शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

शेती तंत्राचे वर्तुळ

 

शेती चांगली पिकायची. अन्नधान्याचे व्यवस्थापनही नेटके केले जात असे. त्यामुळेच ब्रिटिशांची सत्ता येण्यापूर्वी मोठे दुष्काळ पडूनही अन्नधान्याची कमतरता आणि उपासमारीने मृत्यू या उपखंडाला जाणवले नाहीत. आज ज्याला आपण सेंद्रीय शेती म्हणतो, तीच शेतीपद्धती पूर्वीपासून भारतात राबवली जात असे. शेतातील पालापाचोळा हा कुजवून त्यापासून खत मिळवून ते मातीत मिसळले जायचे. सेंद्रीय शेतीच्या पुरस्काराने भारतीय कृषी क्षेत्राचे एक वर्तुळ पूर्ण होत आहे… 
शेतीप्रगती मासिकाच्या २०२२ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख…

_________________________________________________________


पृथ्वीची निर्मिती ही एका महास्फोटातून झाली. स्फोट झाला त्यावेळी पृथ्वीसह अन्य सर्व ग्रह तप्त वायुंचे गोळे होते. या गोळ्यांना स्वत:भोवती गती होती. त्या गतीसह हे गोळे सुर्याभोवती फिरत राहिले. अनेक वर्षे असे फिरत असताना, हळूहळू ते गोळे थंड होत गेले. तापमान कमी होत असताना त्यामध्ये नेमक्या कोणत्या प्रक्रिया घडल्या, की ज्यातून विविध मूलद्रव्यांची निर्मिती झाली, हे अजून नेमकेपणाने कोणी सांगितलेले नाही. सूर्यामध्ये असणाऱ्या घटकांचेच हे तप्त गोळे होते, मात्र त्यातील ऊर्जाक्षय झाला. ते थंड झाले. मात्र त्यातून आत पृथ्वीसह अन्य ग्रहावर आढळणारी मूलद्रव्ये कशी बनली, याची उकल अजून झालेली नाही. ते काहिही असले, तरी आज हा सिद्धांत बहुतांश संशोधक मान्य करत आहेत. तर
, महास्फोटात पृथ्वी तयार झाली. ती थंड होत गेली. ती थंड झाल्याने भूपृष्ठ तयार झाले. तरीही पोटातील तप्त लाव्हा ज्वालामुखीच्या माध्यमातून बाहेर येत असे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून उंच पर्वत आणि खोल समुद्र बनले. थंड होण्याच्या प्रक्रियेत तयार झालेले पाणी खड्ड्यात जाउन साठले आणि समुद्र तयार झाले. या समुद्रातील पाण्यामध्ये प्रथम एकपेशीय आणि नंतर बहुपेशीय जीव बनले. यामध्‍ये अमिबासारखे एकपेशीय जीव प्रथम तयार झाले. पुढे शैवालासारख्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती अस्तित्वात आल्या. त्यानंतर जलचर, पुढे उभयचर जीव तयार झाले, असे मानले जाते. उभयचरांपासून सरपटणारे प्राणी, पुढे भूचर, पक्षी बनले. तसेच वनस्पतींचेही उत्क्रांत पावणे सुरू होते. पाण्यात वाढणाऱ्या शैवालांपासून जमिनीवर वाढणाऱ्या वेली विकसीत झाल्या. त्यानंतर झाडे बनली. प्राण्यांमध्ये असणारा मानव हा वानरापासून उत्क्रांत झाला, असे डार्विनचे म्हणणे आज जगाने स्विकारले आहे.

मानवही इतर प्राण्याप्रमाणे प्रथम चार पायावर चालत होता. तो निसर्गात मिळणाऱ्या वनस्पतींची पाने, फळे खाऊन आपली भूक भागवत होता. कंदमुळे, फळे आणि पाने खात जगताना काही प्राणी इतर प्राण्यांना मारून आपली भूक भागवताना दिसले आणि तोही शिकार करू लागला. मांसाहार करू लागला. हळूहळू त्यांने चार पायावरील तोल दोन पायांवर सांभाळण्याची कला विकसीत केली. हा सर्वात मोठा महत्त्वाचा क्षण होता. मानवाचे डोके आणि जमीन यामधील अंतर वाढले आणि मानवांचा मेंदू आधिक कार्यक्षमतेने कार्य करू लागला. त्यातून त्याला कष्ट कमी करण्याचे वेध लागले. उन, वारा आणि पाऊस यापासून संरक्षण हवे होते. यासाठी तो एकाच ठिकाणी निवारा करून राहू लागला. निवाऱ्यासाठी त्यांने नदीकाठची जागा निवडली. सुरक्षीत ठिकाणी तो गवत, लाकडाचा वापर करून झोपड्या बनवू लागला. अनेकदा झाडावर निवारा बनवू लागला.

