मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

आंबट-गोड चिंच

 

चिंचेचे फळ सर्वांचे आवडते. चिंचेचे झाड कोणा प्रियकराला चिनार वृक्षापरी दिसते. हे झाड सावली, जनावरांना चारा, माणसाला लाकूड आणि फळे देतात. हे झाड फुलांच्या मोसमात पिकांचे परागीभवन करण्यासाठी उपयुक्त ठरते. या झाडाचे, फळाचे अनेक औषधी उपयोगही आहेत. हे झाड म्हणूनच गरीबालाही सावकार बनवते. अशा या बहुगुणी झाडाविषयी व त्याविषयीच्या आठवणी….

_______________________________________________________

हे चिंचेचे झाड, दिसे मज चिनार वृक्षापरी…’ हे गाणे नव्याने प्रेमात पडलेल्या अनेक तरूणांच्या तोंडी आपसुक येत असते. .दि. माडगुळकर यांचे मधुचंद्रया चित्रपटातील हे गीत, महेंद्र कपूर यांच्या आवाजात अजरामर झाले. या गाण्यावेळचा प्रसंग खूप मजेदार आहे. नायक आणि नायिका गावाबाहेर एका माळावर बसलेले आहेत. ती म्हणते, ‘सगळीकडे काटेच काटे. ही बोरीची, बाभळीची आणि चिंचेची झाडे असलेला माळ म्हणजे नंदनवन समजायचे काय?’ त्यावेळी नायक म्हणतो, ‘त्यातील सौंदर्य बघायला नजर लागते. नजर बदलून पाहिले, तर यातही नंदनवन दिसेल.त्यानंतर तो आपल्या डोळ्यावरील गॉगल तिच्या डोळ्यावर चढवतो आणि गाणे सुरू होते. यात नायक सांगतो, ‘हे चिंचेचे झाड मला काश्मीरमधील चिनार वृक्षाप्रमाणे दिसते आणि तू तर मला काश्मीची नवतरूणी भासतेस. वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी झेलमचे, तर, पिवळे गवत केशराच्या मळ्याप्रमाणे भासते.या नितांतसुंदर गाण्यामुळे सर्व मराठी भाषिकांच्या तोंडी गीतरूपाने चिंचेचे झाड आले.

तसेही चिंचेचे झाड नसले तरी, त्याचे फळ प्रत्येकाला आवडणारे. चिंच शब्द ऐकला तरी तोंडाला पाणी सुटते. सर्व वयोगटातील प्रत्येकाला चिंच हवी असते. चिंच खायला नको म्हणणारा तसा दुर्मिळच. प्रत्येकाच्या मनात चिंचेच्या अनेक आठवणी असतात - चिंचेप्रमाणेच आंबटगोड. तरीही हव्याशा वाटणाऱ्या. लहानपणी सर्वांनाच आंबट खाण्याची भारी हौस असते. कोवळ्या पोपटी चिंचा, रंग बदलत पांढऱ्या झालेल्या, पण चिंचोका नसलेल्या, त्यानंतर गाबोळी चिंच आणि शेवटी पक्व चिंचोके काढल्यानंतरची चिंच. चिंचफळ कोणत्याही टप्प्यावरचे असो, खायला सर्वाना आवडते.

चिंच भारतात विशेष प्रसिद्ध आहे. तसे हे झाड मूळ आपल्याकडील नाही, असे म्हणतात. चिंचेचे मूळ आफ्रिका खंडातील, असे वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात. मात्र भूशास्त्रज्ञांच्या मते, आफ्रिका आणि भारतीय उपखंड हे परस्परांना जोडलेले होते. ते नंतर दूरवर गेले. त्यासाठी अनेक पिकांचे, वनस्पतींचे आणि भूरचनेचे दाखले देतात. त्यामुळे चिंचेचे मूळ भारतातीलच आहे, असेही म्हणता येते. चिंच आफ्रिकेतून येवो किंवा मूळ भारतातील असो, आज चिंचेचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते, हे सत्य आहे. चिंचेचा वापरही भारतात मोठ्या प्रमाणात होतो. चिंचेचे सर्वच घटक मानवाला उपयुक्त ठरत असल्यानेज्याचे दारी चिंचेचे झाड, तो सावकार’, अशी म्हण तयार झाली. आजही ही म्हण तेलंगणामध्ये वापरली जाते.

मराठीत चिंच, हिंदीत आम्बली किंवा इमली, संस्कृतमध्ये तिंतिका किंवा अम्लिका, इंग्रजीमध्ये टामारिंड अशी नावे धारण करणारे हे फळ भारतात सर्वत्र वापरले जाते. याचे शास्त्रीय नाव टामारिंडस इंडिका असे आहे. चिंचेचे पक्व फळ खजुरासारखे दिसते. ‘भारतीय खजूरया अर्थाने अरबीमध्येटामार-उल-हिंदअसे म्हणत. त्यावरून पुढे टामारिंड नाव पडले, असे मानले जाते. त्यावरूनच या झाडालाइंडियन टामारिंडअसेही म्हणतात. ‘इंडिकाहा शब्दही भारतावरूनच आल्याचे मानले जाते. तुर्कीमध्ये चिंचेलादेमिरहिंदीम्हणतात. भारतीय उपखंड, आफ्रिका आणि अमेरिका अशा उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधातील वातावरणात चिंचेची झाडे वाढतात. चिंच हा दीर्घायुषी वृक्ष आहे. त्याची दोनशे वर्षांपूर्वी लावलेली अनेक झाडे तमिळनाडूमध्ये आजही आढळतात. महाराष्ट्रातही काही जुनी झाडे आढळतात. मात्र त्यांचे प्रमाण आता खूपच कमी झाले आहे.

