथा थोडी वेगळ्या पद्धतीने सांगण्यात आली आहे. तपश्चर्या करत असणाऱ्या च्यवन ऋषींच्या अंगावर वारूळ चढले होते. वारूळातून केवळ त्यांचे तेजस्वी डोळे दिसत होते. तेथे शर्याती राजाची कन्या सुकन्या खेळत होती. खेळताना तिने पडलेली काडी च्यवन ऋषींच्या डोळ्यात घातली. त्यामुळे च्यवन ऋषींचे डोळे फुटले. त्यामुळे च्यवन ऋषी भयंकर संतापले. त्यांनी शर्याती राजाच्या सैन्याचा मलमुत्रावरोध केला. सर्व सैनिकांचे पोट दुखू लागले. शर्याती राजाला हे कळताच तो च्यवन ऋषींना शरण गेला. अत्यंत नम्रतापूर्वक च्यवन ऋषींना विनंती केली, ‘महर्षी माझ्या कन्येने अज्ञानाने आपला नेत्रभेद केला. आपण तिला आणि मला माफ करावे.’ च्यवन ऋषी उत्तरले, ‘क्षमा करीन, पण यासाठी तू तुझ्या कन्येचा विवाह माझ्याशी करून दिला पाहिजे.’ सुकन्येने आपली चूक मान्य करून च्यवन ऋषींशी विवाह केला. त्यांची अखेरपर्यंत सेवा केली. मात्र च्यवन ऋषी वृद्ध होते. त्यांची तपश्चर्या माहीत असल्याने अश्विनीकुमारांनी च्यवन ऋषींना आवळ्यापासून बनवलेला प्रसाद दिला आणि त्यातून च्यवन ऋषींना तारूण्य प्राप्त झाले. हाच प्रसाद आज ‘च्यवन प्राश’ म्हणून ओळखला जातो.

      आवळ्याचा आणि साहित्याचा खूप जुना संबंध आहे. अभिजात संस्कृत साहित्यामध्ये आवळ्याचा संदर्भ अनेक ठिकाणी येतो. जैमिनीय उपनिषद, ब्राह्मणग्रंथ, छांदोग्योपनिषद, शिवोपोनिषद, कौटिल्यीय अर्थशास्त्र, जातक कथा, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, काश्यपसंहिता, पाणिनीचे अष्टाध्यायी, पतंजलीचे महाभाष्य इत्यादी अनेक ग्रंथात आवळा भेटतो. वाल्मिकी रामायणामध्ये आवळ्याच्या चूर्णांचा उल्लेख आहे. वनवासाला जाणाऱ्या रामाला भेटण्यासाठी भरत आपल्या सैन्यासह येतो. तेव्हा भरत आणि त्याच्या सैन्याचे आदरातिथ्य करण्यासाठी भारद्वाज ऋषींनी विश्वकर्म्याला आवाहन करून दिव्य वातावरण निर्माण केले. त्यावेळी नदी काठावर पात्रामध्ये कषायचूर्ण म्हणजे आवळ्याचे उटणे ठेवले. आवळा तुरट असल्याने त्याचा उल्लेख कषाय असा केला जातो. महाभारतातील वनपर्वात आवळ्याचा उल्लेख आहे. कालिदासांनी ‘ऋतुसंहारम’मध्ये ग्रीष्म ऋतूच्या वर्णनामध्ये लिहिले आहे की, ‘शिरोरुहै: स्नानकषायवासितै: l स्त्रियो निदाघं शमयन्ति कामिनाम् ll’ म्हणजेच कषायचूर्णाने केस सुगंधित करून स्त्रिया स्नान करतात आणि आपल्या सुगंधीत केसांनी प्रियकराचा ग्रीष्मदाह शांत करतात. सम्राट हर्षवर्धनाच्या सभेतील राजकवी बाणभट्टांच्या कादंबरीतील वैशंपायन पोपट आवळा खात असल्याचा उल्लेख येतो. वैशंपायन शूद्रक राजाला म्हणतो, ‘देव किं वा न आस्वादितम् l नलिनीदलहरितानि ll द्राक्षाफलस्वादूनि च दलितानि स्वेच्छया प्राचीनामलकीफलनि ll’ अर्थात महाराज मी कशाचा म्हणून आस्वाद घेतला नाही? कमळाच्या पानाप्रमाणे हिरवे आणि द्राक्षांप्रमाणे गोड असे जुन आवळेही चूर्ण करून खाल्ले.

शंकराचार्यांनी रचलेल्या ‘कनकधारा’ स्तोत्रात आवळ्याचा संदर्भ येतो. आचार्य गुरूग्रही असताना भिक्षा मागायला एका गरीब ब्राम्हणाच्या घरी गेले. भिक्षा देण्यासाठी घरात काहीच नव्हते. दारी आलेल्यास परत पाठवणेही शक्य नव्हते. त्यामुळे ब्राम्हण पत्नीने दारातील आवळ्याच्या झाडाखाली पडलेला एकमेव आवळा भिक्षा म्हणून दिला. तेव्हा त्यांनी अठरा श्लोकांचे कनकधारा स्तोत्र रचले. या स्तोत्राने प्रसन्न होऊन लक्ष्मीने सोन्याच्या आवळ्याचा वर्षाव केला. गृहिणीने भिक्षा म्हणून दिलेल्या आवळ्याला सोन्याचे मोल प्राप्त झाले. शंकराचार्यांच्या चरित्रातही आवळ्याचा संदर्भ येतो. तीर्थयात्रा करत ते ‘श्रीवाली’ गावी आले. तेथे त्यांनी एका मंदबुद्धी बोलू न शकणाऱ्या मुलाला त्यांनी बोलते केले. तो मुलगा जीवनमुक्तावस्थेत आहे, हे त्यांनी ओळखले होते. त्यांनी त्याचे नाव ‘हस्तामलक’ असे ठेवले. यावर त्यांनी ‘हस्तामलकस्तोत्रम्’ रचले. संस्कृत साहित्यात असे आवळ्याचे अनेक संदर्भ मिळतात. सम्राट अशोकाने निधनापूर्वी बुद्ध संघाला आपल्याकडील अर्धा आवळा दिला असल्याचा उल्लेख मिळतो. फुसा बुद्धांनी या वृक्षाला बुद्धीचा वृक्ष असे म्हटले आहे. आवळ्याचा मुरंबा जेवणानंतर सैन्याला गोड पदार्थ म्हणून दिला जात असल्याचे उल्लेख मिळतात.