मानवालाच नव्हे, तर सर्वच सजीवांना जगण्यासाठी लागणाऱ्या तीनच मूलभूत गोष्टी आहेत. अन्न, पाणी आणि हवा. हवा, आणि पाणी निसर्ग सहज पुरवत होता. मानवाच्याही याच तीन मूलभूत गरजा. या पूर्ण करण्यासाठी त्याला कष्ट करावे लागत होते. शिकारीसाठी, फळे, कंदमुळे मिळवण्यासाठी त्याला जंगलात जावे लागे. वणवण फिरून अन्न मिळवावे लागे. कधीकधी शिकारीविना परतावे लागत असे. ही अनिश्चितता त्याला नको वाटे. हे कष्ट कमी करण्यासाठी, अन्नाची शाश्वती ‍निश्चित करण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये खाण्यायोग्य कोणत्या वनस्पती आहेत, याचा शोध सुरू केला. ‍जगाच्या शेतीचा शोध घेतानाही हाच निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. महिलाच अशा वनस्पतींचे बियाणे राखून ठेवत. ते बियाणे दुसऱ्या वर्षाच्या हंगामात पेरता येते आणि त्यापासून उत्पन्न घेता येते हेही महिलांनीच शोधले. नेमके किती बियाणे पेरावे, त्यापासून किती उत्पन्न मिळणार, याचा त्यांनी अंदाज येऊ लागला आणि खऱ्या अर्थाने अन्ननिर्मितेचे म्हणजेच शेतीचे तंत्र मानवाच्या हाती आले. अर्थात त्या काळात शेतातील सर्व कामे हातानेच केली जात असत.

शेतीची सुरुवात साधारण दहा हजार वर्षांपूर्वी मध्यपूर्व भागात झाली. यामध्ये आजचे इस्राईल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्तान, कुवेत, इराक, इराण या देशांचा समावेश होतो. सुरुवातीच्या काळात त्यांने गहू, आईन कॉर्न, जवस अशा धान्यप्रकारांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर मसूरसारख्या कडधान्याचेही उत्पादन घेण्यात येत असे. त्यानंतर वाटाण्याची शेती होऊ लागली. पशूपालनास सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ शेळ्या आणि मेंढ्या पाळल्या जात. त्याबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश झाला. या भागातून शेतीचा प्रसार उत्तर आफ्रिकेतील इजिप्त, आणि आशिया खंडामध्ये झाला.