भारतात रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी वडानंतर चिंचेच्या झाडाला पसंती दिली जात असे. वर्षभर हिरवे राहणारे झाड असल्याने त्याची सावली छान मिळते. आता त्याऐवजी रस्त्याकडेला विदेशी वाणांच्या झाडांची लागवड केली जाते. ही झाडे जरा जोराचा वारा सुटला की मोडतात. रस्ता अडवला जातो. चिंचेच्या झाडाच्या फांद्या मात्र कितीही मोठे वादळ आले तरी मोडत नाहीत. त्या वाऱ्याला अलगद रस्ता देतातसंकटाला वाट करून द्यायचे आणि आपण सुरक्षित राहायचे कसब चिंचेकडून शिकावे. भारतातील हिमालयामध्ये आणि राजस्थानच्या वाळवंटामध्ये फक्त हे झाड वाढत नाही. चिंचेचे झाड लावणेही सोपे. त्याच्या बिया सहज बांधावर टाकल्या तरी त्यापासून रोप उगवते. पूर्वी भारतात चिंचेची लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जात असावी. भविष्यपुराणातील एक श्लोक वृक्षासंदर्भात फार महत्त्वाचा आहे. ‘अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम। कपित्थबिल्वा मलकत्रयं पंचाम्रवापी नरकं पश्येत्। अर्थात पिंपळ, वड किंवा कडूनिंब यांच्यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल किंवा आवळा यापैकी कोणत्याही वृक्षाची तीन झाडे लावणारा नरकामध्ये जात नाही. स्वर्ग आणि नरक या कल्पना प्रत्यक्षात आहेत किंवा नाही, हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मात्र अशा प्रकारे झाडे लावणारा सुखी असेल, असा त्याचा आपण अर्थ घ्यायला हवा. ज्यावेळी निसर्गसंपन्न भूप्रदेश होता, त्यावेळी सांगितलेली ही बाब अर्वाचीन काळात समजत नाही, हे आपले दुर्दैव!

चिंचेच्या झाडाची निर्मिती त्याच्या बियांंपासून होते. मातीच्या संपर्कात पुरेशा प्रमाणात पाणी मिळाल्यास ते रूजतात. त्याच्या बियांच्या दोन दलांमध्ये एक कोंब घेऊन जमिनीवर येतात. ही दोन दले सुरूवातीला हिरवी असतात. नंतर रोप वीतभर उंचीचे होईपर्यंत ती पिवळी होऊन गळतात. त्यातून पोपटी रंगाची पाने येतात. ही पाने संयुक्त पाने असतात. सुरुवातीला खोडावर दोन बाजूला आलेली पाने ही एका शिरेभोवती दहा ते वीस छोट्या पानांच्या जोड्या घेऊन येतात. पानाची लांबी तीन ते सहा इंच असते. ही छोटी पाने, पाच ते सहा मिलीमीटर लांबीची असता. ती रात्री मिटतात. ही पाने चवीला आंबट असतात. लहान मुले-मुली अशा कोवळ‌्या पानांचा बोकाणा भरतात. छोट्या रोपांची पाने शेळ्या आणि मेंढ्याही आवडीने खातात. त्यामुळे अशा जनावरांची पोहोच असलेल्या रोपांना काटेरी कुंपण घातले जाते. झाडाची वाढ सुरुवातीला वेगाने होते. पिशवीत भरलेली रोपे तर तीन महिन्यांत एका फुटापर्यंत वाढतात. त्यानंतर त्याची वाढ हळूवार होते.

चिंचेची मूळे खूप खोलवर जातात. खडकाळ आणि कमी पाण्याच्या भागातही स्वत:ला जिवंत ठेवण्याचे कसब या झाडाकडे आहे. पाणी न देताही हे झाड वाढते. हळूहळू त्याच्या खोडाचा रंग पांढरट तपकिरी होत जातो. झाड जसे मोठे व्हायला लागते तसे खोडही आपला रंग बदलते. भरपूर पाणी असणाऱ्या भागातील चिंचेचे खोड हे गडद काळसर राखट किंवा तपकिरी रंगाचे असते; तर, कमी पाण्याच्या क्षेत्रातील खोडाचा रंग पांढरा, फिकट तपकिरी दिसतो. खोडाच्या सालीवर उभ्या भेगा किंवा खोल रेषा असतात. त्यांना दहा ते पंधरा सेंटीमीटरवर आडव्या भेगा तोडतात. बियांपासून तयार होणाऱ्या झाडाला फळे यायला दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागतो. आज योगेश्वरी २६३, अकोला स्मृती किंवा एकेटी-१०, पीकेम-, शरद, शिवाई, प्रतिष्ठान, अजिंठा ही चिंचेची संकरित वाणे लावून अगदी तिसऱ्या वर्षी फळे मिळविता येतात. चिंच सदाहरीत वृक्ष असला तरी उष्ण वातावरणात त्याची पानगळ होते. आपल्याकडे एप्रिल-मे महिन्यात पाने गळतात.

