मंगळवार, २९ जून, २०२१

बहुगुणी रानमेवा : धामण

 धामण. रानात आढळणारे झाड. उंचीने कमी मात्र फळे बहुगुणी. या झाडांच्या पानामुळे १९७२ च्या दुष्काळात मराठवाड्यातील पशुधन तग धरू शकले. तर याची फळे मुलांना जितकी आवडतात, तितकीच पक्ष्यांना आवडतात. जरा कोठे फळ पिकू लागले की पक्षी बरोबर शोधून खातात. मुळे, साल, लाकूड, पाने आणि फळे सर्व काही उपयोगाचे. तर झाडाला बहर आलेला असताना मधमाशा या झाडावर मध गोळा करायला येतात की कुस्ती करायला असा प्रश्न पडावा इतकी त्या फुलांशी जवळीक साधतात. मात्र हे झाड आज दुर्लक्षित आहे. त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. अशा बहुगुणी रानमेव्याविषयी…

_________________________________________________________

एक दिवस सकाळी फिरताना विद्यापीठातील एका चौकाच्या कोपऱ्यावर मधमाशा गुणगुणताना दिसल्या. त्यांच्या आनंदाचे कारण शोधण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. जवळ जाऊन पाहिले तर काष्ठयुक्त शरीरावर पिवळ्याधमक फुलांचे उमलणे सुरू होते. त्या फुलांभोवती मधमाशांचा गुंजारव सुरू होता. बारकाईने पाहताच त्याची ओळख पटली. या झाडाभोवती अनेक आठवणी गुंतलेल्या होत्या. त्या झाडाला पाहून मनस्वी आनंद झाला. ते झाड होते धामण! 

धामण  माल्वेसी कुळातील झाड. शास्त्रीय नाव ग्रूविया टिलीफोलिया. याचे बारसे कार्ल लिनियस यांनी केले. ग्रूविया हे नामकरण इंग्लंडमधील सुप्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ नेहेमियाह ग्रू यांच्या सन्मानार्थ आणि त्याचे पाने टिलिया गटातील वनस्पतींच्या (जसे की कापूस, ताग, कोको) पानाप्रमाणे असल्याने टिलिफोलिया असे करण्यात आले. याला मराठीप्रमाणेच गुजराती आणि हिंदीमध्येही धामण म्हणून ओळखले जाते. मराठीमध्ये धामन, धामीण, धामणी, करकरणी, करवरणी या नावानेही ओळखले जाते. याच्या मोठ्या झाडाच्या फांद्या खाली लोंबकळत असतात. या फांद्या धामhण लोंबकळते, तशा दिसतात म्हणून याचे नाव धामण असे पडले, असे मानतात. हिंदीमध्ये याखेरीज झुझना, फैसा, फारसा या नावानेही ओळखले जाते. तेलगूमध्ये तड चेटू, चराची, इरथ्थडा अशा २९ नावानी हा वृक्ष ओळखला जातो. तमिळमध्ये बेलक्का, थडाची उनू, सदाची याप्रमाणे पंचवीस नावे याला मिळाली आहेत. ओडिसीमध्ये धामुरो, भंगिया म्हणतात. मल्याळममध्ये उन्नम, धानुना वृक्षम, धामण, चडची अशी एकोणीस नावानी हे झाड ओळखले जाते. कन्नडमध्ये बाल्मुरी, बताला, तडस्सू, तडसल अशी विविध प्रांतात तब्बल छत्तीस नावे आहेत. संस्कृतमध्ये फांद्या धनुष्याप्रमाणे वाकलेल्या अर्धगोलाकार असल्याने धुनर्वृक्षा, धन्वंगाह, धनुष्याची ताकत लाकडामध्ये असल्याने धन्वन, महाबला, झाडाचे लाकूड निसरडे, मऊ सालीचे असल्याने पिन्हलिका, फुलांचा रंग लाल होत असल्याने रक्तकुसुम, फळे चवीस गोड असल्याने स्वादुफल:, या फळांच्या सेवनाने वेदना कमी होत असल्याने रूजपह:, याच्या फळामुळे ज्वर कमी होत असल्याने ज्वरघ्न:, विषबाधेवर उपयुक्त असल्याने विषघ्न:, भरून न येणाऱ्या जखमावर गुणकारी असल्याने दुष्ट व्रण: अशी या वृक्षाच्या आणि त्याच्या फळाच्या गुणधर्मावरूनही या झाडाला सतरा नावे आहेत.

हे मुळचे उत्तर भारतातील झाड. वाराणशी भागात सर्वप्रथम आढळले. या झाडाच्या चविष्ट फळांना त्याच्याच पानांमध्ये गुंडाळून ठेवल्यास फळे दोन तीन दिवस चांगली राहतात. बौद्ध भिक्खू प्रवास करत असताना ही फळे आपल्यासमवेत नेत. त्यांच्यामार्फत या झाडाचा प्रसार देशाच्या इतर भागात आणि विदेशातही झाला असावा, असे मानले जाते. आज हे झाड भारत, नेपाळ, श्रीलंका, ब्रम्हदेश, दक्षिण चीन, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम आणि आफ्रिका खंडाच्या काही देशांत मोठ्या प्रमाणात आढळते. पानझडी आणि निमसदाहरित जंगलात उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधात आढळणारे हे झाड आहे. गवताळ प्रदेशात समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीपर्यंत हे झाड वाढते. ३० ते ४२ डिग्री सेल्सियस तापमान असणाऱ्या प्रदेशातही चांगले वाढते. चांगले वाढलेले झाड -५ डिग्री सेल्सियस इतके अल्प तापमान सहन करते. साडेसातशे ते ४००० मिलीमीटर पर्जन्यमान या झाडाला चालते. केतकरांच्या ज्ञानकोशात धामण वृक्षांच्या साठ प्रजातींची नोंद आहे. त्यातील छत्तीस भारतात आढळतात. या प्रजातीतील केवळ फालसा प्रजातीची (ग्रेविया ॲसियाटिका) व्यावसायिक शेती केली जाते.

या झाडाची निर्मिती बियापासून होते. याच्या बिया मातीत पडल्या आणि पाणी मिळाले की रूजतात. त्यापासून रोप तयार होते. रोपावर एकाआड एक पाने येतात. रोप लहान असतानाच त्याला फांद्या येऊ लागतात. झाड चार पाच फुटाचे उंच होताच, ते फळ द्यायला सुरुवात होते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात याची सर्व पाने गळून जातात. एप्रिलच्या अखेरीस त्याला नव्याने पाने फुटू लागतात. कोवळ्या फांद्या आणि पानांवर लव म्हणजेच बारीक केसासारख्या रचना असतात. त्यामुळे त्यांचा रंग पांढरट दिसतो. पाने साधी असतात. पानांचा आकार हृदयाकृती असतो. त्यांची लांबी सात ते अठरा सेंटिमीटरपर्यंत आढळते. पानांचा वरचा भाग गुळगुळीत असतो, तर खालचा भाग केसाळ. पानांच्या मधोमध एक शीर असते. त्यापासून एकाआड एक सहा उपशीरा दोन्ही बाजूला फुटतात. त्यांच्यापासूनही पुन्हा बारीक केसाळ शाखा फुटतात. त्या एकमेकाला मिळतात. त्यांचा रंग पिवळसर पोपटी असतो. या शीरा आणि उपशिरांची सुंदर नक्षी पानावर तयार होते. पानाच्या कडेला पांढरी सुंदर कडा तयार झालेली असते. ती पानांच्या सौंदर्यात मोठी भर घालतात. पानाच्या कडेला बारीक कात्र्यांची नक्षी असते. ही नक्षी पांढऱ्या रंगामुळे आणखी उठून दिसते. पाने दुसऱ्या बाजूला टोकदार असतात. हळूहळू केसाळ रचनांचा प्रभाव कमी होत जातो. पाने हिरव्या रंगाची दिसू लागतात. खोड पांढरे होते. धामणीची पाने शेळ्या, मेंढ्या, गाई आणि म्हशींचे आवडते खाद्य आहे. पानांमध्ये एक टक्का टॅनिन असते. या वृक्षांच्या पानाचा किंवा सालीचा रस कपड्याला लागल्यास लाल डाग पडतात आणि हे ‘डाग अच्छे’ नसतात कारण ते साबणाने धुवूनही जात नाहीत. झाडांची पाने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करतात. पाने पसरट असल्याने ती जमिनीची धूप थांबवतात. बांधावर असणारी झाडे वाऱ्यापासून पिकांचे संरक्षण करतात.