शेतीची सुरुवात झाल्यानंतर सुमारे ३५०० वर्षांनी भारतात शेतीची सुरुवात झाली. निकोलाय व्हॅव्हिलाव या रशियन संशोधकाने जगभरातील शेतामध्ये सुरुवातीच्या काळात पिकवल्या जाणाऱ्या पिकांविषयी संशोधन केले. जगभरातील शेतीच्या सुरुवातीच्या क्षेत्रांमध्ये दक्षीण भारताचा समावेश होतो. या भागात पिकवल्या जाणाऱ्या पिकामध्ये तांदूळ, मूग, उडीद, तूर, हरभरा, चवळी इत्यादी तृणवर्गीय पीके लावली जात. वांगी काकडी, मुळा, इत्यादी भाज्या लावल्या जात. यामध्ये ऊस, तीळ, करडई, ताग, काळे मिरे, दालचिनी इत्यादी पिकांचाही समावेश आहे. आंबा, चिंच, संत्रा, लिंबू या फळांचाही अन्न म्हणून समावेश आहे. भारतात पिकवली जाणारी शेती ही सेंद्रीय शेती होती. शेतीसाठीची जमीन अदलून बदलून वापरण्यात येत असे. बियाणे पिकातूनच वेगळे काढले जात असे. भारतीय शेतीमध्ये मातीचा कस टिकवून ठेवण्यामध्ये मोठे महत्त्व होते. शेतामध्ये अनेक पिके एकाच क्षेत्रात लावण्यात येत असत. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत तूरीमध्ये उडीद, मूग, चवळी इत्यादी कमी उंचीची पिके आडपट्ट्यामध्ये घेतली जात असत. भारतीय शेती पद्धतीमध्ये जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल राखण्यावर मोठा भर दिला जात असे. जंगलाची शेती पिकवण्यामध्ये असणारी भूमिका माहिती असल्याने ग्रामवन किंवा देवरायांना जपण्याकडे ग्रामस्थ लक्ष देत. अगदी प्राचीन काळापासून तलावांची निर्मिती आणि तलावांचे पाणी पाटाने शेतीला पुरवण्याकडे ग्रामस्थ लक्ष देत. उन्हाळ्यात तलावातील पाणी कमी झाले की गाळ काढून तो शेतातील मातीमध्ये मिसळण्यात येत असे. जेथे तलावाचे पाणी जात नसे, त्या भागात शेत जमिनीच्या कडेला झाडे लावून ओलावा टिकवण्याचे तंत्र, त्यांना माहीत होते. झाडांच्या ओलाव्यावर रब्बी पिके पिकवण्यात येत असत. अशा जमिनीत कोणती पिके घ्यायची, याचे शास्त्र अवगत झाले होते. अनुभवाच्या आधारे मिश्र पिके कोणत्या जमिनीत कोणती आणि कशी लावावीत, याच्या पद्धती त्यांनी समजून घेतल्या होत्या. पिकांचा फेरपालट करून जमिनीचा कस टिकवून असत. पिके कधी काढावीत, त्यांची मळणी कशी करावी, याच्या पद्धती भारतातील शेतकऱ्यांनी विकसीत केल्या होत्या. काढलेले धान्य साठवण करण्यासाठी भारतातील शेतकरी जमिनीखाली गोदाम तयार करत. ज्वारीसारखी धान्ये त्यामध्ये दोन-तीन वर्षे सहज टिकत. मूग, उडिद, तूरीसारख्या कडधान्यापासून डाळ बनवण्याची प्रक्रिया विकसीत करण्यात आल्या. या सर्व प्रक्रिया निसर्गस्नेही होत्या. पिक काढल्यानंतर उरणारा जैविक कचरा  जनावरांना खाद्य म्हणून वापरत. उर्वरीत भाग हा खोल खड्ड्यात कुजवून त्यापासून खत बनवले जाई. जनावरांपासून मिळणारे शेणादी मलमूत्र हे ही त्याच खड्ड्यात कुजवून खत म्हणून वापरले जात असे. या शेती पद्धतीतून मिळणारे उत्पादन भरपूर होते. प्रती हेक्टर चार ते सहा टन धान्य उत्पादन निघत असल्याचे दाखले मिळतात. त्यावेळच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे उत्पादन खूप जास्त होते. हे धान्य पेवामध्ये पुरून ठेवत. या धान्याचा उपयोग अवर्षण काळात करण्यात येत असे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्याकडील असे अतिरिक्त धान्य खरेदी करत आणि किल्ल्यावर साठवून ठेवत. पावसाळ्यापूर्वी किल्ल्यावरून बियाणे आणि घोडे आणि अन्य प्राण्यापासून बनलेले खत पुरवण्यात येत असे. अन्नधान्याचे इतके मोठे उत्पादन होते की इंग्रजांची सत्ता येईपर्यंत गत दोन हजार वर्षांत बावीस मोठे दुष्काळ पडले, मात्र अन्नधान्याची कमतरता जाणवली नाही. अन्नपाण्याच्या कमतरतेमुळे जिवित हानी झाल्याच्या नोंदी नाहीत.   

इंग्रजाचा भारतात सर्वत्र अंमल सुरू होईपर्यंत भारतातील शेती आणि शेतीपद्धती समृद्ध होती. भीषण दुष्काळ पडले असूनही अन्नधान्याची टंचाई झाली नाही. पाण्याचीही उपलब्धता होती. मुस्लीम राज्यकर्त्यांच्या काळातही भारतातील खेडी अन्नधान्य आणि शेतीव्यवस्थापनामध्ये स्वायत्त होती. मात्र इंग्रजांचा अंमल सुरू झाला आणि त्यांनी येथील सर्व संसाधनांची लूट सुरू केली. त्यांनी प्रथम जंगलांची मालकी शासकीय केली. जंगलातील सागासारख्या टिकाऊ लाकडाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. त्यांच्या जागेवर नव्याने लागवड मात्र झाली नाही. शेतावर मोठ्या प्रमाणात कर आकारणी करण्यात येऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. जो शेतसारा पाच टक्केपर्यंत असायचा, तो पन्नास ते साठ टक्केपर्यंत वाढवण्यात आला. खेड्यांतील गावकऱ्यांना गरजेची असणारी पिके न लावता नीळ, कापूस, ऊस, भुईमूग अशी नगदी पिके लावण्याची सक्ती करण्यात येऊ लागली. उत्पादन निघो किंवा न निघो शेतसारा भरणे सक्तीचे असायचे.   