पानगळ संपल्यानंतर लाल आवरणाखाली पिवळसर पोपटी कोंब फुटतात. त्या पालवीसोबत गुलाबी पिवळ्या रंगाच्या कळ्या येतात. कळ्यांचा आकार शंकूसारखा असतो. कळ्यांची संख्या जास्त असते. पहाटे पाच ते आठ या वेळेत कळ्यांतून फुले उमलतात. चिंचेच्या फुलात अनेक रंगांचा सुरेख संगम झालेला असतो. लाल, पिवळा, गुलाबी रंगाची सुंदर संगती साधलेली असल्याने ही फुले मनाला भुरळ घालतात. फांदीच्या टोकाला फुलांचा गुच्छ येतो. फुले साधारण सव्वा ते दीड सेंटीमीटर लांबीची असतात. जमिनीकडे झुकलेली सुंदर फुले पाहताना सौंदर्य आणि विनयाचा अप्रतिम अविष्कार पाहावयास मिळतो. लहानपणी चिंचेच्या कळ्या अनेकदा आम्ही खायचो. फुले फुलू लागताच मुंग्यांची झाडावरील हालचाल वाढते. किटकांचे, मधमाश्यांचेही पिंगा घालणे सुरू होते. निसर्गातील मानवाखेरीज सर्व जीव इतरांकडून काही घेताना काही तरी देतात. आपण याला आज रिटर्न गिफ्टम्हणतो. मुंग्या, किटक ही मंडळीही चिंचेकडून आपले अन्न घेताना, फुलांमध्ये परागीभवन घडवून आणतात. अर्थात सर्वच फुलांमध्ये परागीभवन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलांची गळ होते. या काळात झाडाखाली पिवळ्या-लाल फुलांचा सडा घातला जातो.

परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण झालेल्या फुलांचे फळात रूपांतर होते. सुरुवातीला त्यातून तलवारीच्या आकाराची पोपटी कोवळी फळे दिसू लागतात. त्याभोवतीच्या सर्व पाकळ्या गळून जातात. काही दिवसाताच त्यांचा रंग हिरवा व्हायला सुरूवात होते. पुढे त्यावर तपकिरी रंगाचा वर्ख ये लागतो. तोपर्यंत आतले बी पांढऱ्या रंगाचे असते. प्रत्येक फळ हे एक ते पंधरा चिंचोके धारण करते. प्रत्येक चिंचोक्याच्या भागाला बोटक, बोटुक किंवा बुटुक म्हणतात. प्रत्येक बोटकानंतर फळाचा आकार आकुंचन पावलेला असतो. ही लांब फळे थोडी गोलाकार असतात. कमी बोटकांची फळे मात्र सरळ असतात. जास्त बोटकांच्या चिंचफळाला आकडा म्हणतात. सहा महिन्यानंतर फळ परिपक्वतेकडे वाटचाल करते. तेव्हा फळांचा रंग पांढरट तपकिरी झालेला असतो. आतले बी पक्व होताना साधारण साडेसहा महिन्यानंतर बियाभोवतीचा गर हा बाह्य आवरण किंवा टरफलापासून अलग व्हायला सुरुवात होते. या चिंचांना गाबोळ्याकिंवा गाभोळ्याचिंचा म्हणतात. त्या खायला सर्वांना आवडतात. विशेषत: डोहाळे लागलेल्या काळात महिलांची अशा चिंचांना विशेष पसंती असते. साधारणत: आठ महिन्यांनी चिंचा पूर्ण पक्व झाल्यानंतर पडतात. फळाचे देठ कठीण असते. पिकलेली चिंच सहा महिने पुढे झाडावर राहू शकते. अशा पडलेल्या चिंचा सापडू लागल्या की शेतकरी फांद्या हलवून किंवा काठीने झाड झोडपून फळे खाली पाडतात. चिंचेचे खोड आणि लाकडे वाकडी नसली, तरी फळे मात्र आकडा करतात.

 चिंचफळाचे टरफल किंवा बाह्य आवरण काढून टाकले जाते. त्याच्या आत गुळासारखा तांबडा किंवा पिवळा गर असतो. गराच्या आत चिंचोका किंवा बी असते. गर हा चवीला आंबट गोड असतो. गरावर शिरा असतात. फुगीर असणाऱ्या चिंचामध्ये गर जास्त प्रमाणात असतो. चिंचेच्या गरामध्ये २३९ किलो कॅलरी इतकी ऊर्जा असते. त्यामध्ये टार्टारीक आम्ल, शर्करा, जीवनसत्वे आणि क्षार असतात. शंभर ग्रॅम गरामध्ये ६२.ग्रॅम कर्बोदके (कार्बोहायड्रेट‌्‌) असतात. त्यातही ५७.४ ग्रॅम शर्करा आणि ५.१ ग्रॅम तंतूमय पदार्थ असतात. फॅट ०.६ ग्रॅम असतात. ट्रिप्टोफॅन, लायसीन आणि मिथिऑनीन हे प्रथिन घटक २.८ ग्रॅम असतात. चिंच गर जीवनसत्वांचे आगार आहे. त्यात जीवनसत्व अ, थायमीन (बी१), रायबोफ्लेवीन (बी२) नायसीन (बी३), पॅन्टोथेनीक आम्ल (बी५), जीवनसत्व बी६, फोलेट (बी९), कोलीन, -जीवनसत्व, -जीवनसत्व आणि के-जीवनसत्व असतात. त्याचबरोबर कॅल्शियम, कॉपर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पॉटेशियम, सेलेनियम, सोडियम आणि जस्त (झिंक) या मूलद्रव्यांचे क्षार असतात. तर पाण्याचे प्रमाण ३१.४० ग्रॅम असते.