त्याचवेळी पानांच्या देठाच्या बेचक्यातून दोन ते चार कळ्या पांढरट रंगात यायला सुरूवात होते. या कळ्या सुरुवातीला गोल असतात. त्या वाढतात, तशा फुगीर होत जातात. कळ्या चार ते पाच मिलीमीटर लांबीच्या होताच उमलू लागतात. त्यातून पाच थरांचे फुल तयार होते. सर्वप्रथम बाहेरच्या आधाराच्या पुष्पपटलांचा थर असतो. त्याच्या बाह्य बाजूस केसाळ रचना असतात. त्यावर पिवळ्या पाच मध्यम आकाराच्या पाकळ्या असतात. त्यावर पाच छोट्या पाकळ्या येतात. या अत्यंत अस्पष्ट दिसणाऱ्या पाकळ्यांच्या केंद्रस्थानी पुंकेसरांचा पिवळा गठ्ठा असतो. त्याच्या टोकाशी परागकण असतात. पुंकेसराच्या केंद्रस्थानी फिकट हिरवट पिवळ्या रंगाचे पुंकेसरापेक्षा जाड स्त्रीकेसर असते. फुलाच्या तळाशी बिजांडकोष असतो. संपूर्ण फुल पिवळेधम्मक असते. फुलांची लांबी दोन सेंटिमीटर असते. तर फुलांचा व्यास दीड ते दोन सेंटिमीटर असतो. पानांच्या बेचक्यामध्ये फुललेल्या फुलांमुळे हळद सांडल्यासारखे दिसू लागते. मात्र या फुलातील पुंकेसरांचा पुंजका दोन-तीन दिवसांत प्रथम लाल-केशरी रंगाचा दिसू लागतो. कीटक विशेषत: मधमाशा या फुलाजवळ मध गोळा करण्यासाठी येतात की अंग मोकळे व्हावे म्हणून कुस्ती खेळायला, असा प्रश्न पडतो. मधमाशांचे इतर फुलांबरोबर असणारे नाजूक, मर्यादाशील वर्तन धामनीच्या फुलाजवळ दिसत नाही. या फुलांवर मधमाशांचे जरा जास्त प्रेम दिसून येते. (मधमाशांचा धामण वृक्षाच्या फुलाबरॊबरचा विडिओ https://youtu.be/WgGmNzDY0zI या लिंकवर उपलब्ध आहे.) मधमाशांची ही मस्ती सुरू असताना पिवळे परागकण पानांवर पडतात. मधमाशांच्या या वर्तनाचे कारण जो मकरंद या फुलांमध्ये असतो, तो परागकणाच्या खाली लपलेला असतो. तो मिळवण्यासाठी त्यांची धडपड असते. स्वत:ला मध मिळावा म्हणून त्या एकमेकींशी भांडतातही. या त्यांच्या मस्तीमध्ये पानांवर पडलेले काही परागकण हळद सांडल्यासारखे दिसतात. या फुलांवर इतर कीटकही असतात. मात्र खरे अस्तित्व दिसते आणि जाणवते ते मधमाशांचे. एखादा भुंगाही हजेरी लावतो. मुंग्यांचा वावरही या झाडावर असतो. 

किटकांच्या फुलांवरील मध गोळा करण्यासाठी चाललेल्या धडपडीमधून फुलांचे परागीभवन होते. फुलाच्या पाकळ्यांचा रंगही तीनचार दिवसांत केशरी बनतो. प्रथम पाकळ्या गळतात. पाठोपाठ पुंकेसर गळतात आणि त्या ठिकाणी एक गोल फळ दिसू लागते. सुरुवातीला हे गोल फळ देठापेक्षाही लहान असते. फळांबरोबर देठही वाढत जाते. क्वचित दोन गोलाकार फळे एकमेकाला चिकटून डंबेलसारखी रचना तयार करतात. मात्र अशा जुळ्यांची संख्या अगदी कमी असते. एकाच देठाला तीन बी असलेले फळही पहावयास मिळाले, पण अख्ख्या झाडावर एकच! फळे मजबूत देठाला चिकटलेली असतात. ती शक्यतो गळत नाहीत. त्यांचा रंग पोपटी हिरवा असतो. ती वाढतात आणि वाटाण्याच्या आकाराची होतात. पिकण्यापूर्वी फळे आंबट-तुरट असतात. मात्र कच्ची फळे खाण्यासाठी पक्षी येत नाहीत. फळे मोठी होताच पिकू लागतात. सुरूवातीला त्यांचा रंग पिवळसर होतो. त्यानंतर तो लालसर तपकिरी होतो. त्यावर गडद ठिपके दिसू लागतात.  फळाचा रंग आणखी गडद होत चॉकलेटी किंवा जांभळा होतो. हे आंबटगोड फळ खाण्यासाठी योग्य मानले जाते. बी आणि साल यांच्यामध्ये असणारा गर खाल्ला जातो. आतमध्ये फळ खाल्ल्यानंतर हिरवट आवरण असलेले बी सापडते. वाळल्यानंतर बियांचा रंग तपकिरी होतो. बियांवरील आवरण कठीण असते. धामणीची फळे पक्ष्यांना फार आवडतात. पिकलेली फळे वेचून खायला पक्षी गर्दी करतात. पोपट, बुलबुल, चिमणी, होला, साळुंखी असे अनेक पक्षी झाडाकडे चक्कर मारायला सुरूवात करतात. खंड्याही या झाडावर विसावताना खाण्यायोग्य्‍ा फळांवर नजर ठेवून असतो. खालच्या फांद्यावर असणारी फळे खायला मोरही येतो. खारूताईलाही पिकलेली फळे फार आवडतात. गाय, म्हैस, बकऱ्या हरीण, अस्वल हे प्राणीही झाडांची फळे आवडीने खातात. ही पिकलेली फळे लहान मुलांचा आवडता रानमेवा असतो. ही फळे तोडून काही ग्रामीण भागातील महिला, पुरूष बाजारात विकायला नेतात. या रानफळांच्या विक्रीतून मिळणारे पैसे हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असते. मात्र आज झाडांचे प्रमाण कमी झाले असल्याने या फळांची उपलब्धता कमी झाली आहे.  

फळांना मधूर सुवास असतो. या फळांची साल जाड असते. फळ अर्धा ते सव्वा सेंटिमीटर आकाराचे असते. आतमध्ये गर कमी असतो. बी मोठे असते. पांढरे, गोलाकार एकच बी असणारे हे फळ आहे. जोडफळांमध्ये मात्र दोन बी असतात. क्वचितच तीन बियांचे फळ आढळते. ॲन्थोसायनीन, फिनॉल, फ्लॅव्होनाईडस् आणि जीवनसत्व ‘क’ या फळाच्या गरामध्ये असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट घटकही असतात. या फळांचे सेवन आरोग्यासाठी लाभकारक ठरते. या झाडांच्या कळ्याही काही आयुर्वेदिक औषधामध्ये वापरण्यात येतात. चरकसंहिता, भावमिश्रा, सुश्रुतसंहिता इत्यादी ग्रंथांमध्ये या वृक्षांच्या औषधी गुणधर्मांचे वर्णन करण्यात आले आहे. निघंटू या औषधकोषातही याच्या औषधी गुणधर्मांची माहिती देण्यात आली आहे. फळांप्रमाणे साल आणि लाकूडही काही औषधांमध्ये वापरले जाते. मूळव्याधीच्या त्रासावर सालीपासून बनवलेला काढा वापरला जातो. अतिसारावर सालीचे सेवन केले जाते किंवा सालीपासून बनवलेले चूर्ण देण्यात येते. स्नायूंच्या वेदना, कमी तीव्रतेची विषबाधा, खोकला इत्यादींवरील औषधे या झाडाच्या सालीपासून किंवा पानापासून बनवली जातात. कवचकुली, खाजखुजलीला स्पर्श झाल्यास या झाडाची साल त्या जागेवर चोळतात. अल्सर, श्वसनाचे आजार यावरही धामण फळांचे सेवन उपयुक्त ठरते. 

या झाडाचा उपयोग केवळ फळापुरता नाही. या झाडाचे खोड जसे दिवस जातील, तसे वाढत जाते. मध्ये असणारी फांदी उंच वाढत जाते. झाडाची उंची तीस ते अगदी पन्नास फुटापर्यंत वाढते. खोडाचा व्यास दोन फुटापर्यंत वाढतो. त्याच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर फांद्या फुटतात. या बाजूने फुटणाऱ्या फांद्या काही दिवसानंतर वाळतात आणि गळून जातात. वरच्या भागात नव्या फांद्या फुटत जातात. साल बाहेरील बाजूस पांढरी असते. मात्र पूर्ण वाढलेल्या झाडाची साल काळसर, करडी बनते. धामण वृक्षाची साल झाड जून झाल्यावर थोडी खडबडीत बनते. साल मध्यभागात लालसर असते. सालीची आंतरसाल मात्र पांढरी आणि चिवट असते. या आंतरसालीपासून दोरखंड बनवले जातात. धामण वृक्षाचे लाकूड गुळगुळीत असते. लाकडाचा रंग फिकट पिवळा असतो. या लाकडाला पॉलिश चांगले होते. लाकूड कठीण व टिकाऊ असते. लाकडाचा उपयोग अवजारे, दारे, खिडक्यांच्या चौकटी, दांडे, बैलगाड्या, होड्या बनवण्यासाठी करण्यात येतो. लाकूड जळणासाठी आणि कोळसा बनवण्यासाठीही वापरले जाते. याच्या लाकडांपासून पूर्वी तेलासाठीची छोटी भांडी बनवली जात. आज अशा भांड्यांची जागा स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे. ओकच्या लाकडाला धामणीचे लाकूड पर्याय मानले जाते. कोईमतूर येथे संशोधन करणाऱ्या किर्ती कापडी यांनी धामण वृक्षांच्या लाकडापासून प्लायवूड बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

मूळ, साल, आंतरसाल, लाकूड आणि सर्वात महत्त्वाचे फळ, सारे काही उपयुक्त. मानवी आयुष्यात महत्त्वाचे. जमिनीचा पोत सुधारणे, धुप थांबवणे, पिकांचे संरक्षण आणि जनावरांचे खाद्य पुरवणारे हे झाड आज मात्र दुर्लक्षित आहे. जांभळासारख्या मूळ जंगलातील झाडाला आज शहरात स्थान मिळाले आहे. मात्र धामण आजही केवळ जंगलात आढळते. या झाडाची लाकडासाठी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. त्यामुळे पूर्ण वाढलेल्या झाडाचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. याची खास रोपे तयार करून लावण्याची गरज आहे.

असे असले तरी या झाडावर कोणी काव्य रचल्याचे आढळून येत नाही. मात्र या झाडावरून अनेक गावांना धामणगाव असे नाव येते. काही गावांचे नाव धामणी असेही आहे. त्यावरून धामणगावकर, धामणकर, धामणीकर, धामणी अशी आडनावे धारण केलेली कुटुंबेही आहेत. एका नदीलाही धामणी असे नाव मिळाले आहे. पालघर जिल्ह्यात धामणी धरण आहे. धामण या सापाच्या प्रजातीप्रमाणे असून या झाडाच्या फांद्या लोंबकळताना दिसतात म्हणून त्याचे नाव धामण असे आले असल्याचा संदर्भ राणी बंग यांच्या ‘गोईण’ पुस्तकात आढळतो.