इंग्रजांच्या या धोरणाने भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. दुसरीकडे शेतकऱ्यांना सहाय्य करण्याच्या नावाखाली इंग्रज सरकारच्या आश्रयाने जमिनदार आणि सावकारांचे पेव फुटले. शेतकरी कर्जबाजारी बनले. कर्ज न फेडता आल्याने शेतकरी आणखी त्रस्त झाला. जमिनींची मालकी सावकार आणि जमिनदारांकडे जाऊ लागली. यामुळे खेड्यांमध्ये दारिद्र्य वाढले. भारतातील शेतकऱ्यांची आणि शेतीची प्रचंड हानी झाली. ब्रिटीश सत्तेच्या काळात एकूण अकरा दुष्काळ पडले. तोपर्यंत भारतातील अन्नधान्य निर्मिती, साठवण आणि वितरण व्यवस्था पूर्णत: बदलली होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात  पडलेल्या बिहार आणि पश्चीम बंगालच्या दुष्काळामध्ये मोठी जिवीत हानी झाली. या दुष्काळात लोकांचे झालेले हाल आणि लाखोंची जिवितहानी वाचताना आजही अंगावर शहारे येतात.

तोपर्यंत पाश्चात्य राष्ट्रांमध्ये रासायनिक खतांचा शोध लागला. त्यांचे कारखाने निर्माण झाले. उत्पादन वाढीसाठी या खतांचा वापर करून जास्त उत्पादन काढता येते, असा या खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा दावा होता. भविष्यात याचे काय परिणाम होणार आहेत, याचा विचार कोणीच केला नाही. भारतातील पारंपरिक शेती पद्धती आदिम आहे आणि यांना आधुनिक शेतीपद्धती शिकवण्याची गरज आहे, असे इंग्रज सरकारला या कंपन्यांनी पटवून दिले. इंग्रज शासनाने तेथील कृषी संशोधकांना भारतियांना आधुनिक शेतीपद्धती शिकवण्यासाठी पाठवण्याचे धोरण स्विकारले. अल्बर्ट हॉवर्ड असेच एक संशोधक होते. ते भारतात आले आणि येथील पारंपरिक शेती पद्धतीच्या प्रेमात पडले. ज्या कामासाठी त्यांना भारतात पाठवण्यात आले होते, ते काम ते करत नाहीत, उलट भारतीय शेती पद्धतीचा पुरस्कार आणि प्रसार करत आहेत, अशा हॉवर्ड यांच्याविरूद्ध तक्रारी करण्यात आल्या. यामध्ये कंपन्याना त्यांची उत्पादने विकायची होती. हॉवर्ड यांचे वर्तन मात्र कंपन्यांच्या ध्येयधोरणाच्या विरूद्ध होते. ते पारंपरिक भारतीय शेती पद्धतीच योग्य असल्याचे प्रतिपादन करत. त्यांच्या शेती पद्धतीची फळे इंग्लंडच्या महाराणीने चाखली आणि हॉवर्ड यांना शिक्षा करणे तर दूरच, उलट त्यांना ‘सर’ ही पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले. हॉवर्ड यांच्या या प्रयत्नांना सर्वमान्यता मिळण्याऐवजी रासायनिक खत कंपन्यांनी भारतीय शेती पद्धती आणि हॉवर्ड यांच्यावर टिकेची झोड उठवली. मोठी बदनामी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धात जगातील बहुतांश राष्ट्रे कंगाल झाली. इंग्लंडही याला अपवाद नव्हते. इंग्रजांनाही सूर्य कधीही न मावळणारे साम्राज्य सांभाळणे कठीण झाले आणि भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र तोपर्यंत भारतीय कृषीक्षेत्राची पूर्ण वाट लागली होती.     

भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेतीकडे लक्ष देणे गरजेचे होतेच. सरकारनेही त्यादृष्टिने प्रयत्न सुरू केले. भारत सरकार, संशोधक या सर्वांनीच भारतीय शेती पद्धतीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सेंद्रीय शेतीची फळे तत्काळ मिळत नाहीत. त्यासाठी वाट पाहावी लागते. शेतीचे उत्पादन वाढेपर्यंत लोकसंख्या वाढ मात्र थांबली नाही. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. इंग्रजानी बदललेल्या शेती पद्धतीतून शेतकरी आणि शेती रातोरात बाहेर पडू शकत नव्हते. त्यातच स्वातंत्र्य पडल्यानंतर पाठोपाठ काही दुष्काळाची वर्षे आली. पुरेसे अन्न न ‍मिळाल्याने काही प्रमाणात जिवितहानी झाली. पुढे अन्नधान्याची आयात करण्यात येऊ लागली. १९७२ च्या दुष्काळापर्यंत अशी अन्नधान्याची आयात करणे क्रमप्राप्त झाले. अमेरिकेसारखी राष्ट्रे भारताला अन्न विकतानाही मुजोरी दाखवत. भारताला अक्षरश: याचकाप्रमाणे धान्य विकत घेण्यासाठीही मिनतवाऱ्या कराव्या लागत. या सर्व परिस्थितीची जाण आणि भान असणारे डॉ. स्वामीनाथन हे त्यांच्या कर्तृत्वाच्या परमसीमेवर होते. त्यांच्याखेरीज इतरही कृषी संशोधक कृषी उत्पादन वाढावे, यासाठी प्रयत्न करत होते.

जानकी अम्मल यांनी भारतीय ऊसाचा गोडवा वाढवला होता. ऊसाचे संकरीत वाण तयार केले. शर्करेचे जास्त प्रमाण असणारे ऊसाचे वाण तयार करण्यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. कृष्णस्वामी रामय्या यांनी संकरीत वाण निर्मितीचे तंत्र अवगत असणारे अनेक संशोधक घडवले. बेंजामीन पिअरी पाल यांनी तर भाताबरोबर गुलाब आणि बोगनवेलीच्या असंख्य वाणांची निर्मिती केली. दिलबागसिंग अठवाल यांनी ‘कल्याण सोना’सारख्या आजही सुप्रसिद्ध असणाऱ्या गव्हाच्या वाणाची निर्मिती केली. एम.व्ही. राव यांनी भारत तेलबियांच्या उत्पादनात स्वंयपूर्ण व्हावा, यासाठी योगदान दिले. बद्रीनारायण बारवाले यांच्यासारख्या शेतकऱ्यांने बीजनिर्मिती आणि वितरण व्यवस्था महिकोच्या माध्यमातून भक्कम केली. संशोधकांचे असे प्रयत्न सुरू असताना दादाजी खोब्रागडे यांच्यासारखा शेतकरी आपल्या कल्पक डोक्याने संकरीत वाणांची निर्मिती करत होते. आजही प्रसिदध असलेला ‘एचएमटी तांदूळ’ दादाजींची भारताला सर्वात मोठी देणगी आहे. मद्रास भागात जी. नमलवार हे सेंद्रीय शेतीचा सर्वत्र प्रसार करत होते. संशोधक आणि शेतकरी शेतीत नवे प्रयोग करत असताना दुसरीकडे आधिकाधीक क्षेत्र शेतीखाली यावे यासाठी सरकार प्रयत्न करत होते.

तोपर्यंत भारतातील बहुतांश शेती ही निव्वळ पावसावर अवलंबून होती. त्यामुळे बहुतांश क्षेत्रामध्ये एकच पीक घेतले जात असे. वर्षभर शेती पिकवायची असेल तर त्यासाठी पाण्याची गरज होती. यासाठी जायकवाडी, उजनी, कोयना ही जशी महाराष्ट्रामध्ये धरणे बांधण्यात आली, तशीच ती देशभर बांधण्यात आली. यामुळे शेतीला पाणी उपलब्ध झाले. तरीही शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत नव्हते. संशोधकांनी संकरीत वाणही बनवले होते. मात्र हे प्रयत्न वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यास पुरेसे पडत नव्हते. स्वामीनाथन जगभरात अन्नधान्याच्या उत्पादनवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांकडे लक्ष ठेवून होते. अमेरिका आणि जपान या राष्ट्रांनी या क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केली होती. स्वामीनाथन यांनी श्रीमंतीच्या तोऱ्यात वावरणाऱ्या अमेरिकेकडे मदतीचा हात मागण्यापेक्षा जपानकडे सहकार्य मागितले. मात्र जपानमध्ये झालेल्या क्रांतीमागे नॉर्मन बोरलॉग यांचेच सहकार्य होते. जपानच्या संशोधकांनी मदत तर केलीच पण त्यांनी जपानकडून मिळणाऱ्या वाणांपेक्षा नॉर्मन बोरलॉग यांच्याकडील बियाणे भारतीय वातावरणात जास्त उपयुक्त ठरतील असे कळवले.