चिंचेचा गर भारतात मसाल्याप्रमाणे वापरला जातो. घराघरां विविध खाद्यपदार्थ बनवताना चिंच वापरली जाते. भेळ, पाणीपुरी, आंबील (काही भागात), सांबर या पदार्थांसाठी चिंच अत्यावश्यक असते. त्यामुळे उन्हाळ‌्‌याच्या सुरुवातीला पिकलेली फळे काढली जातात. त्याचे टरफल बाजूला काढूगर आणि बी वेगळे केले जाता. गर वाळवून मीठ लावून वर्षभराच्या वापरासाठी जतन केले जातात. बियांसह गर जतन करावयाचा झाल्यास हवाबंद अवस्थेत ठेवणे आवश्यक असते. तसे न केल्यास कीड लागण्याचा धोका संभवतो. चिंचेच्या गरापासून सिरप, रस, रसाचा संपृक्त अर्क, शितपेय, पेस्ट बनवली जात. भारतातून निर्यात होणाऱ्या मसाला पदार्थामध्ये चिंचेचा सहावा क्रमांक आहे. चिंचेचा वापर भांडी स्वच्छ करण्यासाठीही केला जातो. विशेषत: तांबे, पितळ आणि चांदीच्या भांड्यांना आणि वस्तूंना चकाकी आणण्यासाठी चिंच उपयुक्त ठरते.   

गरामध्ये चिंचोका अथवा बी असते. गडद काळसर चॉकलेटी रंगाच्या आवरणात दोन पांढऱ्या भागांनी मिळून बी बनते. चिंचेचे बी हे द्विदल आहे. चिंचोक्यात प्रामुख्याने प्रथिने, शर्करा, तंतूमय पदार्थ आणि पाणी हे घटक असतात. अनेक लोक चिंचोके भाजतात आणि शिजवून किंवा भिजवून खातात. आम्हाला असे चिंचोके खायला घरात बंदी होती. वडील रागावायचे. मात्र ते कोठे गावी गेले की आईकडे हट्ट करून आम्ही इच्छा पूर्ण करून घ्यायचो. भाजलेले चिंचोके खाणे हा त्या काळात आणखी एक आवडता भाग होता. खूप वेळ तोंडात ठेवल्यावर तो खाता येत असे. दहावीत असताना एका मुलाने असा तोंडात चिंचोका ठेवला होता. वर्गात तो खात असल्याने सरांनी त्याला तोंड उघडायला सांगितले. तो तोंड उघडायला तयार नव्हता. शेवटी सरांनी पाठीत जोरात एक धपाटा मारला आणि त्याच्या तोंडातून चिंचोका बाहेर पडला. त्यावरील आवरण काढून टाकल्यानंतर ते चविष्ट लागतात. चिंचोकेही विकत घेतले जातात. चिंचोक्याच्या भुकटीमध्ये सरस घालून ती जोड भरण्यासाठी वापरली जाते. तसेच लाकडासाठी लुकण तयार केले जाते. चिंचोक्याची खळ बनवून ती घोंगड्या, कांबळींना लावल्यास ताठपणा येतो. चिंचोक्यापासून काढलेले तेल अनेक कारणासाठी वापरतात. तसेच त्याची भुकटीही खळ तयार करण्यासाठी वापरतात.         

चिंचेची टरफले, पाने आणि फुलांचा पडलेला कचरा कुजवू त्यापासून खत तयार केले जाते. या खतामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. चिंचेच्या कोवळ्या फांद्या गोठा बांधताना लाकडांना आणि वरच्या गवताला बांधण्यासाठी वापरतात. लाकूड शेतीची अवजारे बनवताना काही प्रमाणात वापरले जाते. कायम बांधकामासाठी मोठे लाकूड वापरत नाहीत. मात्र कायम पॉलीश करावयाच्या फर्निचरसाठी ते वापरले जाते. चिंचेच्या झाडाचे सर्व भाग मानवाच्या उपयोगाला येतात. चिंचेच्या फळाला वीस हजार रूपये क्विंटलपेक्षा जास्त दर मिळतो. मोठ्या वृक्षाला दी ते दोन क्विंटल चिंच सहज मिळते. तर जुनी झाडे तीन-साडेतीन क्विंटल चिंच उत्पादन देऊ शकतात.

सहज बांधावर उगवलेल्या झाडाला लहानपणी जपले की ते आपल्याला आयुष्यभर जपते. हे झाड दीर्घायुषी असल्याने त्याचे उत्पादन पुढच्या पिढीलाही मिळते. चिंचेचे आरोग्यासाठी खू फायदे आहेत. चिंचेपासून मिळवलेले चिंचलावण तेल पोटदुखीवरचे उत्तम औषध म्हणून सुपरिचित आहे. पक्व चिंच वात, पित्त आणि कफ शामक आहे. चिंचेचे सरबत पित्त आणि उष्णताशामक आहे. तोंडाला चव येण्यासाठी मी लावलेली चिंच खातात. मुका मार लागलेल्या जागेवर चिंचोक्याचा लेप लावतात. त्यामुळे सूज आणि वेदना कमी होते. काविळ रूग्णांना अनेक वैद्य चिंचेचे सरबत घेण्यास सांगतात. चिंचेच्या फुलांचा रस मुळव्याधीवर पिण्यास सांगतात. चिंच खाल्ल्यास पचनशक्ती वाढते. पावसाळ्यात पायांना चिखल्या पडल्यास चिंचेचा गर लावला जातो. चिंचेच्या फुलांचा गुलकंदाप्रमाणे बनवलेला पदार्थ पित्तशामक आहे. काही आदिवासी लोक चिंच पाने आणि फुलांची भाजी करतात. तसेच त्याच्या फुलांची चटणी लोक आवडीने खातात. अनेक जीवनसत्वे आणि क्षारांचे आगार असणारी चिंच आपणास हृदयविकार, रक्तदाब, संधीवात, एनिमिया, दातदुखी आदी अनेक व्याधींपासून दूर ठेवण्यास सहाय्यकारी आहे. तसेच चिंच स्नायुंचे मजबुतीकरण, रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ, वजन कमी करणे, त्वचेला चकाकी येणे न्श्युलिन पातळी नियंत्रण इत्यादीसाठी उपयुक्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. असे हे बहुगुणी झाड शेतकऱ्याच्या शेताची शोभा तर वाढवतेच, पण पैसेही मिळवून देते.