या झाडाबद्दल मला विशेष आकर्षण आहे, प्रेम आहे. धामण वृक्षांची फळे लहानपणीच नव्हे, तर मोठेपणीही अनेकदा खाल्ली आहेत. आंबट गोड चवीची ही फळे पिकू लागली की आम्ही शोधून खायचो. अगदी जूनपासून ते डिसेंबर-जानेवारीपर्यंत ही फळे मिळतात. चांगली पिकलेली फळे खायला खूप आवडायचे. मात्र कामाच्या व्यापात गावी जाणे कमी झाले. फळे मात्र आठवत. हे झाड आणखी एका कारणासाठी आठवते. ही आठवण, निव्वळ फुलांची, फळांची किंवा आम्ही केलेल्या उपद्व्यापाची नाही, तर त्याने संकटकाळात केलेल्या मदतीची आहे. १९७२ चा भीषण दुष्काळ. माणसाला पिण्यासाठी पुरेसे पाणी होते. मात्र माणसासह जनावरांच्या पोटाला पुरेसे अन्न नव्हते. हुशार माणसाने भूक भागवण्यासाठी परदेशातून अन्न मागवले. मात्र जनावरांच्या पोटासाठी अन्न येथेच शोधावे लागले. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो. शनिवारची  अर्धी सुट्टी आणि रविवारची सुट्टी या काळात बालाघाटच्या जंगलात जावे लागत असे. त्या काळात बालाघाटच्या डोगरात धामणीची भरपूर झाडे होती. जंगलात असणाऱ्या धामण वृक्षांची पाने ओरबडून पोत्यात भरली जात. या कामामध्ये लहान मुले फार महत्त्वाची असत. धामण वृक्षांच्या बारीक फांद्यावर लहान मुलांना चढवले जात असे. त्यांनी पाने ओरबडून पिशवीत भरली जात आणि त्या खाली सोडल्या जात. वडिलधारी मंडळी त्या रिकाम्या करून पुन्हा पिशव्या वर पाठवत. दोन चार झाडे मिळाली तरी पोते भरत असे. असा गोळा केलेला पाला घरी आणून कोठ्यामध्ये पसरवून ठेवला जात असे. पोत्यातून पाला काढताना त्यातील उब जाणवत असे. तो पोत्यातच ठेवला तर सडून जात असे. आठवडाभर तो पाला जनावरांना पुरवून खाऊ घातला जाई. विशेष म्हणजे जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय आणि गरीब शेतकरी आपल्या पशुधनासाठी हे कष्ट घेत असे. त्यामुळे १९७२ च्या दुष्काळात माणसाला इलोमिलो आणि सुखडीने तर जनावरांना धामणीच्या पाल्याने जगवले. विशेषत: मराठवाडा भागातील जनावरांसाठी धामण वरदान ठरले. असे हे झाड आपण आवर्जून लावायला आणि जगवायला पाहिजे कारण हे बहुगुणी झाड जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.   

-०-

शुक्रवार, ११ जून, २०२१

जांभूळ आख्यान

 

फळांचा राजा असेल आंबापण झाडांचा राजा जांभूळच. या वृक्षावरून भारतीय उपखंडास जम्बूद्विप म्हणून ओळखले जात असे. झाडांची फळे धुमेहींसाठी खास गुणकारी मानली जातात. इतर आजार उदभवू नयेत म्हणूनही जांभूळ खाणे महत्त्वाचे. त्याची फळे मधूर, फुले अतिसुंदर. त्याचे लाकूड मौल्यवान आणि अनेक गुणांनी युक्त. जांभूळ खाल्ल्यानंतर त्याचा जिव्हेला लागलेला रंग खूप काळ राहतो. याच वैशिष्ट्याचा वापर करून रचलेले जांभूळ आख्यान. अशा जांभूळ वृक्षाविषयीचे हेजांभूळ आख्यान…’...

________________________________________________________

ll ll

एप्रिल महिन्याचा दुसरा शुक्रवार. साडेसहाची वेळ. पुढचे दोन दिवस सुट्टी. कार्यालयातून बाहेर पडताना, ‘गाडीमध्ये बॅग ठेवून थोडा चालण्याचा व्यायाम करू या. आज थोडे लवकर घरी जाऊ या, असे विचार सुरू होते. गाडीजवळ पोहोचलो. त्याचवेळी गाडीवर टप्पअसा आवाज झाला. काय पडले म्हणून पाहिले, तर एक जांभूळ गाडीच्या टपावर विसावलेले. लहानपण आठवले. काहीही विचार न करता मी पटकन जांभूळ उचलले. स्वच्छतेचे नियम, कोरोना काळ काही मनात येण्याअगोदर फुटलेला भाग सोडून ते अधाशासारखे खाऊनही टाकले. नंतर जिव्हेचा रंग निळा झाला की नाही, ते एकदा जीभ बाहेर काढून पाहिलेही. लहानपणची सवय, दुसरे काय? आणि मग फिरताना डोक्यात जांभूळ घुमू लागले. काही केल्या जाईना. दुसऱ्या दिवशी सकाळच्या उन्हात त्या झाडाकडे बारकाईने पाहिले आणि जांभळाचा मौसम सुरू झाल्याची खात्री पटली.

जांभूळ... रंगावरून नाव मिळालेले फळाचे झाड. याला वृक्षराजम्हणायला हवे. फळांचा राजा असेल आंबा; पण, झाडांचा राजा जांभूळच. मराठीत जांभूळ आणि अनेक वचनात जांभळं असे नाव मिळालेला प्राचीन काळापासून माहीत असणारा वृक्षराज! याला बंगालीमध्ये कालाजाम, बजाम, गुजरातीमध्ये जम्बू, रायजंबो, जामून, उर्दूमध्ये जामून, हिंदीत जामून, राजजामून, बडी जामून, कन्नडमध्ये नेराले बीजा, जम्बू नेराले, मल्याळममध्ये जावल, ओडिसीमध्ये जाम कोल, जामू कोल, पंजाबीमध्ये जामून, तमिलमध्ये नवल, तेलगूमध्ये अलला नेरेडुचेट्टु, नेरेडू चेट्टू म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये याला जंबू, राजजंबू, महास्कंध, नीलफलं, सुरभापत्र, आणि फलेंद्र म्हणतात. देवांचा राजा इंद्र तसा फळांचा राजा जांभूळ. इंग्रजीमध्ये त्याला जावा प्लम, ब्लॅक प्लम, इंडियन ब्लॅक प्लम, जांबोलान प्लम, जांभूळ, जंबू ही नावे देण्यात आली आहेत. चीनीमध्ये वू मोम्हणतात. याचे शास्त्रीय नाव सिजिजियम क्युमिनीआहे. जांभूळ ही मिरटॅशिए कुलातील झाड आहे.

जांभूळ, मूलत: दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढळणारे झाड. या झाडाच्या आजच्या आशिया खंडात असणाऱ्या वास्तव्यामुळे प्राचीन ग्रंथामध्ये भारतीय उपखंडास जंबूद्विप म्हणत. भारताखेरीज जांभूळ वृक्ष, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया खंडाच्या काही भागात आढळते. अमेरिकेत हे झाड १९११ मध्ये गेले. सध्या आफ्रिकेतही जांभूळ वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हा वृक्ष समुद्र किनारी जोमाने वाढतो. अगदी ६००० फूट उंच पर्वतरांगातही जांभूळ आढळते. मात्र, त्याची उंची फार वाढत नाही. पाण्याचा चांगला निचरा होणारी कोणतीही जमीन या झाडाला चालते. काळ्या निचरा होणाऱ्या जमिनीत याची चांगली वाढ होते. अडिचशे ते २००० मिलिमीटर पाऊस झेलण्याचे आणि वेगवान वाऱ्यातही टिकून राहण्याचे कसब याच्या असते. जांभूळ वृक्षाला उष्ण आणि समशितोष्ण वातावरण चांगलेच मानवते. समुद्र सपाटीपासून १५० मीटर उंचीपर्यंत हे झाड चांगले वाढताना आढळते. जांभूळ सर्व प्रकारच्या जमिनीत वाढते. हा एक काटक वृक्ष आहे. पाणी कमी मिळाले तरी, झाड टिकून राहते. पाण्याचा निचरा होणारी, सुपीक, काळी किंवा गायरानाची हलकी पडीक जमीन जांभूळ झाडासाठी खूप चांगली असते. जांभूळ हा सदाहरित, सपुष्प आणि दीर्घायुषी वृक्ष आहे.

जांभूळ वृक्षाची निर्मिती बियांपासून होते. बिया दंडगोलाकार, मध्ये थोड्याशा दबलेल्या असतात. बियांवर पांढरे हलके आवरण असते. या आवरणाला फळाच्या रसाचा रंग लागल्याने ते आवरण जांभळे बनते. आतमध्ये द्विदल बी असते. कडक वाळण्यापूर्वी आतला भाग हिरवा असतो. वाळल्यानंतर आतल्या भागाचा रंगही पांढरट होत जातो. या बिया चांगली माती आणि पाणी मिळताच आठवडाभरात रूजतात. उगवताना रोप चॉकलेटी रंगासह खोडाला चिकटलेली पाने घेऊन येतात. पाने समोरासमोर येतात. ही पाने खोडापासून वेगळी होतात. रोप वाढत जाते. उंच होत जाते. सुरूवातीला रोपाची वाढ वेगाने होते. तीनचार महिन्यांत रोप चांगले वाढून लावण्यायोग्य होते. रोपांची वाढ होताना त्याचा रंग सुरुवातीला पोपटी आणि नंतर गडद हिरवा होत जातो. पुढे हळूहळू खोडावर पांढरा रंग यायला सुरूवात होते. रोप साधारण सहा सात फूट उंच असताना त्याला फांद्या फुटतात. फांद्या येतानाही चॉकलेटी-तपकिरी रंगांच्या येतात. त्यांचाही रंग बदलत प्रथम हिरवा आणि नंतर पांढरा होत जातो. फांद्या सुरुवातीला सरळ असतात मात्र पुढे जशा वाढत जातात, तशी त्यांची टोके खाली झुकत जातात. फांद्या अशा झुकत असल्या तरी झाड उंच वाढत जाते. पानांनी भारलेल्या खाली झुकलेल्या फांद्यांसह जांभूळ वृक्षास पाहिले की पायापर्यंत रूळणारे केस सोडून कोणी सुकेशिनी उभी आहे, से वाटते. झाडांची उंची अगदी शे-दीडशे फुटापर्यंत वाढत जाते. हल्ली असे जुने वृक्ष क्वचितच आढळतात. निसर्गात साधारणपणे पन्नास-साठ फुट उंचीची झाडे आढळतात. मोठ्या झाडांचा बुंधा एक मीटरपर्यंत व्यासाचा असतो. झाडाच्या फांद्यांचा विस्तार पन्नास फुटापर्यंत वाढत जातो.

