गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

'सर, खूप लवकर एक्झिट घेतलीत!'


(शिक्षक दिन विशेष-१ प्राचार्य एन.एस, धायगुडे सर)
आज शिक्षक दिन. शिक्षक, गुरू यांनी घडवले तर आपण घडतो. मलाही जीवनाच्या वेगवेगळ्या टप्पयावर  अनेक गुरू भेटले. यानिमित्ताने दरवर्षी एका गुरूच्या आठवणीला ऊजाळा देण्याचा आणि त्या तुमच्यापुढे सादर करण्याचा संकल्प आहे. यावर्षी ज्यांनी एका खेड्यातील मुलाला अनेक अंगानी घडवले असे गुरूवर्य प्राचार्य नागेश स्वानंद धायगुडे सरांविषयी मी लिहिले आहे. दयानंद महाविद्यालयांतील या सरांनी आम्हाला खूप काही दिले. ते अकाली गेले. मात्र त्यांच्याबद्दलची आठवण नाही असा दिवस जात नाही. अशा या सरांविषयी......                            
--------------------------------------------------------------------------------------------
सोलापूरचे दयानंद महाविद्यालय! ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात याच महाविद्यालयात प्रवेशित होतात. पासष्ट एकरांचा विस्तीर्ण परिसर. चार महाविद्यालये एकाच परिसरात, मात्र स्वत:चे वेगळेपण सांभाळणारी. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र इमारत. प्रशस्त देखणी मुलांचे व मुलींचे वसतिगृहे. भव्य ग्रंथालय. 'शिक्षणाचा खरा अर्थ हा विद्यार्थ्याला परिपूर्ण माणूस म्हणून घडवणे हा आहे,' हे प्रमाण मानून विद्यार्थ्यांवर कायम चांगले संस्कार होतील, याची जाणीव ठेवून कार्य करणारे शिक्षक या महाविद्यालयात होते आणि अजूनही आहेत. विस्तीर्ण परिसराप्रमाणे, मोठ्या मनाचे शिक्षक. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे.ले विद्यार्थी चुकीचे तर वागत नाहीत ना, वाई मार्गाला जात नाहीत ना, हे आपल्या तीक्ष्ण नजरेने तपासणारे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमाबरोबर संस्कारांचे धडे देणारे. आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा, या शिक्षकांती डॉ. नागेश स्वानंद धायगुडे सर हे विद्यार्थ्यांच्या मनात सर्वोच्च स्थानी. विद्यार्थी चुकीचे वागले तर त्याची अशा शब्दात जाणीव करून द्यायचे की, विद्यार्थ्यांचे वागणे बदलणारच, याची १०० टक्के खात्री. गुंड प्रवृत्तीचेही काही विद्यार्थी असायचे, पण सरांचा आदरयुक्त दरारा असा की, ते विद्यार्थीही सरांसमोर निःशब्द व शांत होऊन जात.
            आजूबाजूच्या ग्रामीण भागातीलच नव्हे तर माढा, बार्शी, अक्कलकोट भागातील, खेड्यांतील मुले या महाविद्यालयात प्रवेश घ्यायची. महाविद्यालयात शहरी विरूद्ध ग्रामीण असे गट असायचे. या गटांच्या हालचाली विशेषतः निवडणुकाच्या वेळी फार जोरात असायच्या. त्यावेळी थेट विद्यार्थ्यांच्या मताद्वारे विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडी व्हायच्या. एकदा अशाच निवडणुकीच्या काळातील वादात शहरातील मुलांचा गट एका गुंडाला घेऊन आला. त्याच्याजवळ चाकू होता. शिक्षणशास्त्र इमारतीच्या पुढे असणाऱ्या बुचाच्या झाडाखाली दोन्ही गटांतील मुले उभी होती. त्यावेळी