स्वामीनाथन यांनी बोरलॉग यांच्याकडे बियाणे पाठवण्याची विनंती केली. विश्वकल्याणाचा विचार करणाऱ्या बोरलॉग यांनी ती मान्य केली. बियाणे पाठवले. स्वत: भारतात येऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना शांततेचे नोबेल देण्यात आले. संशोधकांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला. पद्धती समजावून सांगितली आणि भारतीय शेतकऱ्यांच्या सहकार्याने भारताने हरीत क्रांती झाली. हरीत क्रांती घडवून आणताना त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करण्यात आला नाही. विचार करण्यासाठी वेळही नव्हता. सुरुवातीला काही वर्षे शेती उत्पादन वाढले. मात्र संकरीत वाणांना आवश्यक असणारी पोषकद्रव्ये मिळावीत, यासाठी रासायनिक खते देणे गरजेचे बनले. तसेच संकरीत वाणांवर कीड पडते. रोग आणि किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किटकनाशकांचा वापर करणे आवश्यक बनले. पुढच्या मोसमांमध्ये आणखी जास्त मात्रा वापरावी लागते. याचा परिणाम जल, जंगल आणि जमीन यावर होत गेला. किटकनाशके, खते यांच्या अतिरीक्त वापरांमुळे जमीन क्षारपड होऊ लागली. जल प्रदुषणाचे प्रमाण वाढले. मातीचा पोत बिघडला. अखेर संशोधकांनी आणि शेतकऱ्यांनी आपले लक्ष सेंद्रीय शेतीवर केंद्रीत केले आहे.

रासायनिक खते, किटकनाशके यांचा वापर करण्यापेक्षा निसर्गातून मिळणाऱ्या घटकांचा वापर करून शेती पिकवण्याचे तंत्र वापरण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष गेले आहे. निसर्गातून मिळणाऱ्या घटकांचा उपयोग करून शेती पिकवण्याच्या पारंपरिक पद्धतींचे पुनरूज्ज्वीन आणि त्यामध्ये आवश्यक शास्त्रीय बदल, प्रयोग करण्याचे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली अन्नधान्ये, शेतीजन्य पदार्थ, फळे यांची भारतातील बाजारपेठेत मागणी वाढत आहे. भावही चांगला मिळत आहे. मात्र सेंद्रीय शेती पद्धती पूर्ण विकसीत होऊन वाढलेल्या लोकसंख्येचे पोट शांत करेल, इतके उत्पादन निर्माण करण्याची क्षमता येईपर्यंत मिश्र शेती पद्धती कायम ठेवावी लागेल. अन्यथा पुन्हा मोठे संकट उभे राहू शकते आणि जागतिक स्तरांवरील अस्थिर वातावरण पाहता ते परवडणारे नाही. शासनाने अशा शेतीला उर्जितावस्था प्राप्त होईपर्यंत अनुदान द्यायला हवे.

असे झाले तरी इंग्रजी राजवट आल्यापासून थेट कृषी डतपादकांना बाजारात वाढलेल्या भावाचा उपयोग किंवा फायदा होत नाही. शेतकरी आजही असंघटीत असल्याने बाजार भावाचा लाभ शेतकऱ्यास मिळू दिला जात नाही. हे टाळण्यासाठी सामुहीक शेतीचे प्रयोग व्हायला हवा आहे. खेडी अन्नधान्य आणि त्यांच्या गरजांच्यासाठी स्वायत्त होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची आंदोलने होतात, मात्र ती पूर्ण यशस्वी होताना दिसत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादन खर्च आणि मिळणारे पैसे यातून भरीव नफा मिळत नाही. त्यामुळे उपजिविकेसाठी त्याला आलेले कृषी उत्पादन तत्काह विकावे लागते. दुसरी मोठी समस्या येते ती अन्नधान्य साठवून ठेवण्याची व्यवस्था ग्रामीण भागात नाही. त्यामुळे माल भाव चांगला येईपर्यंत ठेवायचे कोठे? हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो. शेतकऱ्यांना गोदामांची सहज सुविधा उपलब्ध व्हायला हवी.