जांभूळ झाडाची साल बाहेरून पांढरी, राखाडी रंगाची असते. जी झाडे मुरमाड जमिनीवर असतात, त्यांची साल मात्र काळसर करडी बनते. सालीचे आवरण तुटत जाते आणि कात पडावी तशी गळते. सालीवर बोर, बाभूळ किंवा चिंचेच्या खोडांप्रमाणे खडबडीतपणा नसतो, ती मऊ आणि गुळगुळीत असते. झाडाच्या टोकाच्या फांदीपर्यंत ती तशीच असते. सालीचा आतील भाग गडद लाल असतो. खोडाचा पांढरा रंग जेथे संपतो, तेथे असणाऱ्या हिरव्या फांद्यावर पाने असतात. पाने असणारा भाग अनेकदा लाल-तपकिरी रंगाचा असतो.

झाडाची पाने चकाकतात. पाने वरच्या बाजूला गडद हिरवी आणि खालच्या बाजूला पांढरट पोपटी असतात. त्यांची जाडीही इतर पानांच्या तुलनेत थोडी जास्त असते. पाने सहा ते अगदी पंचवीस सेंटिमीटर लांब असतात. त्यांची रुंदी अडिच ते दहा सेंटिमीटरपर्यंत असते. टोकाला ती निमुळती होत जातात. शेंड्यांच्या पानांना टर्पेंटाईनसारखा वास असतो. पानाला पिवळसर पोपटी देठ असते. देठांच्या रंगाची शीर थेट पानाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. या मुख्य शीरेपासून अनेक उपशीरा फुटतात आणि त्या पानाच्या कडेला काही मिलिमीटर आत एकमेकांना जोडल्या जातात. कडेजवळून असणाऱ्या या शीरेस अंतर्धारी असे म्हणतात. पानाच्या उपशीरांना मध्येच आणखी छोट्या शीरा फुटतात आणि त्या दुसऱ्या उपशीरेपर्यंत जातात. पानावर शीरा आणि उपशीरांचे जाळे अगदी स्पष्ट दिसते. ही रचना पाहताना शालेय जीवनात पाहिलेल्या कांद्यांच्या पेशींची आठवण होते. पानांची कडा ही पिवळी असते. त्यामुळे पानांचे सौंदर्य खुलून दिसते. जांभूळ सदाहरित वृक्ष असल्याने जुन होतील, तशी पाने प्रथम पिवळी पडतात आणि नंतर गळतात. सर्व पाने एकाचवेळी गळत नाहीत. त्यामुळे या झाडाची कायम सावली मिळते. जांभळाची पाने खाण्यासाठी अनेक प्रकारच्या अळ्या टपून बसलेल्या असतात. रेशमाचे कीडेही या झाडावर चांगले वाढतात.     

झाड सात आठ वर्षांं पंधरा-सोळा फुट उंचीचे होते. तोपर्यंत झाडाचा विस्तार चांगलाच झालेला असतो. अशा झाडाला जानेवारीच्या अखेरीस कळ्या येतात. फांद्यांच्या टोकाला पानांच्या बेचक्यातून कळ्या येतात. कळ्या गुच्छाने येतात. कळ्या बारीक मुगाच्या आकाराच्या आणि पोपटी रंगाच्या असतात. त्या वाढत जातात आणि आठदहा दिवसात त्यांचे फुलात रूपांतर होते. मात्र बाहेरून पाहिल्यावर या झाडांचे फुलणे लक्षात येत नाही. फुलांचे सौंदर्य पानाआड जणू लाजून लपलेले असते. ही फुले मोठ्या प्रमाणात असूनही पानाआड असल्याने दिसत नाहीत. त्यांचा मंद गंध या झाडाच्या फुलण्याची वार्ता देतो. ज्यांची घ्राणेंदिये तीक्ष्ण नसतील, त्यांना मधमाशांच्या गुणगुणण्यातून हे लक्षात येते. झाडाच्या बुंध्यात उभा राहून वर कोवळ्या फांद्याकडे नजर टाकली की ही फुले दर्शन देतात. फुले अतिशय सुंदर आणि देखणी असतात. ती झाडावर फुलली की खालून केवळ पांढरा रंग दिसतो. फुले लहान आणि गुच्छामध्ये असतात. एका गुच्छाची लांबी अगदी वीस ते पंचवीस सेंटिमीटर असते. मात्र या राजवृक्षाच्या फुलांचे सौंदर्य जवळून पाहिल्याखेरीज लक्षात येत नाही.

फुलांचा रंग हा पांढरा किंवा हिरवट पिवळा असतो. फुलांना मंद गंध असतो. खरे तर, हा गंधच पानाआड लपलेल्या फुलांच्या फुलण्याची बातमी कीटकांपर्यंत पोहचवतो. इवल्याशा कळ्यातून फुलणाऱ्या फुलांच्या कडेला असंख्य केसरदलेपुंकेसर असतात. त्यांच्या टोकाला पिवळे गोंडे असतात. त्याच्या आतमध्ये रंगवल्यासारखा पिवळा भाग असतो. त्या गोलाकार पिवळ्या रंगाच्या केंद्रस्थानी आवरणाखाली अंडाशय असते. त्यापासून एक पुंकेसराच्याच रंगाची कुक्षी बाहेर पडते. तिला एक लहान छिद्र असते. पुंकेसराआड अस्पष्ट चार पाकळ्या असतात. फुलांचे फुलणे सुरू झाले की मधमाशांची शाळाच या झाडावर भरते. काही झाडांवर मधमाशांची पोळीही बसतात. महाबळेश्वरमध्ये जांभूळ मधविक्रीसाठी असतो. प्रामुख्याने मध गोळा करण्यासाठी येणाऱ्या मधमाशा आणि काही प्रमाणात इतर किटकांच्या माध्यमातून परागीभवन होते. हा वृक्ष उंच असूनही, फुलांवर फुलपाखरे आढळतात. त्यांच्या पायाला आणि पंखांना लागून आलेले परागकण कुक्षीच्या छिद्रामध्ये पडतात. यातील परागकणामुळे अंडाशयात फलन होते.

परागीभवन झाले की प्रथम कडेचे पुंकेसर गळू लागतात. कुक्षीही गळून जाते. अंडाशयात बीज वाढत असताना फुलाचे इतर सर्व भाग गळत जातात. बाहेरून फुलांचाच भाग बनलेली हिरवी दले बीजाभोवती आवरण तयार करतात. हिरवे फळ तयार होते. जांभळाचे फळ तयार होताना, बाहेरचा हिरवा भाग वाढत बीजाला पोटात सामावून घेतो. असे फार कमी फळाच्या बाबतीत आढळते. त्यामुळे जांभळाला दोन्ही बाजूने देठ असते की काय? असा प्रश्न पडतो. याच निरीक्षणावर महाभारतात जोडल्या गेलेल्या कथेवर उत्पातांचे जांभुळाख्यान बेतले आहे. फळ सुरुवातीला कोनासारखे असते. मात्र आतील बीज जसे आकार धारण करत जाते, तसा फळांचा आकारही बदलत जातो. फळ लंबगोलाकार किंवा गोल असते. जांभूळ वृक्षाच्या बहुतांश फुलांचे फळात रूपांतर होते. फळांचा देठ घट्ट असतो. मध्यमगतीच्या किंवा तीव्र वाऱ्याने फळे पडत नाहीत. पानाआड लपलेल्या फळांना थेट वाऱ्याचा सामना करावा लागत नाही. एखाद्या मातेने उन-वारा-पावसापासून वाचवण्यासाठी आपल्या बाळाला पदराआड घ्यावे, तशी ही फळे पानांच्या कुशीत सुरक्षित असतात. त्यांची सहज गळ होत नाही. मात्र माकडांना फळांचा वास लागताच ती झाडांवर हल्ला करतात. जांभूळ फळे खूपच टोकाला असल्याने त्यांच्याही हाती सर्व फळे लागत नाहीत. मुळात या मर्कटराजांच्या हातून खाण्यापेक्षा नासाडीच जास्त होते. तरीही, फळे टोकाला असल्याने, त्यांच्या हाताला फार थोडी फळे लागतात.