त्या मुलाने चाकू बाहेर काढून धमकावायला सुरूवात केली. तेवढ‌्यात गेटमधून सरांच्या स्कूटरचा आवाज आला. सरांना पाताच भांडणाचे वातावरण एकदम बदलले. चाकू खिशात गेला. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गप्पांचा आव आणला गेला. पण सरांच्या हे सारं लक्षात आलं असावं. सरांनी त्या मुलाजवळ आपली निळी स्कूटर उभी केली. 'काय चाललं आहे?' सरांनी विचारलं. मुलांमधून 'काही नाही, चहाला जातोय' असं उत्तर आलं. तरी सरांनी सांगितलं, 'हे बघा, निवडणुका आहेत, जय-पराजय होतच असतो. तुम्ही शिकायला आलात. पण निवडणुकांच्या नावाखाली काहीही चुकीचे होणार नाही, याची काळजी घ्या.' असं सांगतानाच त्यांच लक्ष त्या बाहेरच्या मुलाक़डं गेलं. त्यांनी विचारलं, 'हा कोण? हा तर आपला विद्यार्थी नाही.' त्यावर 'नाही सर, तो आमचा मित्र आहे,' असं मुलांमधून उत्तर आलं. पुन्हा सरांनी सांगितल, 'निवडणुका सुरळीत झाल्या पाहिजेत आणि सर्वांशी मैत्री असणं खूप चांगलं, पण अशा प्रसंगी ती काॅलेजमध्ये आणू नका,' एवढं सांगून सर निघून गेले. पण त्यांच्या सांगण्याचा परिणाम असा झाला की, पुन्हा चाकू बाहेर आला नाही. दमदाटीची भाषा संपली. शांतपणे, योग्य शब्द आणि शब्दफेकीच्या जोरावर सर आपल्याला जे साध्य करायच ते करत. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि बाहेरील विद्यार्थी ते अचूक ओळखत. 
      वर्गात त्यांचे शिकविणे, विषय समजावून सांगणे हे तर भन्नाट होते. इलेक्ट्राॅनिक्स किंवा अन्य विषय घेण्यासाठी प्रवेशित झालेले अनेक विद्यार्थी सरांच्या व्यक्तिमत्वाने व शिकविण्याने प्रभावित होऊन भौतिकशास्त्र विषय निवडायचे. मीही असाच बार्शीवरून बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स शिकण्यासाठी दयानंदमध्ये प्रवेश घेतलेला. मी खेड्यातलाच. बार्शीत इलेक्ट्रॉनिक्स मिळाले नाही म्हणून सोलापूरला गेलो होतो. पण सरांच्या प्रभावाखाली कधी गेलो ते कळाले नाही आणि सरांचा भौतिकशास्त्र विषय घेऊनच १९८९ मध्ये बी.एस्सी. झालो. सरांनी वर्गात शिकवत राहावे आणि आपण ऐकतच राहावे, असे वाटायचे. त्यांच्याकडून इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम, क्लासिकल
मेकॅनिक्स, मॅक्सवेल इक्वेशन्स शिकताना असे वाटायचे की, जणू हे शास्त्रज्ञ सरांना येऊन आपण हा शोध कसा लावला, इक्वेशन कसे सुचले, ते सांगत असावेत. त्यांच्या सुंदर अक्षरात बोर्डवर लिहीलेली सूत्रे किंवा इक्वेशन्स पाहात राहावी, असे वाटायचे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर वर्गात शिकविताना मराठीचा वापर करत नसत. ते इंग्रजीतूनच शिकवत. मात्र वर्गाबाहेर अस्खलित मराठीत संवाद चालायचा. सर आणि धायगुडे मॅडम दोघेही शिकवायला असत. मॅडमकडे नेहमीच 'क्वाॅंटम मेकॅनिक्स'सारखा अवघड पेपर असतो आणि तरीही तो आपल्याला समजतो, आपण त्याची उत्तरे छान लिहू शकतो, याचही कौतुक वाटायच. वर्गाती शिकवण्याच्या बाबतीत मॅडम आणि सरांची तुलना अनेकदा व्हायची आणि शेवटी दोघंही 'ग्रेट' आहेत, यावरच शिक्कामोर्तब व्हायच. 
     एक प्रसंग सांगतो. मी बी.एस्सी.च्या तिसऱ्या वर्षात असताना १९८९च्या फेब्रुवारीत बिहारमधील 'राजेंद्र ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी, पुसा' येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबीरासाठी माझी विद्यापीठामार्फत निवड झाली. मी जायला तयार नव्हतो. सरांनी मला समजावून सांगितलं. अशी संधी पुनःपुन्हा येत नाही आणि ती टाळू नकोस, म्हणून बजावले. नेमका १९८८ मध्ये चौथा वेतन आयोग लागू करावा, यासाठी शिक्षकांचा संप झाला होता. संपकाळात बुडालेले अध्यापन त्या काळात झाले. संपामुळे परीक्षा काही काळ पुढे गेल्या होत्या. मी बिहारवरून आलो आणि विद्यापीठाच्या युवक महोत्सवासाठी कोल्हापूरला थांबून ८ मार्चला परत सोलापूरला आलो. जवळपास एक महिना यात गेला. तोपर्यंत अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला. सरांकडे क्लासिकल मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रीसिटी मॅग्नेटिझमचा पेपर होता, तर मॅडमकडे मॅथेमॅटिकल फिजिक्स आणि क्वाँटम मेकॅनिक्सचा पेपर होता.