मराठी साहित्यात आवळ्याचे संदर्भ येतात, मात्र ते बोरी-बाभळीइतके नाहीत. ज्ञानेश्वरीमध्ये हस्तामलकाचाच दाखला दिला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये चौदाव्या अध्यायात ओवी क्रमांक २६८ मध्ये  ‘करतळावरी वाटोळा l डोलतु देखिजे आवळा l तैसे ज्ञान आम्ही डोळां l दाविले तुज ll’ असा उल्लेख आहे. हरिपाठातील बाराव्या अभंगात ‘ज्याप्रमाणे आवळा मुठीत घट्ट पकडून ठेवता येतो, तसेच हरीला नामाने पकडून ठेवता येते’, हे सांगताना ज्ञानेश्वर लिहितात, ‘तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी l वायाची उपाधि करिसी जना l  भावबळी आकळे येरवी नाकळे l करतळी आवळे तैसा हरी ll’ दुर्गाबाई भागवत यांनी आवळ्याला खूप सुंदर शब्दात वर्णिले आहे. त्या लिहितात, ‘आवळी पानांचा पसारा कमी करून, फळांचे पोपटी-गुलाबी घोस लेऊन उभी असलेली. या दिवसातल्या आवळीकडे पाहिले की, मला लेण्यातल्या कटिखांद्यावर, हातात, पायांत व गळ्यात ठसठशीत अलंकार घालून, डौलात उभ्या असलेल्या स्त्रीमूर्तीची आठवण येते.’ शरदिनी डहाणूकर यांना आवळा वृक्ष सर्वाधिक प्रिय असला, तरी त्याची फुले मात्र अनाकर्षक वाटत.

आवळ्यावर ग. दि. माडगूळकरांनी ‘तळहातीचा आवळा’ ही सुंदर कविता लिहिली आहे. उन्हाळ्यात ते निष्पर्ण आवळ्याचे झाड काढून टाकण्याची सूचना माळ्यला देतात. माळयाने ते ऐकून न ऐकल्यासारखे केले. झाड तसेच ठेवले. त्यातील भिरूड शोधून मारला. झाडाची निगा राखली आणि नंतर ते आवळ्याचे फळांनी लगडलेले झाड पाहून माडगूळकर लिहितात,

‘या शरदागमी पाहतो आहे तो

आवळीचे सावळे हिरवेपण,

परत विस्तारले आहे, भरला आहे

डहाळी डहाळीवर पानाआड लटकली आहेत

फळे, आवळे,

कुमारिकांचे कोवळे स्तनच अवतरले आहेत जणु,

पुढच्या पिढ्यांना पाजण्यासाठी,

मी पाहतो आहे हा सोहळा,

याचि देही याची डोळा,

तळहातीचा आवळा’.

प्रशांत शिंदे यांनी औषधी महत्त्व ओळखून, ‘आवळ्याची डिश पाहून तोंडाला पाणी सुटतं, आरभट चरभट खाणाऱ्याचे बिंग फुटते’, असे कवितेत गुंफले आहे. नेहा इनलकर यांना दूरदृष्टी सांगताना आवळा देऊन कोहळा काढण्याची गोष्ट गुंफतात. त्या लिहितात, ‘दूरदृष्टी ठेवून स्वार्थी काहीच, आवळा देऊन कोहळा काढतात, दूरदृष्टीच्या चलाख बायका, नवऱ्याच्या पानात अती वाढतात’. आवळ्यावरील कोडे वसुधा नाईक यांनी तयार करून वाचकांसमोर ठेवले आहे. आवळ्यावर काही बालगीतेही मिळतात. आवळा अनेक कथानकात भेटणे अपरिहार्य आहे. आवळ्यावर अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत. यातील चंद्रकांत बारहाते यांचे ‘आवळा, वृक्ष अमृताचा’ हे पुस्तक खूपच गाजले. डॉ. प्र. पुं देशमुख यांनीही आवळ्याचे महत्त्व सांगणारे लेखन केले आहे.

तुकाराम महाराजांची पत्नी आवळी सर्वंपरिचित आहे. आवळी हे आजही स्त्रियांचे टोपणनाव म्हणून वापरतात. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आवळे गाव आहे. इतरही अनेक गावांना आवळ्यावरून नावे आली आहेत. अनेकांचे आडनावही आवळे असते. आवळा खऱ्या अर्थाने भारतीयांच्या मनात, जीवनात आणि जगण्यात आला आहे.        

ll४ll

आमच्या लहानपणी आवळा केवळ सणाच्या निमित्ताने पाहायला आणि खायला मिळायचा. आवळ्याची झाडे बालाघाटच्या डोंगरात रामलिंग मंदिराजवळच्या जंगलात होती. आम्हाला त्या भागात श्रावणात जायला मिळायचे. श्रावणाव्यतिरिक्त सोमवती अमोवास्या असेल आणि शाळेला सुट्टी असेल तरच त्या जंगलात जाणे होत असे. एरवी त्या जंगलात आमचे जाणे नसे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या भागात माकडांचा मोठा वावर असायचा. त्यामुळे झाडावर आवळ्याच्या फळांचे दर्शन कधीच होत नसे. आवळ्याची अर्धपारदर्शक गोलमटोल फळे तुळशीच्या लग्नावेळी आम्हाला पाहायला मिळायची. पूर्वी आवळ्याचा एवढा प्रसार झालेला नव्हता. त्यामुळे बंगल्याच्या कडेला आवळ्याची झाडे कधी दिसत नसत. आठवीला पांगरीच्या सर्वोदय विद्या मंदिरात शिकत असताना आवळे लगडलेले झाड पाहायला मिळाले. शाळेची इमारत पुरेशी नव्हती. त्यामुळे काही वर्ग भाड्याच्या वाड्यात भरत. देशपांडे वाड्यात हे आवळ्याचे झाड होते आणि त्याला लागलेली फळे प्रथम पाहिली. मात्र ती फळे खाण्याचे आमच्या नशिबात नव्हते कारण आमचा वर्ग त्या वाड्यात भरत नव्हता.