सुरुवातीला फळांचा रंग पोपटी असतो. ते पूर्ण वाढले की मग त्याचा रंग लालसर व्हायला सुरुवात होते. तोपर्यंत आतले बी पुरेसे वाढलेले असते. हिरव्या सालीतला गर पांढरट हिरवा असतो. फळे तुकतुकीत कांतीची असतात. फळ पूर्ण वाढले की त्यांचे वजन वाढते आणि शेंड्याला, अगदी वरच्या टोकाला असणाऱ्या फांद्या फळांच्या ओझ्याने आणखी वाकतात. सूक्ष्मपणे पाहिल्यास त्यावर काही ठिकाणी शीरा दिसतात. फळे दुसऱ्या टोकापासून पिकायला सुरुवात करतात. सुरुवातीला शेंड्याचा भाग लालसर होतो. तो रंग पसरत देठाकडे जातो. काही दिवस अशा रंगात ही फळे दिसतात. नंतर तो रंग गडद होत, शेवटी गडद जांभळा होतो. पक्व फळांच्या रंगावरूनच याचे नाव जांभूळ असे पडले आहे. झाडाचीच नव्हे तर एका घोसातील सर्व फळेही एकाचवेळी पिकत नाहीत. जांभूळ पूर्ण पिकले की देठापासून गळते आणि खाली पडते. त्याची साल पातळ असते. साल इतर फळांसारखी टणक आणि भक्कम नसल्याने फळ फुटते. साल बाहेरून पूर्ण गडद काळसर जांभळी असते. दुरून झाडावर भुंगे एकत्र जाऊन बसले की काय असे वाटते. मात्र सालीच्या आवरणापासून बीपर्यंत वसलेला गर हा गुलाबी लाल किंवा राणी रंगाचा असतो. फळे पिकायला लागली की झाडाखाली त्यांचा सडा पडतो. एका मोठ्या झाडाला सत्तर ते ऐंशी किलो फळे लागतात. त्यांची चव आंबटगोड आणि किंचित तुरट असते. चांगल्या पिकलेल्या फळांची चव मात्र पूर्ण गोड लागते.

उन्हाळ्याच्या शेवटी फळे पिकू लागली की या झाडावर पक्ष्यांची मोठी झुंबड उडते. धनेश, तांबट, बुलबुल, पोपट इत्यादी पक्षी फळांचा अस्वाद घेतात. माकडासोबत वटवाघळेही या फळावर तुटून पडतात. जंगलातील कोल्हे, उद, मसण्या, अस्वल इत्यादी प्राणी जांभळे आवडीने खातात. पाळीव प्राण्यातील घोडा या झाडांच्या फळाची चाहूल लागताच झाडाखाली अवश्य चक्कर टाकतो. देशी वाणांचे फळांच्या आकारावरून तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. भरपूर गर असणारी फळे राजजम्बू किंवा राही जांभूळ किंवा राई जांभूळ म्हणून ओळखली जातात. कमी गर असणारी आणि राजजम्बू फळांच्या आकारापेक्षा लहान जांभूळ फळांना काष्ठ जांभूळम्हणून ओळखतात. तर आकाराने खूप लहान आणि चवीला एकदम गोड असणाऱ्या जांभूळ फळांना लेंडी जांभूळम्हणतात. राजजम्बू प्रकारची झाडे पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळतात. काष्ठ जांभूळ हा प्रामुख्याने मराठवाड्यात आढळणारा प्रकार आहे. तर लेंढी जांभूळ जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते. पानावरूनही हे झाडांचे प्रकार ओळखण्याचे कौशल्य अनेक शेतकरी आणि निसर्गप्रेमींनी अवगत केले आहे. लेंढी जांभूळ वृक्षांची पाने कमी हिरव्या रंगाची आणि कमी रूंदीची, लांबीला जास्त असतात. त्यापेक्षा काष्ठ जांभूळची पाने थोडी जास्त रूंद असतात. तर राजजम्बू झाडांच्या पानांची लांबी आणि रूंदी दोन्ही जास्त असते. लेंढी जांभूळचे बी आकाराने खूप लहान असते. फळांचाच आकार लहान असल्याने गरही कमी असतो. मात्र काष्ठ जांभूळ हा प्रकार नकोसा वाटणारा. गर कमी आणि बी मोठे, असा हा मामला. या फळांना जांभळाची चव लागते. आणखी खावीशी वाटतात. मात्र गर कमी असल्याने तल्लफ पूर्ण होत नाही.

कृषी शास्त्रात लागवडीसाठी राई आणि संकरित थाई, बारडोली आणि बियाण्या हे चार वाण वापरले जातात. या झाडांची कलमे तयार करून लावतात. भारतात जांभळाची शेती फार कमी प्रमाणात होते. इंडोनेशियासारख्या देशात जांभळाची शेती करण्यात येते. भारतात जांभळाची शेती करणाऱ्या, शेतकऱ्यांना एकरी तीन ते दहा लाख रूपयापर्यंत फळांच्या उत्पादनातून मिळतात. सर्व खर्च वजा जाता तीन ते चार लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळतो. फळांवर रोग पडत नाहीत. मात्र फळांना बाजारात सुरक्षित पाठवण्याचे काम खूपच काळजीपूर्वक करावे लागते. तसेच फळे जास्त काळ टिकत नाहीत. ती वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचवणे आवश्यक असते. जांभूळ फळांचे औषधी महत्त्व लक्षात घेता भविष्यात जांभूळ वृक्षांची शेती खूप फायदेशीर ठरणार आहे.

जांभूळ मधुमेहावरील औषध म्हणून सर्वपरिचित झाले आहे. जांभूळ फळांचा रस आणि बीच्या भुकटीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. जांभळांच्या सुक्या बियात रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्त्व आहे, असे मानतात. जांभूळ बी गळवांच्या त्रासावर उगाळून लावतात. जांभूळ रक्त शुद्ध करते. मुखशुद्धीसाठीही जांभूळ बियांचे चुर्ण वापरले जात असे. जांभूळ बियांमध्येग्लुकोसाईड जांबोलिनहा ग्लुकोजचा प्रकार, शरीरातील साखर वाढल्यानंतर पिष्टमय पदार्थांचे साखरेत रूपांतर करण्यास प्रतिबंध करतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. चेहऱ्यावरील मुरूम आणि पुटकुळ्या घालवण्यासाठी जांभूळ बिया उगाळून लेप लावला जातो. जांभूळ फळ पाचक आहे. जांभूळ फळांपासून जेली, रस असे उपयुक्त पदार्थही बनवले जातात. जांभूळ सेवनांमुळे केस लांबसडक आणि मजबूत बनतात. जांभूळ फळामध्ये पॉटेशियम जास्त असते. पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर अशा त्रासासाठी जांभूळ रसाचे प्राशन करतात. शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी पाने आणि फळांचा उपयोग करण्यात येत असे. पंडुरोग किंवा ॲनिमिया, कावीळ, रक्तदोषविकारावर जांभूळ फळांमध्ये असणाऱ्या लोहामुळे गुण येतो.

चांगल्या पक्व जांभूळ फळांची चव चाखणाऱ्या माणसाला पुन्हा, पुन्हा ही फळे खावीशी वाटतात. या फळांच्या एक कप रसामध्ये १८१ किलोकॅलरी ऊर्जा असते. १०० ग्रॅम जांभूळ गरांमध्ये कर्बोदके १५.५६ ग्रॅम, मेद .२३ ग्रॅम, प्रथिने .७२ ग्रॅम, पाणी ८३.१३ ग्रॅम, जीवनसत्त्व बी- .००६ मिलीग्रॅम, बी- .०१२ मिलीग्रॅम, बी- .२६ मिलीग्रॅम, बी- .१६ मिलीग्रॅम, बी- .०३८ मिलीग्रॅम, जीवनसत्त्व १४. मिलीग्रॅम, कॅल्शियम १९ मिलीग्रॅम, लोह .१९ मिलीग्रॅम, मॅग्नेशियम १५ मिलीग्रॅम, फॉस्फरस १७ मिलीग्रॅम, पॉटेशियम ७९ मिलीग्रॅम आणि सोडियम १४ मिलीग्रॅम असते. काही प्रमाणात जीवनसत्त्व देखील असते. कोलिन आणि फोलिक आम्लही असते. मूतखडा, मूळव्याधीवरही जांभूळ फळे गुणकारी ठरतात. जांभूळ फळे अँटिऑक्सिडंटही असतात, त्यामुळे ते कर्करोग प्रतिबंधकही मानले जाते. चरकसंहितेत यकृतवृद्धीवर जांभूळ फळे खावीत, असे सांगण्यात आले आहे. वजनवृद्धी टाळण्यासाठी जांभूळ फळ उपयुक्त ठरते. मात्र जांभूळ फळे उपाशीपोटी खाऊ नयेत. कच्ची कीड लागलेली आणि अतिपिकलेली फळे खाऊ नयेत. पिकलेली जांभळी फळे स्वच्छ धुवून जेवणानंतर खावीत. जांभूळ फळांपासून वाईनही बनवण्यात येते.

जांभळाची पाने लोखंडाच्या भुशाबरोबर एकत्र मिसळून ठेवल्यास सहा महिन्यात उत्तम लोहक्षार तयार होतो. फार पूर्वीपासून जांभूळ वृक्षांची पाने सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरण्यात येत असत. पोटाच्या विकारावर जांभळाच्या सालीपासून औषध देतात. जांभळाच्या कोवळ्या पानामध्येजीवनसत्त्वही असते. दात आणि हिरड्या कमकुवत असल्यास सालीपासून औषध बनवतात. वारंवार होणाऱ्या गर्भपातावरही कोवळी पाने उपयुक्त ठरतात. जांभूळ मधही सध्या आयुर्वेदीक औषधाच्या दुकानात उपलब्ध असतो. जांभूळ वृक्षाच्या विविध घटकापासून करेला जामुन ज्युस, करेला जामुन पावडर, जम्बवासव, जम्ब्वासव, DIABIT capsules, DIABNEX Tablets, DIABOHILLS Tablet, DIACONT Tablets, मधुनाशिनी चुर्ण, Syziginium Jambolicum इत्यादी औषधी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मात्र यांचा वापर डॉक्टरी सल्ल्यानेच करावा.