सर आणि मॅडम दोघांनीही त्यांच्या विषयाच्या संदर्भ पुस्तकांची माहिती दिली. कठीण भागाच्या नोट्स दिल्या. सरांचा पेपर तसा तयार करणे शक्य होते. पण क्वाँटम मॅकेनिक्स पूर्णपणे डोक्यावरून जात होते. काय करायचे? हा प्रश्न होता. सराना अडचण सांगितली. मॅडम आणि सरांनी दोघांनी बोलावून सांगितले, 'सांयकाळी पाचनंतर थेट घरी ये. मॅडम तुला तो संपूर्ण भाग शिकवतील.' मी त्यानुसार घरी जायला सुरूवात केली. आमची 'विना फी'ची शिकवणी सुरू झाली. दिप्ती आणि प्रज्योत दोघेही त्यावेळी लहान होते. त्यांना खरे तर आई-बाबांची गरज होती. त्या वेळेत मॅडम मला शिकवत असत आणि सर या दोन्ही पिल्लांना सांभाळत. या कालावधीत ज्ञानग्रहणानंतर अनेकदा अन्नग्रहण करूनच मी तेथून निघत असे. कोण कुठला मी? एक हजाराच्या आतल्या लोकसंख्येच्या खेडयातील शिक्षकाचा मुलगा. त्यांचा माझा संबध आला, तो एक विद्यार्थी म्हणून. मात्र विद्यार्थ्याला आपल्याकडे असलेले सारे काही द्यावयाचे या उद्देशाने सर आणि मॅडम जगत होते आणि त्याचा मी पूर्ण अनुभव घेतला. त्यांनी निरपेक्ष भावनेने विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी केलेले प्रयत्न मला त्यांच्याकडे खेचत. त्यामुळे माझे लौकिकार्थाने त्यांच्याकडून शिकण्याचे दिवस संपले तरी जीवनाचे धडे मी त्यांच्याकडून शेवटपर्यंत घेत राहिलो. त्यांच्या मार्गदर्शनाचा अनेक कठिण प्रसंगात लाभ होत राहिला. मला माझे विद्यार्थीपण असेच आजीवन जपायचे होते आणि आज सर भौतिकदृष्ट्या जवळ नसले तरी जपण्याचा प्रयत्न करत आहे. 
      पुसा इथल्या शिबिराला जायला माझा मुख्यत्वे नकार होता, तो माझी एम.एस्सी. प्रवेशाची संधी सुटेल म्हणून. मात्र सरांनी त्यावेळचे शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.
आर.एस. माने यांच्याशी संपर्क साधला. त्या काळात कुलगुरूंच्या आधिकारात प्रत्येक विभागात एका विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात असे. त्या जागेवर भौतिकशास्त्र विषयासाठी मला संधी द्यावी, अशी विनंती केली. मला ते सांगितले. त्यानंतर मी तयार झालो होतो. शिबिरावरून आल्यानंतर आता आपण सहज उत्तीर्ण होऊ शकतो आणि आपण एम.एस्सी.ला प्रवेश मिळवणार, या आविर्भावात होतो. त्यामुळे महाविद्यालयात इकडून तिकडे मित्रांसोबत फिरत असे. मी हवा तसा अभ्यास करत नाही, हे सरांनी ओळखले. मला शिपायामार्फत बोलावणे धाडले. मी गेलो. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, 'हे बघ, तू उत्तीर्ण होशील. एम,एस्सी.ला प्रवेशही मिळेल - मात्र ताे कुलगुरूंच्या आधिकारात. आणि जर अभ्यास चांगला केलास तर मात्र गुणवत्तेवर प्रवेश मिळेल. तू आता अभ्यास करायला हवा. हे हुंदडणे थांबवा.' तोपर्यंत सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर एवढा परिणाम झाला होता की मी त्यांचा शब्द प्रमाण मानला. त्या दिवसापासून मी पहाटे तीन-तीन वाजेपर्यंत अभ्यास केला आणि महाविद्यालयात प्रथम आलो. विद्यार्थ्याला त्याच्या चुकीची नेमकी जाणीव करून देणारे सर भेटले नसते, तर एम.एस्सी.ला प्रवेश मिळाला असता पण गुणवत्तेवर नाही, तर सवलतीचा फायदा घेऊन. विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण करण्याचा त्यांच्याकडे अलौकिक गुण होता. ज्याचा मी एक लाभार्थी आहे.