बाहेर बोरे, आवळे विकणाऱ्या बायका बसत असत. त्यावेळी त्यांच्याकडून आवळे विकत घेऊन खायला पैसे नसत. पुढे शिक्षण घेताना आवळे खाल्ले. मित्र-मैत्रिणींसमवेत फिरताना क्वचितच मी आवळ्याच्या वाटेला गेलो. लग्नानंतर बायकोच्या मागणीवरून आवळे खरेदी केले. आवळा सुपारी, आवळा वडी मात्र आवर्जून खात असे. आवळा मला हळूहळू आवडू लागला. आवळा सरळ जरी खाल्ला नाही तरी आवळ्याचे पदार्थ, लोणचे खायला आवडू लागले.

पुढे नांदेडला गेल्यानंतर कुलसचिव निवासस्थानाच्या बाहेर अगदी दरवाज्यासमोर दिसतील अशी आवळ्याची दोन झाडे होती. वीस-पंचवीस फुट वाढलेली ती झाडे खूपच देखणी होती. त्याच्या फांद्यांना लगडलेल्या आवळ्याच्या फांद्या जमिनीला टेकू लागल्या. त्यांना आधार देऊन सांभाळावे लागले. आवळ्याच्या फळांचे महत्त्व खऱ्या अर्थाने तेथेच लक्षात आले. नांदेड येथे परीक्षा नियंत्रक वसंत भोसले सर होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ते आवळ्याचा रस प्यायचे. त्यांच्याबरोबर मीही आवळ्याच्या रसाचा अनेकदा आस्वाद घेतला. नांदेडच्या या झाडांचे आवळे आम्ही सर्व कुटुंबियांनी खाल्ले. टपोरे रसरशीत आवळे खाण्याचा आनंद मनमुराद लुटला. आवळा तेव्हापासून मनात वसला. आवडू लागला. पुढे आवळ्याचे महत्त्व वाचनातून समजले, तसा आवळा आणखी प्रिय झाला. आजही आवळ्याच्या झाडांची लागवड जेथे शक्य असेल, तेथे करतो.  कदाचित त्या झाडांची फळे मला चाखायला मिळणार नाहीत. पण कोणीतरी त्याची फळे खाणारच, याची खात्री आहे. निदान पशु-पक्ष्यांना आणि पूर्वज माकडांना या झाडांची फळे खायला मिळणार, याचे समाधान असते. यातूनच आणखी झाडे लावायची प्रेरणा मिळते.  

-0-

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

काटा..

 

काटा.. शब्द ऐकला तरी टोचण्याचा भास होतो. काटा.. डोळ्यात पाणी आणि आतून हुंदका आणणारा. कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला. मूळ वेगळे असेल, कूळ वेगळे असेल, पण टोचण्याचा गुण तोच. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरूष, कसलाही भेदभाव न करणारा. वनस्पतीचे काटे टोचत असले तरी ते आपणास सांगतात… जपून, नाही तर टोचेन. पण माणसातील काटे?

      तर आज काट्याबद्दल बोलू काही…

__________________________________________________

 

काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी

मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे!

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची?

चिरदाह वेदनेचा, मज शाप हाच आहे!

काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे

माझे अबोलणेही, विपरीत होत आहे!

हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना

आयुष्य ओघळोनी, मी रिक्तहस्त आहे!

आकाशवाणीवर गाणे लागले होते. सकाळचा चहा घेताना नकळत मीही गुणगुणू लागलो. ‘हे बंध रेशमाचेया रणजीत देसाई यांच्या नाटकातील थोर कवयित्री शांता शेळके यांचे गीत. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजाने सजलेले. भीमपलास’ रागातील हे गीत कितीही वेळा ऐकले, तरी पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे. 'काटा' या शब्दाने सुरू होणारे. काटा आणि फुलाची सांगड या गीतात घातली आहे. काटा तर रूततोच. मात्र कवयित्रीला फुल रूतते. हे फुलाचे रूतणे तिला आपल्या नशिबाचा भाग वाटतो. सहज शब्दात आलेले हे गीत मनात रूतणारे आहे. अंतर्मन दुखावल्याची भावना या काव्यात व्यक्त होते. अस्वस्थ मनातील भावना व्यक्त करणारे गीत. ऐकत राहावेसे वाटते. मनातील वेदना कोणाला सांगणेही अशक्य आहे. काही कोणाला सांगावे, तर त्यातून वेगळाच अर्थ काढण्याची जगाची रीत आहे. भवताली असणाऱ्या लोकांचे वागणे पाहून मनोमन एकाकी पडलेल्या व्यक्तीचे मनोदर्शन सुंदर पद्धतीने या गीतात ऐकावयास मिळते. नाटकामध्ये हे गीत ज्या प्रसंगानंतर येते, तो लक्षात घेतला तर ते मन:पटलावर आणखी खोल रूतते.