जांभूळ वृक्षाच्या सालीमध्ये असणाऱ्या टॅनिनमुळे तीचा उपयोग कातडी रंगवण्यासाठी आणि कमावण्यासाठी केला जातो. सालीच्या आतील लाकूड पिवळसर फिकट तपकिरी किंवा लालसर रंगाचे असते. सालीला उग्र वास असतो. झाडाचे खोड सरळ वाढते. त्यापासून सरळ आणि लांब फळ्या मिळतात. जांभळाचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. लाकडाचा वापर घरबांधणी आणि गाड्यांच्या निर्मितीसाठी केला जातो. हे लाकूड पाण्यामध्ये कुजत नाही, त्यामुळे त्याचा वापर बोटींच्या निर्मितीतही केला जातो. लाकूड सरळ असल्याने बांधकामात खांब, तुळ्या आणि शेतीच्या अवजारासाठीही केला जातो. चांगल्या दर्जाच्या लाकडापासून भाकरी करण्यासाठी काटवट तयार करण्यात येते. जांभूळ वृक्षाचे लाकूड काटवटीसाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते. या झाडांच्या लाकडापासून मोठ्या प्रमाणात खेळणीही बनवली जातात. एक घनफुट लाकडाचे वजन वीस ते बावीस किलोग्रॅम इतके भरते. जळणासाठीही जांभळीचे लाकूड मोठ्या प्रमाणात वापरले जाते. शेवाळलेल्या, घाण पाण्यात जांभूळ वृक्षाची लाकडे टाकल्यास पाणी चांगलेच निवळते. फळमाशी आणि खोडअळी मात्र या झाडाला बांधली, तर लाकडाला आतमध्ये पोखरण्याचा प्रयत्न करते. मात्र या झाडाचे खोड चांगलेच ताकतवान असते. या झाडाच्या खोडात खिळा मारला, तर एका वर्षात त्याला जिरवून टाकण्याचे सामर्थ्य या झाडात असते. लाकडाच्या या गुणांमुळेच या झाडांचा घात होतो. लाकूड मिळवण्यासाठी आज या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येते. 

ll ll

जांभूळ या भागातील आद्य वृक्ष आहे. त्यामुळे येथील संस्कृतीमध्ये त्याचे प्रतिबिंब सापडते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जांभूळगाव आहे. जांभळे आडनावाची अनेक मराठी कुटुंबं आहेत. जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. जांभूळ वृक्ष हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये पवित्र वृक्ष मानला जातो. त्यामुळे या वृक्षाची लागवड अनेक मंदिराभोवती आणि बौद्ध स्तुपांच्या परिसरात लावण्यात येतो. बौद्ध धर्मग्रंथामध्ये भारतीय उपखंडाचा उल्लेख जम्बूद्विप असा आढळतो. भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्व इराण, रशियाचा आशिया खंडातील भाग, मंगोलियाचा वाळवंटाखेरीजचा चीनचा भाग, बांग्लादेश हा सर्व भाग यामध्ये समाविष्ट होता. बालपणी राजकुमार सिद्धार्थ जांभूळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसण्याचा अभ्यास करत, असे मानले जाते. तसेच तथागतांनी रोजच्या आहारात ज्या आठ फळांच्या रसग्रहणास अनुमती दिेली होती, त्यामध्ये जांभूळ फळांचा समावेश आहे

तिरूचिरापल्ली शहराजवळ प्रसिद्धजंबुकेश्वर महादेवमंदिर आहे. या मंदिराला हे नाव त्याच्या परिसरात असणाऱ्या अतिविशाल जांभूळ वृक्षामुळे मिळाले आहे. पूर्वी प्रत्येकाच्या दारात जांभूळ वृक्ष असायचा, असे म्हणतात. गणेश, महेश आणि कृष्णास जांभूळ वृक्षांची फुले प्रिय आहेत, असे मानले जाते. भारतातील काही भागात जांभूळ पानांचे तोरण बांधले जाते. ढगांचा राजा जांभूळ वृक्षाच्या रूपात पृथ्वीवर आल्यामुळे याची फळे जांभळ्या रंगाची आहेत, असा समज आहे. महाभारतातील भीष्म पर्वामध्ये भीष्मांनीया भागात असणाऱ्या विशाल जम्बूवृक्षांमुळे जम्बूद्विप असे नाव मिळाले,’ असल्याचे म्हटले आहे. रामायणांमध्ये सीतेच्या विरहात फिरणाऱ्या रामाने जांभूळ वृक्षाला मिठी मारूनसीता कोठे गेली?’ असे विचारल्याचा उल्लेख येतो. कालिदास यांना जम्बूवृक्षांच्या फांद्या नद्यातील पाणी अडवत असल्याचे दिसले होते. बाणभट्टांच्या कादंबरीमध्ये असणारा वैशंपायन नामक पोपट हा जम्बूवृक्षाच्या फळांचा रस पीत असे. गणेश वंदनेतही जांभूळ फळांचा उल्लेख येतो

ll गजाननं भूतगणादि सेवितं l कपित्थं जम्बूफलसार भक्षितमं ll 

ll उमासुतं शोक विनाशकारणम् l नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ll 

हत्तीसारखे मुख असणाऱ्या, ज्याची भुतादि गण सेवा करतात, पार्वतीचा पुत्र असणारा, जो कवठ आणि जांभूळ फळांचा रस खातो, जो सर्व दु:खाचा विनाश करतो, अशा गणेशाला वंदन करतो. बृहत्संहिता, कौटिलीय अर्थशास्त्र, महाभारताचे आरण्यक पर्व इत्यादी पौराणिक साहित्यात जांभूळ वृक्षाचा उल्लेख येतो. जांभूळ वृक्षाच्या उत्तरेस तीन हातापुढे दोन पुरुष खोलीवर पाणी मिळेल. तसेच जांभूळ वृक्षाच्या पूर्वेस जवळपास वारूळ असेल तर त्या वारूळाच्या दक्षिणेस दोन पुरूष खोलीवर चांगले पाणी मिळेल, असे अनुमान वराहमिहिरांच्याबृहत्संहिताग्रंथात ५४ व्या अध्यायात लिहिले आहे.   

जांभूळ फळाचा आणि झाडाचा उल्लेख मराठी भाषेतील शृंगारिक साहित्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. कदाचित हे जांभूळ फळाच्या कृष्णवर्णामुळे असावे. १९७७ साली प्रदर्शि झालेल्या जब्बार पटेल दिग्दर्शितजैत रे जैतया चित्रपटातील ना.धों. महानोर यांचे आशा भोसले यांच्या आवाजातील 

         जांभूळ पिकल्या झाडाखाली, 

ढोल कुणाचा वाजं जी...’ 

हे गीत आजही लोकप्रिय आहे. जांभूळ हा आदिवासींचा कल्पवृक्ष. हा वृक्ष बहरला की आदिवासी सर्वांना ढोल वाजवून बोलावतात आणि एकत्रित फळांचा आस्वाद घेतात. या प्रथेला अनुलक्षून महानोरांचे हे प्रसंगास साजेसे गाणे. मुळातून चित्रपट पाहताना समजून घ्यावे असे. ही प्रथा माहित नसणारांना गाण्याचा संदर्भ तसा लागत नाही. मात्र गाण्याचे बोल, आवाज आणि संगीत असा त्रिवेणी संगम इतका सुंदर आहे की, हे गीत अजरामर बनले. दादा कोंडके यांच्या १९७८ सालच्या गाजलेल्याबोट लावीन तिथं गुदगुल्याया चित्रपटामध्ये षा मंगेशकर यांच्या आवाजातील 

गळला मोहर झडली पालवी, फळे लागली निळी जांभळी

पिकलं जांभूळ तोडू नका, माझ्या झाडावरती चढू नका’,

हे राजेश मुजुमदारांचे गाणेही खूप गाजले. झाडाचे दिसणे आणि त्याचे मानवाला प्रिय असणे याबद्दल शेवटच्या कडव्यात खूप छान वर्णन आले आहे

भारी पिरतीनं पानाआड जपलं, रस चाखाया लई जन टपलं

इश्काच्या माऱ्यानं पाडू नका, कुणी झाडावरती चढू नका.’ 

याखेरीज ज्योती अहिरे यांनीहीपिकलंय जांभूळ झाडाचं तुम्ही, चाखून नका हो पाहू, खुशाल पाहा दुरून पाव्हणं, झाडाला हात नका लावू’, ही लावणी जांभूळ वृक्षाला मध्यवर्ती धरूनच लिहिली आहे. तर राज इर्मली यांचेजांभूळ नाय पिकली, बागेचा पिकला नाय तोह आंबा, बाबा आई तिची बोलताय लग्नाला दोन वर्ष थांबागीतही चांगलेच लोकप्रिय आहे.

जांभळाचं झाड इथल्या लोकसंस्कृतीतही मिसळून गेले आहे. पूर्वी जात्यावर दळण दळणे सुखकर व्हावे, म्हणून बायका ओव्या म्हणत. अशाच एका ओवीत 

रावणाच्या लंकेला लावियली जांभळं

पतिव्रता सीताबाई नाव रामाचं संभाळ’, 

असा पोक्त सल्ला दळणारी माता सीतेला देत असे. इतरही अनेक कवीनी जांभूळ वृक्षाला आपल्या कवितेत स्थान दिले आहे. ‘कसा जांभूळ तरूला, आला उत्फुल्ल बहर, उजाडल्या गोकुळात, टाहो फोडतात मोरअसे शंकर वैद्य लिहितात. तर कवी चंद्रशेखर गोखले जांभूळ वृक्षाशी आपले नाते बापलेकाचे असल्याचे सांगताना लिहितात 

अंगणात माझ्या उभे, जांभळाचे झाड एक

त्याचे माझे नाते असे, जणू बाप आणि लेक’. 