      वर्गात शिकविणाऱ्या सरांचा प्रभाव पडायचाच, पण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्याला जे शिकवायचे आणि घडवायचे, तेही अफलातून होते. त्यांच्या प्रयत्नातून समाजात अनेक यशस्वी व्यक्ती-नागरिक त्यांनी निर्माण केले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमबाह्य उपक्रमांत सहभागी व्हायला प्रोत्साहित करायचे. विद्यार्थ्यांच्या अंगचे नेमके कलागुण हेरून ते प्रोत्साहित करत, मार्गदर्शन करत. फिजिक्स क्लबद्वारा अनेक नामवंतांची व्याख्याने आयोजित व्हायची. त्यामध्ये सर्वांना उपस्थिती सक्तीची असे. हा उपक्रम विद्यार्थ्यांनीच चालवला पाहिजे, याकडे त्यांचे लक्ष असायचे. पाहुण्यांची ओळख, आभार मानणे, सूत्रसंचलन मुलांनी करावे, यासाठी ते आग्रही असत.
त्यातून नकळत सभाधीटपणा यायचा. या क्लबचे खातेसुध्दा विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संयुक्त असायचे आणि जमा होणारे सर्व पैसे त्याच वर्षी खर्ची पडावेत, त्याचा त्याच वर्षीच्या विद्यार्थ्याना फायदा व्हावा, हा त्यांचा कटाक्ष असायचा. स्पर्धांना पाठवण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे निबंध सर तपासून द्यावयाचे. नकला, गाणी सादर करणारांना सुधारणा सांगायचे. त्यांचे इंग्रजीतील शिकवणे जेवढे सुंदर, तितकेच मराठीचे ज्ञानही उत्तम होते. काना, मात्रा, वेलांटीच्या चुकाही दुरूस्त करायला लावत. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. त्यासाठी तो विद्यार्थी आपल्या विषयाचा किंवा विभागाचा असावा, असे कोणतेही बंधन नव्हते. एखाद्या विषयाच्या बाबतीत हे अमूक एका सरांनी तपासून दिलं तर अधिक चांगलं होईल, असे सांगण्याची आणि दुसऱ्याची त्या विषयातील प्रज्ञा मान्य करण्याचा मोठेपणा आणि नम्रता त्यांच्याकडे होती. इतरांच मोठेपण ते सहजपणे सांगत आणि त्यांच्या अशा कृतीतून निगर्वीपणाचा संस्कार विद्यार्थ्यांवर होई. सरांचा विद्यार्थ्यावर इतका प्रभाव असे की, अनेक विद्यार्थी सरांप्रमाणे पूर्ण बाह्यांच्या शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत दुमडत. माझ्यातही ती सवय नकळत उतरली. 
    सरांची भाषा शुध्द आणि संयमी होती. त्यांनी चुकूनही कधी अपशब्द उच्चारलेला आठवत
नाही. त्यांना गाण्यांची आवड होती. ते चित्रे खूप सुंदर काढत. एकदा ते कोल्हापूरला माझ्याकडे आले असताना सकाळी कन्या चित्र काढत बसली होती. तिने हॉलभर पसारा मांडलेला. मी तिच्या त्या चित्र काढण्याच्या पद्धतीवरून तिला ओरडलो. सरांनी मला शांतपणे बाहेर जायला सांगितले आणि ५५ वर्षांनी लहान असलेल्या चिमुरडीबरोबर सर खाली जमिनीवर बसले. मी माझ्या कामासाठी निघून गेलो. संध्याकाळी घरी आलो, तेव्हा एक चित्र पुस्तकाच्या कपाटावर लावलेले होते. समुद्र किनाऱ्यावरील घर, त्याला कुंपण, नारळाचे झाड, कडेने जाणारी वाट असे ते संध्याकाळचे सुंदर चित्र होते. माझ्या कन्येने इतके सुंदर चित्र काढले, यावर माझा विश्वास बसत नव्हता. सरांनी आणि आमच्या सौभाग्यवतींनीही सांगितले की, ते चित्र तिनेच काढलेय. बी.एस्सी., एम.एस्सी.च्या वर्गांना शिकवणाऱ्या सरांनी सात आठ वर्षांच्या मुलीला किती सहजपणानं सुंदर चित्र काढायला शिकवलं. हे फक्त एक सच्चा शिक्षकच करू शकतो. 