चिंचेवर फारशा म्हणी वाक्प्रचार ऐकायला मिळत नाही. आमच्या लहानपणी शेजारी नानी आजी होती. बोलताना कायम म्हणी वाक्प्रचार वापरणारी, अन् नवऱ्याला कायम टोमणे मारणारी. ती नवरा काही बोलला की म्हणायची, ‘चिंचचा आंबटपणा जाईल, पण तुमचा खवूटपणा काय जायचा नाही.चिंचेच्या झाडावर जास्त कविताही नाहीत. मात्र ज्या आहेत त्या मानवी मनाच्या हळव्या कोपऱ्यांना स्पर्श करणाऱ्या आहेत. स्वाती फडणवीस या आपल्या कवितेतआंबट गोड नात्यांना चिंचेच्या आकड्याची उपमा देताना म्हणतात, ‘चिंचेचा आकडावाकडा गं…, पेरापेरात गाठीबाटी गं…, चिंच जशी आंबट-गोड नाती गं’. शिला अंभुरे यांनीहीचिंचेच्या झाडावर बालकविता लिहिली आहेविक्रांत तिकोणे यांनी चिंचेचे आणि चिंचफळाचे अचूक वर्णण केले आहे. ते म्हणतात, ‘ फळ आम्र, चिकू, केळी, जरी मधूर चविष्ट, चिंच सम्राज्ञी रसांची, करी स्मरणे प्रकट’. कवी, लेखक देवा झिंजाड यांनी स्त्रीमनाला चिंचेशी जोडून ‘चिंचा’ ही सुंदर अन मनाला भिडणारी, अस्वस्थ करणारी कविता लिहिली आहे. तर आनंद जोर्वेकर यांचीचिंचेचे झाडआणि नवनाथ माझिरे यांचीशाळेकडेची चिंचया कविता प्रत्येकाला आपल्या शालेय जीवनाची आठवण करून देतात. मी मुलुंडच्या बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाचा विद्यार्थी असताना शाळेच्या मागील बाजूला एक चिंचेचे झाड होते. त्याच्या चिंचा दगडाने पाडून आम्ही मित्र-मैत्रिणी खायचो. त्या विद्यालयातील मराठीचे राठोड सर आणि इंग्रजीचे उत्तम पोटे सर यांनी एकदा चिंचा खाताना पकडले. साऱ्या चिंचा काढून घेतल्या. ‘पुन्हा तेथे जायचे नाही, चिंचा पाडायच्या नाहीत’, असे सांगितले. तरीही आमचा चिंचांचा मोह काही सुटत नसे. त्यांची नजर चुकवून चिंचा पाडायचो.

चिंचेचे आणि पक्ष्यांचेही नाते फार जवळचे आहे. चिंचेला मोहोर येताच त्यावर पोपटांचे थवे येऊन बसतात. चिंचेचे झाड जुने असले तर त्याच्या कापलेल्या फांद्याच्या ठिकाणी ढोली तयार होतात. त्यामध्ये पोपट आपले घर-संसार थाटतात. पिवळ्या चिमण्यांचाही मोहोराच्या दिवसात या झाडावर वावर वाढतो. सुगरण नदी-ओढ्याकडेच्या बाभळीच्या झाडावर घरटे बांधायला पसंती देते. मात्र बाभळीसारखी काटेरी झाडे नसली तर चिंचेचे झाड ती निवडते. चिंचेच्या फळानी वाकलेल्या फांदीच्या टोकाला आपले घरटे बांधते. इतरही अनेक पक्षी चिंचेवर वास्तव्याला असतात. 

चिंचेच्या झाडाचा आणि माझा ऋणानुबंध जन्मापासूनचा. आमच्या गावाचे नावच मुळात चिंचोली. नाव चिंचोली असले तरी गावात चिंचेची झाडे नव्हती. आम्हाला आठवणारे एकच चिंचेचे झाड होते. ग्रामदैवत निळकंठेश्वराच्या मंदिराकडे जाताना बार्शी-लातूर रोडवर भलेमोठे झाड. त्या झाडाबरोबर आमच्या गावातील सर्वांचे बालपण जोडले गेले होते. त्या झाडांच्या चिंचांनी अनेक पिढ्यांच्या जिव्हांना पाणी सुटण्यास भाग पाडले होते. शिक्षणानिमित्त गाव सोडले आणि या झाडाच्या आठवणीवर धूळ साठली. एक दिवस व्हॉटसअपवर हे झाड पडल्याची वृत्तपत्रातील बातमीची क्लीप आली आणि मी अस्वस्थ झालो. काहीच सुचत नव्हते. जवळचे माणूस गेल्याचे दु: मनभर दाटले. मन मोकळे करायचे म्हणून संगणकासमोर बसून या झाडाबाबतच्या सर्व आठवणी आणि भावना शब्दात मांडल्या; तेव्हा कुठे मन शांत झाले. त्यावेळी माझ्या लक्षात आले झाड माझ्या मनाच्या किती आत खोलवर रुजले होते, बसले होते. नोकरीनिमित्त बाहेर राहू लागल्यानंतर गावी गेले की निळकंठेश्वर मंदिराला भेट व्हायची. आज त्या झाडाच्या जागेकडे पाहिले की झाड नसल्याचे पाहून मन उदास होते.