हे जांभळाचे झाड अनेक संकटात ताठपणे उभा राहायची शिकवण देत असल्याचेही ते लिहितात. बालकवींच्या पहिल्या कवितेतही जांभूळ दर्शन होते. तर कवी अनिल गव्हाणेझिम्मा जांभूळ वाऱ्याचाया कवितेतरानमेवा लुटण्यास, थवा आलाहो पोरांचा, झिम्मा रंगला रानात, असे जांभूळ वाऱ्यांचाअसे वर्णण करतात. कुसुमाग्रजांच्याकेव्हातरी मिटण्यासाठीचकवितेत जांभूळ खाल्ल्यानंतर त्यांचा निळा रंग जिव्हेवर तसाच राहतो, याचे वर्ण करताना लिहितात, ‘वाट केव्हा वैरीण झाली तरी झाडे प्रेमळ होती, लाल जांभळे भेटून गेली, साथीत उरली निळी नाती’. ना. धोंं. महानोर यांचे ग्रामीण जीवनाशी असलेले नाते खूप घट्ट आहे. त्यांच्या अनेक कवितांमध्ये विविध झाडे भेटतात. जांभळीचे झाड निश्चितच आणखी प्रिय असावे. ते चांगली बातमी जांभूळ झाडाला सांगायची इच्छा व्यक्त करताना 

बिलोरी हाताना, मोराचं गोंदण

चांदण्याचं बन बाई पेटलं पाण्यानं

जांभळीच्या झाडाला गंs सांगावा शकून’ 

असे लिहितात. तर गणेश शिवलद यांच्या कवितेतील अप्सरा मान मुरडत जांभूळ पिकल्या झाडाखाली येते.

जांभूळ झाड आणि फळे यांचा या भागातील मानवी जीवनावर मोठा प्रभाव असल्याने त्याचे मराठी साहित्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबिंब पडलेले दिसून येते. माकडाचे आणि जांभूळ फळांचे नातेही असेच घट्ट आहे. त्यावरून जातकामध्ये एक छान बोधकथा आहे. एका गावाजवळ तलावाच्या कडेला मोठा जांभूळ वृक्ष होता. त्या झाडावर रक्तमुख वानर रहात असे. एक दिवस त्याला झाडाखाली एक मगर विश्रांती घेत पडलेला दिसला. रक्तमुखाने झाडाची जांभळे तोडून त्याकडे टाकली आणि म्हणाला, ‘तू झाडाखाली प्रथमच आलास, तू माझा पाहुणा आहेस. म्हणून हे आददरातिथ्य!’ मगरला जांभळे आवडली. तो मगर रोज येऊ लागला. रक्तमुखही त्याला जांभळे देई. दोघात छान मैत्री झाली. पुढे मगर उरलेली जांभळे आपल्या बायकोला ने लागला. एक दिवस मगराची बायको म्हणाली, ‘जर ही फळे इतकी गोड असतील, तर ती रोज खाणाऱ्या तुमच्या मित्राचे काळीज किती गोड असेल. मला त्याचे हृदय खायचे आहे.मगर बायकोला ते अशक्य आहे, म्हणून सांगतो. मगराची बायको हट्टाला पेटते आणि रक्तमुखचे हृदय खायला दिल्यास अन्नपाणी त्यागून जीव द्यायची धमकी देते. मगराचा बायकोच्या हट्टापुढे नाईलाज होतो.

मगर दु:खी मनाने रक्तमुखजवळ येते. मगरला दु:खी पाहून रक्तमुख कारण विचारतो. तेव्हा बायकोने मित्राकडून रोज एवढी मधूर फळे आणता, पण त्या मित्राला अजूनही घरी बोलवले नाही, यावरून चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सांगतो. यावर रक्तमुख तुमच्या पाण्यातील घरात मी कसा येऊ शकेन अशी शंका व्यक्त करतो. त्यावेळी मगर तलावाच्या मध्यावर असलेल्या बेटावर घर असल्याचे सांगतो. तेथे माझ्या पाठीवर बसवून तुला नेईन, असे सांगतो. नवरा-बायकोत वाद वाढायला नको, म्हणून त्याच्या घरी जायला रक्तमुख तयार होतो. मगर वानराला पाठीवर घेऊन तलावाच्या बराच आत जातो. मात्र आपण त्याला फसवून नेत आहोत, याबद्दल त्याचे मन खात होते. आता रक्तमुख पळून जाऊ शकत नाही, याची त्याला खात्री झाली. आता तरी मित्राला आपण खरे सांगावे म्हणून मगर त्याला का घेऊन जातो आहोत, ते सांगतो. यावर माकड घाबरता म्हणतो, ‘अरे पण मी तर माझे काळीज झाडावरच ठेऊन आलो आहे. तिथ बोलला असतास, तर तुला तिथेच दिले असते ना’. मगर माकडाच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. झाडावरील काळीज घेण्यासाठी वानराला घेऊन परत झाडाजवळ येतो. तेथे येताच वानर टुणकण झाडावर उडी मारते आणि मगराला म्हणते, ‘अरे विश्वासघातकी. जा, तुझे तोंड काळे कर. तुझ्या तावडीतून सुटण्यासाठी मी थाप मारली. काळीज असे थोडेच बाहेर काढून ठेवता येते. माझा तुझ्यावर विश्वास नाही. जा, संपली आपली मैत्री.’ संकटाला धैर्याने तोंड दिले पाहिजे आणि विश्वासघातकी लोकांंपासून दूर राहिले पाहिजे, असे सांगणारी ही कथा.

हिंदी साहित्यिक कृष्ण चंदर यांचीजामुन का पेडही कथा तशी जुनी. मागील वर्षी ती पुन्हा नव्याने चर्चेत आली. चंद्रकांत ओंजाळ यांनी केलेला या कथेचा अनुवाद साधनामध्ये प्रकाशित झाला. वादळात जांभळाचे झाड पडते. त्याखाली एक शायर सापडतो. त्याची सुटका करण्याऐवजी ते झाड हटवणे हे कोणाचे काम यावर शासनाच्या विविध खात्यात कसा पत्रव्यवहार चालतो. धिकारी साधे कामही दुसऱ्याकडे कसे ढकलतात आणि यात सामान्य माणसाचा जीव कसा जातो. याचे सुंदर चित्रण या कथेत आहे. श्री.. पानवलकर यांचाजांभूळनावाचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. भास्कर चंदनशिव यांचीजांभळढव्हकथाही चांगलीच प्रसिद्ध आहे. व्यंकटेश माडगुळकर यांचेजांभळाचे दिवसहा कथासंग्रह आहे. यातील शीर्षक कथेतील नायक गावाकडे गेल्यानंतर जांभळे खात असताना समोर आलेली मुलगी चमन आणि तिच्याबद्दलचे विचार यामध्ये ही कथा फुलते. या कथेत जांभळे काढणे आणि खाण्याचे जांभळाइतकेच बहारदार आणि रसदार वर्ण आले आहे. तर इरावती कर्वे यांच्या परिपूर्तीया पुस्तकातीलमराठ्याचा मठ्ठपणाया कथेत जांभूळ विकणाऱ्याचे सुंदर वर्ण आहे. ‘गाजर दाखवणेया अर्थानेजांभूळ भरवणेअसा वाक्प्रचार वापरला जातो. तर अत्यंत आळशी माणसालाओठावरचे जांभूळ तोंडात पडायची च्छा धरणाराम्हणून ओळखले जाते. देवदार वृक्षांतजांभूळ देवदारम्हणून ओळखला जाणारा वाण उंच वाढत जातो.   

जांभूळ खाल्ल्यानंतर, रसाचा रंग जिभेला लागतो. गुपचुप जांभळे खाल्ली, तरी रंगीत जी सर्वांना बातमी सांगत असते. तसेच जांभूळ फळ दोन देठाचे म्हणून ओळखले जाते. याच बाबीचा आधार घेत महाभारताच्या कथानकास एक कथा जोडली गेली आहे. त्यावर विठ्ठल उमप यांनीजांभूळ आख्याननावाचे सुंदर नाट्य रचले. पांडव घरी नसताना एकदा कर्ण येतो. पाच पांडवाची पत्नी असणाऱ्या द्रौपदीच्या मनातकर्ण आपला सहावा पती असता तर..’ असा विचार येतो. देहाने नाही तर मनाने द्रौपदीचे पातिव्रत्य भंगले. तिने यात अडकू नये. बाहेर पडावे, यातून द्रौपदीची सुटका व्हावी, यासाठी कृष्ण पांडवांकडे येतो. सर्वांना वनभोजनाला घेऊन जातो. वनभोजनानंतर श्रीकृष्ण फलाहार करण्याची च्छा व्यक्त करतो. पांडव  फळे घेऊन आलेले नसतात. मग भीम वनातच फळे शोधू लागतो. त्या जांभूळ वनात कोठेच फळ नसते. अखेर एका झाडाच्या शेंड्याला एकमेव पिकलेले जांभूळ दिसते. तो ते तोडतो आणि श्रीकृष्णाला आणून देतो. ते फळ कोठून आणले, ते भीमाने सांगताच श्रीकृष्ण म्हणतो, ‘भीमाने मोठा अनर्थ ओढवून घेतला आहे. या झाडाखाली एक ऋषी कठोर तप करतात. ते दररोज त्या झाडाला येणारे एकमेव जांभूळ फळ खाऊन रहातात. पाणीही पीत नाहीत. आज त्यांना ते जांभूळ दिसले नाही, तर ते चिडतील आणि शाप देतील आणि त्यात पांडवाचा विनाश होईल’. यावर मार्ग म्हणून ते फळ पुन्हा देठाला जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम धर्माने आपले त्त्व पणाला लावून फळ देठाला जोडावे, असे श्रीकृष्ण सांगतो. नंतर पांडवातील प्रत्येकज आपले त्त्व पणाला लावतो. मात्र प्रत्येक पांडवाने त्त्व पणाला लावल्यानंतर जांभूळ केवळ एक हात वर जाते. अखेर द्रौपदीला तिचे पातिव्रत्य आणि त्त्व पणाला लावायला सांगण्यात येते. द्रौपदीने प्रयत्न करताच वर गेलेले फळ खाली पडते. असे का घडले, या प्रश्नाचे उत्तर कोणालाच माहीत नसते. द्रौपदीलाही आश्चर्य वाटते. ती श्रीकृष्णाला कारण विचारते. तेव्हा श्रीकृष्ण द्रौपदीला तिच्या मनात कर्णाला पाहून आलेल्या विचाराची आठवण करून देतात आणि ही बाब पांडवासमोर कबूल करण्यास सांगतात. त्यानंतर श्रीकृष्ण आपले कौशल्य पणाला लावून फळ देठाला जोडतात, मात्र ते उलटे जोडले जाते. तेव्हापासून जांभूळ फळ दोन देठाचे म्हणून ओळखले जाते.