    सरांचे पशुपक्ष्यांवरही तितकेच प्रेम होते. दारात येणाऱ्या कुत्र्याला किंवा मांजरांना ते अत्यंत प्रेमाने वागवत. सरांच्या घरात आपले घर थाटणाऱ्या होला पक्षाला त्यांनी कधी हाकलले नाही. तो त्यांच्या घराचा भाग बनून राहिलेला मी अनेकदा पाहिलाय. 
    वैष्णवी तीन वर्षांची असताना आम्ही सोलापूरला राहायला आलो. त्यावेळी दिप्ती आणि प्रज्योत दोघेही सोलापुरात नसायचे. या दिवसात आमच्यात आणखी जवळीक आली. मॅडम सोलापूरमध्ये
नसताना अनेकदा ते वैष्णवीला घेऊन बाहेर जात. एकदा आपण सर्वांनी गड्डयाच्या जत्रेत जायचे, म्हणून सांगितले. मी म्हटले, सर, खूप धूळ असते नको. पण सरांनी आपल्या गावची जत्रा आहे, गेलेच पाहिजे, म्हणून सांगितले. जत्रेत अगदी पन्नालाल गाढवापासून सगळे एंजॉय केले. निघताना एका फोटोच्या दुकानात सरांनी फोटो काढायला लावला आणि सांगितले- दरवर्षी जत्रेत असा फोटो काढून घेतला पाहिजे. ती एक मस्त आठवण असते. मला शिक्षक, प्राचार्य याच्यापलिकडचे सर खऱ्या अर्थाने समजायला लागले. धूळ, गर्दीचा अगर आपण प्राचार्य आहोत याचा विचार न करता प्रथम आपण माणूस आहोत, हे माणूसपण जपलं पाहिजे, हेच त्यांच्या या कृतीतून मला दिसून आलं. 
      वर्गात शिकवताना सरांनी फळ्यावर काढलेल्या आकृत्या खूपच सुंदर आणि प्रमाणबद्ध असत. त्यांचे अक्षरही सुंदर होते. वर्गात आल्यावर बोर्ड स्वच्छ पुसायचा. त्याचे खडूने दोन भाग करायचे आणि मग शिकवायला सुरूवात करायची. तास संपताना पुन्हा बोर्ड स्वच्छ पुसूनच ते बाहेर पडायचे. त्यांच्या या सवयी पुढे अनेक विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या. वर्गात लक्ष न देता हुडपणा करणारी मुलंही असायची, वेळप्रसंगी त्यांना वर्ग सोडण्याची सौम्य शिक्षा ते द्यायचे. पण यातल्याच कोणी पुढे कोणतेही चांगले काम केले, तर त्याचे मोकळेपणाने कौतुकही करायचे. परिणामी, मुलांना सरांच्या नजरेतला आपला वाढलेला भाव कमी होऊ नये, असे वाटायचे. आपोआपच व्रात्यपणा कमी व्हायचा.
      पुढे सर प्राचार्य झाले. खरे तर सर प्रशासन कुशलही होते. ते मी अनेक कार्यक्रमातून अनुभवलेही. प्रशासनात यशस्वी होण्यासाठी काही वेळा डावपेच खेळावे लागतात. या गोष्टीला त्यांचा विरोध होता. असे कोणतेही डावपेच न खेळता ते स्पष्टपणे आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवत. अनेकदा अनेकांना त्या रूचत नसत. त्याचा त्यांना त्रासही व्हायचा. लोक दुखावले जायचे. मात्र अपवाद वगळता, सरांनी अप्रिय निर्णय घेतला, तरी लोकांचे त्यांच्यावरील प्रेम कमी होत नसे. भौतिकशास्त्रातील इल्युजन त्यांना पूर्ण माहित होते, मात्र माणसे दुखावू नयेत म्हणून त्यांनी आभासी मुखवटा कधीही धारण केला नाही. प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळत असताना संस्थेची तत्त्वे चुकूनही मोडणार नाहीत, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. 