स्वातंत्र्यपूर्व फाळणीचा काळ. आजच्या पाकिस्तानातील लाहोर येथे श्रीकांत आणि अमिर हे दोन गुणी गायक मित्र शेजारी-शेजारी राहात असतात. दंगली उसळल्या आणि श्रीकांतने भारतात यायचा निर्णय घेतला. त्यासाठी तो तिकीट आणण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जातो. तेवढ्यात दंगल उसळते. दंगलखोर श्रीकांतच्या घरी जातात. श्रीकांतच्या पत्नीवर अत्याचार करण्यासाठी पुढे सरकतात. आपले शील जपण्यासाठी ती स्वत:ला पेटवून घेते. श्रीकांत आला की नाही, हे पहायला अमिर श्रीकांतच्या घरी येतो. श्रीकांतच्या घराची दुर्दशा पहात असताना, श्रीकांतची मुलगी शामला, अमिरला बिलगते आणि ‘अब्बूजान हमें बचाओ’ म्हणते. अमिर तिला येऊन घरी येतो. पत्नीची अशी अवस्था आणि मुलीचे गायब होणे पाहून हताश श्रीकांत कसाबसा भारतात येतो. तिकडे अमिर शामलाला संगीत शिकवतो. तिला उत्कृष्ट गायिका बनवतो. अनेक वर्षांनंतर एका संगीत संमेलनात हे दोन मित्र भेटतात. त्या ठिकाणी आपल्या पत्नी आणि मुलीला मारण्यामध्ये अमिरची भूमिका आहे, या ग्रहातून श्रीकांत त्याची निर्भर्त्सना करतो. त्यावेळी अमिरच्या तोंडी रणजीत देसाई यांनी खूप सुंदर वाक्य दिले आहे, ‘लोग काँटों की बात करते है, हमने तो फुलों से जख्म खाये।’ आणि त्यानंतर हे गाणे सुरू होते. या एकूण पार्श्वभूमीवर या गीतातील प्रत्येक शब्द मनाला नकळत अंतर्मुख करत नेतो. हे गीत अनेकदा ऐकले, पण, या गीतातील काटा हा शब्द आज मनातून जात नव्हता. पुनःपुन्हा तो आठवत होता. खरं तर, काटा मनात रूतला होता.

काटा एक साधा शब्द. ऐकला तरी टोचण्याचा आभास होतो. काटा, डोळ्यात पाणी आणि आतून हुंदका आणणारा. काटा, कधी ना कधी, कोठे ना कोठे भेटलेला. खेड्यात बालपण गेलेल्या प्रत्येकाला तर तो हमखास टोचतोच, पण, शहरातील मंडळींनाही कोठे तरी तो भेटतोच. फार तर त्याचे झाड वेगळे असेल. मूळ वेगळे असेल, कूळ वेगळे असेल, पण टोचण्याचा गुण तोच. कधी तरी, कोठे तरी पायात घुसतोच. गरीबाला पाय अनवाणी असल्याने बाभळीचा, हिवराचा काटा टोचेल. तर कोणा गर्भश्रीमंताला, स्वयंपाकगृहातही पाय अनवाणी ठेवायची सवय नसलेल्यास, गुलाबाची फुले घेताना हाताला बोचतो. गरीब असो किंवा श्रीमंत, लहान असो किंवा मोठा, स्त्री असो वा पुरूष, काटा कोणताही भेदभाव न करता, थोडे दुर्लक्ष झाले की टोचतो. काटा टोचला की ‘आई गं...’ हे शब्द तोंडातून बाहेर येतात.

निसर्गात झाडाला काटे आले, ते त्यांच्या संरक्षणासाठी निसर्गाने केलेली सोय म्हणून, असे संशोधकांचे मत. कमी पावसाच्या भागात वाढणाऱ्या झाडांना हमखास काटे असतात. झाडाचे संरक्षण हा त्यामागचा उद्देश असतो, असे म्हणतात. मला मात्र हे पटत नाही. हां, हे खरे आहे की, करवंदीसारख्या मधूर फळांच्या जंगलात आढळणाऱ्या झाडाला काटे असतात. मोसंबी, लिंबोणी अशा बागेतील सुमधूर फळांच्या झाडानांही काटे असतात. ते सुरूवातीला हिरवे असतात. नंतर त्यांचा रंग पांढरा होतो. हे काटे फळांचे रक्षण करण्यासाठी निश्चितच नसावेत. कारण बाभळीच्या शेंगा आपण कोठे खातो, हिवराच्या शेंगा कसल्या आहेत, हे कोठे पहायला जातो. त्यांनाही असतातच ना काटे. मग तेथे का असतात काटे? काटे असूनही या झाडांची पाने शेळ्या अन् मेंढ्यांचे आवडते खाद्य. काटे चुकवून पाने खाण्याचे कसब या प्राण्यांना कोण शिकवते, माहीत नाही. तर दुसरीकडे आंबा, पेरू, चिंच या मधूर आणि सर्वप्रिय फळांच्या झाडाना कुठे असतात काटे? याचीही पाने शेळ्या आणि मेंढ्या तितक्याच आवडीने खातात. निवडूंगाच्या झाडाला त्याच्या पानातून बाष्पीभवन कमी व्हावे, म्हणून काटे असतात, म्हणे. कारण काहीही असो, काही वनस्पतींना काटे असतात, तर काहींना नसतात, हेच खरे. काटे असोत वा नसोत सर्वच वनस्पती त्यांचे कार्य करत, काही उद्देशाने जगत असतात. स्वत:ला बुद्धीमान समजणाऱ्या मनुष्यप्राण्यास का जगायचे कळो वा ना कळो, वनस्पतींना मात्र जीवनाचे उद्दिष्ट ठाउक असते.

गुलाबाचे फुल आकर्षक. सर्वांचे आवडते. फुलांचा राजाच. मात्र त्याला बेसावधपणे तोडायला जाल, तर काटे टोचणारच. बरे गुलाबाचे काटे जसे टोकदार, तसेच अणकुचीदार. थोडासा बेसावधपणाही रक्त काढतो. तसे हे फुल इतरांपेक्षा कमी नाजूक, मात्र त्याला काटे आहेत. गुलाबापेक्षा जाई, जुई, चमेली, प्राजक्त, बकुळ, रातराणी, कामिनी अशा अनेक वेलींची आणि झुडुपांची फुले ही कितीतरी नाजूक. मात्र या वेलींना आणि वनस्पतींना काटे नसतात. तर दुसरीकडे बोगनवेलीला पावसाळा संपला की फुले यायला सुरुवात होते. नेत्रसुखापलिकडे काहीही उपयोग नसणारी. पण बोगनवेलीचे काटे वर्षभर सर्वांच्या डोळ्यांत खुपतात. बोगनवेलीचे काटे सरळ, पण वाळल्यावर लोखंडी खिळ्यासारखे पायात घुसणारे. अगदी ‘चप्पल फाड के’. कामिनी, रातराणीची फुले तर सुगंधी दरवळ पसरवणारी. तोडली तर रात्रीत सुकून जाणारी. मानव प्राण्यास धुंद करणारी. मात्र या वनस्पती काट्याविना असतात. निसर्गाने वनस्पतींना काटे वाटताना काय नियम लावला, काही लक्षात येत नाही.   