हे झाड रस्त्याच्या कडेला होते. मालकी सर्वांची, मात्र जबाबदारी कोणाचीच नाही, अशी त्याची अवस्था. फळे सर्व जण चाखत. मात्र त्याला हानी पोहोचताना कोणीच लक्ष देत नसे. एकदा रस्ता दुरूस्ती करताना डांबर वितळवण्यासाठी या चिंचेच्या फांद्या तोडल्या. मी त्या कंत्राटदाराशी भांडण काढले होते. कंत्राटदाराचे काम संपल्यानंतर सर्वजण निघून गेले. त्यानंतर मी डांबर वितळवायच्या यंत्रावर दगड मारून माझा राग शांत केला होता. त्यानंतर तर ते झाड मला जास्तच आवडू लागले होते. या झाडाच्या आंबटगोड चिंचांनी जो आनंद दिला तो अवर्णनी आहे. चिंचेची पिकलेली फळे पडायला लागली की आम्ही झाडाकडे चक्कर मारायचो. दगड मारून चिंचा खायच्या. पिकलेल्या चिंचांतील चिंचोके काढून गर कुटायचा आणि तिखट-मीठ मिसळून एकजीव गोळा करायचा. तुरीच्या बारीक काडीला लावला की आमचे बालपणचेलॉलीपॉपतयार व्हायचे. कितीतरी वेळ ते चोखत, त्याचा आनंद घेत, आम्ही शेतातून हुंदडायचो.

चिंचातून निघालेले चिंचोके हे फोडून त्याचे दोन भाग करायचे काम कौशल्याचे असे. असे दोन भाग झाले की त्याला आम्हीचंपुळ्याम्हणायचो. आजच्यालुडोखेळाला बनवणारा लहानपणी चंपुळ्या खूप खेळला असावा कारण त्यात आणि चंपुळ्या खेळात मोठे साम्य आहे. या चंपुळ्यांचा खेळ उन्हाळ्याच्या सुट्टीतील आमचा आवडता खेळ. उन्हात फिरायचे नाही. मग वेळ घालवायला हा खेळ उपयोगाला यायचा. हारणाऱ्याला पाणी घालावे लागे आणि जिंकणाऱ्याला तीन वेळा हुकेपर्यंत फटके खावे लागत. यात भांडणेही खूप व्हायची. पण ती लगेच विसरली जायचीहा खेळ महाराष्ट्रात सर्वत्र खेळला जातो. नियम वेगळे असतात. पण हरणाऱ्याला शिक्षा तीच. कोयासारखा अखंड चिंचोक्याचाही खेळ असायचा. पण चंपुळ्यांची मजा त्याला यायची नाही. पावसाळ्यातही या झाडाखाली आमच्या फेऱ्या होत असत. झाडाखाली नुकतेच रूजलेले बी शोधायचो. त्या अंकुरणाऱ्या रोपांसाठी दोन्ही दलामध्ये अन्न साठवलेले असते, हे आम्हाला त्यावेळी कळत नसायचे. आम्ही ती दोन्ही दले आमच्या आनंदासाठी रोपापासून काढायचो. त्याच्या मध्यभागी बाभळीचा काटा बसवायचो. यातून आमची भिंगरी तयार व्हायची. असले खेळ खेळत निसर्गाच्या सान्निध्यात आमचे बालपण फुलले, वाढले. पुढे आमच्या शेतात चिंचेची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. त्याला फळे येऊ लागली. मात्र मनाची ओढ जुन्या झाडाकडेच होती. आमच्या शेतातील झाडाच्या चिंचा काढण्यासाठी दगड मारावे लागत नव्हते. त्या हाताने तोडता येत. त्यामुळे बालपणीचा दगड मारून चिंचा पाडून खाण्यातील आनंद येथे मिळत नाही.

चिंचेच्या गर्द फांद्यां अनेक मधमाशांची पोळी असायची. दिवसा त्यांच्या गर्द फांद्यांमध्ये असणारे मधाचे पोळे लक्षात यायचे नाही. चिंचेच्या झाडांची पाने संध्याकाळी मिटतात, हे माझ्या संशोधक मनाने टिपले होते. चिंचेच्या झाडावरील पोळी शोधण्यासाठी मी सांजवेळी त्या झाडाखाली जात असे आणि त्या झाडावरची सर्व पोळी शोधून ठेवत असे. संध्याकाळी मध काढला तर तो पूर्ण मिळत नाही. त्यामुळे हे काम दुपारी करावे लागते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मध काढायचे काम होत असे. एका चिंचेच्या झाडाला आठ ते दहा मधाची पोळी सापडत. झाड मोठे असेल तर यापेक्षाही जास्त. यातून एका दिवशी एका झाडावरच्या पोळ्यातून लिटर- दी लिटर मध मिळत असे.

पुढे कोल्हापुरात विद्यापीठातील एफ- धिकारी निवासस्थानात राहायला आलो. या घराच्या कोपऱ्यावर एक चिंचेचे झाड होते. त्याला भरपूर चिंचा येत. त्या झाडावर चढून मी अनेक वर्षे चिंचा काढत असे. त्या चिंचेच्या झाडाची फळे नऊ वर्षे आम्ही खाल्ली. फळे खाताना बालपण आठवत राहिलो. झाडाकडे पाहत नकळतमधुचंद्रमधीलहे चिंचेचे झाड दिसे…’ हे गीत गुणगुणत राहिलो. पानाफुलापासून प्रत्येक गोष्ट निसर्गाला समृद्ध करण्यासाठी देणाऱ्या चिंचेची शेकडो झाडे लावत राहिलो...