    सरांना प्राचार्य पदापेक्षा शिक्षक म्हणून कार्य करण्यात जास्त रस होता. विज्ञानप्रसारासाठी ते स्वत:च्या खिशातून खर्च करत. अनेक शाळा महाविद्यालयांत ते व्याख्यानाला जात. मानधन तर सोडाच, पण अनेकदा प्रवास खर्चही घेत नसत. व्याख्यानांद्वारे आपल्या सुमधूर वाणीने ते विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगत. विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी सांगत. भाभा अणुशक्ती केंद्र, इस्रो अशा नामांकित विज्ञान संशोधन संस्थांमधील संशोधक त्यांचे मित्र होते. त्यांची व्याख्याने ते मुलांसाठी आयोजित करत. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. व्ही.एन. बापट, डॉ. जयंत नारळीकर इत्यादी विज्ञान क्षेत्रातील दिग्गज मंडळींना ऐकण्याची संधी त्यांनी सोलापूरकरांना उपलब्ध केली. 
      एक शिक्षक म्हणून, ल्युमिनिसन्स संशोधन प्रयोगशाळा दयानंद महाविद्यालयात उभारून अनेकाना मार्गदर्शन करणारे संशोधक म्हणून, एक विज्ञान प्रसारक म्हणून सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार सहजी मिळायला हवा होता; पण, त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी कधी अर्ज केला नाही. आदर्श पुरस्कार घेऊन आदर्श ठरतो, असे नाही. पुरस्कार मिळाला तर, चार दिवस कौतुकाचा वर्षाव होतो आणि सारे विसरून जातात, असे पुरस्कार मला महत्त्वाचे वाटत नाहीत. आपण आपले काम करीत राहावे, असे त्यांचे कायम म्हणणे असायचे. त्यांच्याबद्दल मोठा आदर असणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांनी एकदा त्यांना अर्ज पाठवायला सांगितला होता. माझ्यामार्फतही निरोप पाठवला. मात्र सरांनी अत्यंत नम्रपणे नकार दिला. यातच सरांचे मोठेपण होते. 
     सर अगदी जवळीक असलेल्या विद्यार्थ्यांना एकेरीतून बोलायचे. तो त्यांचा हक्कही होता. मात्र अशा एखाद्या विद्यार्थ्याच्या कार्यालयात गेले की, त्याला अहो-जाहो असे आदरार्थी संबोधायचे. त्यावर त्यांचे म्हणणे असायचे की, 'मी जर आदरार्थी बोललो तर त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांमध्ये आपोआप आदराची भावना वाढते. आणखी एक फायदा होतो, होणारी कामे, नियमानुसार कामे, माझा विद्यार्थी अडवणारच नाही. पण जर तेथे आमच्या दोघांच्या ओळखीचा कोणी असेल आणि त्याचे काम अडलेले असेल, तर तो दुसरा माणूस वशीला लावायला माझ्याकडे येणार नाही'. यातला आपल्या विद्यार्थ्यांबाबत सरांच्या मनात किती विश्वास होता, हे समजून यायचे.
मी सोलापूरला पदव्युत्तर शिक्षण केंद्रात अधिव्याख्याता म्हणून काम पाहात असताना २८ फेब्रुवारी १९९६ या विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञान दिन पुरवणी प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी लगेच सोलापूर तरूण भारतचे तत्कालीन संपादक विवेक घळसासी यांच्याशी चर्चा करून पुरवणी काढायचे निश्चित केले. लेखकांना विनंती करणे, पत्रे पाठवणे इत्यादी गोष्टी स्वत:ची कामे बाजूला ठेवून केली. या विज्ञान दिनाचे औचित्य साधून एखाद्या मराठी वृत्तपत्राने चार पानांची विज्ञान पुरवणी काढायची, ती पहिली वेळ असल्याचे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा लेखन करणार असल्याचे वि. गो. कुलकर्णी यांच्यासारख्या मातब्बर विज्ञान प्रसारकाने सांगितले. पुढे मी अधिव्याख्याता पदावर असेपर्यंत मी त्यांच्यासमवेत पुरवणीचे पूर्ण कामकाज पाहायचो. एकदा तर रात्री अकरा वाजेपर्यंत काम चालले होते. त्यावेळी होटगी रोडवरील तरूण भारतच्या कार्यालयातून आम्ही रेल्वे स्टेशनवर चहा पिण्यासाठी गेलो होतो. दिवसभर कॉलेजचे काम सांभाळून रात्री उशीरापर्यंत या कामासाठी वेळ देणे हे सरांनाच शक्य होते. त्यांची ही सवय नकळत आमच्यात उतरत होती. एकदा काम स्विकारले की पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा ते करत. 