बरे, या काट्यांचे प्रकारही अनेक. प्रत्येक झाडाचा काटा वेगळा. रंग वेगळा, गुणधर्मही वेगळे. बाभळीचा काटा मोठा, लांब असतो. फांदीच्या अगदी टोकाला असणारे काटे पोपटी असतात. ते जरा जून झाले की पांढरे होतात. हळूहळू त्यांचे टोक काळे होते आणि अगदी जुना काटा झाला की तो पूर्ण काळा होतो. हा काटा पायात खोलवर घुसतो. कोवळा काटा पायात घुसला की काढताना तो टोक आत ठेवूनच येतो. मग पायातील काट्याचा तो भाग काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. या बाभळीच्या काट्याचा वापर एका धार्मिक उत्सवातही केला जातो. पुणे जिल्ह्यातील पुरंधर तालुक्यातील गुळुंचे गावी जोतिर्लिंग मंदिर आहे. इथे गुढीपाडव्यानंतर लगेच बाभळीच्या झाडांच्या शेंड्यांच्या फांद्या तोडून फास घातले जातात. दिपावली पाडव्याला ग्रामदेवतेची यात्रा सुरू होते. कार्तिक बारसच्या दिवशी हे बाभळीचे घातलेले सर्व काटेरी फास एकत्र आणून रचले जातात. या दिवशी देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर अनेक भाविक मंदिराला प्रदक्षिणा घालून येतात. काट्याच्या फासावर उड्या मारतात. हे चित्र तसे नवख्या माणसाच्या अंगावर शहारे आणणारे. मात्र उड्या मारणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नसते. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या या जत्रेला ‘काटेबारस’ म्हणून ओळखले जाते.

हिवराचे काटेही तसेच. मात्र फांदी तुटून पडली की ते लवकर कुजतात. असा कुजलेला काटा पायात घुसला तर जास्तच त्रासदायक. पायात राहिला तर कुरूप तयार करतो. त्याला मुळापासून काढावे लागते. विलायती बाभूळ नावाची विदेशी वाणाच्या बाभळीचा काटा सर्वात खतरनाक. चुकून गाडीच्या चाकाखाली हा काटा आला, तर टायर पंक्चर झालेच म्हणून समजा. बोरीचे काटे दोन प्रकारचे असतात. सरळ काटा दर्शनी असतो, तर वाकडा काटा पानाआड दडलेला. सरळ काट्यापासून जपताना खालचा काटा कधी ओरखडा उठवतो, कळतही नाही. झाडाची ताजी बोरे तोडून खाण्याची मजा घेताना लपलेल्या काट्यापासून नेहमी सावध रहावे लागते. सरळ काटे सरळ नजरेला दिसतात. मात्र वाकडे काटे आकाराने लहान, पोपटाच्या चोचीसारखा बाक असलेले. त्यांच्या सानिध्यात कोणतीही गोष्ट गेली की फाटलीच पाहिजे. अनेकांचे कपडे आणि कातडी या बोरीच्या काट्यांनी फाडलेली असते. सुरुवातीला पांढरट हिरवे असणारे काटे, पुढे फांदीबरोबर तांबडा रंग धारण करतात आणि काटकही बनतात. घातक, काटेरी झाडाची फळे मात्र मधुर असतात. त्यांची आंबटगोड चव अवर्णनीय. खैर, सागरगोटे किंवा गजगा, चिलारी या झाडांचे काटेही बोरीसारखेच. सौंदड किंवा दसऱ्याला ज्याची पाने आपट्याबरोबर वाटण्याची प्रथा मराठवाड्यात आहे, त्या चांदीच्या झाडाचे काटेही अणकुचीदार, वाकडे असतात. सागरगोट्याच्या तर बियांच्या पेटीवरही काटे असतात. मात्र खोडावरचे काटे वाकडे आणि फळांच्या पेटीवरचे काटे सरळ असतात. पेटीतून सागरगोटे फोडून बाहेर काढताना काळजीपूर्वक काढावे लागतात. नाही तर फिकट सोनेरी रंगाचे काटे कधी हातात घुसतात, कळतही नाही. बरे हातात घुसल्यानंतर काटा तर सलतो, पण तो कोठे आहे, ते नेमके दिसत नाही. हेकळीच्या झाडाचे काटे तसेच. मात्र झुडुपाच्या लाल रंगांच्या काट्यावर पाने असतात. पुढे या काट्याचे फांदीत रूपांतर होते. आपटा, पांढरफळी, हुंबाटीचे काटे असेच असतात. मात्र त्यांचे टोक धारदार नसते. गवती बांबूच्या लहान पेरावर ते लहान असल्यापासून काटे असतात. तर इतर जातीच्या बांबूचे बेट पक्व झाले की, त्याला फुले येतात आणि नंतर त्या बांबूला काटे येतात. हे काटे फारच भयंकर असतात. त्यामुळे आदिवासी मंडळी बांबूच्या बेटाला फुले दिसली की कटाई करतात आणि काट्याचा त्रास टाळतात. त्याउलट बाभळीचे वय जसे वाढत जाते, तसे काटे लहान होतात. झाड म्हातारे झाले की त्याला काटे यायचे बंद होतात. बिनकाट्याच्या बाभळीला ‘गोडी बाभळ’ म्हटले जाई. आज क्वचितच गोडी झालेली (पूर्ण आयुष्य जगलेली) बाभूळ पहायला मिळते. फणसाच्या फळावर काटेरी आवरण असल्यासारखे भासते. दिसतेही तसेच. त्यामुळे फळाला हात लावायची भीती वाटते. मात्र या काट्यांच्या आत पौष्टिक गर असतात. धोत्र्याच्या फळाला विषारी म्हणून कोणी हात लावायचे धाडस करत नाही. तरीही या झाडाच्या फळावर काटे असतात. विशेष म्हणजे फणस असो वा धोत्रा त्यांच्या खोडावर काटे नसतात.