(उगवलेल्या रोपाचे छायाचित्र मा. अशोक अरगडे यांच्या फेसबुक पोस्टमधून साभार घेतले आहे.)


२९ टिप्पण्या:

  1. सर फार छान, आमचे लहानपणीच्या आठवणी यामुळे जागृत झाल्या आम्हीपण गाभुळलेल्या चिंचा भरपूर खाल्ले आहेत चिंचोक्या सहित... धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. आमच्या पिढीच्या भावविश्वात झाडांचे अनेक आठव आणि दिवसभर खेळण्याचे उंडारण्याचे दिवस यांचे संदर्भ गच्च रुतून आहेत. खिसा भरून चिंचा काढणे आणि मोठ्या रुबाबात गल्लीत वाटणे, यात मौज होती. आत्ताची पिढी या निर्भेळ आनंदा पासून वंचित आहे.

    संत जनाबाईचे वास्तव्य गोपाळपूरात दिंडीरवनात होते. असा उल्लेख आहे. हे दिंडीरवन म्हणजे चिंचबनच होते. वसंत बापटांच्या फुंकर कवितेत चिंचेच्या आकड्याचा भावात्मक उल्लेख आहे. या लेखामुळे हे सारे आठवले. सुंदर लेखाबद्दल हार्दिक अभिनंदन🎉🎊

    उत्तर द्याहटवा
  3. चिंचेचे झाड आणि पक्षी यांचे जवळचे नाते आहे. विशेषतः पोपटांचा थवा चिंचेवर पाहायला मिळतो. काही पक्षी चिंचेच्या ढोलीत घर करतात. तुरुतुरु धावणारी खार चिंचेच्या झाडावर पाहायला मिळते

    उत्तर द्याहटवा
  4. चिंचेच्या झाडा बद्दल लिहिलेल्या लेखाच्या माध्यमातून आम्हाला उपयुक्त माहिती समजली आणि चिंचेची असणारे बहुगुनी गुणधर्म समजले आपण लिहिलेल्या लेखाबद्दल सर आपणास खूप खूप धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  5. चिंचेवरचा हा लेख खूप आवडला. माझ्या आजोळी चिंचेची बाग होते होती. या बागेत माझे बरेच बालपण गेले आहे. त्यामुळे चींचोशी एक अनामिक असे नाते आहे. या नात्याची आठवण या लेखाने झाली. चिंच आता आपल्या आहाराचा भाग झाली आहे. परंतु लहानपणी तिचे अनेक उपयोग आम्ही पाहिले आहेत. माझ्या गावाकडे सहा महिने कोसळणारा प्रचंड पाऊस आणि भरणारी हूडी यावर मात म्हणून पावसाळ्यात चिंचोके भाजून खाण्याची पद्धत आहे. त्यासाठी उन्हाळ्यात परसात किंवा बांधावर असणाऱ्या चिंचा गोळा करायच्या आणि चिंचोके वेगळे करून त्याचे गोळे बनवून ठेवायचे. ही चिंच माशाची आमटी करताना आणि इतर काही खाद्यपदार्थात वापरत असायची आणि चिंचोके गाडगे भरुन ठेवली जायची. हे चिंचोके चांगले वाळवून त्यांचा खणखणीत आवाज आम्ही ऐकत असू अशी खणखणीत वाजणारी चिंचोके गाड्यात जतन होत. पाऊस सुरू झाला, तो चांगला मुरला आणि घनदाट थंडी वाजू लागली की या या चिंचोक्याच्या गाडग्याची आठवण येत असे. चुलीवर तवा ठेवायचा आणि लागतील तसेच चिंचोके भाजून खिसा भरून घ्यायचा. आणि दाताखाली सगळत फोडत बसायचे. शाळेत जाताना खिशात भाजके चिंचोके न्यायचे. शिवाय सुट्टीदिवशी चिंचा आणायच्या त्या पाट्यावर त्यामध्ये चटणी मीठ टाकून त्याचे गोळे बनवायचे आणि हे गोळे तासनतास चाटत बसायचे. अशा अनेक गोष्टी चिंचेशी निगडीत आठवत राहिल्या. लेख खूप माहितीपूर्ण आणि उपयुक्त एका अनवट विषयावर दीर्घ लेख वाचायची संधी मिळाली. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  6. I remember my childhood days to read nice information... Thank you very much appreciated for this article.. 💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  7. सर
    खूप छान वाटले वाचताना.लहानपणीची आठवण झाली शाळेत चिंचेचा गोळा मीठ लावलेला.चिंचोके साठवून आम्ही नक्का दुव्वा हा खेळ खेळायचो.हा खेळ फार कमी लोकांना माहिती आहे.चार कालींचा एक गंडा वगैरे.चिंच खाऊन बऱ्याच वेळा दात आंबायचे.
    वाह वाह सुंदर,मस्त.

    उत्तर द्याहटवा
  8. खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहे सर, तुम्ही मुळचे फिजिक्सचे आहात असे वाटत नाही...

    उत्तर द्याहटवा
  9. व्वा, प्रियाराधनेपासून ते आरोग्यराधनेपर्यंतची चिंच मस्तच ..
    छान..