     माझे पहिले पुस्तक 'एककांचे मानकरी' लिहायला घेण्यापूर्वी मी माझा या पुस्तकाचा संकल्प सरांना सांगितला. सरांशी मी मोकळेपणाने त्या विषयावर चर्चा केली. त्यातील काही भाग लिहून झाल्यावर मी त्यांना पाठवला. त्यावर तू सर्व लिखाण संपव, आपण १२ नोव्हेंबरला सोलापूरमध्ये पुन्हा चर्चा करू, असे सांगितले. आम्ही एकत्र बसणार होतो, पुस्तकाचा मसुदा अंतिम होणार होता... आणि सात नोव्हेंबरला प्रज्योतचा मला पुण्याला येण्यासाठी निरोप आला. आठ तारखेला सरांचे जाणे झाले. मात्र ते जाणेसुद्धा एका विज्ञानप्रेमी शिक्षकाचे ठरले. सरांचे डोळे आणि अन्य अवयव दान करण्यात आले. सरांनी आयुष्यभर विद्यार्थ्याना जे काही शक्य होते, ते ते दिले... जातानाही दात्याच्या रूपातच जाणे पसंत केले. ज्ञानदानाचा हा यज्ञ अवयव दानापर्यंत गेला आणि त्यांच्या सर्व अवयवांचे रोपण यशस्वी झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी प्रसिद्ध झालेल्या स्मृतीग्रंथाचे नाव विज्ञानाचा वारकरी असेच ठेवले. 
     सरांच्या जाण्याने बसलेला धक्का फार मोठा होता. आपण पुस्तक पूर्ण करत आणले आहे, मात्र ते सरांनी पाहिले नाही. आता आपण ते कशाला प्रसिद्ध करायचे, असा विचार करत ते हस्तलिखित तसेच पडून होते. मी पूर्णतः एका वेगळ्या मन:स्थितीत होतो. शेवटी 'हे पुस्तक प्रसिद्ध करा आणि ते सरांनाच अर्पण करा' अशी सूचना माझ्याइतकेच सरांवर आणि मॅडमवर प्रेम करणाऱ्या आमच्या
सौ.कडून आली. मी एरवीही ते पुस्तक सरांनाच अर्पण करणार होतो. त्यामुळे सरांनी न पाहता ते प्रसिद्ध करायला मन तयार नव्हते. शेवटी पत्नी वैशालीने 'सरांना तुमचे हे वागणे आवडले असते का? सरांचे विद्यार्थी म्हणवता आणि त्यांच्या तत्त्वाविरूद्ध कसे वागता?' असा प्रतिप्रश्न केला आणि मुलीनेही तिचे म्हणणे उचलून धरले. तसेही आमचे पूर्ण कुटुंबच सरांचे विद्यार्थी झाले होते. मलाही ते पटले आणि 'एककांचे मानकरी' हे पुस्तक जून २०१५ मध्ये प्रसिद्ध झाले. माझ्या आजच्या लेखनाचे श्रेय खऱ्या अर्थाने सरांनाच जाते. त्यांच्या सूचनेप्रमाणे मी विज्ञान लेखक आणि अगदी कार्टुनिस्टही झालो. टिकलो मात्र लेखनाच्या प्रांतात. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी मराठीतून लेखन करणे कसे आवश्यक आहे, हे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा जाणवले होते. तेच कार्य पुढे नेण्याचा मी अल्पसा प्रयत्न करत आहे. 
      माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना सरांनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही मदत केली. त्यांना अनमोल मार्गदर्शन केले. ते त्याच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होत, पण निर्णयात ढवळाढवळ नसे. अडचणीतला विद्यार्थी सल्ला मागायला भेटल्यानंतर ते अडचण समजून घेत. सरांनी शिक्षणाचा खरा अर्थ खऱ्या अर्थाने आचरणात आणला. पण एवढ‌्‌यात त्यांनी जायला नको होतं. अजून त्यांची आम्हाला, जगाला गरज होती. त्यांच्या प्रत्येक कृतीतून, उक्तीतून आणखी खूप शिकायचं होतं. पण...