परपुरूषाबद्दल द्रौपदीच्या मनात आलेला विचार नैतिकतच्या कसोटीवर अयोग्य असल्याचे बिंबवण्यासाठी हे कथानक जोडले गेले असावे. या एका छोट्या कथानकावर दोन तासांच्या जांभूळ आख्यानाचा प्रयोग रंगवला आहे. कथा छोटी असली तरी त्याचा साज आणि सादरीकरण इतके सुंदर आहे की कोठेही कंटाळवाणे बनत नाही. सुरुवातीस या कथेवर परभणीचे कलाकार कदम गोंधळी प्रयोग सादर करत. त्यांच्यानंतर जांभूळ आख्यानविठ्ठल उमप यांनी सुरू ठेवले. या प्रयोगासाठी सुरेश चिखले यांनी त्याचे पुनर्लेखन केले आणि उमप यांनी प्रयोग सुरू केले. लेखन आणि सादरीकरण अप्रतिम आहे. विठ्ठलजी द्रौपदीचा अभिनय इतका सुंदर करत की, ते पुरूष आहेत, हेही लक्षात येत नाही. संहितेत ग्रामीण बोलीभाषेतील शब्द वापरले आहेत. त्यामुळे लोक लगेच कथेशी जोडले जातात. मध्यवर्ती कवनात झाली सर्द गर्द, पाहून कामतीर, देह चळलं, हीचं देह चळलं, अन् कर्णाला पाहून, द्रौपदीचं मनं पाकुळलं’, हे ते असे सादर करत की प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर त्याक्षणी सुंदर रूपवती द्रौपदीच दिसते. आता नंदेश उमप हे प्रयोग सादर करत आहेत. खरे तर, जांभूळ आख्यान हा देवीच्या गोंधळाचा प्रकार. मात्र उमप यांनी त्याला अमाप लोकप्रियता दिली. उमपांमुळे जांभूळ आख्यान केवळ धार्मिक राहिलेले नाही.  

ll ll

संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेले जांभूळ माझ्याही बालपणापासून परिचयाचे झालेले. गावाजवळच्या सुभाषकाकांच्या लिंबारीनावाच्या शेताच्या पश्चिम बांधावर जांभळाचे झाड होते. त्याला टपोरी फळे येत. त्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला की आम्हाला समजायचे, जांभळे पिकली आहेत. या झाडाला फुले कधी आली, फळे कधी आली आणि कधी पिकली, हे कळायचेच नाही. खाली एकदोन पिकलेली फळे पडलेली असायची. आम्ही ती शोधत फिरायचो. सुरूवातीला एखाद दुसरेच फळ मिळायचे. आम्ही तेही वाटून खायचो. झाडावरच्या झाडांना दगड मारायचा आणि फळे पाडायचा विचारही करू शकत नव्हतो. पडलेल्या फळावरच समाधान मानावे लागत असे. त्यावेळी या झाडांची चारपाच फळे मिळाली की जो आनंद होत असे, तो अवर्णनी असे. त्या झाडाची फळे काढून ती काका विकत. फळे काढण्यासाठी ते फांद्या हलवत. झाडाखाली पडलेली पाने तशीच ठेवत. उलट खाली गवत पसरत. वरून पडणारी जांभळे फुटू नयेत म्हणून ही काळजी घेत. पण फांद्या हलवताच सडा घातल्यासारखी जांभळे पडत. पडलेली जांभळे पायाखाली ये देता गोळा करणे मोठे कौशल्याचे काम. पडलेली सर्व फळे गोळा करून चांगली फळे पाटीत भरत आणि मग ती विक्रीला नेत. फुटलेली, जास्त पिकलेली फळे गोळा करणाऱ्या मुलांची असत. पाटी भरून उरलेल्या सर्व फळांवर बालगोपाळांचा धिकार असायचा. त्यावेळी तेथे असणाऱ्या आणि जांभळे संपेपर्यंत तेथून जाणाऱ्या सर्व मुलांना हा मेवा चाखायला मिळायचा. मात्र एक दिवस एका लाकूड मिलमालकाची नजर या झाडावर पडली. त्याला बालगोपाळांच्या आनंदापेक्षा झाडाचा मोठा आकार दिसत होता. काकालाही फळे विकून येणारा थोडा, थोडा पैसा आणि बालगोपाळांच्या चेहऱ्यावरील जांभूळ खायला मिळाल्यावर ओसंडणाऱ्या आनंदापेक्षा एकदम येणारा पैसा मोठा दिसला. लवकरच त्या झाडाला कापण्यात आले. आमच्या डोळ्यादेखत त्याचे तुकडे पाडले. आम्ही विदीर्ण मनाने त्या हत्येकडे पाहात होतो. सुरुवातीला वरच्या जळणायोग्य फांद्या काढून त्याचा विस्तार कमी केला. नंतर ज्याची खेळणी, शेतीपुरक साहित्य बनवता येईल, अशा फांद्या कापल्या गेल्या. त्यानंतर बुंध्यावर कुऱ्हाड चालवण्यात आली. झाड एवढं मोठे होते की त्याला कापण्याचे काम चार-पाच दिवस चालले. झाडाच्या बुंध्यावर बसणारा प्रत्येक घाव आमच्या मनावरही बसत होता. त्यामुळे तो चाळीसेक वर्षांपूर्वीचा प्रसंग जसाच्या तसा आठवतो.

एक वर्ष असेच गेले. आमच्या काही मित्रानी पांगरी स्टेशनकडच्या एका शेतात जांभूळ असल्याचे सांगितले. बंजाऱ्याच्या शेताकडील झाडाचाही शोध लागला. मात्र या दोन्ही झाडांच्या फळांना ती चव नव्हती. ही दोन्ही झाडे काष्ठ जांभूळ जातीची होती. त्यातही बंजारा शेतातील झाड विहिरीच्या कडेला होते. निम्म्यापेक्षा जास्त जांभळे विहिरीत पडत. त्यामुळे आम्ही पांगरी स्टेशनजवळच्या शेतातील जांभळे खायला जायचो. असाच एक शनिवारचा दिवस. जूनची पहिल्या महिन्यातील शाळा. गुरूजीनी लवकर जायला सांगितले. मग आम्ही दफ्तर घेऊन तसेच गेलो. काष्ठ जांभळे भरपूर खाल्ली. किती वेळ गेला कळलेच नाही. वडील तेव्हा ममदापूरच्या शाळेत शिक्षक होते. त्यांची शाळा सुटल्यावर ते त्याच रस्त्याने घरी येत. त्यांना आम्ही तेथे गेलो आहोत, ही चुगली कोणीतरी केलीच. वडिलांनी आम्हाला तिथे शोधले नाही. सरळ घरी आले. आम्हीही जांभूळ खाण्याचा कंटाळा आल्यानंतर घरी आलो. आमची हजेरी सुरू झाली. त्यांना असे फिरणे आवडत नसे. वडिलांनी कुठे गेला होता?’ असे विचारले. आम्ही खोटे बोललो, ‘शाळा सुटल्यावर थेट घरीच आलो.’ आम्ही कदाचित खोटे बोलणार, हे वडिलांनी अगोदरच ताडले असावे. त्यामुळेच कदाचित त्या झाडाजवळ येऊन आम्हाला काही बोलले नसावेत.

आम्ही तसे सांगताच ते जवळ आले आणि जीभ बाहेर काढायला सांगितली. आता आपली चोरी पकडली जाणार, या भितीने गाळण उडाली. जीभ बाहेर काढताच खण्णकन कानाखाली बसली. ‘थेट शाळेतून घरी आला तर जीभ जांभळी कशी? शाळेत काय शाई पिलास? जांभळाच्या झाडाकडे कोण गेले होते? खरं बोलजांभळं खायला गेला होता की नाही?’ वडिलांचे करड्या आवाजातील शब्द कानात घुसत होते. आमची चोरी पकडली गेली होती. आता आणखी खोटे बोलणे म्हणजे छडीच्या प्रसादाला आणखी निमंत्रण ठरणार होते. निमूटपणे खाली मान घालून जांभळे खायला गेल्याचे मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. मान्य करूनही खोटे बोलल्याबद्दल आणखी चांगलाच मार मिळाला. जांभूळ खाल्ल्याचे कधीच लपून राहात नाही. वडिलांना आम्हाला जांभळे खायला गेलो का नाही, यापेक्षा आम्ही खोटे बोलतो की नाही, हे तपासायचे असावे. त्यामुळे तेथे येऊन त्यांनी अटकाव करणे टाळले. जांभळे खाण्याचा आनंद घेऊ दिला. घरी आल्यानंतर आम्ही खरे उत्तर देतो की खोटे, हे तपासले. म्हणूनच मारतानाही जांभळे खायला जाण्याबद्दल ते मारत नव्हते, तर खोटं का बोलला, असे म्हणत बडवत होते. त्या वेळेपासून कधी खोटे बोलण्याची वेळ आली की आमचे जांभूळ आख्यान आठवे.

त्यामुळे कधी खोटे बोलायचे धाडस झाले नाही. खोटे बोलणाऱ्याच्या जवळ राहावेसे वाटले नाही. मैत्री ठेवावीशी वाटत नाही. अर्थात, आजवर खरे बोलण्याचा अनेकदा फटका बसला, त्रास झाला. मात्र, जांभळाने दिलेली शिकवण आयुष्यभर जपत आहे. फार मोठी शिकवण देणाऱ्या या झाडाचे उपकार फेडता येणे शक्य नाही. मात्र शक्य असेल तेथे या झाडांची लागवड करतो. त्यांना जपतो, वाढवतो आणि मौसम आला की त्याची शिकवण आठवत, स्वत:च्या हाताने तोडून ताजी जांभळे खाण्याचा मनमुराद आनंद लुटतो.

ll इति जांभूळ आख्यान ll