काटेसावरची तर गोष्टच वेगळी. अंगभर जाडजूड काटे घेऊन ही बया मिरवत असते. फुललेली काटेसावर पाहिली की मनाने चांगली पण बोलण्याला काट्याची धार असणाऱ्या इरसाल म्हातारीची आठवण येते. काटेसावर फुलली की कावळ्यांपासून पोपटांपर्यंत सर्व पक्षी आणि कीटक मधूभक्षणासाठी या झाडावर गर्दी करतात. आणि हे झाड सर्वांना तितक्याच प्रेमाने आपला मध वाटत राहते. या कार्यक्रमात काटे कोठेच येत नाहीत. याखेरीज विदेशातून भारतात पोहोचलेली आणि सर्वत्र आपले साम्राज्य उभारत चाललेल्या घाणेरीवरील काटे बारीक पण चांगलेच बोचणारे असतात. खरे तर घाणेरीला आता हद्दपार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्टुली आणि वागाटे या रानातल्या फळभाज्या. वागाटे आषाढ महिन्यापर्यंत मिळतात. आषाढी एकादशीचा उपवास सोडताना त्यांचा मान मोठा. मात्र ही रान-फळभाजी बाजारात सहज मिळत नाही. क्वचित दिसतात, पण भरपूर महाग. त्यामुळे नव्या पिढीला ही फळे अपवादानेच माहित आहेत. तर कर्टुली किंवा रानकारली पावसाळयात येतात. रानकार्ल्याच्या वेल नाजूक. कमी उंचीच्या झुडुपावर वाढणारा. तर वागाट्यांचा वेल कडुनिंब, आंबा, शेलवट अशा उंच वाढणाऱ्या झाडावर दिमाखात चढणारा. मात्र रानकार्ल्याच्या वेलाला काटे नाहीत. वागाट्याच्या वेलीचे काटे मात्र भरपूर टोकदार आणि टणक. ही फळे काढणे महाकष्टाचे काम. मुळात वेली कमी. त्यात फळे काढणारे आणखी कमी. रानकार्ल्यावरही काटेरी आवरण आहे, असे दिसते. मात्र हे काटे खूप मऊ असतात.

वांग्याचे भरीत खायला अनेकांना आवडते. मात्र ही फळे काढतानाही भरपूर काळजी घ्यावी लागते. वांग्याच्या खोडावर आणि पानावरही भरपूर काटे असतात. त्याच्या फळाच्या देठावरही काटे असतात. वांग्याला अनेकजण मजेने 'वन लेग चिकन' म्हणतात. वांगे तोडताना किंवा स्वयंपाकघरात वांग्यावरील काटे काढताना ते हातात घुसले तर सलतात. काट्यांचा रंगही फिकट पिवळा. त्यामुळे नजरेला लगेच काटा कोठे घुसला, हे दिसत नाही. अंबाडी आणि करडी या दोन तेलबियासुद्धा काटेरी वनस्पतीपासून मिळतात. अंबाडीचे काटे बरे, पण वाळलेल्या करडीचे काटे भरपूर त्रास देणारे. भुईरिंगणीचे काटे अगदी वांग्यासारखेच असतात. याखेरीज अनेक झुडुपवर्गीय, वेलीवर्गीय, जमिनीवर पसरणाऱ्या आणि गवतवर्गीय वनस्पतींना काटे असतात. सरळ, वाकडे आणि कुसीच्या रूपात हे लहान-मोठे काटे आपल्याला भेटतात.   

लहानपणी असा पायात काटा घुसला की बाभळीचा चांगला (न कुजलेला) काटा शोधला जाई, काट्याने काटा काढायला. त्या काट्याने पायात जेथे काटा घुसला आहे, त्याच्या आजूबाजूची कातडी काढली जाई. घुसलेल्या काट्याचे टोक प्रथम शोधले जाई. हा काटा दिसू लागला की ज्याच्या पायात काटा मोडला आहे, त्याला हुश्श वाटे. मग तो काटा आणखी जरा मोकळा करून अलगद काढायचा प्रयत्न केला जात असे. काढणाऱ्याने कितीही काळजी घेतली, तरी ज्याच्या पायात काटा मोडला आहे, तो ‘जरा हळू की. किती जोरात काढताय’, असे ओरडत असे. मोठ्या माणसांना काटा काढू द्यायला लहान मुले तयार नसत. लहानपणी असा पायात मोडलेला काटा बाहेर काढल्यावर तो 'चोर' की 'पोलीस' हे ठरवण्याचा खेळ चाले. डोळ्यावरील पापणीतील एक केस काढून तो पायातून काढलेल्या काट्याला लावून तो काटा केसाला चिकटतो की नाही, हे तपासले जाई. जर काटा उचलला गेला, तर तो प्रामाणिक आणि पोलीस ठरवला जाई. मात्र जर तो नाही चिकटला, तर तो चोर असे. मग पायात घुसलेल्या काट्याला फेकून दिले जाई. या खेळाला तसा काही अर्थ नसायचा. पण या खेळात काटा घुसून झालेल्या वेदना कुठच्या कुठे पळून जात असत, हे मात्र नक्की.