भारतीय शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करणे भविष्यात फार गरजेचे असणार आहे. एकीकडे पारंपरिक शेती ते सेंद्रीय शेती हे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. मात्र अन्नधान्य उत्पादन वाढवायचे असेल तर जनुकीय वाणांना मर्यादित रूपात स्विकारणे आवश्यक आहे. दुसरीकडे मूळ देशी वाणांचे जतन करत त्यांच्यापासून आधिक उत्पादन ‍मिळवण्यासाठी संशोधनाची गरज आहे. नवे संकरीत वाण शोधावे  लागतील. जागतीक तापमान वाढ आणि त्यामुळे होणारे बदल, निसर्गाचा लहरीपणा शेती क्षेत्रावर मोठे परिणाम करणार आहे. त्यातून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना संशोधकानी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यानीही या सर्व गोष्टी समजून घेऊन आवश्यक बदल तातडीने स्विकारण्याची गरज आहे. तरच शेती आणि शेतकरी ‍टिकेल!

-०-



 

         

१० टिप्पण्या:

  1. छान विश्लेषणात्मक लेख... शेतीप्रधान देश म्हणून ओळख असणाऱ्या भारताची आता जागतिकीकरणाच्या काळात शेती क्षेत्रात भरारी मारणे निश्चितच गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अभिनंदन,लेख अतिशय सुंदर आहे.मला एक गोष्ट लक्षात आली म्हणून नमूद करतो. सुशिक्षित लोक शेती न करता शेती पिकविन्याबाबत
    मार्गदर्शन करू लागले,त्यामुळे शेती उत्पादन घटले ही बाब दुर्लक्षित करुन चालणार नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. अभिनंदन सर. शेती विषयक माहितीबाबतचा अतिशय सुंदर लेख, छान विस्तृत माहिती मिळाली, लेखन मांडणी सुंदर माहिती

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय छान माहिती लेखामध्ये दिली आहे. सेंद्रिय शेती, जुनी बियाणे, नवीन तंत्रज्ञानचा वापर आपण केल्यास नक्की फायदा होईल व शेतकऱ्यांचे जीवन सुधारेल यात शंका नाही. हा लेख जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर आगदी मनापासून अभिनंदन कारण एक अभ्यासपूर्ण आणि वास्तव जीवनात उपयोगी पडेल असा लेख आहे. तुमचे असेच मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
  5. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारताची आता जागतिकीकरणाच्या काळात शेती क्षेत्रात भरारी मारणे निश्चितच गरजेचे आहे.आपण खूप छान माहिती दिली आहे. सर्व वर्गांचे लक्ष वेधले आहे.
    धन्यवाद सर....

    उत्तर द्या

    उत्तर द्याहटवा
  6. छान लेख! खरं आहे सर, जसं की शिक्षण पद्धती री डिफाईन होऊ घातली आहे त्याच प्रकारे शेती पद्धती देखील जुन्या नवीन परंतू शास्वत विकासाकडे नेणाऱ्या तंत्रा नुसार री डिफाईन होणं जरुरी आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. अतिशय छान माहिती आहे. एक प्रकारे शेतीशी निगडित इतिहास संक्षिप्त स्वरुपात मांडला आहे. सेंद्रिय शेतीचे महत्व पण अधोरेखीत केले आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. खूप दिर्घ लेख आहे. पण संपूर्ण वाचून काढला. देशी बियाणे देशी पारंपरिक तंत्र ते संकरीत बियाणे व रासायनिक खतांचा वापर करून शेती पिकवण्याची तंत्रातील संक्रमणाची माहिती मिळाली.. पारंपरिक पद्धतीने पिकविलेल्या शेतीची फळ गोडच मिळते ( सर हाॅवर्ड/ व्हिक्टोरिया राणी.. अर्थात उत्पादन ) हे पुन्हा पटलावर आणले आहे ‌. शेती पिकवण्याच्या कालखंडाचा उल्लेख वाचताना कुतुहलापोटी काही प्रश्नही निर्माण झाले आहेत .ते पाठवतो.

    उत्तर द्याहटवा