    उत्तर द्याहटवा
  10. 'हे चिंचेचे झाड...' या चित्रपट गीताने प्रेमीकाच्या प्रणयराधनेसंदर्भात लेखाची सुरुवात करून त्याचा शेवटही त्याच गीताने केला आहे; पण त्याचा संदर्भ मात्र बालमनाच्या विविध कंगोऱ्यासह कमालीचा बदलला दिसतो.
    चिंचेच्या झाडाची जन्मकथा आणि कुलकथा सांगत,त्याच्यातील जीवनसत्त्वसंदर्भात शास्त्रीय विवेचन करत,चिंचेचे झाड,फळ आणि मानवी जीवन यांचा एक भावबंध चित्रमय शैलीत रेखाटला आहे.
    निसर्गाच्या सानिध्यात जे जीवन आपण जगतो आहोत; ते किती अद्भूत आणि वैचित्र्यपूर्ण आहे, करुणा आणि हास्यास्पद विसंगतीने भरलेलं आणि ससुसंगतीत ओवलेलं आहे याचा प्रत्यय देणारा हा लेख आहे.
    व्यक्ती आणि तिचे भावविश्व हे चिंचेच्या झाडाच्या माध्यमातून व्यक्त करणे हे लेखाचे केंद्र आहे. निसर्गाविषयीच्या विविध भावबंधाच्या कलात्मक संवादी रचनेची भलावण येथे प्रत्ययला येते. यातून लेखकाचा निसर्गाकडे पाहण्याचा, त्यातून जीवन व्यवहार समजून घेण्याचा प्रचंड व्यासंग दृष्टीस पडतो. विचारांची परिपक्वता, मार्मिक शब्दयोजना, विशिष्ट प्रसंगातील कोटीबाजपणा आणि प्रौढ भाषाशैली अशा लेखनावश्यक गुणानियुक्त संपन्न असा हा लेख आहे.
    लेखाच्या शेवटी गाव, शिवार, शिवारातील माणसं आणि चिंचेचे झाड यांच्यातील जोडलेले एक अतूट नाते रेखाटले आहे. यातून लेखकाच्या बालवयातील बालमानस अगदी सहजतेने प्रत्ययाला येतो. रस्त्याकडेच्या "त्या" चिंचेच्या झाडाची फांदी कामगाराने तोडल्याने तेथील यंत्रावर दगड मारून लेखक आपला राग व्यक्त करतो आणि शांतही होतो. या प्रसंगातून निरागस बालमनाचे आणि मानवतेच्या विकासाचे दर्शन घडते.
    शेवटच्या टप्प्यात लेखक विद्यापीठात अधिकारी होऊन तेथेच राहतो. त्याच्या घराशेजारी चिंचेचे झाड आहे; हा योगायोग जरी असला तरी त्या झाडाकडे पाहत पाहत 'हे चिंचेचे झाड...' असे गुणगुणताना मानवी जीवनात निसर्ग कसा कसा अनुभव देतो हे गावाकडील उन्मळून पडलेल्या "त्या" चिंचेच्या झाडाच्या माध्यमातून अनाकलनीय अनुभवांची वीण गुंफत असावा असे नक्की वाटते.
    अलीकडे डॉ. व्ही. एन. शिंदेसर वैज्ञानिक लेखनाकडे अधिक वळलेले आढळतात; पण त्यांचा हा लेख वाचल्यास मराठीत वैज्ञानिक ललित लेखनाचा अव्वल नमुना ठरावा असा आहे. भविष्यकाळात त्यांच्याकडून यासारखे नाविण्यपूर्ण लेखन सतत होत राहो; जेणेकरून मराठी साहित्य शारदेच्या कंठावर वैज्ञानिक ललितलेखन प्रवाह हा आणखी एक नवा दागिना तिची शोभा वाढवत राहील.

    उत्तर द्याहटवा
  11. खुप छान माहितीपुर्ण लेख आहे सर

    उत्तर द्याहटवा
  12. नमस्ते सर, खूप छान माहिती मिळाली आणि माझे बालपण सुद्धा आठवले.

    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा !!!

    राजेंद्र मोरे, मुंबई.

    उत्तर द्याहटवा
  13. 'सहज बांधावर उगवलेल्या झाडाला लहानपणी जपले की ते आपल्याला आयुष्यभर जपते.' असं झाड,पाना फुलात रमत अगदी सहज आणि अत्यंत नितळ भाषेतील हा लेख झालाय सर.तसा मी तुमचा जुना वाचक आहे. पण प्रत्येक लेखात तुमची मांडणी वेगळी असते.तशी ती या लेखातही जाणवते.'लहानपणी एखाद्या झाडाला जपल्यावर ते आपल्याला आयुष्यभर जपते'अशी निसर्ग प्रेमी जाणीव करून दिलीत.दिल खुश हुआ ...

    उत्तर द्याहटवा
  14. खुपच छान लिहिले आहे....मला पण आपल्या जडाची आठवन ज़ाली...मी उन्हालयचया सट्टी मधे सगळा मुक्काम तिथेच असायचा...आज पुन्हा लहान जलो..

    उत्तर द्याहटवा
  15. सर्वांचे मनापासून आभार... लवकरच आणखी एका अश्याच झाडाबद्दल... लेख घेऊन येत आहे..

    उत्तर द्याहटवा
  16. Casinos of New Jersey - DRMCD
    Find all the casinos in New Jersey online. Get latest casino news, reviews, and exclusive promo codes for all 수원 출장샵 your favorite slot and table games!Deposit Bonus: 100% up to $2000Deposit Methods: 광양 출장안마 Bitcoin eCheck: Instant WithdrawalFinder: InteracCheck: 나주 출장마사지 InteracCheck Out: 11:00 AM Rating: 용인 출장샵 4 · 원주 출장안마 ‎Review by drmcd

    उत्तर द्याहटवा