पायात मोडलेला काटा बाभळीचा असेल तर फारसा त्रास देत नाही. मात्र तो हिवर, पांढरा खैर या झाडांचा असेल तर खूप दुखतो. लगेच काढावा लागतो. त्याच्या वेदना जास्त होतात. लहानपणी असे अनेक काटे पायात मोडले. काटा मोडला की आम्ही वडिलधाऱ्यांना पायाला हात लावू देत नसायचो. मग वडिलधारी मंडळी सांगायची, 'असा काटा पायात ठेवणे बरे नाही. तो काढावाच लागतो. नाही काढला तर पायात बाभळीचे (किंवा हिवराचे) झाड उगवते. मग त्याची मुळे शरीरात शिरतात आणि झाड मोठे होते. मग तू चालणार कसा?' असे म्हटले की डोळ्यासमोर आपल्या पायात झाड उगवल्याचे चित्र यायचे. लगेचच ते झाड मोठे व्हायचे. पायातील झाड घेऊन आपल्याला चालता येणार नाही, असे वाटायचे आणि आम्ही गपगुमान काटा काढायला पाय पुढे करायचो.

काट्याच्या बालपणी अनेक गंमतीही घडत असत. आघाड्याच्या रोपाच्या शेंड्याला आलेले काटेरी फळांचे घोस नकळत एखाद्या मुलाच्या पाठीवरून फिरवले जाई आणि त्यांची छान नक्षी पाठीमागे शर्टवर उठायची. मुलगा कोठे तरी टेकून बसेपर्यंत आपण पाठीवर काटे घेऊन फिरतो आहोत, हे त्याच्या गावीही नसायचे. आघाड्याच्या काटेरी बिया नकळत कापडाला चिकटतात. गवतातून जाताना त्या आपल्या कपड्यावर कधी येऊन बसतात, ते कळतही नाही. एका गवताला काळ्या रंगाची कोयरीच्या आकाराची फळे येतात. त्याला खालच्या बाजूला दोन वाकडे काटे असतात आणि देठाच्या बाजूला दोन छिद्रे असत. ते दोन काटे छिद्रात अडकवून त्याची लांब माळ करायचो. ती माळ नंतर सर्वत्र विसकटली जात असत. कोणी याला कोयरीचे तर काही भागात कुत्रीचे झाड म्हणतात. काही ठिकाणी नकटीचे झाडही म्हणतात.  यावरूनच वेल्क्रोचे तंत्रज्ञान तयार झाले. सराटा हा एक भयानक प्रकार खेड्यात आढळतो. हरभऱ्यासारखी पाने असलेली ही वनस्पती. जमिनीवर मस्त पसरते. सराट्याच्या पानांची भाजीही करून खाल्ली जात असे. मात्र त्याच्या फळाचे काटे पायात घुसले की वेदना असह्य होत. जनावरे शेतात चरताना अनेक प्रकारचे काटे शरीरावर घेऊन येत असत. आणखी बरीच झाडे आणि वनस्पती, गवतांना काटे असतात. गवताला भाले फुटतात की नाही, माहीत नाही. मात्र बाजरी, ज्वारी, करडी, अंबाडीला असणारी कुस एक प्रकारचे सूक्ष्म काटेच. ते अंगाला चिकटले तर आंघोळ केल्याशिवाय जात नाही. शक्यतो, काळ्या मातीचा अंगाला लेप लावून आंघोळ केली तरच कुस लवकर जाते.

      या भागातील कवचकुल्या आणि उर्वरित महाराष्ट्रातील खाजखुजली ही एकाच गुणाची. लहानपणी मारकुट्या मास्तरच्या खुर्चीला ती आणून लावायचा प्रकार एक दोन वर्षात एकदा तरी घडायचा. खोडकर मुले अतिशय सांभाळून ती आणायचे. या उनाड मुलांचे नाव सांगणे म्हणजे शाळा सुटल्यावर त्यांचा मार खाणे. त्यामुळे हा पराक्रम करणारा कोण हे बहुतांश वेळा गुप्त राहायचे. त्यामुळे छडीचा प्रसाद अख्ख्या वर्गाला मिळायचा.

असे हे वनस्पतीचे काटे आपल्याला अनेकदा, अनेक ठिकाणी भेटतात आणि छळतातही. मात्र त्यांचा त्रास आपण त्यांना निष्काळजीपणे सामोरे गेलो किंवा आडवे गेलो तरच होतो. ते स्वत:हून तुमच्याकडे येत नाहीत. काट्याचा धर्म आहे टोचणे. जवळ गेलो तर टोचणारच. एकाच झाडाला येणारी फुले, फळे आणि काटे. काट्यांचे मोल नाही. शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी कुंपण करण्यापूरता याला महत्त्व. एरवी रस्त्यात कोठे काटा दिसला तर त्याला उचलून बाजूला फेकले जाते. त्यावरून वाक्प्रचारही आला, काट्यासारखे दूर करणे. फुल किंवा फळ मोलाचे असते. फुलांना भाव मिळतो, मात्र त्या शेजारील काटे खरवडून काढले जातात. फळ आणि फुलाला मिळणारा भाव पाहून असूयेपोटी तर काटे टोचत नसावेत?

मात्र काटे असणारी बाभूळ, हिवर, बोर, कार ही झाडे पक्ष्यांची आवडती झाडे. हिवराच्या झाडावर पन्नासपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी घर बनवतात. बाभळीच्या झाडालाही सुगरणीपासून अनेक पक्ष्यांची पसंती असते. सुगरणीची घरटी कडुलिंबापेक्षा बाभळीवर जास्त दिसतात. या झाडाच्या काट्यामुळे शत्रूचा धोका कमी असतो. कित्येक पक्षांची बाळंतपणे या काटेरी झाडावर सुखेनैव झालेली असतात. बाभळीच्या काट्यांचे सुंदर घर बॅगवर्म मॉथ बनवतो. त्या काटेरी कोशातून तो केवळ पानांचे भोजन घ्यायला बाहेर येतो.