... सर, तुम्ही खूप लवकर एक्झिट घेतलीत!

(यातील एककांचे मानकरी या पुस्तकाचा कव्हर फोटो वगळता सर्व छायाचित्रे 'विज्ञानाचा वारकरी' या स्मृतीग्रंथातून घेतली आहेत.) 

१५ टिप्पण्या:

  1. सलाम तुमच्या ध्येयप्रेमी धायगुडे सरांना आणि तुमच्या ओघवत्या लिखाणाला.

    उत्तर द्याहटवा
  2. Sir, I humbly salute the noble hearted Prin. Dhaygude sir and also to you because you have also nobility of your mentor.

    उत्तर द्याहटवा
  3. सर आणि मॕडम दोघेही वंदनीय. ऐकून खूप होतो. आज वाचले.

    उत्तर द्याहटवा
  4. Sir tumhi khup great ahat tyach thod sreyy tumchya guruna nakkich jat Dhaygude siranpramane aloukik vyaktimtv aslele teacher utkrisht vidyarthi ghadvu shakatat ...very nice writing for your teachers ,, yahun mothii gurudakshina hone nahi

    उत्तर द्याहटवा
  5. माझ्या साठी ही पुज्य अश्या धायगुडे सर व मँडम ना शतशः प्रणाम.

    उत्तर द्याहटवा
  6. डॉ. विलास शिन्दे, खूप दिवसांनी एक चांगला लेख वाचावयास मिळाला. माझ्या दयानंद कॉलेज मधील आठवणी जाग्या झाल्या. मलाही सर आणि मॅज्य या दोघांचा विदयार्थी होता आले. खरच आपण नशिबवान आहोत कारण
    आपल्याला एवढे चांगले शिक्षक मिळाले. म्हणूनच तुमच्या माझ्या सारखी खेडयातली पोरं एम एस्सी पी .एच.डी झाली. १९्८७ ते १९९० या काळातील दयानंद महायिदयालयाच्या सर्व आठवणी आज या निमीत्ताने आल्या. कॉलेज खूपच छान होते . आणखी एखादा लेख कॉलेज व तेथील वसतिगृहावर आपण आपल्या ओघवत्या भाषेत लिहावा ही अपेक्षा.
    सरांचे वरील लेख खूपच छान आहे . अप्रतिम ..
    लेखन प्रपंच वाढवावा .
    प्राचार्य डॉ बी . टी. जाधव
    रयत शिक्षण संस्था सातारा

    उत्तर द्याहटवा
  7. सुंदर लेख. तत्त्वनिष्ठ आणि ध्येयवादी सरांप्रती व्यक्त केलेला आदरभाव वाखाणण्याजोगा आहे .
    डॉ. प्रकाश दुकळे

    उत्तर द्याहटवा
  8. विलास खूप छान मांडलयंस. सरांचे विविध पैलू कळाले यातील काही जवळून अनुभवलेत. पत्रकारितेत असताना काही लिहिलं की पहिली दाद सरांची असायची. दरवर्षी केसरीचा गणेशोत्सव सर आणि मॅडमच्या भेटीचा असायचा. दोघेही आवर्जून यायचे.छान गप्पा व्हायच्या.शास्राचा विद्यार्थी असूनही पत्रकारितेच्या क्षेत्राची निवड केल्याचे त्यांना कौतुक होते अशा अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुझ्या लेखाचे निमित्ताने याला पुन्हा उजाळा मिळाला.

    उत्तर द्याहटवा
  9. माझ्या दयानंद कॉलेज मधील आठवणी जाग्या झाल्या. मलाही सर आणि मॅज्य या दोघांचा विदयार्थी होता आले. खरच आपण नशिबवान आहोत

    उत्तर द्याहटवा
  10. सरांचे स्मृतीस विनम्र अभिवादन
    विलासराव छान मांडणी
    7588608546
    पिसे,कट्टीमनी,mamdyal, पौर्णिमा,कुलकर्णी या सर्व मित्रांची आठवण यामुळे झाली

    उत्तर द्याहटवा
  11. I was past student of Dayanand college so I have great affinity for the college. Prin.Dhaigude was very good friend of mine.In 2004 we both were appointed as NAAC Peer-Team members and we both together went to Rajkot (Gujrat) for training.His lucid language, sound knowledge and excellent style of teaching made him a teacher par excellence.He was also an administrative giant.
    Dr.Vilas Shinde has written an excellent article on his Guru wherein
    he has beautifully narrated his Guru's great qualities of head and heart
    Dr.Dhaigude touched my heart.
    My humble tribute to my friend Dr. Nagesh Dhaigude.

    उत्तर द्याहटवा