मानवी जीवनाचा काटा हा अविभाज्य भाग आहे. जेवताना चमच्याप्रमाणे आता काटा हाही आवश्यक झाला आहे. त्यातून काटे-चमचे असा जोडशब्दच तयार झाला. वजन-काटा बरोबर असेल तरच माप व्यवस्थित होते. तेथेही काटा हाच महत्त्वाचा. न्यायदेवतेच्या हातातही हा वजन-काटा दिलेला आहे. वस्तुस्थिती काही असो, पुराव्याचे वजन पारड्यात पडले तरच काटा न्यायाच्या बाजून झुकतो. इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आले तरी आपण त्याला काटाच म्हणतो. माशांच्या हाडे काटे म्हणूनच ओळखली जातात. मासे खाताना काटे अलगद बाजूला काढून टाकावे लागतात. चूकून घशात अडकला तर जेवणाची पूर्ण मजाच निघून जाते. मधमाशी, गांधीलमाशी यांनाही काटे असतात. हे किटक माणसाला किंवा इतर प्राण्यांना चावा घेताना तो काटा शरीरात सोडतात. काटा काढला नाही, तर त्या भागाला मोठी सूज येते. कधी कधी त्यामुळे जखम होण्याचा धोका असतो. त्यामुळे तो काटाही शोधून तत्काळ दूर करावा लागतो. निवडणूक दोन तुल्यबळ उमेदवारांत असेल, तर त्या मतदारसंघातील निवडणूक म्हणजे ‘काट्याची टक्कर’ आहे, असे म्हणतात.

काटा हा एकच शब्द आपण मराठीत वापरत असलो तरी इंग्रजीत त्याला अनेक नावे आहेत. वांगी आणि गुलाबावरील काट्यांना ते प्रिकल म्हणतात. कॅक्टसवरील काटे स्पाईन होतात. स्वयंपाकगृहामधील काटे फोर्क असतात. बियांवरील कूस स्पीकलेट असते. वनस्पतींवरील सर्वच काट्यांना थॉर्न म्हणतात. हिंदीत त्याला काँटा म्हणतात. या शब्दाला घेऊन अनेक चित्रपट निघाले. गाणी बनवण्यात आली. तुळजापूरचे कवी नारायण पुरी यांनी नवविवहितेच्या पायात मोडलेला काटा काढणाऱ्या नवऱ्याच्या मनातील भावनांचे छान वर्णन केले आहे. बायकोच्या पायात मोडलेल्या बोरीच्या अणकुचीदार काट्याने ज्या वेदना सुरू होतात, त्यात आपला निम्मा वाटा आहे, असे त्याला वाटते. तिचे पाय किती नाजूक हे सांगताना कवीला कापूस आठवतो.

'पायामध्ये सलतो गं, सखे बोराटीचा काटा

तुह्या पायातील सल, त्यात माहा निम्मा वाटा

पाय नाजूक साजूक, राणी कापसाच्यावाणी

तुह्या पायाला बग फुलली, बघ काट्याची ग अणी

 

काटा काढण्याची पद्धत आणि पतीपत्नीतील प्रेमाचे सुंदर वर्णन कवितेत आहे. पायात काटा मोडण्यापासून, काटा काढणे, त्याला चोर-पोलिस ठरविणे आणि त्यानंतर बिब्याचा चटका देईपर्यंत सर्व काही या कवितेत आहे. काटा जर पूर्ण निघाला याची खात्री नसेल, तर बिब्याचा चटका दिला जातो. तसेच ‘वाटेवाटेवर काटे आहेत जरा जपून चाल’, असा पोक्त सल्लाही तिला देतो. तिचा पाय असा मांडीवर घेता येणार असेल, तर तिला काटा पुन्हा मोडावा, असा स्वार्थी विचारही त्याच्या मनात येतो. ग्रामीण भागात काट्यामुळे ओढवणारा प्रसंग ग्रामीण शैलीत अतिशय सुंदर पद्धतीने चित्रीत केले आहे.

वनस्पतींचे काटे आपल्याला त्रास देत असले तरी ते आपल्याला दिसतात. ते सांगतात, ‘जवळ आलास तर टोचेन’. आपण त्यांच्याजवळ गेलो नाही तर ते आपल्याला त्रास देत नाहीत. पण माणसातील काटे अनेकदा दिसत नाही. समाजात जगताना असे काटे पदोपदी भेटतात. नेहमी गोड बोलणारी माणसे हिवराच्या काट्यासारखी असतात. गोड बोलून जवळीक साधून गळा कापण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही. उलट काट्यासारखे बोचणारी माणसे ही खऱ्या अर्थाने आपली हितचिंतक असतात. आपले भले व्हावे, म्हणून त्यांचे ते टोकणे, बोलणे असते. समाजाच्या भल्यासाठी आपल्या पदाचा पूर्ण क्षमतेने वापर करणारी माणसे जनसामान्यांच्या मनातील नायक असतात. मात्र त्यांचे कर्तव्यकठोर नियमाप्रमाणे काम करणे ज्यांच्या स्वार्थाच्या आड येते, त्यांच्या दृष्टीने ती काटा असतात. एरवी काटा सहज दूर करता येतो, पण हे खऱ्या अर्थाने काटे नसल्याने त्यांना कायमचे दूर करणे शक्य नसते. अशा कर्तव्यप्रिय अनेक अधिकाऱ्यांना बदल्यांना सामोरे जावे लागते. अशा अधिकाऱ्याना काट्यासारखे बाजूला करून अडगळीत टाकून दिले जाते. शेवटी काय, काटा बाजूला करण्यातच धन्यता मानली जाते. खरे तर समाजाचा गाडा त्यांच्यामुळेच नीट चालत असतो. असे अधिकारी जनतेच्या गळ्यातील ताईत असतात. जनता त्यांच्यावर मनापासून प्रेम करते. मात्र त्यांना संरक्षण देऊच शकते, असे नाही. ‘काटा’ ही गोष्ट त्यामुळेच सापेक्ष आहे.

काटेही सुंदर असतात, असेच निसर्ग सांगतो. तसे असते म्हणूनच त्यांच्या संगतीत गुलाब फुलतो.  गुलाबाला जवळ करणारे काट्यांना दूर करतात- गुलाबाला तो कितीही जवळ हवा असला तरी.... मग गुलाबाला तोडण्यापेक्षा काट्यातच फुलत राहू दिले तर..?

(पूर्वप्रसिद्धी पुण्यनगरी, कोल्हापूर दिवाळी अंक २०२१)

 

-०-